About

Monday 19 September 2016

मराठ्यांना शैक्षणिक सवलती हव्यात

मराठा समाजाचे मोर्चे हा व्यवस्थेने केलेल्या दीर्घकालीन गळचेपीचा परिपाक आहे. व्यवस्था ही सर्वजातीय घटकांनी बनलेली आहे. त्यात गडगंज मराठा घराणीही आलीच. पण काही मोर्चा विरोधकांनी फक्त याच गोष्टीचे भांडवल करायला सुरवात केली आहे. तथापि विरोधकांनी आकसापोटी मांडलेला एक मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे.

मराठा समाजातील दिग्गजांच्या ताब्यात अनेक शिक्षण संस्था आहेत हे वास्तव आहे. आज मराठा समाजापुढील सर्वात गंभीर प्रश्नांपैकी एक शिक्षण आणि नोकरी हा आहे. मराठा आरक्षण कायदेशीर लढाईअंती मिळेलच.. पण मराठा समाजाच्या ताब्यातील शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजासाठी खास राखीव कोटा आणि फीमध्ये सवलत असण्यास काहीच हरकत नाही.

अल्पसंख्य कम्युनिटीच्या शिक्षण संस्थांमध्ये त्यांच्या कम्युनिटीसाठी खास राखीव कोटा व खास सवलती असतात. ही त्यांची समाजाप्रति असणारी बांधीलकी आहे. एकमेकांना धरून राहण्याच्या आणि समाजाभिमुख वृत्तीमुळे या अल्पसंख्य कम्युनिटी बहुसंख्याकांना मागे टाकून पुढे गेल्या आहेत.

सोलापूरमधील टॉपचे कॉलेज म्हणून वालचंद कॉलेजकडे पाहिले जाते. ही संस्था जैन समाजाची असून जैन समाजाच्या मुलांना संस्थेत 40 % राखीव प्रवेश कोटा आहे. अश्या बहुसंख्य संस्थांच्या घटनेतच तशी तरतूद करुन ठेवलेली आहे. हा प्रयोग सर्व मराठा शिक्षण संस्थांनी अंमलात आणायला हवा.  आज मराठा नेते आणि शिक्षण सम्राट जे काही आहेत त्यात मराठा समाजाचा सिंहाचा वाटा आहे. समाजाचे ऋण मान्य करुन त्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

पवार साहेबांचे विद्या प्रतिष्ठान आहे,  पतंगराव कदमांचे भारती विद्यापीठ आहे. वैरागचे बाळासाहेब कोरके यांच्या शे दोनशे शिक्षण संस्था आहेत. बार्शीची जगदाळे मामांची शिक्षण संस्था आहे. रयत शिक्षण संस्थेवर देखील मराठा समाजाचेच वर्चस्व आहे. डी वाय पाटील आहेत, विखे पाटील आहेत. अजुनही अनेक मराठा धुरीणांच्या अश्या खंडोगणती शिक्षण संस्था आहेत.

सोशल मिडियावरील सर्व सुशिक्षित मराठा तरुणांनी यापुढील मोर्च्यांत मराठा समाजाच्या शिक्षण संस्थांमध्ये मराठा मुलांना 40 % राखीव कोटा आणि फी मध्ये 50 % सवलत ही जोडमागणी लावून धरायला हवी. यात येऊ शकणाऱ्या  कायदेशीर अडचनींवर मार्ग काढण्यात यावा किंवा योग्य पर्यायी मार्गांचा विचार व्हावा.

©सुहास भुसे


No comments:

Post a Comment