About

Sunday 23 April 2017

पुरोगामी शरद पवार

शरद पवार साहेबांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक विधायक व महत्वाची कामे पार पाडली आहेत. त्यापैकी काही कामे पुरोगामी चळवळीला वरदान ठरणारी आहेत.

महात्मा फुले जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने फुले चरित्र समितीची स्थापना केली होती. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने 16 खंडात महात्मा फुले यांचे समग्र वाङमय इंग्रजी, हिंदी व मराठी या तीन भाषांत प्रसिद्ध केले.

साधारण त्याच सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्यही पवार साहेबांनी 18 खंडात व इंग्रजी, मराठी या दोन भाषांमध्ये प्रसिद्ध केले.  तसेच पवार साहेबांनी या फुले-आंबेडकर समग्र साहित्य खंडांच्या जनआवृत्त्या काढायचे ठरवले. त्यामुळे हे साहित्य मुबलक प्रतींमध्ये व अत्यल्प दरात सामान्य वाचकांसाठी उपलब्ध झाले.

काही दिवसांपूर्वी एका प्रकाशक मित्रासोबत एका दुर्मिळ पुस्तकाबद्दल चर्चा सुरु होती . मित्राला प्रकाशित करण्यासाठी ते पुस्तक हवे होते . पण त्याची छापील प्रतच त्याला एक वर्षापासून उपलब्ध होत नव्हती. चर्चेच्या ओघात त्या प्रकाशक मित्राने सांगितले की सांस्कृतिक सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची मांडणी करणारी अशी अनेक दुर्मिळ पुस्तके आज पुर्नप्रकाशनासाठी उपलब्ध नाहीत. भारताचा जातीय व वर्चस्ववादी इतिहास पाहता असं होण्याचे कारण स्पष्ट आहे.

महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे क्रांतिकारी मूल्य व स्वरूप पाहता हे साहित्य जर राज्य शासनाने प्रसिद्ध केले नसते तर कदाचित त्यापैकी अनेक पुस्तके आज उपलब्ध नसली असती. आणि कदाचित चार्वाक साहित्याप्रमाणे इतरत्र सापडणाऱ्या खंडणमंडणावरून आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागला असता.

हे रचनात्मक काम हा पवार साहेबांच्या पुरोगामी कारकीर्दीतला मानाचा तुरा आहे आणि त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप करणारांना सणसणीत चपराक आहे..

- पुस्तक दिनाच्या निमित्ताने

©सुहास भुसे


Tuesday 4 April 2017

राम हा रामच !

रामाबद्दल काही थियऱ्या आजकाल वाचण्यात येत आहेत.
राम नावाची कोणी व्यक्ती नव्हतीच तर
1. पुष्यमित्र शृंग हाच राम होता.
2. सम्राट अशोक हाच राम होता.
3. इजिप्तचा फॅरोव रामासीस हाच खरा राम.

रामायण महाभारत हे निव्वळ काव्य आहे असे मानले तरीही त्यातले महानायक शतकानुशतके जनसामान्याच्या मनात घर करून राहिले आहेत याकडे डोळेझाक करता येणार नाही. इतर पूर्णपणे काल्पनिक महाकाव्यांच्या बाबतीत हे झालेले दिसत नाही. इतिहासपौराणिक मिथके उलगडताना
"कथेशिवाय दंतकथा होत नाही " या महत्वाच्या नियमाकडे डोळेझाक करून चालणार नाही. घटना प्रक्षिप्त करून वेगळ्या पद्धतीने मांडणे वेगळे आणि टोकाचे बदल करून पूर्ण पात्रच दुसऱ्या पात्रावर थोपणे वेगळे.
शंभू महाराजांचा इतिहास प्रक्षिप्त करून त्यांच्यावर नसलेली व्यसने थोपता येतील पण शंभू महाराज ही व्यक्तीच नव्हती असं दाखवून ते चरित्र पूर्णपणे दुसऱ्याच पात्राचे आहे वगैरे बदल करणे शक्य आहे काय ?

दुसरी गोष्ट रामायण काल्पनिक की सत्य इतिहास ?
या संदर्भात एक समांतर किस्सा अगदी पाहण्यासारखा आहे. आपल्या रामायण महाभारताप्रमाणेच ग्रीस मध्ये होमर या महाकवीची इलियड आणि ओडिसी ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. रामायण महाभारताप्रमाणेच ती ही काल्पनिक मानली जात होती. त्यातील अखिलीस, हेक्टरसारखे महानायक देवतास्वरूप मानले जात. अ‍ॅगॅमेम्नॉन खलनायक तर हेलन म्हणजे प्रतिद्रौपदी किंवा सीताच.. युद्धाचे कारण. पण हेन्रिच श्लीमन या ध्येयवेड्या माणसाने आपले पूर्ण आयुष्य ट्रॉयसाठी समर्पित करून ट्रॉय हे शहर उत्खनन करून शोधून काढलेच. आणि अख्खे जग विस्मयचकित झाले. ही पुरातत्वशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घटना होती. एक दंतकथा इतिहासाचे रूप घेऊन समोर आली होती.

काळाचा प्रवाह अनंत आहे. त्याचे आपल्याला झालेले ज्ञान म्हणजे दर्यामे खसखस. पुराणऐतिहासिक गोष्टींबद्दल ठाम मत मांडणे कठीण आहे. काळाच्या पटाला शक्यतांचे अनेक पदर आहेत. न जाणो येत्या काही शतकात अयोध्या, द्वारका किंवा हस्तिनापूरही ट्रॉय किंवा मायसिनीप्रमाणे जसेच्या तसे सापडू शकेल. त्यामुळे राम नव्हताच, कृष्ण नव्हताच, ही युद्धे कधी झालीच नाहीत वगैरे निष्कर्ष काढणे भविष्यात सणकुन तोंडावर आपटवणारे ठरू शकते.

©सुहास भुसे