About

Wednesday 1 March 2017

एबीवीपीचा माज

अमेरिकेतल्या कोणा माथेफिरुने श्रीनिवास या भारतीय तरुणाची हत्या करणे आणि ABVP च्या गुंडांचा नंगानाच यात एक साम्य आहे.
प्रत्यक्ष कृती करणारे गुंड, माथेफिरु नाममात्र असतात. त्यांच्यामागे असणारी विचारसरणी ही खरी ट्रिगरचे काम करत असते.
ट्रंप यांचे परदेशी वंशाच्या नागरिकांबद्दलचे प्रक्षोभक विचार, त्यांनी या संदर्भात वेळोवेळी केलेली प्रक्षोभक विधाने यानी एक  वातावरण निर्मिती केली आहे . ट्रंप सत्तेत येताच या विचारसरणीच्या लोकांना जोर चढणे साहजिक आहे. अश्या घटना पुढेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तोच प्रकार भारतात होत आहे. 2014 पूर्वी कोणाला फारशी ठावुकही नसणारी ABVP ही मवाल्यांची, गुंडांची गैंग आज खुलेआम स्त्रियांना बलात्काराच्या धमक्या देत आहे.  विद्यार्थ्यांना मारहाण करत आहे. हा माज त्यांच्या विचारसरणीचे लोक सत्तेत आल्याने आलेला आहे हे उघड गुपीत आहे.

गांधीहत्येस नथुराम पेक्षा ज्या विचारसरणीने गांधीविरोधी वातावरण तयार केले ती अधिक कारणीभुत होती. नथुराम कोणीही मिळाला असता. दाभोळकर पानसरे यांच्याबद्दलही तेच.

घटना, विचार, प्रतिके, संघटना यांचे आपसात गुंतलेले हे जाळे आहे. यांचा मुकाबला करायचा असेल तर मुळावर घाव घालुन ते निष्प्रभ केले पाहिजे. हे लोक काय चीज आहेत याची जाणीव समाजात सदैव धगधगती ठेऊन याना सर्वंकष सत्तेपासून सदैव दूर राखले पाहिजे. यांना ताकद द्याल तर उद्या हे दुधारी शस्त्र तुमच्यावरच उलटण्याची शक्यता नजरेआड करू नका.
©सुहास भुसे.


उजनीचे पाणी कुठे मुरतेय ?

उजनी धरण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 3 वर्षे दुष्काळ पडला तरी पाणी पुरावे हा हिशोब ठेऊन बांधलेले आहे. 2000 ते 2015 या 15 वर्षात 5 दुष्काळ पडले. दरवेळी पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले गेले. लातूर आणि मराठवाड्याएवढी भयंकर अवस्था सोलापुरवर कधीही ओढवली नाही. थोडी फार वैरण, थोडी पीके आणि माणसांना, गुरा ढोरांना पुरेसे पाणी .. कडक मधल्या कडक दुष्काळात एवढे तरी जपले जायचेच !!

या नियोजनाला सुरुंग लागला 2016 साली.
आदल्या वर्षी बऱ्यापैकी असणारा पाणी साठा कोरडा पडला आणि सोलापुरला पहिल्यांदा आपण राजकीय दृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रात असलो तरी भौगोलिक दृष्ट्या मराठवाड्यात आहोत याची जाणीव झाली. 15-20  वर्षात कधीही पूर्णपणे  कोरडे न पडलेले कालवे कोरडेफट्ट पडले.

मागच्या वर्षी पाऊस चांगला झाला. धरण 100 % भरले. आता तीन राहिली किमान दोन वर्षे तरी चिंता नाही अस म्हणत बळी राजा निर्धास्त झाला. पण आज उजनी मधील 60 % पाणीसाठा संपला अशी बातमी आली आणि बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकला. पावसाळा संपुन पुरते 4 महीने उलटतात न उलटतात तो 151 टीएमसीच्या प्रचंड धरणातले 60 % पाणी गेले कुठे ? उद्योगानी पळवले की बेसुमार वापर झाला ?

पण हे कळू शकेल अशी यंत्रणा अस्तित्वात नाही. पाण्याचे ऑडिट होत नाही. करोडो लोकांचे जीवन अवलंबून असणारे पाणी कोण किती वापरते याची माहिती सामान्य माणसाला मिळणे दुरापास्त आहे. ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. उजनी धरणाच्या लाभधारक शेतकऱ्यांनी पाण्याच्या ऑडिटची मागणी लावून धरायला हवी. मोठ्या प्रमाणात जागृती झाली नाही तर हे लोक असेच आपले पाणी पळवत राहतील, धरणातले पण आणि तोंडचे पण !!!
©सुहास भुसे