About

Showing posts with label हिंदू धर्म :एक मुक्त चिंतन. Show all posts
Showing posts with label हिंदू धर्म :एक मुक्त चिंतन. Show all posts

Tuesday, 4 April 2017

राम हा रामच !

रामाबद्दल काही थियऱ्या आजकाल वाचण्यात येत आहेत.
राम नावाची कोणी व्यक्ती नव्हतीच तर
1. पुष्यमित्र शृंग हाच राम होता.
2. सम्राट अशोक हाच राम होता.
3. इजिप्तचा फॅरोव रामासीस हाच खरा राम.

रामायण महाभारत हे निव्वळ काव्य आहे असे मानले तरीही त्यातले महानायक शतकानुशतके जनसामान्याच्या मनात घर करून राहिले आहेत याकडे डोळेझाक करता येणार नाही. इतर पूर्णपणे काल्पनिक महाकाव्यांच्या बाबतीत हे झालेले दिसत नाही. इतिहासपौराणिक मिथके उलगडताना
"कथेशिवाय दंतकथा होत नाही " या महत्वाच्या नियमाकडे डोळेझाक करून चालणार नाही. घटना प्रक्षिप्त करून वेगळ्या पद्धतीने मांडणे वेगळे आणि टोकाचे बदल करून पूर्ण पात्रच दुसऱ्या पात्रावर थोपणे वेगळे.
शंभू महाराजांचा इतिहास प्रक्षिप्त करून त्यांच्यावर नसलेली व्यसने थोपता येतील पण शंभू महाराज ही व्यक्तीच नव्हती असं दाखवून ते चरित्र पूर्णपणे दुसऱ्याच पात्राचे आहे वगैरे बदल करणे शक्य आहे काय ?

दुसरी गोष्ट रामायण काल्पनिक की सत्य इतिहास ?
या संदर्भात एक समांतर किस्सा अगदी पाहण्यासारखा आहे. आपल्या रामायण महाभारताप्रमाणेच ग्रीस मध्ये होमर या महाकवीची इलियड आणि ओडिसी ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. रामायण महाभारताप्रमाणेच ती ही काल्पनिक मानली जात होती. त्यातील अखिलीस, हेक्टरसारखे महानायक देवतास्वरूप मानले जात. अ‍ॅगॅमेम्नॉन खलनायक तर हेलन म्हणजे प्रतिद्रौपदी किंवा सीताच.. युद्धाचे कारण. पण हेन्रिच श्लीमन या ध्येयवेड्या माणसाने आपले पूर्ण आयुष्य ट्रॉयसाठी समर्पित करून ट्रॉय हे शहर उत्खनन करून शोधून काढलेच. आणि अख्खे जग विस्मयचकित झाले. ही पुरातत्वशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घटना होती. एक दंतकथा इतिहासाचे रूप घेऊन समोर आली होती.

काळाचा प्रवाह अनंत आहे. त्याचे आपल्याला झालेले ज्ञान म्हणजे दर्यामे खसखस. पुराणऐतिहासिक गोष्टींबद्दल ठाम मत मांडणे कठीण आहे. काळाच्या पटाला शक्यतांचे अनेक पदर आहेत. न जाणो येत्या काही शतकात अयोध्या, द्वारका किंवा हस्तिनापूरही ट्रॉय किंवा मायसिनीप्रमाणे जसेच्या तसे सापडू शकेल. त्यामुळे राम नव्हताच, कृष्ण नव्हताच, ही युद्धे कधी झालीच नाहीत वगैरे निष्कर्ष काढणे भविष्यात सणकुन तोंडावर आपटवणारे ठरू शकते.

©सुहास भुसे


Sunday, 29 November 2015

शनीदेव आणि बदलता सांस्कृतिक प्रवाह

      शनिदेव ही आपल्या तेहत्तीस कोटी देवांमधली सर्वाधिक दरारा असणारी देवता आहे. शनीची साडेसाती म्हटल की भल्याभल्यांचा थरकाप उडतो. शनीची वक्रदृष्टी ज्याच्यावर पडली त्याची खैर नसते. माणसे ती माणसे पण अगदी देवांची देखील या साडेसातीपासून सुटका नाही. त्यामुळेच सर्व देवदेवता देखील शनीमहाराजांना टरकून असल्याचे दिसते. ही वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून सर्वचजण काळजी घेतात. साडेसातीमध्ये शनीदेवांना खुश ठेऊन साडेसाती कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. विविध व्रते पूजा गंडे दोरे ताईत खडे अंगठ्या रत्ने तेल यांचा धंदा शनीदेवांमुळे तेजीत असतो. किंबहुना असे म्हणता येईल की धर्माचा ७५% धंदा याच शनीची साडेसाती या कल्पनेवर आधारित आहे. पण शनीदेवही असे वस्ताद असतात की यापैकी कशालाच ते दाद देत नाहीत. साडेसातीवाल्याला साडेसात वर्षे दे माय आणि धरणी ठाय करून सोडतात म्हणे. या साडेसात वर्षात त्याला खूप दुखांचा तर सामना करावा लागतोच शिवाय त्याला जे करेल त्या कामात अपयश येते. काही पापी नास्तिक लोक म्हणतात की समजूत म्हणजे आपल्या अपयशाचे खापर शनीदेवाच्या माथ्यावर फोडण्याची सोय आहे. म्हणोत बापडे. त्यांना समजेल साडेसातीमध्ये शनीदेवांचा इंगा. शनिदेवाच्या पुराणकथा देखील या भीतीला बळकटी मिळावी अश्याच शनीदेवांच्या क्रूरतेचे दर्शन घडवणाऱ्या आहेत. विशेषतः साडेसातीमध्ये या कथा वाचतांना तर भाविक भक्त अधिकच घाबरून जातात. व्रत नको पण कथा आवर अशी अवस्था होत असावी त्यांची.

शनीदेवाची मूर्ती देखील क्वचित कुठेतरी घडीव मानवी आकारातली असेल. नाहीतर सर्वत्र एक उंच दगड किंवा शिळा असते. ती शिळा देखील कोणत्यातरी कोपऱ्यात , रस्त्याच्या  कडेला किंवा नाक्यावर छोटेसे मंदिर असते त्यात. शनी शिंगणापूरसारखा विस्तृत चबुतरा एखाद्याच शनीशिळेच्या नशिबी. त्यांना न पूरण पोळीचा नैवेद्य असतो न कोंबडी बकऱ्याचा तिखट प्रसाद. शेंदूर तेल आणि रुईची माळ बस. कदाचित शनिदेवांच्या मागे देखील हीच साडेसाती लागली असावी.
अस असल तरी शनी हि फार प्राचीन लोकदेवता आहे बर का. भारतीय शनीदेवांचे हे भयंकरीकरण नक्की केव्हा झाले हे ज्ञात नसले तरी शनीदेव हे सर्वच काळ दुख आणि दैन्याची देवता नव्हती. जगातील विविध प्राचीन संस्कृतीत देखील शनीदेवांच्या पूजनाची परंपरा आहे. प्राचीन ग्रीक संस्कृतीत शनीदेव क्रोनस (Cronus) या नावाने ज्ञात आहेत. युरेनस (Uranus ) आणि गेया(Gaea ) यांचा मुलगा असलेला हा क्रोनस अर्थात शनिदेव पुढे देवांचा राजा बनतो. देवाधिदेव झ्यूस हा या क्रोनसचाच पुत्र. एकेकाळी ग्रीक संस्कृतीत पूजनीय असलेले शनिदेव व झ्यूस आदी देव आता मात्र ख्रिश्चन धर्माच्या प्रभावामुळे बाजूला पडले आहेत. प्रवाही लोकजीवनाचा प्राण असलेले देव देवता सध्या पुराणऐतिहासिक अभ्यासाचा विषय बनून राहिले आहेत.

ग्रीक देवता क्रोनस

हीच शनीदेवतेची कल्पना रोमनांमध्ये देखील प्रचलित होती. हा रोमन शनिदेव (Saturn) शेतीचा देव. त्याने मानवाला शेती शिकवली अस रोमन मानत. त्याची हातात खुरपे घेतलेली मूर्ती भव्य अश्या सुवर्णमंदिरात रोमन फोरमच्या मधोमघ विराजमान होती. शनिदेव हे समृद्धीचे, मुक्तीचे, साम्राज्याचे प्रतिक मानले जाई. तसेच तो काळाचा देखील स्वामी मानला जाई. रोमन साम्राज्यातील सर्व सोने नाणे आणि खजिना या मंदिराच्या तळघरात ठेवत असत. दर वर्षी डिसेंबर महिन्यात या शनीदेवाची मोठी यात्रा भरत असे. हा उत्सव सहा दिवस चालत असे. रोमनांचा हा सर्वात मोठा उत्सव होता. घरोघर जेवणावळी असत. सहा दिवस सर्वांना सुट्टी असे. सर्वजण एकमेकांना भेटवस्तू देत. एकंदरीत सगळी चैन असे. आता ते मंदीर भग्नावस्थेत आहे. त्याचे फक्त स्तंभ शिल्लक आहेत. आणि ही जत्रा आता ख्रिसमस म्हणून साजरी होते.

रोमन देवता Saturn

या शिवाय बाबिलोनिअन, सुमेरियन, मेसोपिटीयन व अनेक आदीवासी समुदाय-संस्कृतीमध्ये देखील सूर्यपुत्र शनीदेवता आढळते. अश्या प्रकारे आपल्या परंपरांचे धागे अनेक जागतिक संस्कृतीमध्ये अनेक संदर्भात गुंफलेले आढळतात. कालौघात संस्कृती बदलतात. धर्म बदलतात. भूपुष्ठरचना बदलते तत्द्वता देव आणि त्यांचे गुणअवगुण देखील बदलतात. कदाचित विधात्याचा अशाश्वततेचा नियम खुद्द देवांना देखील लागू असावा. बदल हा काळाचा आत्मा आहे या सुत्रातून देवतांची देखील सुटका नसावी.

      शनिवारी शनी शिंगणापूर येथे एका युवतीने शनीच्या चौथाऱ्यावर चढून शनीदेवाचे दर्शन घेऊन तेलही अर्पण केले. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचा निषेध म्हणून गावकऱ्यानी गावबंद आंदोलन पुकारले आहे. मंदिर व्यवस्थापनाने सहा सुरक्षा रक्षकांना निलंबित केले आहे. हा सर्व गरादोळ आजच्या प्रगत विज्ञान युगात व स्त्री पुरुष समानतेच्या युगात अतर्क्य व निषेधार्ह्य आहे. या शनीच्या सर्व निस्सीम पुरुषप्रधान संस्कृतीरक्षक भक्तांनी विज्ञानयुगातील स्त्री पुरुष समानता नजरेआड केली तरी जागतिक संस्कृतीच्या प्रवाहातील खुद्द शनीदेवांचे बदलते स्थान बदलते गुण अवगुण यांची पार्श्वभूमी ध्यानात घेऊन बदल हा जीवनाचा आत्मा असतो हे सूत्र मान्य करावे. आणि काळाबरोबर आपल्या अनिष्ट धार्मिक प्रथांना मुरड घालून प्राचीन हिंदू धर्माचे २१ व्या शतकात यशस्वी पदार्पण होण्यास हातभार लावावा. शनीदेव सर्वांना सद्बुद्धी देवो ही शनीचरणी प्रार्थना.

शनीच्या वैभवशाली सुवर्णमंदिराचे अवशेष: रोम 


Friday, 28 August 2015

हिंदु हा धर्म नाही ?

     ‘ हिंदू नावाचा कोणता धर्मच नाही ’. सध्याचे लोकप्रिय घोषवाक्य आहे. असा विचार मांडणाऱ्या विद्वानांच्या मुलभूत दृष्टीकोनातच मुळात फार मोठी चूक ही आहे की ते हिंदू धर्माकडे इतर तुलनेने अर्वाचीन धर्माच्या अनुषंगाने पाहतात. अर्वाचीन धर्म अर्थात ज्यू ख्रिश्चन मुस्लीम बौद्ध इ. या धर्मात एक व्यवस्थित मुलभूत मांडणी आहे. बहुतेक धर्म एकेश्वरवादी आहेत.  त्यांचा कोणीतरी प्रेषित आहे. तो त्यांच्या धर्माचे तत्वज्ञान सांगणारा उद्गाता आहे. त्यांचे धर्मतत्वज्ञान सांगणारे निश्चित असे धर्मग्रंथ आहेत. जगण्याचे काही नियम सांगितले आहेत. काही धार्मिक कर्तव्ये-बंधने आहेत. उपासना पद्धती एकमेव आहे. हा ठराविक साचा बहुतेक धर्मांचा आहे. याच साच्यात हिंदू धर्माला बसवण्याचा अयशस्वी प्रयत्न करून हिंदू नावाचा कोणता धर्मच नाही असे जाहीर केले जाते.

हिंदू शब्दाच्या व्युत्पत्ती

     हिंदू या शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती सांगितल्या जातात. पैकी पहिली साधारण हिंदू म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे लोक. इराणी भाषांमध्ये स चा उच्चार ह असा होतो. म्हणून सिंधू चे हिंदू झाले. ही फारशी पटण्यासारखी व्युत्पत्ती नाही. कारण इराण ला तुलनेने जवळ असलेले पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहणाऱ्या लोकांना आजही सिंधीच म्हणतात.

     दुसरी व्युत्पत्ती अशी की साधारण युवान श्वांग भारतात आला त्या कालखंडात हिंदू शब्द प्रचलित झाला. हिंदू पंचांग चांद्र पंचांग आहे. चंद्राचे एक नाव इंदू . त्यावरून चीनी लोक इंदू किंवा हिंदू म्हणू लागले. ही व्युत्पत्ती फारशी पटत नाही. चीनी जे म्हणतात ते नाव भारतीय लोकांनी स्वीकारायचे काय कारण ?

     इतर अनेक व्युत्पत्तीही अशाच म्हटल तर पटतात.. म्हटल तर त्या खोडून काढता येतात. एकंदर या हजारो वर्षातल्या धामधुमीच्या काळात हिंदू धर्माला हिंदू हे नाव का मिळाले याचे दुवे निखळले आहेत. पण हिंदू धर्माचे तरल आणि सूक्ष्म तितकेच व्यापक स्वरूप लक्षात घेतले तर या धर्माला तुम्ही काय नाव देता हे अजिबात महत्वाचे नाही. हिंदू म्हणा सिंधू म्हणा इंदू म्हणा भारतीय म्हणा. हा मुद्दा आपण हिंदू धर्माचे स्वरूप ध्यानात घेतले तर लक्षात येतो.



हिंदू धर्माचे उदात्त तत्वज्ञान

सध्या जो बोकाळला आहे व ज्याच्या नावाखाली सनातन्यांचा उन्माद सुरु आहे त्या हिंदुत्ववादाला माझा तीव्र विरोध आहे. ही विचारसरणी हिंदू धर्माशी सुसंगत नाही. Hinduism is basically wrong word. Hindu is not ism it’s a way of life.   हिंदू हा धर्म नसून एक समृद्ध जीवन जगण्याची पद्धती आहे. हिंदू धर्माचे तत्वज्ञान ग्रंथ म्हणून वेद वेदांत स्मृती पुराणे याकडे बोट दाखवले जात असले तरी ते पूर्ण सत्य नाही. हिंदू ही एक जीवनपद्धती हे विधान जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा हे ग्रंथ दुय्यम स्थानावर ढकलेले जातात. ही जीवनपद्धती जगताना प्रत्येक हिंदूने मांडलेले, अंगीकारलेले प्रत्येक तत्वज्ञान हे हिंदू तत्वज्ञान आहे. सर्वसाधारण हिंदू जीवनपद्धती तीन मुद्द्यांभोवती केंदित आहे.

     १.कर्मसिद्धांत – आपल्या सोबत जे काही होत आहे. आपल्या जीवनात जे काही घडत आहे ते सर्व पूर्वजन्मातील सुकृत अथवा पापांचे फळ आहे. आपण जर पूर्वजन्मात पुण्यकर्म केले असेल तर आपल्या सध्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील. याउलट परिस्थितीत वाईट.

     २ .पुनर्जन्म – या जन्मात आपण जी पुण्यकर्मे करणार आहोत त्याचे चांगले फळ आपल्याला पुढच्या जन्मात मिळणार आहे. जर वाईट कर्मे केली तर निश्चितच त्याची वाईट फळे आपणास पुढील जन्मात मिळणार आहेत.

     ३.अंतिम सत्य – अंतिम सत्य अर्थात कोहम या प्रश्नाचे उत्तर. ईश्वराचा साक्षात्कार . त्याच्या सानिध्यात अढळ स्थान. नैनं छिंदन्ति शस्त्रानी नैनं छिंदन्ति अस्त्रानी न चैन क्लेदयांत्यापो नैनं दहति पावकः अश्या अजर अमर आत्म्याचे चिरंतन विश्रांतीचे स्थल. या जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती अर्थात मोक्ष.
 
     चार वेद, चार पुरुषार्थ, चार आश्रम, चार वर्ण या सर्व गोष्टींची गुंफण या मूळ मुद्द्यांभोवती केली आहे. सर्वांभूती एकच तत्व वास करत. हे तत्व सर्व चराचरात सामावले आहे. ही भवसागर सृष्टी ही त्या तत्वाने रचली आहे. हे गुह्य आचार विचारात बिंबवून जगलेले जीवन मोक्ष मिळवून देते जे अंतिम सत्य आहे. अंतिम ध्येय आहे. हे वेदांचे सार आहे. अर्थ व काम यांचा नियंत्रित व सुयोग्य मार्गाने उपयोग हा मोक्ष मिळवून देतो. हा हिंदू धर्माचे अंतिम सत्य असलेला मोक्ष मिळवण्याचा मार्ग किती साधा आहे पहा.

     यासाठी वेद वाचण्याची गरज नाही. कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही. कोणतीही कर्मकांडे पूजा उपास तापास करण्याची गरज नाही. सत्यनारायण, वास्तुशांती, नागनारायणबली, कोकीळव्रत, लक्ष्मीव्रत ..हेमाद्रीने सांगितलेली उठल्यापासून झोपेपर्यंत करावयाची कोणतीही व्रते करण्याची गरज नाही. ज्याला रूढार्थाने धार्मिक म्हणू अशी कोणतीही गोष्ट न करता हिंदू  धर्मातील अंतिम सत्याची प्राप्ती होऊ शकते. फक्त कोणाला कसला त्रास न देता शक्य होईल तितकी इतरांना मदत करत, भूतदया ह्रदयी वागवत, एक आदर्श समृद्ध जीवन जगणे यासाठी पुरेसे आहे. आणि

     सर्वात महत्वाची गोष्ट अशी की हिंदू म्हणवून घेण्यासाठी तुम्हाला यापैकी कोणतीही गोष्ट करण्याची गरज नाही. यापैकी काही केले नाही अगदी देवळाच्या पायरीवर उभे राहून तुम्ही देवाशी भांडलात तरी तुमच्या हिंदू असण्यात कोणती बाधा येत नाही.

     आणि मला वाटते की या विश्वातील कोणत्याही सामाजिक सलोखा राखून जीवन जगू पाहणाऱ्या समूहास ही विचारसरणी सार्वकालिक आदर्शवत आहे.

      कालांतराने हिंदू धर्मात स्वत:च्या फायद्यासाठी धर्मसत्ता काही उच्च समुदायांनी हस्तगत केली. त्यात नाना कर्मकांडे घुसवली. जातीभेद वाढला. हिंदू धर्माची निश्चित अशी कठोर बांधणी कधीच नसल्यामुळे हे करणे त्यांना कठीण गेले नाही. व हळू हळू या उदात्त तत्वज्ञानाचे विडंबन होऊन ही कर्मकांडे व मंदिरातला देव हाच धर्म समजला जाऊ लागला.

समारोप

     हिंदू धर्म हा माझ्या मते एक भौगोलिक धर्म आहे. भारताचे विशिष्ट भौगोलिक स्थान हिंदू धर्माच्या वाढीस व विकासास कारणीभूत आहे. ही एक लोकसंस्कृती आहे. किंबहुना विविधतेत एकता असलेल्या विभिन्न भौगोलिक भागातील विविध लोकसंस्कृतीचा एक समुच्चय आहे. राहिला प्रश्न फक्त हिंदू या संज्ञेचा . हिंदू धर्माचा समकालीन असा एकही धर्म आज या भूतलावर अस्तित्वात नाही. तत्कालीन काळात पृथ्वीवरील विविध खंडांत जेथे संस्कृत्या नांदल्या त्यांच्या धर्मालाही विशिष्ट्य नावे नाहीत. इजिप्तचा प्राचीन धर्म, ग्रीक चा प्राचीन धर्म, रोमनांचा प्राचीन धर्म यांना कोणत्याही विशिष्ट संज्ञेत बद्ध केलेले नाही. पृथ्वीवरील आदीम काळातील प्राथमिक अवस्थेतील स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे उत्तरोत्तर विकसित व समृद्ध होत गेलेले हे धर्म आहेत. आणि यापैकी फक्त हिंदू धर्म आज घडीला टिकून आहे.

     धर्म सुधारणेचे हिंदू धर्म नेहमीच स्वागत करेल. टीका निंदा सर्वकाही स्वागतार्ह. हिंदू धर्म चार्वाकांपासून हे पचवत आलेला आहे. नव्हे बाहू पसरून स्वागत करत आलेला आहे. फक्त इथे काही विशिष्ट लोक आणि ते सांगतात तो हिंदू धर्म नाही. किंवा त्यांच्या कृती या हिंदू धर्माच्या कृती नाहीत याची थोडी नोंद घ्यावी. हे धर्म-मक्तेदार सांगतात तो आपला धर्म नसून हिंदू धर्माचे हे तरल व लवचिक रूप सर्व धर्म सुधारणा करू इच्छिनारांनी जाणून घ्यावे. तुकाराम महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या काळात हे त्यांना कठीण गेले असले तरी आज हे तितकेसे कठीण राहिलेले नाही.
-सुहास भुसे    


Friday, 14 August 2015

कुंतीचे रहस्य

     कुंतीला पुत्र कसे झाले याची मोठी रोचक मिथककथा सांगितली जाते. या मिथककथेनुसार दुर्वास ऋषीच्या यज्ञात एक वर्षभर रात्रंदिवस कुंतीने दुर्वासाची सेवा केली. त्याचा यज्ञ संपन्न झाला तेव्हा दुर्वासाने प्रसन्न होऊन कुंतीला देवाहुती मंत्राची दीक्षा दिली. या मंत्रानुसार कोणत्याही देवाचे स्मरण करून या मंत्राचे उच्चारण केले तर तो देव तिच्या पोटात त्याचा गर्भ उत्पन्न करून जाणार अशी त्यात शक्ती होती.
   
     तर दुर्वास गेल्यावर लगेच कुंतीला या मंत्राचा प्रयोग करून बघण्याची इच्छा झाली व तिने सूर्याचे स्मरण केले. यातून तिला कुमारी असताना अर्थात विवाह झाला नसताना कर्ण हा पुत्र झाला. पण बदनामीच्या भीतीने कुंतीने त्याला अश्वनदीत सोडून दिले. त्याचा त्याग केला.

     त्यानंतर तिचा विवाह पांडू सोबत झाला. हा पांडू एकदा मृगया करण्यासाठी वनात गेला असताना तिथे किंदम नावाचा ऋषी हरणाच्या रुपात आपल्या प्रेयसी बरोबर संभोग करत होता. पांडूने त्याला बाण मारला. अर्थात त्याला ते हरीण म्हणजे किंदम ऋषी आहे हे माहित असण्याचे कारण नाही. तर यावर क्रोधीत होऊन मरता मरता किंदम ऋषीने “ तू संभोग लालसेने जेव्हा तुझ्या स्त्रीला जवळ घेशील तेव्हा तूला माझ्यासारखाच तडफडून मृत्यू येईल “ असा शाप दिला.

     या शापामुळे पांडूला विरक्ती आली व तो कुंती आणि माद्री या आपल्या दोन नवविवाहित पत्नी घेऊन वनात निघून गेला. काही काळ गेल्यावर त्याला पुत्रलालसा निर्माण झाली. परंतु तो स्वत: तर संभोग करू शकत नव्हता. तेव्हा कुंतीने देवाहुती मंत्राच्या सहाय्याने यम वायू व इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठर भीम व अर्जुन हे पुत्र उत्पन्न केले. पुढे माद्रीलाही असेच नकुल सहदेव हे पुत्र झाले.

     आता थोडस या मिथक कथेकडे डोळसपणे पाहू. अस वर दिल्यावर किंवा प्रसाद म्हणून आंबा वगैरे खाल्यावर मुल होत नाही त्यासाठी स्त्री व पुरुष यांच्यात संभोग झाला पाहिजे इतके प्राथमिक वैज्ञानिक ज्ञान आपल्याला आले आहे. विषयात शिरण्याच्या आधी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की महाभारताचा काळ हा हजारो वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हाच्या वैदिक धर्मातील समजुती व समाजमान्यता या निराळ्या होत्या. द्रौपदीच्या उदाहरणावरून असे दिसते की त्याकाळात बहुपतित्व हे वैदिक धर्मसंमत व समाजमान्य होते.  जर अपत्य होत नसेल तर धर्मसंमत असे काही उपाय होते. त्यातलाच एक उपाय म्हणजे नियोग पद्धती. या पद्धतीत जर एखाद्या स्त्रीला नवऱ्यापासून अपत्य होत नसेल किंवा तिचा नवरा अपत्य देण्यास अक्षम असेल तर परिवारातीलच कोणाकडून उदा. दीर वगैरे तरी किंवा तशी उपलब्धता नसेल तर रक्ताच्या कोणाकडून तरी त्या स्त्री ला अपत्य प्राप्ती करता येत असे.

     याचे एक उदाहरण भीष्माची आई व कौरव पांडवांची पणजी सत्यवती. तिला नियोग पद्धतीने पराशर ऋषी पासून व्यास हा पुत्र झाला होता. पुढे सत्यवतीचा पुत्र विचित्रवीर्य अकाली मृत्यू पावला. त्याच्या दोन बायका अंबिका व अंबालिका या निपुत्रिक होत्या. तेव्हा आपला कुरु वंश बुडू नये म्हणून सत्यवतीने नियोग विधीने नातू उत्पन्न करण्याचा निर्णय घेतला. तिने आपला पुत्र भीष्माला आधी विचारले पण त्याने ब्रम्हचर्यपालनाची भीष्मप्रतिज्ञा केली असल्याने या गोष्टीला नकार दिला. मग तिने अंबिका व अंबालिका यांचा दीर, विचित्रविर्याचा भाऊ व आपला मुलगा व्यास याला आपल्या सुनांसोबत व त्याच्या वहिन्यांसोबत संभोग करून अपत्यप्राप्ती करण्याची आज्ञा केली. मग व्यासाने आधी अंबिकेसोबत संभोग केला. त्यावेळी अंबिकेने व्यासाचे दाढी भस्म असे उग्र रूप बघून डोळे ,मिटून घेतले. यावर रसभंग होऊन व्यासाने तिला तुला अंध पुत्र होईल असा शाप दिला. त्यानंतर अंबालिकेची बारी आली. ती व्यासासोबत संभोग करताना भीतीने पांढरी पडली त्यामुळे तिला तुला पंडू पांढूरका पुत्र होईल असा शाप दिला.( कमाल आहे कि नाही या व्यासांची ) तर हे दोन पुत्र म्हणजे धृतराष्ट्र व पांडू. यातला शापाचा प्रसंग मिथक असला तरी नियोगाला असलेली वैदिक धर्माची राजमान्यता ही दोन उदाहरणे अधोरेखीत करतात.

व्यासाचे उग्र रूप पाहुन अंबिका भयभीत झाली


     वैदिक धर्माचे हे तात्कालिक स्वरूप लक्षात घेतले असता कुंतीला पुत्र कसे झाले असावेत याचा तर्क करता  येतो. पांडूचा शाप म्हणजे पांडूचा षंढपणा लपवण्यासाठी केलेली मिथककथा आहे. मग कुंतीला आपल्या सासूने व आजेसासूने जो नियोग विधीचा मार्ग अवलंबला त्या मार्गावरून जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि हे त्याकाळी वैदिक धर्मसंमत व समाजमान्य होते हे ही ध्यानात घ्यावे. वनात असताना त्याकाळी हिमालयात वास्तव्य असणाऱ्या उंच, धिप्पाड, गौर, पितकेशी व शूर असणाऱ्या जमातीतील काही पुरुषांपासून तिला हे वीरपुत्र झाले. या निरोग विधियुक्त संभोगात इतर पुरुषांचा वापर झाला. अर्थात कुरु घराण्यातील व्यक्तीचा नाही.  नियोग पद्धती वैदिक धर्माला मान्य असली तरी पांडव हे आपल्या रक्ताचे नाहीत म्हणजे कुरु नाहीत म्हणून दुर्योधन त्यांना विरोध करत असे हा ही संदर्भ महत्वाचा.

     नंतरच्या काळात धर्मकल्पना विवाह पद्धती बदलल्यानंतर ही कुंतीची कथा काही लोकांना व्यभिचार कथा वाटू लागली व हे टाळण्यासाठी या कथेला देवाहुती मंत्राचे व दैवी वरदानाचे अभेद्य कवच देण्यात आले.

     आता राहिला कर्णाचा विषय. सुमारे एक वर्ष दुर्वासाची रात्रंदिवस सेवा केल्यावर दुर्वास गेल्यावर लगेच कुंतीचे गर्भवती होणे व पुढे कुमारी असताना कर्णाला जन्म देणे हे कर्ण हा कुंतीला दुर्वासापासून झालेला पुत्र होता हे कळण्यासाठी फार खोलात जाण्याची गरज पडत नाही.

( संस्कृतीरक्षकांसाठी विशेष टीप – सदर लेख फक्त सत्य व कुंतीच्या वरदानाच्या मिथकाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आहे. यात कुंतीची बदनामी करण्याचा हेतू नाही. )

-सुहास भूसे


Saturday, 16 May 2015

अघोर साधू आणि अघोरी साधना.

 "सैतानालाही लाजवेल असे अघोरी कृत्य"
असा वाकप्रचार नेहमी वापरला जातो. म्हणजे नृशंस किंवा पाशवी कृत्यासाठी आपण ' अघोरी ' या शब्दाची योजना करतो. ती कितपत बरोबर आहे , योग्य आहे हे हा लेख वाचल्यानंतर आपणच ठरवा.
अघोरी साधूंविषयी आणि त्यांच्या पंथाविषयी दुर्दैवाने फारच कमी माहिती उपलब्ध आहे. जी माहिती उपलब्ध आहे त्यात अघोरींविषयीच्या गैरसमजांचाच भरणा अधिक आहे. एक भयचकित करणारे वलय पुरातन काळापासून अघोर पंथाभोवती राहिले आहे. अघोरी साधूंच्या अलौकिक शक्ती, त्यांची अमानवी साधना याविषयीचे गूढ कायम आहे. साधारणत: सर्वसामान्यांना अघोरी साधूंविषयी जी माहिती असते ती अशी -
1. अघोर साधू स्मशानात साधना करतात.
2. मानवी मृतदेहाची राख ते अंगाला फासतात.
3. अघोर साधू मानवी कवठ्यांची माळ गळ्यात घालतात.
4. अघोर साधू मानवी कवठी भोजनपात्रासारखी वापरून त्यात भोजन करतात.
5. अघोर साधू नरमांस भक्षण करतात.
6. हठयोगात ते प्रवीण असतात.
7. अघोर साधूंच्या अंगात अलौकिक शक्ती असतात.
ही किंवा यापैकी काही माहिती सर्वसामान्यांना असते. यातील ब-याच किंवा सर्वच गोष्टी ख-या आहेत. आणि चार भिंतीत विश्व सामावलेल्या माणसांना अंगावर भयाने काटा आनण्यासाठी या गोष्टी पुरेश्या आहेत. त्यामुळ अघोर साधू म्हटल की सर्वांची तंतरते. खर तर अघोर साधूंना भिण्याचे काहिएक कारण नाही. ही भीति निव्वळ अज्ञान व गैरसमजापोटी आलेली आहे.


ड्रेक ब्रॉकमन नांवाच्या इंडियन मेडिकल ऑफिसरनें मिळविलेली एका अघोर्‍याची जन्मकथा एच. बालफर या इंग्लिश लेखकाने लिहून ठेवली आहे. तो सांगतो..
' हा मनुष्य जातीनें लोहार असून पंजाबांतील पतियाळा संस्थानांत राहात असे. तो प्रथम भीक मागत असे, पण पुढें एका अघोर्‍यानें त्याला आपला शिष्य केला. तो बदरीनारायण करून नंतर नेपाळांत गेला; तेथून जगन्नाथाला जाऊन शेवटीं मथुरा व भरतपुर येथें आला. भरतपुरला त्याची चौकशी झाली. त्यानें अशी जबानी दिली कीं,'' मी सध्यां कोणत्याहि जातीकडून अन्नग्रहण करितों, व जातीचा विधिनिषेध मी मानीत नाहीं. मी कोणाच्याहि हातचें खातों. मी स्वत: नरमांस खात नाहीं पण माझ्या पंथांतील कांही जणांना तें खाऊन मृतांना पुन्हां सजीव करण्याची ताकद आहे. कांहींजवळ मंत्रसामर्थ्य असतें व तें मनुष्यांचे मांस खातात; पण माझ्यांत हें सामर्थ्य नसल्यानें मला तशी ताकद नाहीं. मी फक्त मनुष्याच्या डोक्याच्या कवटींतून अन्न खातों व पाणी वगैरे पितों. याशिवाय मी घोड्याव्यतिरिक्त सर्व मृत जनावरांचें मांस भक्षण करितों. घोडा निषिद्ध मानला आहे म्हणून खात नाहीं. माझे सर्व जातबांधवहि माझ्याप्रमाणेंच घोड्याच्या मांसाशिवाय सर्व मांस खातात.''

अश्या या गूढवलयांकित आणि विस्मित करून सोडणा-या अघोर पंथाविषयी आणि त्यांच्या तत्वज्ञानाविषयी अधिक जाणून घेवुया.


...............

अघोर संप्रदाय हा हिंदूस्थानातील सर्वात जूना संप्रदाय. याचा निश्चित कालावधी सांगता येत नसला तरी तो कापालिक पंथाच्या समकालीन असावा असे मानले जाते. हिंदुस्थानातील प्राचीन शैव धर्माच्या दिव्य परंपरेचा वारसा बाळगनारा हा पंथ आहे. याचा सर्वाधिक जूना उल्लेख सापड़तो तो युवान श्वांग या चीनी प्रवाश्याच्या प्रवासवर्णनात...अंगाला राख फांसून, कवट्यांच्या माळा धारण करणारे (कपालधारी), नागवे साधू त्याने हिंदुस्थानांत पाहिले असल्याचे लिहून ठेवले आहे.

अघोर तत्वज्ञान :-

अघोर या शब्दाचा अर्थ ' अ + घोर ' जो घोर नाही असा...जो भीतिदायक नाही असा..ज्याच्या ठाई कोणताही भेदभाव नाही असा.. सरळ ..स्थितप्रज्ञ .
 'स्थितप्रज्ञ ' ही अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीची मानसशास्त्रीय संज्ञा आहे. नुसत सुख आणि दुःख यामध्ये जो स्थिर असतो तो स्थितप्रज्ञ नव्हे. तर जगातील सर्व चराचर गोष्टींकड़े जो समदृष्टीने पाहतो ज्याला कशाचाही मोह नाही आणि जो कशाचीही घृणा करत नाही तो स्थितप्रज्ञ ..तो अघोर!

याच तत्वज्ञानात अघोरींच्या गूढ , विक्षिप्त आणि भयावह जीवनशैलीचा उगम आहे.

मृत मानवी शरीराचे मांस माणूस त्याज्य मानतो. त्याची घृणा येते म्हणून अघोरी ते मांस खातात. या मागे घृणेवर विजय मिळवणे हा एकमेव उद्देश आहे. मानवी समाज ज्या ज्या गोष्टींची घृणा करतो त्या गोष्टी अघोरी अंगीकारतात. लोक स्मशान, मृत मानवी शरीराचे मांस, मृतदेहाची राख यांची घृणा करतात. म्हणून अघोरी त्याना स्वीकारतात. तुम्ही विचार करा ..जो मृतदेहाचे मांस खातो ..त्याची राख अंगाला फासतो..स्मशानात साधना करतो..राहतो त्याला या जगात दूसरे काय घृणास्पद वाटेल ? अघोर विद्या आणि तत्वज्ञान माणसाला इतक्या टोकाचा स्थितप्रज्ञ बनवते की त्याच्या ठाईचा आप-पर भाव पूर्ण नाहीसा होऊन सकल विश्वाकडे तो एका विशाल समदृष्टीने पाहू लागतो. खरा अघोरी हा समाजापासून पूर्ण अलिप्त असतो आणि आपल्या साधनेमध्येच मग्न असतो. आपल्या विद्येचा उपयोग तो फक्त जनकल्याणासाठीच करतो.

अघोरींच सोंग घेऊन काही भामटे आपल्याला ठकवु शकतात. मागील वर्षी एका भामट्या अघोर बाबाने अथनी जि. बेळगाव इथ कल्लोळ उडवून दिला होता. वृत्तपत्रात ही घटना खुप गाजली होती. ही त्या बातमीची लिंक -

http://www.tarunbharat.com/?p=42252

पण जे खरे अघोर साधू असतात ते असली हीन कृत्ये कधीच करत नाहीत. निसंग निर्लेप जीवनशैलीचा त्यांनी अंगीकार केलेला असतो. त्यांना ओळखण्याची महत्वाची खुण म्हणजे ते तुम्हाला कधीच काही मागणार नाहीत. पैसा अन्न कपड़ालत्ता अगदी धनाची रास त्यांच्यापुढे ओतली तर ते ढुंकूनही पाहनार नाहीत.

अश्या या गूढरम्य अघोर साधूंची साधना, त्यांची दैवते आणि आणखी रोचक माहिती जाणून घेऊ पुढील लेखात...
(क्रमश:)

सुहास भूसे
(दि. 16 -5-2015)


Wednesday, 12 June 2013

देवलचा पराभव



प्राचीन काळापासून हिंदुस्थान अनेक परकीय आक्रमकांच्या गुलामगिरीत खितपत पडलेला दिसून येतो. इतिहासाच्या पानापानावर लाजिरवाण्या पराभवांचे शिंतोडे आहेत. महमद कासिम पासून घोरीपर्यंत आणि बाबरापासून अब्दालीपर्यंत अनेकांनी हिंदुस्थानावर स्वारी केली. शक, हून, अरब, अफगाणी, इंग्रज, फ्रेंच, डच अनेक अनेक आक्रमक शतकानुशतके हिंदुस्थानाची लुट करत राहिले, हिंदुस्थानचे लचके तोडत राहिले. हिंदुस्थानाची अस्मिता, अभिमान यांच्यावर घाले घालत राहिले. काय कारण असावे बरे या शतकानुशतकांच्या पराभवांचे, गुलामगिरीचे ?

हिंदुस्थानी लोकांपेक्षा हे परकीय शूर होते ? पराक्रमी होते ? रणकुशल होते ? बुद्धिमान होते ? हिंदुस्तानच्या इतिहासाचा अगदी प्राथमिक अभ्यास केलेली व्यक्तीदेखील यापैकी एकाही प्रश्नाचे होय असे उत्तर देण्यास धजणार नाही. शौर्य आणि पराक्रम या हिंदुस्थानाच्या मातीमधून उगवत होता. बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता या हिंदुस्थानाच्या दावणीला बांधली गेली होती. हिंदुस्थानातील रणधुरंधरांच्या रण कुशलतेने साक्षात रणचंडीने अनेकदा आश्चर्याने तोंडात बोटे घातली असतील. पण तरीही पराभव आणि गुलामगिरी हिंदुस्थानच्या वाट्याला का बरे आली असेल ?

इतिहासतज्ञ याची अनेक कारणे सांगतील. हिंदुस्थान हा अनेक छोट्या छोट्या राज्यात विभागला गेला होता. इथ प्रबळ अश्या केंद्रीय सत्तेचा अभाव होता वगैरे वगैरे. तात्कालिक कारणे अनेक आहेत व ती खरीही आहेत. तथापि या सर्वांपेक्षा देखील इथल्या लोकांची फुटीर वृत्ती आणि धर्मभोळेपणा आणि नितीअनितीच्या भ्रामक कल्पना ही कारणे सार्वकालिक आणि प्राधान्याने विचार करावी अशी आहेत. इथला समाज हा एकसंध कधीच नव्हता. राज्याराज्यात असो वा जातीपातीत असो तो सदैव विभागला गेलेलाच होता. देवधर्म, जपजाप्य, व्रतवैकल्ये, स्नानसंध्या यात बुडून गेलेला होता. या सर्व गोष्टींनी हिंदुस्थानाचे अपरिमित नुकसान केले आहे . या सर्व गोष्टींमुळेच इथल्या लोकांमध्ये प्रबळ अशी राष्ट्रभावनाच कधी निर्माण होऊ शकली नाही हे हिंदुस्थानच्या गुलामगिरीचे आणि पराभवांचे सर्वात प्रमुख कारण आहे.

हिंदुस्थानातील लोकांच्या या देव-धर्म भोळेपणाच्या आणि नितीअनितीच्या फोल कल्पना, फालतू व्रताचार आणि कर्मकांडात गुंतून सर्वनाश ओढवून घेतलेल्या राज्यकर्त्यांच्या गाथा इतिहासात ढिगाने सापडतील. शरण आलेल्याला मरण नाही म्हणून घोरीला १६ वेळा पराभूत करून २ वेळा जीवदान देणारा पृथ्वीराज चौहान, अल्लाउद्दीन खिलजीने स्वारी केली तेव्हा ससैन्य तीर्थयात्रेला गेलेला यादवांचा सेनानी आणि युवराज शंकरदेव आणि चातुवर्यचिंतामणी ग्रंथ लिहीत बसलेला यादवांचा प्रधान हेमाद्री ही काही ठळक उदाहरणे. स्नानसंध्या आणि जपजाप्य यात गुंग होऊन राज्य कारभाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या थोरल्या माधवराव पेशव्यांची रामशास्त्री प्रभून्यांनी कानउघडणी करून त्यांचे लक्ष परत राज्यकारभाराकडे वळवल्याचा किस्सा तर सर्वश्रुत आहेच.

इ.स.च्या सातव्या शतकात प्रजेचा धर्म भोळेपणा आणि देवावरील आंधळी श्रद्धा याने एका पराक्रमी राजाचा कसा घात केला याचा एक डोळ्यात अंजन घालणारा  प्रसंग आढळतो. त्या काळात सिंध प्रांतात चच नावाच्या एका पराक्रमी राजाचा दाहर नावाचा तितकाच पराक्रमी पुत्र राज्य करत होता. त्याची राजधानी होती देवल. या देवल शहरात हिंदूंचे एक प्रसिद्ध मंदिर होते. या मंदिराच्या गगनचुंबी कळसावर एक भलामोठा भगवा ध्वज मोठ्या डौलात सदैव फडकत असे. इथल्या देवावर प्रजेची अतोनात श्रद्धा होती तसेच या मंदिराविषयी आणि या ध्वजाविषयी एक अंधश्रद्धाळू आख्यायिका लोकांमध्ये प्रचलित होती कि जोवर हा ध्वज उभा आहे तोवर आपल्या राज्यावर कोणतेही संकट येऊ शकत नाही. जोवर हा ध्वज उभा तोवरच आपले राज्य उभे. देवल च्या प्रजेची ही देवभोळी कल्पना आणि जोवर रोम उभे तोवर जग उभे ज्यादिवशी रोम पडेल त्यादिवशी जगबुडी होईल ही रोमवासियांची फोल कल्पना यात किती साम्य आहे पहा ना..

इ स ७१२ मध्ये अरबी आक्रमक महंमद कासिम याने सिंध वर स्वारी केली. त्याला त्याच्या गुप्तचरांकडून ही ध्वजाची आख्यायिका समजली. त्याने प्रजेच्या या वेडगळ अंधश्रद्धेचा फायदा उठवून हे राज्य स्वस्तात जिंकायचे ठरवले. त्याने आपल्या तोफा सर्वप्रथम या मंदिरावर डागून हे शिखर आणि त्यावरील ध्वज प्रथम उध्वस्त केला. आपला शकुनी ध्वज पडलेला पाहताच सैनिक आणि प्रजेमध्ये हा:हा:कार माजला. आपला पराभव आता निश्चित आहे. ध्वजाच्या पतनानंतर आपला टिकाव लागणे अशक्य आहे या कल्पनेच्या आहारी जाऊन देवल च्या सैन्याने न लढताच शस्त्रे खाली ठेवली आणि एक प्रबळ राज्य विनासायास कासीमने घशात घातले.    

                              सुहास भुसे 
                        (रोखठोकसाठी दि. १२-६-१३)                

 
                            
       

Thursday, 11 October 2012

कर्मकांडाचा अतिरेक- २


कर्मकांड आणि वंशश्रेष्ठत्वाचा सिद्धांत हे हिंदू धर्मावरील सर्वात मोठे कलंक आहेत. तथापि यात धर्माच्या शिकवणुकीचा काही सबंध नाही हे ही तितकेच खरे. ही तात्कालिक शोषणाधारित समाजव्यवस्थेची देणगी आहे . कर्मकांडांचा पायाच मुळी शोषण हा आहे. समाजातील पुरोहितवर्गाची पिढ्यान पिढ्या कष्ट न करता पोटाची खळगी भरण्याची त्यांच्या लबाड आणि धूर्त पूर्वजांनी करून ठेवलेली ती सोय आहे. मात्र या स्वघोषित धर्ममार्तंडानी केलेल्या हरामखोरीचा ठपका मात्र हिंदू धर्मावर ठेवला जातो. सर्व ब्राह्मण आणि बहुजन समाजातील सच्च्या हिंदू धर्म प्रेमींनी आपला धर्म म्हणजे नेमक काय आहे ?आपल्या धर्माचे तत्वज्ञान काय आहे ?धर्माचरण याचा हिंदू धर्माच्या भूमिकेतून अर्थ काय ?ही सर्व पूर्वपीठिका नव्याने समजून घेण्याची गरज आहे.

    




कर्मकांडाचे स्तोम शोषणाधारीत समाज व्यवस्थेतून माजवण्यात आले आहे. लोकांच्या मनावर देव धर्म आणि कर्मकांड या त्रिसूत्रीचा असा जबरदस्त पगडा बसवण्यात आला आहे कि लोक आजही त्यातून बाहेर यायला तयार नाहीत. शतके लोटली ,अनेक विचारधारा आल्या आणि गेल्या ,पण त्यांनाही हा कर्मकांडाचा पगडा लोकांच्या मनावरून पूर्ण पणे पुसून टाकता आला नाही .या कर्मकांडाला विरोध करणारे पहिले बंडखोर विचारवंत तत्वज्ञ बहुधा चार्वाक असावेत. तथापि त्यांची विचारधारा काही धर्मधुरिणांना मानवली नाही. चार्वाकांना त्यांनी नास्तिक आणि धर्मद्रोही ठरवले आणि धर्मराज(?) युधिष्टराच्या समोरच त्यांचा खून करण्यात आला. चार्वाक मुनीच्या लोकायत दर्शनासंदर्भात मी सविस्तर लिहिणारच आहे पुढील लेखात. विचार दाबणे आणि वेगळे विचार मांडून शोषण कर्त्या पुरोहित वर्गाचे पितळ उघडे पाडणा-यांची मुस्कटदाबी करण्याची परंपरा एकंदरीत खुपच जुनी असल्याचे यावरून लक्षात आलेच असेल ...चार्वाकांपासून ते तुकारामांपर्यंत.

    

या सर्व गोष्टींचा हिंदू धर्मावर खुपच विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. आणि पर्यायाने देश ,काळ ,इतिहास यावरही. सध्याच्या भारतीय समाजामध्ये जी एक षंढ वा पराभूत मानसिकता आढळते तिचे बीजे या कर्मकांडप्रधान व्यवस्थेत आहेत. माणूस जन्मल्यापासून जी त्याच्या मागे कर्मकांडे लागतात ती तो मेला तरी त्याचा पिच्छा सोडत नाहीत. होम-हवन,पूजाअर्चा,वेगवेगळ्या नाना देवतांना संतुष्ट करण्यासाठी करावे लागणारे नाना शास्त्रोक्त(?) विधी अशा गोष्टी त्याला आयुष्यभर सश्रद्ध भावनेने करत राहाव्या लागतात. आणि तो मेला तरी त्याची सुटका नाही या कर्मकांडाच्या फे-यातून. परत दशक्रिया विधी आहेत,श्राद्ध आहे. धर्ममार्तंड महाब्राह्मणांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी सर्वसामान्य माणसाने आयुष्यभर राबत राहावे अशीच एकंदरीत या कर्मकांड प्रधान व्यवस्थेची रचना करण्यात आलेली आहे. ही सर्व हिंदू धर्माची अनौरस अपत्ये आहेत. मूळ विशुद्ध हिंदू धर्माच्या विचारधारेचा आणि या संकल्पनांचा काडीमात्रही सबंध नाही. नाना पुराणे आणि त्यातील कर्मकांडाचा उदो उदो करणा-या भाकडकथा या पुरोहितब्राह्मण वर्गाच्या पाताळयंत्री, लबाड पूर्वजांनी आपल्या वंशजांची कष्ट न करता लोकांचे शोषण करून जगण्याची करून ठेवलेली सोय आहे. या परता दुसरा कोणताही सिद्धांत असल्या बुळ्या कल्पनांच्या समर्थनार्थ मदतीला धावणार नाही. आणि वरून याला विरोध करणा-यांचे काय होईल याच्यासाठी धमक्या आणि अनेक शिक्षा या भाकडकथा सांगणा-या पुराणांतून लिहून ठेवलेल्याच आहेत. सत्यनारायणाची कथा याचे उत्तम उदाहरण म्हणून पाहता येईल. कर्मकांडाकडे दुर्लक्ष वा त्याची अवहेलना करणा-यांची काय गत होते आणि अशा कथित चुका दुरुस्त करून कर्मकांड पार पडल्यानंतर त्याचे तत्काळ फळ कसे मिळते याची ही कथा म्हणजे या सर्व कर्मकांड प्रधान व्यवस्थेची प्रातिनिधिक कथा म्हणूनही पाहता येईल. इतकी प्रचंड हास्यास्पद कथा दुसरी नसावी बहुधा.


प्रयत्नवादाला कर्मकांडी विचारधारेत स्थान नाही. प्रत्येक गोष्ट विधिलिखित आहे. पूर्वजन्मीच्या सुकृतानुसार दैव आपणास या जन्मात फरफटवत असते. विविध कार्यांच्या सिद्धीसाठी मुहूर्त ,वास्तुशांती ,सत्यनारायण ,विविध देवतांची तुष्टी अशा गोष्टी महत्वाच्या असतात. चिकाटी ,ध्येयनिष्ठा ,बुद्धिमत्ता ,कर्तव्यतत्परता अशा गुणांना मग कवडीमोल स्थान उरते. कितीही प्रयत्न केला आणि तुमच्या प्रयत्नाला जर कर्मकांडाचे अधिष्ठान नसेल तर कार्यसिद्धी होणे दुरापास्त !अनेक परकीय आक्रमकांनी हिंदुस्थानवर हजारो वर्षे अधिराज्य गाजवले ते या कर्मकांडाने खिळखिळ्या केलेल्या ऐत्तदेशियांच्या दुर्बल मानसिकतेचा फायदा घेऊनच. आणि लोकांना कर्मकांडाच्या जाळ्यात गुरफटवून त्यांचे शोषण करणारे हे पुरोहित भाट 


"दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान पुरयितुं समर्थ:" 



अशी आक्रमक मुस्लीम सम्राटांची लाचार स्तुती करत त्यांचे तळवे चाटत बसले. आणि हिंदुस्थान ला गुलामगिरीच्या खाईत लोटण्याचे प्रमुख कारण बनले.











यासंदर्भात चार्वाकाच्या लोकायत दर्शनातील एक श्लोक इथे उद्धृक्त करण्याचा मोह आवरत नाही. कर्मकांडे आणि त्याच्या कर्त्यांवर अतिशय भेदक पण यथार्थ टीका त्यात केली आहे.

‘अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम्‌ ।
बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृर्मिता ॥२॥’

अर्थात – ‘अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंड (साधूंची क्रिया), शरिराला राख फासणे - बुद्धी आणि पौरुष नसलेल्यांच्या उपजीविकेसाठी विधात्याने (या सर्व गोष्टी) निर्माण केल्या आहेत.’



दान करणे हा पुण्य कमवण्याचा सर्वात सोपा राजमार्ग. या असत्य आणि भ्रामक कल्पनेने पुराणकाळापासून अनेकांना नागवल्याचे आपणास ज्ञात असेलच. सामान्यांच्या खिशाला तर आयुष्यभराचे छिद्र या कल्पनेने पडून ठेवलेलेच आहे पण अनेक राजे-राजवाड्यांचे खजिने देखील रिते केल्याचे अनेक दाखले देता येतील. एखाद्या दरोडेखोराला अनेक सायास करून मिळणार नाही इतकी संपत्ती या लबाड पुरोहितांनी या षडयंत्री कल्पनेचा वापर करून मिळवल्याचे दिसते. दान दक्षिणा असल्या फालतू कल्पना म्हणजे सामान्यांचा बुद्धिभेद करून त्यांच्या घामाच्या पैशावर घातलेला धडधाकट दरोडाच नाही तर दुसर काय आहे ?सत्पात्री दान करावे (म्हणजे ब्राह्मणाला) आणि ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ट या दोन्ही परस्परविरोधी कल्पना वंशश्रेष्ठत्व दानधर्म या दोन्ही गोष्टींसंदर्भात विचारवंतांना चीड आणणा-याच आहेत .



हिंदू धर्म म्हणजे एक सांस्कृतिक विचारधारा आहे ही कल्पना ज्यावेळी आपण स्वीकारतो तेव्हा या समाजात अव्यवस्था अनीती माजवणा-या असल्या संकल्पना नाकारणे आणि त्यांचे समूळ उच्चाटन करणे ओघानेच आले. आणि कर्मकांडाला विरोध करताना ज्यांच्या हितसंबधांना यातून बाधा येणार आहे ते वर्षानुवर्षे लोकांचे शोषण करून त्यांचे रक्त पिवून माजलेले डास याला कडवा विरोध करणार यात शंकाच नाही. कर्मकांड वगळून हिंदू धर्माचे तर्काधीष्टीत तत्वज्ञान सांगणारे ,यांसदर्भात मार्गदर्शक ठरू शकेल अश्या चार्वाक दर्शनासबंधी पुढील लेखात लिहीन. तूर्त विराम घेऊ ...


 - सुहास भुसे 

( रोखठोक साठी )


         

Saturday, 29 September 2012

कर्मकांडाचा अतिरेक - १


हिंदू धर्माचा उगम हा अज्ञात आहे . मुळात ही एक सांस्कृतिक विचारधारा असल्याने त्याची अधिकृत अशी स्थापना कधी झालेलीच नाही.( संदर्भ- हिंदू धर्म एक सांस्कृतिक विचारधारा ) म्हणूनच त्याचा उगम अज्ञात आहे . त्याचा कोणी कर्ता नाही. तसेच हिंदू धर्मावर प्राचीन काळापासून अनेक आक्रमणे होत राहिली आहेत. त्या सर्व संकटांना तोंड देत हिंदू धर्म आजही खंबीरपणे उभा आहे. या दृष्टीने पाहीले असता हिंदू धर्माचे अनादी अनंत स्वरूप आपल्या लक्षात येते.

अतिप्राचीन काळात या धर्माचे स्वरूप अतिशय तरल आणि पारदर्शी असल्याचे आपल्या अनेक संदर्भांवरून लक्षात येते. सर्व विचारधारांना सामावून घेत आणि सामान्य माणसाचा विचार करून हा धर्म आपला मार्ग अनुसरत होता. त्यामुळे कोणासही तो सहज अनुसरता येत होता. वर्ण व्यवस्था देखील लवचिक होती. कालांतराने कर्मठ लोकांनी हाती असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करत या विशुद्ध धर्माचे स्वरूप पार बदलून टाकले . उत्तर वैदिक काळात वर्णश्रेष्ठत्व ,यज्ञयाग ,कर्मकांडे यांचे प्रचंड स्तोम माजवले गेले. हिंदू धर्मातील अनेक मूळ कल्पना आणि संकेत स्वत:च्या स्वार्थासाठी समाजातील उच्च म्हणवल्या जाणा-या (अर्थातच स्वयंघोषित ) वर्गाने पार बदलून टाकले. अनेक गोष्टी स्वत:ला हव्या तशा वळत्या करून घेण्यात आल्या.


उदाहरण म्हणून एक प्रातिनिधिक गोष्ट सांगेन या संदर्भातील. यज्ञ या शब्दाची फोड ' यत् + ज्ञ ' अशी आहे . याचा अर्थ ' ज्यातून ज्ञान येते तो यज्ञ ' . प्राचीन काळात आपली संस्कृती अतिशय प्रगत असल्याचे अनेक पुरावे जगापुढे येत आहेत . त्याविषयी विस्तारपूर्वक पुन्हा केव्हातरी नक्की लिहीन. सर्वच शास्त्रात अनेक हिंदू विद्वान मंडळी पारंगत होती . खगोल ,तर्क ,तत्वज्ञान ,अध्यात्म ,वास्तुशास्त्र , तंत्रज्ञान अश्या सर्वच क्षेत्रात ही संस्कृती अतिशय प्रगत असल्याचे ढीगभर पुरावे आता जगासमोर येत आहेत . आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत आपण जर प्रयोग या शब्दाची व्याख्या केली तर ज्यातून ज्ञान येते किंवा ज्ञान मिळवण्यासाठी जो केला जातो तो प्रयोग ही व्याख्या आपल्या यज्ञ या शब्दाच्या अर्थाशी चपलख जुळते. यज्ञ म्हणजे प्राचीन काळातील शास्त्रज्ञांनी केलेले प्रयोग होत असे अनेक तत्ज्ञांचे मत आहे . परंतु उत्तर वैदिक काळात या शब्दाला निराळाच अर्थ चिकटवला गेला . आणि प्रयोग म्हणून केला जाणारा यज्ञ फक्त एक निरर्थक होम बनून राहिला.यज्ञाच्या नावाखाली उत्तरकाळात चालू झालेल्या प्रकाराला यज्ञ कोणत्या अर्थाने म्हटले जात होते ?त्या निव्वळ कर्मकांडाला दुसरा एखादा अर्थपूर्ण आणि सुसंगत शब्द न सुचण्याइतपत तात्कालिक भाषापंडितांचे शब्ददारिद्र्य होते हा मुद्दा पटत नाही. कालांतराने यज्ञात पशुहत्या आदी प्रकारांची भर पडत त्याचे पूर्ण विकृतीकरण झाले .अशाच प्रकारे इतर अनेक गोष्टींचे विकृतीकरण करून मूळ विशुद्ध हिंदू धर्माचे स्वरूप बदलून टाकण्यात आले.





हिंदू धर्माचे मूळ तत्वज्ञान हे बरेचसे अद्वैती स्वरूपाचे होते .निसर्ग आणि इतर जीवनदायीनी गोष्टींची पूजा हाच लोकांचा खरा धर्म होता. ही इथल्या लोकांमध्ये खोलवर आणि घट्ट रुजलेली संस्कृती होती . तिचे पाळेमुळे समूळ उखाडणे या स्वयंघोषित धर्ममार्तडांना शक्य झाले नाही. आपल्या अनेक परंपरा सणवारांमध्ये तिची पाळेमुळे आपणास जाणवतात. विशेषत: ग्रामीण भागात ही निसर्गपूजक संस्कृती मोठ्या प्रमाणावर जोपासली गेल्याचे आपल्याला अनेक प्रतिकांतून जाणवते. मात्र हळू हळू हिंदू धर्माचा कल स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कष्ट न करता आयते जगण्याची साधने उपलब्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक वळवण्यात आला. अमूर्त देवतांची पूजा करणारा हा धर्म मूर्तिपूजक बनला. अद्वैती तत्वज्ञान मागे पडून द्वैत तत्वज्ञानाचे महत्व वाढले. पारलौकीकाचे ज्ञान करून घेण्यास आसुसलेले अध्यात्म लौकिक गोष्टींच्या दावणीला बांधण्यात आले. योग साधना ,ध्यान धारणा  अश्या गोष्टींना फाटा देऊन कर्मकांड म्हणजेच धर्माचरण बनवण्यात आले. उत्तर वैदिक काळात अनेक नवनव्या देवांचा उदय झाला . देवालये आली . मग भक्त आणि देव यांच्या मध्ये दलालांची एक साखळी उभी राहिली. आता या नव्या दैवतांच ( बदललेल्या स्वरूपातील अमूर्त -->मूर्त ) सर्व सामान्य भक्ताला निव्वळ दर्शन ही या दलालांच्या कृपेने मिळू लागले. अगदी प्रसादासाठी फोडलेल्या नारळातदेखील या दलालांचा वाटा निर्माण झाला.


आणि अश्या प्रकारच्या धर्माच्या विकृतीकरणाने धर्माचे मुळचे विशुद्ध रूप मागे पडले.आता आपल्या धर्माचा खरा अर्थ समजण्यासाठी भक्ताला या दलालांना शरण जाणे आवश्यक होते . नव्हे ते हेतुपुरस्पर आवश्यक करण्यात आले. कारण आता वेद हे मनुष्यनिर्मित न राहता स्वर्गलोकांतून फ्याक्स ने अवतरलेले साहित्य बनले होते. शिवाय ज्या भाषेत हे धर्मज्ञान होते तिला देवबोली म्हणून जाहीर करण्यात आले. देवाच्या तथाकथित दलालांशिवाय ती शिकण्याचा,वाचण्याचा सर्वसामान्यांना अधिकार उरला नाही. मग काय ‘ बाबा वाक्य प्रमाणमं !’ हे धर्माचे दलाल सांगतील तोच अर्थ मान्य करण्याशिवाय लोकांना पर्यायच उरला नाही. या सर्व खटाटोपामध्ये अतिशय शक्तिशाली असणारी समृद्ध अशी संस्कृत भाषा फक्त धर्माची आणि त्यातही परत कर्मकांडाची भाषा बनून राहिली. अश्या प्रकारे संस्कृत चा गळा घोटण्याचे कार्य तिच्या महान सुपुत्रांनीच केले.


हिंदू धर्म अध्यात्मिक तत्वज्ञानाच्या दृष्टीने परिपूर्ण होता आणि आहे. अनेक विद्वान हिंदू धर्माच्या पुत्रांनी सतत वाद-चर्चा-संवाद यांच्या माध्यमातून सतत लखलखीत ठेवलेले हे तत्वज्ञान काळाच्या उदरात पुढे २१ व्या शतकात समाज शिक्षित आणि शोषणमुक्त होण्याची वाट पाहत पडून राहीले. ‘ सत्याचे ज्ञान म्हणजे धर्म ’ ही धर्माची व्याख्या उत्तर वैदिक काळात पूर्णपणे बदलली.


यतोभ्युदयनि:श्रेयससिद्धी: स धर्म:
अर्थात ज्याच्यापासून विषयसुख व मोक्ष सुख मिळते तो धर्म
(संदर्भ – वैशेषिक दर्शन)



आता वाद-चर्चा-संवादांचे स्वरूप बदलले होते. पूजा करताना घंटा उजव्या हातात असावी की डाव्या? पूजा विधी करताना कलश मांडणी नेमकी कशी केली पाहिजे ? ताम्हन हे शास्त्रशुद्ध की पळी पंचपात्र योग्य ? अश्या चर्चांमध्ये हिंदू धर्ममार्तंड गुंतून पडले. इ स ६ वे शतक उजाडेपर्यंत या मंडळींनी हिंदू धर्माचे पार डबके करून टाकले होते.


                         ( क्रमश:)




                               
   

Monday, 24 September 2012

हिंदू धर्म : एक सांस्कृतिक विचारधारा

प्रास्ताविक :-


हिंदू धर्म, धर्मावर केली जाणारी टीका, आपल्या प्राचीन परंपरांचे केले जाणारे विकृतीकरण किंवा विडंबन , वर्षानुवर्षे बोकाळलेला जातीयवाद, अंधश्रद्धा  अश्या अनेक गोष्टींमुळे अनेक सर्वसामान्य हिंदू संभ्रमित असलेले दिसतात.  खरच आपले मूळ काय आहे, कोण आहे मी ? हा सनातन प्रश्न आजही अनेकांना भेडसावत असलेला पाहायला मिळतो. या विषयावर अनेकांचे लिखाण वाचण्याचा योग आला. " मी हिंदू नाहीच कारण असा कोणता धर्मच अस्तित्वात नाही" अश्या शीर्षकांचे काही लेख हि वाचनात आले. अशा लोकांनी हिंदू धर्माच्या मुळावरच घाव घालण्याचे उद्योग सुरु केले आहेत. साधारणतः अश्या लोकांचा राग हा हिंदू धर्मावर नसून हिंदू धर्मातील वर्चस्ववाद्यांवर ज्यांनी या प्राचीन धर्माचे अपहरण केले आहे त्यांच्यावर आहे हे उघड आहे. अश्या लोकांनी हिंदू धर्माचे सत्य, तरल, सुंदर व शुद्ध रूप जाणून घेणे गरजेचे आहे.


धर्म म्हणजे काय ?


धर्म म्हणजे काय ? या मुलभूत प्रश्नापासून सुरवात करू. अनेक तत्वज्ञानी धर्माच्या अनेक व्याख्या केल्या आहेत.माझ्या मते हिंदू विचारधारेनुसार धर्म म्हणजे एका चिरंतन अशा सत्याचे ज्ञान आणि धर्माचरण म्हणजे या सत्याचा घेतलेला शोध.


अपाणणिपादोहम्चिन्त्यशक्ति:पश्चाम्य्चक्षु: स श्रॄणोम्यकर्णः
अहं विजानामि विविक्तरुपोन चास्ति वेत्ता मम चचित्सदाहम २१

अर्थात

मला हात आणी पाय नाहीत। मी डोळे नसतानाही पाहतो आणि कान नसतानाही ऐकतो. मलाच सर्व ज्ञान आहे पण माझे अस्तित्व (ज्ञान) कोणालाही नाही कारण मी च ते पवित्र ज्ञान वा अंतिम सत्य आहे.

" याच अंतिम सत्याचे ज्ञान म्हणजेच धर्म "



हीच व्याख्या प्रमाणभूत मानून मी हिंदू धर्माविषयी मुक्त चिंतन रूप विचार मांडणार आहे.



हिंदू धर्म एक सांस्कृतिक विचारधारा 


हिंदू हा एक धर्म कमी आणि एक सांस्कृतिक विचारधारा जास्त आहे अस मला वाटत. आपल्या देशाला खूप पुरातन आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे. जेव्हा इतर देशातील लोक जंगलात कंदमुळे खात रानटी संस्कृतीत जगत होते तेव्हा आपल्या देशात समृद्ध अशा नागरी संस्कृती नांदत होत्या. सुमारे ५००० वर्षांपूर्वी जर्मनीतील कोकेशियस पर्वतातून आर्य भारतात आले असे काही तज्ञांचे मत आहे. तर काही तज्ञांचे मत आहे कि आर्य मुळचे इथलेच. सत्य काय आहे हा आता एक संशोधनाचा आणि इतिहासातील नोंदींचा भाग बनला आहे. तथापि आपण आपल्या संस्कृतीचे सुक्ष्म निरीक्षण केले असता इथ अनेक वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाफ झाल्याचे दिसून येईल. दक्षिण भारत, मध्य भारत, पूर्व आणि पश्चिम भारत, उत्तर भारत या भागात अनेक प्रथा परस्परांपेक्षा भिन्न असलेल्या दिसून येतात. आणि अनेक प्रथा आणि परंपरामध्ये समानतेचा धागा देखील दिसून येतो. या सर्व वरवर भिन्न वाटणा-या प्रथा, परंपरा, लोकजीवन आणि त्यातून वाहणारी एकच जीवनसरिता हीच पुढे इथली जीवनपद्धती बनली तिच इथल्या लोकांची विचारधारा बनली आणि तोच या लोकांचा धर्म बनला. माझा प्रिय हिंदू धर्म .....!! हेच कारण असाव कि अनेक विद्वानांना हिंदू या शब्दाचा उगम अर्वाचीन आहे असे वाटते.

       इथ जाता जाता एक गोष्ट नमूद करण्याचा मोह आवरत नाही. इतर धर्म आणि हिंदू धर्म यात एक फार मोठा फरक आहे. इतर बहुतेक धर्मांचा कोणीतरी प्रेषित आहे. त्याने सांगितलेले त्या त्या धर्माचे अंतिम तत्वज्ञान आहे. त्यावर कोणताही प्रतिवाद होऊ शकत नाही. हिंदू धर्माचा असा कोणताही उदगाता नाही. हिंदू धर्म अशी कोणतीही चौकट मानत नाही.बहुतेक धर्म एकेश्वर वादी आहेत. एकच देव, एकच धर्मग्रंथ, एकच उपासना पद्धती, एकच विचारसरणी . पण हिंदू धर्म मात्र सर्वथैव भिन्न आहे . इथ कोणी एकच देव नाही, एकच धर्मग्रंथ नाही, एकच उपासना पद्धती नाही, एकच विचारधारा नाही. हिंदू धर्म हे त्याच्या पाईकांसाठी एक प्रकारचे मुक्त प्रांगण आहे. इथे कोणतीही विचारधारा निषिद्ध मानली गेलेली नाही. कि अमुकच एका देवाच्या भक्तीचा आग्रह नाही उपासना पद्धतीचे मुक्त स्वतंत्र इथे आहे. कोणतेही कर्मकांड इथे सक्तीचे नाही. ज्याला जे हव, जे पटत, ते त्याने कराव, आचराव.   हिंदू धर्मात जितके पंथ आहेत तितके अन्य कोणत्याही धर्मात नाहीत.  देव मानणाऱ्या अन्य पंथांच तर सोडाच पण दार्शनिकांच्या मीमांसा, न्याय, सांख्य, लोकायत  अशा वेद प्रामाण्य नाकारणा-या, देवाचे अस्तित्वच अमान्य करणा-या विचारधारांनादेखील या विशाल अंत:करणाच्या धर्माने आपल्यात सामावून घेतल आहे. यातील निवडक दार्शनिक विचारधारांविषयी या लेखमालेत लिहिणारच आहे. तूर्त आटोपते घेतो.