About

Friday 25 September 2015

सर्वेपि सुखिन: संतु । सर्वे संतु निरामया ।

सर्वेपि सुखिन: संतु । सर्वे संतु निरामया ।

     इंडिया असाच शायनिंग करत राहो. सोबतच भारताचेही थोडेफार धडभले होत राहो.

     त्यांच्या ४० मजली घरांचे ग्रिनीज बुकात रेकॉर्ड नोंद होवो ..
     पण आमच्या पांडबारावांचे घर खूप गळते. यंदा पावसाळ्यात तणसाने घर शाकारून घेण्याइतकी त्यांची ऐपत होवो.

     त्यांच्या पॉर्श, फेरारी ला भारतात आणण्याचे परवाने मिळोत ..
     पण आमच्या आनंदारावांचा एक बैल खूप थकलाय. यंदा सिझन ला जोडीला दुसरा बैल घेण्याची ताकद त्यांच्यात येवो.

     त्यांचे नऊ नऊ लाखांचे सूट अजून चमकत राहोत...
     पण आमच्या गण्याची गणवेशाची चड्डी दोन वर्षे वापरून बुडावर पार विगरून गेली आहे. पुढील वर्षी तरी त्याला नवीन गणवेश घेऊन देण्याची आर्थिक कुवत त्याच्या आईबापात येवो.

     त्यांच्या परदेश दौऱ्यासाठी, सहली, चिंतन सुट्ट्या, वर्ल्ड टूर साठी शुभेच्छा...
     पण आमचे मनोहरराव तिकिटाचे पैसे वाचवण्यासाठी २५ किमीवर राहण्याऱ्या आपल्या लेकीकडे चालत जातात. त्यांच्या पायातले बळ अक्षय राहो.

     त्यांच्या सर्दीवर परदेशात उत्तम उपचार होवोत...
     पण आमच्या कर्जबाजारी सदोबाची म्हाताऱ्याला लाखभर रु ऑपरेशन खर्च भरण्याची ऐपत नाही म्हणून सदोबाने त्यांना दवाखान्यातून घरी परत आणले आहे. त्यांचा शेवटचा प्रवास वेदनामुक्त व समाधानी होवो.

     त्यांच्या स्विमिंग तैंक मधले निळेशार पाणी पूर्ण विषाणूमुक्त राहो...
     पण आमच्या यमनाबाई, सखूबाई, गिरजाबाई तीन मैलावरील आटत चाललेल्या विहिरीतून पाणी आणतात. त्यांची घागर बुडण्याइतके पाणी त्या विहिराला अखंड राहो.

     एखादा तास वीज गेल्याने त्यांचा एसी बंद पडून त्यांच्या जीवाची तगमग न होवो...
     पण आमच्या गोविंदरावांचा वीजपंप दिवसातून दोन तास तरी सुरळीत चालावा एवढी सलग वीज त्यांना मिळत राहो. बाकी १८ तास लोडशेडींगमध्ये उकाड्यात झोपायला त्यांच्या मुलाबाळांना त्यांच अंगण तुझ्या दयेने प्रशस्त आहे.

     त्यांचे पोटातले पाणी न हालावे असे रस्ते, केबल्स, इंटरनेट,विज, पाणी आदी सुविधायुक्त इंफ्रास्ट्रक्चर पूर्ण बहराने पूर्ण होवो...
     पण आमचा हानमा गुडघ्याएवढ्या चिखलातून, काट्याकुट्यातून, 2 ओढे पार करून किराणा आणायला गावात जातो. त्याच्या वस्तीपर्यंत एक साधासा मुरुमाचा रस्ता तेवढा होवो.

     त्यांच्या स्मार्ट सिट्या शांघाय, बीजिंगच्या तोंडात मारतील अश्या उभ्या राहोत...
     सोबतच आमचे औंढी गांवही हागणदारी मुक्त होवो.

     त्यांच्या नवनव्या फॅक्टऱ्या उभ्या करण्यासाठी आय सी सी आय डी बी आय आदी बॅकांची फौज इंडस्ट्रियल कर्जाची पॅकेजेस घेऊन त्यांच्या दारात खेटे घालत राहो...
     पण यंदा पावसाने दगा दिल्याने आमच्या उमाजीरावाने बायकोचे मंगळसूत्र मोडून ही दुबार पेरणी व खतासाठी २० हजार उभे झाले नाहीत. त्यांची नड भागून त्यांच्यावर गळफास लावून घेण्याची वेळ न येवो.

     इंडिया त्यांच्या पैश्याच्या महापुरात पोहत असाच झगमगत राहो...
पण आमचा भारत फक्त नीटनेटक धडुत लेऊन, बऱ्यापैकी छपराखाली, पोटभर दोन घास खाऊन सुखी असो.

सर्वेपि सुखिन: संतु ।
सर्वे संतु निरामया ।।
सर्वे भद्राणि पश्यंतु ।
मा कश्चित दु:खभाद् भवेत ।।

©सुहास भुसे.

Sunday 20 September 2015

हिंदुत्ववादी की मनुवादी ?

हिंदू धर्माचे सांस्कृतिक स्वरूप जर आपण ध्यानात घेतले तर हिंदुत्ववाद या सध्या बऱ्यापैकी फोफावलेल्या संकल्पनेमधील फोलपणा आपल्या ध्यानात येतो. हिंदुत्ववाद ही विचारधारा मानून जे लोक फेसबुकवर आणि समाजात सध्या वावरत आहेत त्यांचे निरीक्षण केले असता आपणास त्यांची खालील काही वैशिष्ट्ये ध्यानात येतात.

-हे मुद्द्यांवर कधीही चर्चा करत नाहीत.
-विरोध केला की आक्रमक असंबद्ध टीका करतात किंवा शिव्या देतात.
-अनिष्ट गोष्टींवर टीका केली की धर्मद्रोही ठरवतात.
-त्यांच्या दृष्टीने धर्मद्रोही लोकांना सुंता करा, पाकिस्तानात चालते व्हा असे आदेश देतात.
-सतत आमचा धर्म आमचा देव असे ठेकेदारी उल्लेख हिंदूंशी बोलतानाही करत राहतात.
-सावरकर टिळक परशुराम यांची चिकित्सा केली की हे भयंकर चिडतात.
-हिंदू धर्माचा काडीमात्र अभ्यास यांना नसतो.
-हिटलरला हे आदर्श मानतात. अजूनही अखंड हिंदूराष्ट्र या भासमान कल्पनेची स्वप्ने बघत असतात.
-आपण जन्मजात देशप्रेमी असून देशप्रेमाचे आपण घावूक गुत्तेदार आहोत अशी यांची अंधश्रद्धा असते.
-हे स्वत: भयंकर अंधश्रद्धाळू असतात. आणि सर्व पुरोगामी नास्तिक असतात अशी यांची अजून एक अंधश्रद्धा असते.
-चातुर्वन्य व्यवस्थेचे हे पुरस्कर्ते असतात.

    अजून बरीचशी सांगता येतील पण सहसा ही समान वैशिष्टे प्रत्येक स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यात आढळतात.
हे लोक स्वत: ला हिंदुत्ववादी किंवा काहीही म्हणवून घेत असले तरी इतरांनी देखील त्यांना या नावाने संबोधने चुकीचे आहे. हिंदू धर्माच्या मूळ गाभ्याच्या पूर्ण विरोधी अशी ही विचारसरणी आहे.

     हिंदू धर्मावर भयंकर टीका करणारे चार्वाक हिंदू धर्माच्या षडदर्शनात मानाने विराजमान आहेत. धर्मसुधारणेची एक फार मोठी परंपरा या धर्माला आहे. अर्थात दुसऱ्या बाजूला सनातनी कट्टर जातीयवादाची काळी बाजू देखील आहे. पण हा सनातनी वंशश्रेष्ठत्ववाद किंवा जातीयवाद हे हिंदू धर्मावरचे बांडगुळ आहे मूळ तत्वज्ञान नव्हे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. हिंदुत्ववादी विचारसरणी हिंदू धर्माशी सुसंगत नाही. Hinduism is basically wrong word. Hindu is not ism it’s a way of life.   हिंदू हा धर्म नसून एक समृद्ध जीवन जगण्याची पद्धती आहे.. ही जीवनपद्धती जगताना प्रत्येक हिंदूने मांडलेले, अंगीकारलेले प्रत्येक तत्वज्ञान हे हिंदू तत्वज्ञान आहे.
मग या स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांना कोणते नाव किंवा दर्जा द्यावा ?

     वर उल्लेख केल्याप्रमाणे हिंदू धर्म बापाचा माल असल्याप्रमाणे किंवा हिंदू धर्म आणि त्यातले सगळे धर्मग्रंथ आणि देवदेवता यांची ठेकेदारी आपल्याकडे दिल्याच्या अविर्भावात हे लोक वावरत असतात. व उठता बसता नवेनवे फतवे काढत असतात. अर्थात हे अत्यंत चूक व हिंदू तत्वज्ञानाच्या विरोधी आहे. त्यामुळे याला कोणी फारशी भिक घालू नये. यांना फार फार तर हिंदू धर्मातील एक वाट चुकलेला छोटासा कट्टरपंथ हा दर्जा देता येईल.
तसेच या हिंसक वृत्तीच्या लोकांना हिंदुत्ववादी या विशेषणाने संबोधणे म्हणजे हिंदू धर्माचा अपमान आहे असे मला वाटते. एकंदर यांची विचारसरणी पाहता यांना हिंदुत्ववादी न म्हणता मनुवादी असे म्हणावे असे सर्व समविचारी लोकांना माझे आवाहन आणि हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या लोकांना ही आवाहन आहे. मनुवादी हे नाव घेऊन वावरल्याने त्यांच्या विचारसरणीला न्याय मिळेल तसेच त्यांच्या विचारसरणीची पूर्ण कल्पना इतर लोकांना केवळ नावावरून लगेच येऊन जाईल.

     आणि हजारो वर्षात असे अनेक लुंगे सुंगे पंथ आले आणि गेले. हिंदू धर्म सहिष्णू होता आणि राहील. आमच्या धर्मात काही बांडगुळे धर्माचे विडंबन करत आहेत. देव देवतांच्या नावे लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवून त्यांचे आर्थिक, राजकीय, सामाजिक, जातीय, मानसिक सर्वप्रकारचे शोषण करत आहेत. आम्ही त्याविरुद्ध कोरडे ओढणार. आमच्या देवावर, आमच्या धर्मावर आम्ही टीका करणार. प्रबोधन करणार. लिहिणार..बोलणार. कोणाला काय उखडायची असतील ती त्यांनी उखडावी !!

जय चार्वाक !! जय कपिल !! जय शिवशंकर !!

©सुहास भुसे.


सनातनचा बिमोड आवश्यक

सनातन संस्थेवर नुसती बंदी घाला अशी मागणी पुढे येतेय. अर्थात तिलाही अनुल्लेखाने मारले जात आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या आणि तिचे धागेदोरे हा विषय अत्यंत गंभीर तर आहेच पण अजून एका महत्वाच्या गोष्टीकडे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे. त्यावर फारसे कोणी लिहिलेले माझ्या वाचनात तरी आले नाही. सनातन संस्थेचे सातत्यपूर्ण प्रक्षोभक लिखाण, ते समाजात पसरवत असलेल्या अंधश्रद्धा, अनेक कोवळ्या तरुणांना नादी लावून त्यांची उध्वस्त केलेली भविष्ये आणि या सर्वातून समाजाचे केलेले सर्व प्रकारचे शोषण.

     दाभोळकरांच्या खुनाआधी केलेले प्रक्षोभक लेखन त्यांच्या मृत्युनंतर लिहिलेले दांभिक कुत्सित अग्रलेख हे सर्व लपून छपून केले जात नाहीये तर उघडपणे प्रिंट मिडिया, इलेक्ट्रोनिक मिडिया यांच्या माध्यमातून उघड उघड पणे केले जात आहे. आणि तरी देखील पुरोगामी समाज व सरकार यावर गप्प आहेत. “जे आपल्या विचारांना विरोध करतात त्यांना नष्ट केले पाहिजे” असल्या तालिबानी भाषेत वृत्तपत्रीय लेखन करून तरुणांची माथी भडकावली जातात. समाजात प्रबोधन करणाऱ्या विचारवंताना टार्गेट करून सातत्याने त्यांच्याविरुद्ध गरळ ओकून एक वातावरण निर्मिती केली जाते. नुकताच पानसरेंच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केलेला समीर गायकवाड वयाच्या १५ व्या वर्षापासून सनातनचा साधक आहे. अश्या कोवळ्या, संस्कारक्षम वयात अश्या दहशतवादी विचारांचा मारा करून तरुणांचा ब्रेन वाश केल्यावर ते तरूण खून बॉंबस्फोट किंवा तत्सम हिंसक कारवाया करण्यास प्रवृत्त झाले तर यात दोष कोणाचा? याला आठवले आणि सनातन संस्था जितकी जबाबदार आहे तितकीच हे सर्व उघडपणे सुरु असताना डोळ्यावर कातडे ओढून मूकपणे पाहणारी शासनव्यवस्था ही याला तितकीच जबाबदार आहे. आज तर सनातन संस्थेने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना कठोर साधनेची शिक्षा दिली जाईल असे जाहीर करून सर्व शासन व कायदा सुव्यवस्थेला उघड आव्हान दिले आहे.

     यांचे आश्रम, त्यात घरदार, कामधंदा सोडून पडून असलेले साधक, आश्रमात सेवेसाठी सोडलेल्या साधिका हा काय प्रकार आहे ? विज्ञान तंत्रज्ञान युगात जग कोठे चालले आहे आणि हे धर्माच्या नावाखाली लोकांना कोठे घेऊन जात आहेत? साधकांची तपासली जाणारी अध्यात्मिक पातळी तीही टक्क्यात. टक्केवारी वाढली की दर्जा वाढला. विशिष्ट अध्यात्मिक पातळी गाठली की संतपद. स्थूल रूप काय, सूक्ष्म रूप काय अरे काय चालले आहे काय हे? हा पप्पू आठवले चक्क स्वत: ला विष्णूचा अवतार घोषित करून लोकांचे शोषण करत आहे. हे सर्व जितके हास्यास्पद आहे तितकेच चीड आणणारे आहे.

     नुसती सनातन संस्थेवर बंदी घालून हा प्रश्न सुटणार नाही. नवीन नाव घेऊन नवीन संस्था काढून हे लोक पुन्हा कार्यरत होणार. यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. बंदी तर आणलीच पाहिजे शिवाय यांच्या सर्व तथाकथित आश्रमांना टाळे ठोकून सर्व साहित्य जप्त करून आजवर केलेले सर्व लेखन तपासून त्याची संगती लावून आजवर कोणकोणते गुन्हे यांनी केले आहेत याचा वेध घ्यायला हवा. सनातन संस्थेच्या सर्व पदाधिकारी व प्रवक्त्यांसाठी एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन करून यांची घरे देखील तपासून यांना आत घ्यायला हवे. जादू टोणा विरोधी कायद्याच्या तरतुदी खाली समाजात अंधश्रद्धा पसरवल्याच्या आरोपाखाली सर्वप्रथम पप्पू आठवले ला उचलला पाहिजे. पप्पू आठवले हा खरच विष्णू चा अवतार आहे का याची त्याला चौदावे रत्न दाखवून, थर्ड डिग्री लावून तपासणी व्हायला हवी. सनातन संस्थेची संपूर्ण पाळेमुळे खणून काढून या विषवल्लीचा पूर्ण बिमोड केल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत.

     राज्याचे गृहमंत्रीपद भूषवणारे आपले कर्तुत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर  कठोर भूमिका घेतात की सनातन ला पाठीशी घालतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

©सुहास भुसे




Saturday 5 September 2015

चिकित्सेला विरोध का ?

     आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व त्यानिमित्त साजरा होणारा शिक्षक दिन. आज शिक्षक दिन साजरा करू नये राधाकृष्णन यांचे कार्य विवाद्य आहे तर त्यांच्यापेक्षाही काहीजणांचे उदा. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे असे मानणारा व तसे ठासून मांडणारा एक मोठा विचारप्रवाह आज दिसून आला.  तर अश्या प्रकारच्या पोस्ट किंवा विचार मुद्दाम ब्राह्मण समाजाला टारगेट करून केल्या जातात किंवा मुद्दाम चिखलफेक केली जाते अश्या स्वरूपाचे दुसऱ्या बाजूने प्रत्युत्तर दिसून आले. या वादात थेट मत देण्यापेक्षा मी एका वेगळ्या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेऊ इच्छितो.

     एक महत्वाचा प्रश्न असा की सर्वच ब्राह्मण व्यक्तींवर टीका केली जाते का ? राजकीय क्षेत्रात आगरकरांवर, एसेम जोशींवर कधी अशी टीका दिसली नाही किंवा इतिहासात खंडोबल्लाळ, पंताजी गोपीनाथ, राहुजी सोमनाथ, थोरला बाजीराव पेशवा यांच्यावर कधी टीका दिसली नाही. इतिहास लेखन क्षेत्रात वा सी बेंद्रे, कमल गोखले, नर फाटक, सेतू माधव पगडी यांच्यावर कधी टीका दिसली नाही. मग सर्वच ब्राह्मण व्यक्तींना मुद्दाम टारगेट केले जाते म्हणण्यात कितपत तथ्य आहे ? रामदास, दादोजी, टिळक, सावरकर, राधाकृष्णन, पुरंदरे, राजवाडे यांच्यावर टीका होत असेल तर ती का होत आहे हे ही समजून घेतले पाहिजे. ब्राह्मण आहेत म्हणून टीका होते म्हणणे म्हणजे पळवाट झाली. जेव्हा एखादा आदर्श समाजापुढे ठेवला जातो तेव्हा तो समाजातील सर्वच स्तरांना आदर्श वाटायला हवा. आदर्श हा सर्वमान्य होण्यासाठी तो सार्वत्रिक हवा. तो जर एखाद्या जातीपुरता किंवा समाजगटापुरता मर्यादित असेल तर काही स्तरांतून विरोध होणे साहजिक आहे. नको इतके अनावश्यक उदात्तीकरण काळाच्या कसोटीवर तर टिकत नाहीच शिवाय एकासाठी उदात्त असणारी व्यक्ती दुसऱ्यासाठी तिरस्कृत ठरते. चिकित्सेचा आग्रह धरणे चूक कसे ? उलट मी तर ही एक संधी मानेन. होत असणारे आरोप कसे चूक आहेत हे शांतपणे पुरावे देऊन खोडून काढण्याची संधी. या व्यक्तींचा अपमान न करता, शिवीगाळ न करता पुरावे देऊन सत्य तेच मांडून कोणी चिकित्सा करत असेल तर त्याला विरोध का व्हावा ?

     याला उत्तर म्हणून फुले शाहू आंबेडकर यांच्यावर टीका केली तर चालेल का असा प्रश्न विचारला जातो किंवा थेट केलीही जाते. अवश्य केली जावी. जे संयत भाषेत सत्य गोष्टी पुराव्यादखल मांडून चिकित्सा होत असेल तर ती व्यक्ती कोणीही असेल विरोध करण्याचे कारण नाही. उलट चिकित्सा केली म्हणून आकांडतांडव केल्याने होत असलेल्या आरोपांना उत्तर नसल्याचा भास निर्माण होतो. किंवा मांडलेल्या गोष्टी निर्विवाद कबूल आणि सत्य असल्याचा संदेश समोरच्या बाजूला मिळतो.

     समाजापुढे एकेकाळी आदर्श म्हणून मांडलेल्या व्यक्तीची चिकित्सा व्हावी व त्यातून तिची महानता अधिक ठळकपणे समोर यावी. जे आदर्श या कसोटीत टिकणार नाहीत ते काळाच्या ओघात आपोआप बाजूला पडतील. या सर्व चिकित्सा, मंथन प्रक्रियेतून समाजापुढे सार्वत्रिक सर्वसंमत आदर्श ठेवले जावेत. ज्यायोगे विविध जातीपाती, धर्म, समाजगटातील दरी कमी होऊन एकजिनसीपणा येण्यास मदत व्हावी या उदात्त सकारात्मक हेतूसाठी सर्व चिकित्साप्रक्रियेचे स्वागत करायला हवे.

     ©सुहास भुसे    


एक होती लोकशाही

     भारतीय लोकशाहीने पाहता पाहता पासष्टी गाठली आहे. पण जितकी जुनी होते आहे तितकी ती परिपक्व होते आहे का ? की उत्तरोत्तर तिची अपरिपक्वताच वाढत चालली आहे ? खरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. देशात धार्मिक उन्माद वाढत चालला आहे. जातीपाती वगैरे समस्या जैसे थे आहेत. नव्हे उलट जातीय अस्मिता आधी कधी नव्हत्या इतकी मान वर काढत चालल्या आहेत. राजकारण म्हणजे तर सामान्य लोकांसाठी फक्त टीकेचा आणि कलंकित विषय बनला आहे. सर्व समाजाने ज्यांच्याकडे आशेने पाहावे अशी आदराची स्थाने कमी होत चालली आहेत. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी अश्या विचारवंतांचे राजरोस खून पाडले जात आहेत. ही वाटचाल फारशी आशादायक नाही.

     धर्म, जात यात आपल्या जाणीवा संकुचित करून टाकण्याच्या काळात लोकशाही मूल्यांबाबत प्रबोधन ही गरजेची बाब होऊन बसली आहे. शालेय अभ्यासक्रमातला २० गुणांचा नागरिकशास्त्र विषय १०० गुणांचा करण्याची हीच वेळ आहे. संपूर्ण जगाने सार्वभौम लोकशाहीची कल्पना ज्या ग्रीस कडून उचलली त्या ग्रीसचे हजारो वर्षापूर्वीचे समृद्ध लोकशाहीचे तत्वज्ञान आजही आपल्याला ललामभूत ठरावे. “ मी अथीनियन नव्हे, मी ग्रीक नव्हे, मी जगाचा नागरिक आहे.” हे महान ग्रीक तत्वज्ञ सोक्रेटीसचे उद्गार आहेत.
सॉक्रेटीस

     एक मजेशीर पण उद्बोधक किस्सा.

     अथेन्स मधला लोकशाहीचा प्रारंभ काळ. कारभार चालवण्यासाठी दरवर्षी चिठ्ठ्या टाकून लकी ड्रो पद्धतीने ५०० लोकांचे एक मंडळ निवडण्यात येई. एका सभासदाला दोनदा काम करण्याची संधी मिळे. या पद्धतीने प्रत्येक नागरिक कधी ना कधी या प्रक्रियेचा घटक बनतच असे. हे ५०० लोक दर दहा दिवसांनी एक सभा घेऊन त्यात विविध समस्यांवर चर्चा करून निर्णय घेत असत. या लोकांना जर या ५०० जनात कोणी अयोग्य वाटत असेल किंवा जनहितविरोधी कारवाया करत असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी एक पद्धती होती. त्यानुसार अश्या अयोग्य सभासदांसाठी नकारात्मक मतदान घेतले जाई. खापराच्या तुकड्यावर नाव कोरून मत दिले जाई त्याला ऑस्राकॉन म्हणत. यात ज्या सभासदाला सर्वात जास्त मते मिळत त्याला दहा वर्षे अथेन्स सोडून जावे लागत असे.

     अरिस्टेडेस ( aristedes bc 530 to bc 468 ) नावाचा एक सांसद तेव्हा न्यायी, न्यायी म्हणून खूप गाजला होता. पण या कीर्तीचा त्याला थोडा गर्व झाला. तो त्याच्या वर्तनातून जाणवू लागला. तेव्हा सभासदांनी त्याची ही ‘ग’ ची बाधा उतरवायची ठरवली. या सभेसाठी जात असताना अरिस्टेडेस एका शेजारून चाललेल्या सभासदाशी बोलत होता. तो सभासद अरिस्टेडेसला ओळखत नसल्याने अरिस्टेडेसच्या तोंडावरच त्याने त्याची निंदा सुरु केली. व शेवटी म्हणाला या अरिस्टेडेसचा माज आज मी उतरवणार. त्याच्या विरोधी मतदान करणार. अस म्हणून त्याने स्वत:ला लिहिता वाचता येत नसल्याने मतदान करण्यासाठी नाव लिहून द्यायला खापराचा तुकडा अरिस्टेडेस पुढे धरला. क्षणभर हसून न्यायी अरिस्टेडेस ने आपल्या कीर्तीला जागत त्या तुकड्यावर त्याला आपले नाव लिहून दिले व त्यादिवशी झालेल्या मतदानात अरिस्टेडेस बहिष्कृत झाला. आणि तो फक्त एका मताने ! जे त्याने स्वत: च्या हाताने लिहून दिले होते.

     ही खरी समृद्ध लोकशाही आणि परिपक्व नेते व जनता ! ज्यांनी आपल्याला निवडून दिले आहे त्यांनी आपल्याला विचारलेला जाब केलेली टीका ज्या राजकारण्यांना सहन होत नाही त्यांनी खूप काही घेण्यासारखे आहे ना अरिस्टेडेस कडून. भारतीय लोकशाही देखील ही उंची लवकरच गाठो ही अंती शुभेच्छा !

     ©सुहास भुसे  

अरिस्टेडेस