About

Thursday 3 November 2016

ऊसाचे अर्थकारण

राजू शेट्टी यांची ऊसाला 3200 रूपये दर देण्याची मागणी आणि पवारांनी त्यांना दिलेले उत्तर हा विषय सध्या चर्चेत आहे. साखरेचा दर आणि ऊसाला देण्यात यावा किंवा दिला जाऊ शकेल असा रास्त दर याबद्दल बऱ्याच प्रमाणात संभ्रम दिसून येतो. उदा. समजा साखर सरासरी 30 किलो प्रमाणे विकली गेली. तर कारखान्याला ऊसा पासून प्रतिटन किती उत्पन्न मिळू शकेल ?

थोड़े गणित मांडू ...

साखर उतारा चोरण्यात आपले कारखानदार निष्णात आहेत. दाखवलेला साखर उतारा 11, 12 ते 13 इतका असतो, पण तो विश्वसनीय नाही. पूर्वी हडकी ऊस असायचा, पाडेगाव नावाचे सुधारित बेणे आले, मग को 7219 ,को 265 अशी सुधारित बेणी आली. दर वेळी जास्तीत जास्त साखर उतारा हे टारगेट ठेऊन उसाच्या प्रजातित सुधारणा करण्यात आल्या.
सध्या को 671, को 86032, को 94012 या अत्यंत सुधारित जातीच्या ऊसाची लागवड करण्यात येते. अगदी निरपेक्ष साखर उतारा तपासला गेलाच तर तो नक्कीच 15 च्या आस पास असू शकतो.

साखर उतारा अर्थात एक टन ऊसापासून किती क्विंटल साखर मिळते त्याचे प्रमाण.  जर आपण अंदाज केलेला 15 चा उतारा ग्राह्य धरला तर एक टन ऊसापासून 30 रु किलो च्या भावाने 4500 रु ची साखर मिळेल. जर कारखाने जाहीर करतात तो 11 ते 12 चा उतारा ग्राह्य धरला तर 3500 ते 3800 रु ची साखर मिळेल.

ऊसापासून मिळणारी साखर हा उत्पन्नाचा एक भाग झाला. ऊस हा नारळाप्रमाणे कल्पतरु आहे. त्याचा कोणताही भाग वाया जात नाही. कारखाने ऊसापासून साखरेव्यतिरिक्त मद्यार्क हे महत्वाचे उत्पादन घेतात. मद्यार्कापासून मद्य तयार होते. शिवाय मळी खत म्हणून विकली जाते, चोयांचा भुस्सा विकला जातो. अनेक कारखान्यांचे को जनरेशन प्रकल्प आहेत. त्यांमार्फत विज विकली जाते. काही कारखान्यांचे प्रायोगिक तत्वावर इथेनॉल प्रकल्प सुरु आहेत.

या सर्व सहउत्पादनांपासून कारखाना प्रतिटन अंदाजे 1000 ते 1500 रु सहज मिळवू शकतो.

आता साखरेचे 3800 किंवा 4500 आणि हे 1000 किंवा 1500 मिळून होतात 4800 किंवा 6000 रूपये.

प्रतिटन मेन्टेनेन्स खर्च किती होतो ?
काही छोटे कारखाने 1500 टनी काही 2500 टनी काही 3500 तर काही 5000 टनी आहेत. रोजी होणाऱ्या या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गाळपामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होते. मागे एकदा शरद जोशीनी मांडलेल्या आकडेवारी नुसार हा उत्पादन खर्च 600 रु ते 650 रु प्रतिटन इतका आहे. जोशिंच्या वेळेपासून आतापर्यन्त यात जास्तीत जास्त दुप्पट वाढ झाली अस ग्राह्य धरुन हा खर्च आपण 1200 रु प्रतिटन पर्यंत आणु.

आता आपण गणित मांडलेल्या अंदाजे कमीत कमी व जास्तीत जास्त उत्पन्नातुन हा खर्च वजा करू. 4500 दर घेतला तर उरतील 3300 रूपये आणि 6000 दर घेतला तर उरतील 4800 रूपये .

यानुसार कारखान्यानी ऊसाला प्रतिटन 3200 रूपये किमान भाव देण्यास काहीच हरकत नाही.

हे गणित सर्वसाधारण व ढोबळ आहे. यात चूका असू शकतील पण ऊसाच्या अर्थकारणाचा सर्वसाधारण अंदाज येण्यास हे पुरेसे आहे. राजू शेट्टी काय म्हणतात किंवा सध्या ते काय करतात हा राजकीय वादाचा मुद्दा आहे. किंवा सत्तेत त्यांची होत असलेली मुस्कटदाबी आणि त्यांची सत्तालोलुपता हा ही चर्चेचा विषय होऊ शकेल. पण ऊस उत्पादकांना ऊसाचे अर्थकारण व्यापक प्रमाणावर समजावून देणारी राजू शेट्टी ही पहिली व्यक्ती आहे. कारखानदार उसाला 800 रु 900 रु देऊन लोकांची लूट करत होते त्या काळात उसाला 1600 रु म्हणजे जवळ जवळ दुप्पट भाव मिळवून देण्याचे शेट्टी यांचे श्रेय नाकारता येणार नाही.

बाकी राजकारण बाजूला ठेऊन कधीतरी ऊस दराच्या मागनीचा शेतकरी केंद्रीभूत ठेऊन सहानभूतिपूर्वक विचार व्हायलाच हवा.
©सुहास भुसे.