About

Sunday 25 December 2016

संस्कृतींची स्मारके

इंका लोकांनी श्वास घ्यायला कठीण अश्या उंच डोंगरावर बांधलेली प्रचंड दगडी बांधकामे ही इंका संस्कृतीची ओळख आहे. कोलासियम, फोरम, पैंथेऑन, प्रचंड आणि अद्भुत स्थापत्य पेश करणारी अनेकानेक स्मारके ही रोमची आणि रोमन लोकांची ओळख आहे. इजिप्तमधले पिरॅमिड ही इजिप्तीशियन लोकांची ओळख आहे. नाईल नदीच्या पात्राजवळ अबु सिंबेल येथे फॅरॉव रामासिसचे प्रचंड पुतळे अनेक वर्षे नाईलच्या पात्रातुन वाहतूक करणाऱ्या परदेशस्थांवर इजिप्शियन सत्तेचा, ऐश्वर्याचा, सामर्थ्याचा वचक ठेऊन होते. ग्रिकांचे एक्रोपोलीस, अथिनाचे भव्य पुतळे, पार्थेनॉन, क्रीटचा भूलभूलैया राजवाडा ही ग्रीकांची ओळख आहे.

काय प्रेरणा असतात भव्य दिव्य स्मारके बांधण्यामागे ?
मानवी संस्कृतीच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर मानवाने आपले सर्वस्व ओतुन अशी भव्य दिव्य स्मारके का उभी केली असावीत ?

दुसऱ्या कंगोऱ्यातुन विचार करू.
पाच शाह्यांच्या संयुक्त सैन्याने विजय नगरचा विध्वंस का केला ?
मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी जेथे जातील तिथल्या प्रार्थनास्थळांचा, स्मारकांचा विध्वंस का केला?
लादेनने बामियान मधील बुद्धाच्या मूर्त्या का फोडल्या ?
आक्रमकांनी अलेक्झांड्रीया, नालंदा अशी विद्यास्थाने का नष्ट केली ?
दूसरे महायुद्ध संपल्यावर दोस्त राष्ट्रानी, थर्ड राइशची जवळ जवळ सगळी भव्य बांधकामे,  हिटलर, मुसोलिनीच्या नामोनिशाण्या का नष्ट केल्या ?

या विध्वंसाचे कारण निव्वळ बदला किंवा धर्मवेड नसून त्याहुन अधिक काहीतरी आहे. एखादे भव्य स्मारक किंवा धार्मिक स्थान संबंधित समुदायाच्या अभिमानाचे भावनात्मक केंद्र असते. त्यांच्या पिढ्यानपिढ्यांचे संचित असते. ते त्यांना जगण्याचे बळ देत असते. तो त्यांचा प्रेरणास्त्रोत असतो. आणि त्यावर घाव घातला, एकदा ते नष्ट केले की मनोधैर्य ढासळलेल्या लोकांचा पराजय करणे, त्यांना गुलाम बनवणे अगदी सोपे असते.

भव्यतेची ओढ आणि दिव्यतेचे आकर्षण ही मानवाची आदिम प्रेरणा आहे. संस्कृत्या उदय पावत राहतील, नष्ट होत राहतील, आपल्या चिरंतन स्मारकांद्वारे त्यांनी काळावर उमटवलेले अमिट ठसे मात्र कायम राहतील. अनंत काळापर्यंत जगाला त्या संस्कृतिच्या, त्या राष्ट्राच्या महानतेची आठवण करून देत राहतील.
सुहास भुसे

Saturday 24 December 2016

स्मारक विरोधकांची वर्गवारी

सामान्य शिवप्रेमी जनतेला राजकीय डावपेच कळत नाहीत. त्यांची प्रामाणिक इच्छा आहे, आपल्या थोरल्या छत्रपतींचे त्यांच्या कार्याला साजेसे भव्य दिव्य स्मारक व्हावे. त्यांना हे स्मारक काँग्रेसच्या की भाजपाच्या कारकिर्दीत बनतेय याच्याशीही काही घेणे देणे नाही...
मात्र काही लोक शिवस्मारकाला विरोध करत आहेत. छत्रपतींच्या महाराष्ट्रात हे व्हावे ही खरे तर दुर्दैवी गोष्ट आहे. यात प्रामुख्याने तीन प्रकारचे लोक आहेत.

1. हे लोक छत्रपतींचा पूर्वापारपासून दुःस्वास करतात. छत्रपतींच्या इतिहासातील नगण्य पात्रांचे उदात्तीकरण करणारे हेच लोक ... छत्रपती शंभु राजांचे चरित्र विपर्यस्त करणारे हेच लोक.

2. या प्रकारचे लोक हे वरच्या पहिल्या प्रकारच्या लोकांनी बुद्धिभेद केलेले लोक असतात. पाहिल्या प्रकारातील लोकांनी सांगावे आणि यांनी माना डोलवाव्या हे ही पूर्वापारपासून चालत आलेले आहे.

3. तिसऱ्या प्रकारचे लोक हे सवंग प्रसिद्धीसाठी हपापलेले आणि स्वतःला बुद्धिवादी म्हणवुन घेणारे लोक असतात. यांना प्रवाहाच्या विरुद्ध मत मांडण्याची प्रचंड खाज असते. लाखो लोक स्मारक व्हावे म्हणत आहेत मग मीही तेच म्हणालो तर माझे वेगळेपण ते काय राहिले ?
अश्या विचाराने हे लाइककमेंट पिपासु लोक स्मारकाला विरोध करत राहतात. त्यासाठी ते दुर्गसंवर्धना पासून आदिवासी शिक्षणापर्यंत आणि उदबत्ती पासून हत्तीपर्यंत एकूण एक यच्चयावत विषय स्मारकाच्या विषयात घुसडतात. वरच्या दोन प्रकारच्या लोकांच्या तुलनेत हे लोक अधिक घातक आणि अस्तनीतले निखारे असतात.

शिवप्रेमींनी स्मारकाला विरोध करणारे लोक यापैकी कोणत्या प्रकारात येतात याची वर्गवारी करून त्यांच्यापासून सावध राहावे.

©सुहास भुसे





Tuesday 20 December 2016

दिघे साहेबांची गोची

दिघे वहिनीनी पाण्याची बाटली हातात देत देतच विचारले,
"अहो, आजचे उरलेले वीस रूपये द्या  परत.. खालून भाजी आणते पटकन.. "
दिघे साहेब जरा दचकलेच..
थोड्स दबकत दबकत त्यांनी दहाची नोट काढून समोर धरली.
" हे काय ? दहाच रूपये ? काय हो अजून दहा रूपये कुठे गेले ?"
दिघे वहिनी खास राखून ठेवलेल्या जरबयुक्त आवाजात विचारत्या झाल्या.

दिघे वहिनी रोज ऑफिसला जाताना दिघे साहेबांना 30 रूपये मोजुन देतात. 10 रु बसने जाणे 10 रु येणे आणि मधल्या सुट्टीत चहासाठी दहा रूपये.
आज सुट्टे नसल्याने 50 ची नोट दिली तर दिघे साहेबांनी मौका बघून 10 रूपयांचा भ्रष्टाचार केलेला दिसत होता.
दिघे वहिनींची नजर चुकवत दिघे साहेब चाचरत म्हणाले,
"अग आज बस उशिरा आली म्हणून तोवर जरा कोपऱ्यावरच्या ठेल्यावरुन मसाला पान घेऊन खाल्ले मी "
हे ऐकून दिघे वहिनी जाम भडकल्या.
"मसाला पान खाताहेत मसाला पान, पेशवाई थाट हवा साहेबांना सगळा "
अशी गडगडाटी नांदी करत त्यानी दिघे साहेबांच्या वेंधळया आणि खर्चिक स्वभावावर तोफ डागली.
त्या माऱ्याने अर्ध्या तासाने भोवंड येऊन दिघे साहेब त्यांना मध्येच थांबवत म्हणाले,
"अग मी हवे तर उद्या येताना चालत येईन दंड म्हणून, उद्या 20 च रूपये दे मला. "
यावर संतुष्ट होऊन दिघे वहिनी भाजी आणायला खाली निघुन गेल्या.

एक प्रदीर्घ मोकळा श्वास घेत जरा रिलीफसाठी म्हणून दिघे साहेबांनी फेसबुक ओपन केले. सगळ्या वॉलवर मोदींना शिव्या आणि नोटबंदी निर्णयाची खोबरेल लाऊन ठासणाऱ्या पोस्टस् चा खच पडला होता. ते सगळे वाचून दिघे साहेबांना कळेचना की या लोकांना नक्की कसली अडचण येतेय ?
बस आणि चहासाठी असे किती पैसे लागतात रोज ?
"द्वेष्टे पुरोगामी, आणि अडाणी खेडूत शेतकरी कुठले " अस पटुपुटत त्यांनी WTS APP उघडले, आणि तिकडून आठ दहा छान छान नोटबंदी समर्थनाचे मेसेज कॉपी करून त्या अडाणचोट लोकांना चांगलीच सणसणीत उत्तरे दिली.

कमेंटच्या रिप्लाई मध्ये बसणाऱ्या शेलक्या शिव्या वाचायला ते थांबलेच नाहीत. दिघे वहिनी परत यायच्या आत त्यांना सगळी भांडीही घासुन ठेवायची होती.
©सुहास भुसे.


Saturday 10 December 2016

भवानी

भल्या पहाटे पहिल्या कोंबड्याला काशिनाथ जागा झाला. कडाक्याच्या थंडीत पांघरुणात मुरसून पडायचा मोह टाळून त्याने शाल अंगाभोवती गुंडाळून डोक्याला मफलरची टाफर मारली. चुलीतल्या गोवरीची राख हातावर घेत मिसरी करत त्याने आनंदीला त्याच्या कारभारणीला हाक मारली. आनंदी त्याच्या आधीच उठली होती. त्याची हाक ऐकताच चहाचे आधण ठेऊन तिने गरम पाण्याचा तांब्या त्याच्या हातात ठेवला. थंडीत अंगाचे मुटकुळे करून गोधडीत अंग चोरून झोपलेल्या पोरांना शिरपती आणि सदाला उठवायचे तिच्या जीवावर आले होते. पण काशीनाथची दुसरी हाक ऐकताच तिने हाका मारून ,हलवून त्यांना जागे केले. सगळ्यांनी पटकन उरकून गरम गरम चहा घेतला आणि हातात ब्याटऱ्या घेऊन कारल्याच्या फडात शिरले.

काशिनाथने घरच्या घरी ढोरमेहनतीने कारल्याचा फड मोठा जोरात जोपला होता. बोरी-बांबूच्या मांडवावरून हिरवीगार. कोवळी कोवळी लांबसडक कारली लोंबत होती. सगळ्यांनी अंग झाडून कामाला सुरवात केली. दिवस फटफटेपर्यंत सगळ्यांनी जोर मारून दहा क्रेट माल हातावेगळा केला.

अजून तासाभरात चार सहा क्रेटचा पल्ला मारून सगळ्यांनी माल उचलून अंगणात आणला. आनंदी पोरांना घेऊन कारली निवडायला बसली आणि काशिनाथ गुरांच्या धारा काढायला गेला. काशिनाथच गुरांची झाडलोट, आंबवणी, धारा, वैरण वगैरे आटोपेपर्यंत आनंदीने पोरांना घेऊन सगळी कारली छाटली. क्रेटमध्ये खाली केळीची पाने घालून ती कोवळी कोवळी कारली अलगद भरली. वरून त्यांना उन लागू नये म्हणून गोणपाटाची पोती ओली करून टाकली. सगळी बेस्तवार व्यवस्था लावून ती न्याहरीकडे वळली. झटपट न्याहरी बनवून तिने मुलांचे आटोपून त्यांना शाळेला पिटाळले. काशिनाथनेही झटकन न्याहरी करून आनंदीच्या मदतीने सगळी क्रेट गाडीच्या दोन्ही बाजूनी बनवून घेतलेल्या कॅरियरला लावून घेतली.

बाजार अकरा वाजल्यापासून खरा रंगात येई. म्हणजे काशिनाथला दहापर्यंत तरी बाजारात जायला लागे. आज सगळे लवकर उरकले म्हणून काशिनाथ जरा खुश झाला. कारली विकून त्याला कीटकनाशकवाल्याची उधारी सारायची होती, खतवाल्याला पुढच्या बाजाराचा वायदा करायचा होता. धाकट्या सदाचा शर्ट पाठीवर फाटला होता. दोन महिने झाले पोरगे ठिगळ लावून शर्ट घालत होत. नवा शर्ट हवा म्हणून बोंब मारत होते. त्याला नवीन गणवेश घ्यायचा होता. किराणा सामान आणायचे होते. म्हशीला भुस्सा आणायचा होता. सगळ्या कामांच्या यादीची एकवार मनातल्या मनात उजळनी करून त्याने मोटारसायकलला किक मारली.

बाजारात पोहोचायला काशिनाथला सव्वादहा वाजले. एका बाजूला गाडी लावत तो गाडीवरून उतरून एक एक क्रेट काढून खाली रचून ठेऊ लागला. तो क्रेट काढतो न काढतो तोच आठ, दहा व्यापारी बायांनी आणि माळणींनी त्याला गराडा घातला.

सुगलाबाई म्हणाली, ‘मामा देयाची का कारली?’
‘द्यायला तर आणली की व बाई, मागा की’
’बाजार लय पडलाय मामा, कुत्र खाईना माळव्याला. पण सगळी कॅरेट घेतो तुझी.’
‘कशी घेता व बाई, मागा गुत्तीच.’
’१० रु देतो बग एका कॅरेटला.’
१० रु एका कॅरेटला हे ऐकून काशिनाथ हतबुद्धच झाला. पंधरा ते अठरा किलो कारली फक्त दहा रूपयांना ?

‘चेष्टा करता का मावशी गरीबाची, नीट मागा की बाय जरा,’
‘धा रुपयाच्या वर परवडत न्हाय मामा, पण माल चांगलाय म्हणून तुला दोन रुपये वर देतो, १२ रुपयला दे कॅरेट.’
‘मावशी, जा बाय तुझ्या वाटनं, आपल न्हाय जुळायचं.’

हे ऐकत उभारलेली रखमा सौदा तुटतोय अस पाहून पुढे झाली. वरचे पोते बाजूला करून कॅरेट मध्ये हात घालत कारली दाबून बघत म्हणाली,
‘मामा १३ ला देयाची का? एकच भाव..’
हळू हळू काशिनाथ भोवती त्या सगळ्याजणी गिल्ला करू लागल्या. १०रु १२ रु १४ रु १५ रु..

काशिनाथच्या मस्तकातली अळी हलली.. उरफोड मेहनत करून जोपलेली कोवळी लूसलुशीत कारली मातीमोल भावाने लुबाडू पाहणाऱ्या त्या बायांची त्याला भयंकर चीड आली.
कॅरेटमध्ये चापचून १५ रु कॅरेट भाव करणाऱ्या एका बाईला संताप अनावर होऊन तो म्हणाला,
‘ये भवाने, ठेव ती कारली खाली. लाज वाटत नाही का १५ रु ला १५ किलो कारली मागायला?’

बस झाल..काशिनाथ च्या तोंडून रागाच्या भरात एक शिवी काय निसटली, सगळ्या साळकाया माळकाया त्याच्यावर तुटून पडल्या. रखमाने त्याचा शर्ट पकडला,
‘का रे मुडद्या, बाया माणस बगून शिव्या देतोस व्हय रं ?’
अस म्हणत रखमाने थोडा जोर लावताच कुजून गेलेल्या त्या शर्टच्या दोन चीरफाळ्या झाल्या. संधी साधून सुगलाने काशिनाथच्या एक श्रीमुखात भडकावली. बाया कचाकचा शिव्या देत जमेल तशी धराधरी करत होत्या आणि
काशिनाथला भर बाजारात होणारी आपली विटंबना बघून धरणी दुभंगून पोटात घेईल तर बर अस झाल होत.

अखेर त्या महामाया दमून बाजूला झाल्या व याच्या कारल्याला आता कोणी हात सुद्धा लाऊ नका असा इतर बघ्या व्यापाऱ्यांना दम टाकत तिथून चालत्या झाल्या.

शेजारच्या हॉटेलमधल्या पोऱ्याने काशिनाथला पाणी आणून दिले. काशिनाथने लडखडत उठून सगळी कॅरेट परत गाडीच्या कॅरियर ला लावली. एक भकास नजर बाजारावर टाकत त्याने गाडीला किक मारली. बाजाराच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गाढवलोळीच्या उकीरड्याजवळ त्याने गाडी थांबवली. आणि एक एक कॅरेट काढून उकिरड्यावर पालथे केले. सगळी कॅरेट पालथी करून डोक्याला हात लाऊन तो खाली बसला. इतका वेळ आवरून धरलेला कढ आता अनावर झाला आणि झाडासारखा अचल काशिनाथ विकल होऊन ढसाढसा रडू लागला.
(सत्यघटनेवर आधारित)

©सुहास भुसे