काल सांगलीत झालेल्या शिवसन्मान जागर परिषदेवर संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून जितेंद आव्हाड यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. कालपासून चेह्रापुस्तीकेवर याविषयी उलट सुलट पोस्ट चा पाउस पडतोय. आव्हाडांना फोडला, तोडला, अडला, नडला वगैरे भाषेत. आता या पोस्ट खऱ्या आहेत असे गृहीत धरू. संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांवर हल्ला करून आव्हाडांना मारले. तिथल्या स्टेजवरील सन्माननीय लोकांना मारले. त्यांची गाडी फोडली वगैरे. यात समर्थन करण्यासारख काय आहे ? किंवा अभिमानाने सांगण्यासारखे काय आहे? जितेंद्र आव्हाड हे त्यांची बाजू ती चूक असेल किंवा बरोबर असेल...लोकशाही मार्गाने मांडत आहेत. त्यांच्यावर हल्ला करणे हा मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न नाही का ? कि हा प्रकार म्हणजे त्यांच्या विचारांचा सामना विचाराने करता येत नाही या पराभूत मानसिकतेतून झाला आहे ? जितेंद्र आव्हाड हे खरेच बोलत आहेत याचे प्रमाणपत्र तर नव्हे ना हे ?
अश्याच पोस्ट जेव्हा दाभोळकर आणि पानसरे यांचा नृशंस भ्याड खून करण्यात आला (कि वध ?) तेव्हाही पडत होत्या. त्याचे समर्थन करणारे आणि कालच्या घटनेचे समर्थन करणारे एकाच मानसिकतेचे लोक आहेत. किती दिवस चालणार आहे हि ऐतिहासिक मुस्कटदाबी अजून ? त्यावेळेसही आव्हाडांना धमक्या दिल्या जात होत्या. आता तिसरा नंबर आव्हाडांचा अश्या स्वरूपाच्या पोस्टही काही लोक फेसबुकवर टाकत होते. आणि दाभोळकर पानसरे आव्हाड यांचे फोटो एका ओळीत..दाभोळकर पानसरे यांच्या फोटोवर एलीमिनेटेड च्या खुणा व आव्हाडांच्या फोटोवर प्रश्नचिन्ह हा प्रकारही अनेकांनी पाहिला असेल.
प्रश्न कोणाची बाजू बरोबर किंवा चूक हा नाही. तर ती बाजू कशी मांडली जाते हा आहे. आपल्या लोकशाहीने आपल्याला अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे.प्रत्येकजण त्याला पटणारी बाजू मांडू शकतो. अस असताना हे हिंसक हल्ले करणे, धमक्या देणे असे प्रकार का करावे लागतात ? जर तुमच नाण खणखणीत आहे जर तुमची बाजू योग्य आहे तर ती लोकशाहीप्रधान मार्गाने मांडा. काय चूक काय बरोबर याचा फैसला लोक करतील. ही वैचारिक मुस्कटदाबी हा अंतर्गत दहशतवादाचाच प्रकार आहे. बाह्य दहशतवाद मोडून काढता येऊ शकतो. पण हा अंतर्गत दहशतवाद त्याहून घातक आहे. यात अनेकांचे हितसंबंध गुंतले असल्याने भारतासारख्या देशात तो मोडून काढणे खूप कठीण आहे. तो फोफावायच्या आतच त्याचा बिमोड करणे गरजेचे आहे.
आता काल प्रत्यक्षात काय झाले ते पाहू आव्हाड हे संभाजी भिडेंना अपशब्द वापरतात. अपशब्द काय तर एकेरी उल्लेख करतात असे कारण देऊन भिडेंच्या गुंडांनी शिवसन्मान जागर परिषदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आधी बाहेर उभी असलेली आव्हाडांची गाडी फोडली. तेव्हा आव्हाड हे अर्थातच स्टेजवर होते. नंतर हे पाच पंचवीस गुंड मोठ्या आवेशात स्टेज वर घुसले. लगेच तिथे असलेल्या चार दोन पोलिसांनी त्यांना अटकाव केला. आव्हाडांना त्यांचे वारेदेखील लागले नाही. त्यांचा प्रयत्न हाणून पाडत स्टेजवरील आणि प्रेक्षकांतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या गचांड्या धरून स्टेजवरून खाली फेकले. आणि गराडा घालून लाथा बुक्क्यांनी त्यांना यथेच्छ बडवले. खुर्च्यांचा त्यांच्यावर पाउस पडला. tv9 मराठी, मी मराठी, एबीपी माझा, झी न्यूज जय महाराष्ट्र सर्व चानेल वर हे फुटेज कालपासून दाखवत आहेत. इच्छुकांनी प्रत्यक्ष बघून खात्री करून घ्यावी. एक पांढरा शर्ट आणि एक चटयापट्याचा टी शर्ट घातलेल्या गुंडाला तर कपडे फाटेस्तो फोडलेले फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
दाभोळकरांवर पानसरेंवर हल्ला करणारे वेगळे असतील पण कालचा हल्ला आणि त्यामागील मानसिकता तीच आहे. पण इथ गोम अशी आहे की दाभोळकर किंवा पानसरे यांच्यासारखे जितेंद्र आव्हाड हे असंरक्षित सामाजिक कार्यकर्ते नाहीत. राजकीय नेते असल्याने आणि त्यांची बाजू खरी असल्याचे कालच्या हल्ल्याने सिद्ध झाल्याने त्यांच्यामागे भरपूर जनाधार आहे. तेव्हा “ इथे उपाय केलिया अपाय होईल !” असा संदेश कदाचित हल्ला करणाऱ्या गुंडांना नक्कीच मिळाला असावा.