About

Wednesday 18 January 2017

पुतळ्याचे एकांगी कवित्व

गडकरी पुतळा प्रकरणावरचे शेवटचे पोस्ट...

-गडकरीच्या पुतळा प्रकरणाचे 15 दिवस कवित्व सुरु आहे. सगळ्या वाहिन्यांनी यावर पूर्ण एकांगी चर्चा आयोजित केल्या. संभाजी ब्रिगेडवर टोकाची टीका केली. पत्रकारीतेेचा अत्यंत खालचा स्तर गाठत पुतळा हटवाणाऱ्या मुलांना गुंड म्हणून संबोधले. आम्ही पुतळा पुन्हा बसवु अश्या राणा भीमदेवी थाटात गर्जना करून झाल्या.

पण गडकरी यांनी राजसंन्यास या नाटकात शंभु राजांची बदनामी केली आहे का ? केली असेल तर का केली ? गडकरीचा पुतळा मुद्दामहुन नेमका संभाजी उद्यानातच बसवण्याचे काय कारण होते ? या प्रश्नांच्या अनुषंगाने किमान एखादी तरी चर्चा आयोजित करावी अस एकाही चॅनेलला वाटले नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. वस्तुस्थिती दाखवणे, न्यूज दाखवणे हे मिडियाचे काम नाही तर न्यूज बनवणे हेच मिडियाचे खरे काम आहे हे या निमित्ताने पुनश्च एकदा अधोरेखित झाले.

चिटनीस बखरीत शंभु राजांची विपर्यस्त प्रतिमा होती त्या आधारे गडकरी यांनी लेखन केले हा युक्तिवाद मान्य केला तरीही रंडीबाज, छकटा, दारूबाज अशी टोकाची विशेषणे गडकरी यांना का वापरावीशी वाटली असावीत ? तुळसा हे पात्र जी नात्याने शंभु राजांची चुलत बहिण लागत होती त्यांचे प्रेम कल्पुन बीभत्स श्रृंगार वर्णने गडकरीना का रंगवावीशी वाटली ? हे गलिच्छ लेखन वाचुन गडकरी हे शेक्सपियर नसून सेक्सपियर आहेत की काय ? असे प्रश्न एकाही विचारवंताला पडू नयेत ही खरोखर आश्चर्यकारक बाब आहे. मी पैज लावायला तयार आहे की यावर हिरीरीने चर्चा करत गडकरीची बाजू लावून धरणाऱ्या बहुसंख्य विचारवंतांनी / सांस्कृतिक गुंडानी राजसंन्यास हे नाटकच् मुळात वाचलेले नाही.

जाता जाता मराठीचे 'सेक्स'पियर गडकरी महोदयांच्या वैयक्तिक चरित्र, स्वभाव, जीवनाबद्दलही थोडीफार चर्चा करता आली असती. कारण या सर्व गोष्टिंचा प्रभाव लेखकाच्या लेखनावर पडत असतो. अंतरीचे धावे ..स्वभावे बाहेरी. आचार्य अत्रे यांनी गडकरी हे टोकाचे सनातनी होते असे लिहून ठेवले आहे. तसेच गडकरीनी एकच प्याला लिहिले हे अनेकांना ठाऊक असले तरी स्वतः गडकरी अट्टल दारूबाज मद्यपी होते हे अनेकांना ठाऊक नसेल. आदरणीय भाऊसाहेब खांडेकर जेव्हा आपल्या पाहिल्या वाहिल्या कवितांवर गडकरी यांची प्रतिक्रिया घ्यायला गेले तेव्हा गडकरी यानी दारूच्या नशेत धुत्त असल्यामुळे ती वही दिव्यावर धरुन जाळून टाकली. काय वाटले असेल नवलेखक खांडेकरांना त्यावेळी ? किती यातना झाल्या असतील त्यांना ? गडकरी चरित्रातले असे काही निवडक प्रसंग देखील या निमित्ताने लोकांपुढे आणून या एकंदर प्रकरणाचा समतोल राखता आला असता.

पण सांस्कृतिक क्षेत्रातील नामचीन गुंड विचारवंतांकडून आणि व्हाइट कॉलर गुन्हेगार चॅनेलवाल्यांकडून अश्या निस्पृह, निष्पक्ष पत्रकारितेची अपेक्षा करणे व्यर्थ आहे याची पुनश्च एकदा पक्की खात्री पटली.
©सुहास भुसे


Sunday 15 January 2017

ती सध्या काय करते ?

ती सध्या काय करते हा प्रश्न माझ्यापुरता त्या सध्या काय करतात असा व्यापक करुन घेतो.
याचे कारण म्हणजे मी भयंकर दिलफेक ...
दिसली जरा बरी पोरगी की फेकलेच दिल.
आता मी फेकले म्हणजे तिने झेलले असे क्वचितच होई हा भाग अलहिदा. पण प्रँक्टिस मेक्स म्यान परफेक्ट या उक्तीप्रमाणे उत्तरोत्तर फेकने आणि झेलने यातले व्यस्त प्रमाण कमी होत गेले.
सच्चा प्यार सिर्फ एक बार ही होता है
आपल्या तमाम सिनेमावाल्यांनी हा हग्या दम देऊन ठेवल्यामुळे आजवर हे सांगायचे धाडस मात्र होत नव्हते ...
पण आता कळले की हा सगळा पुरुषाला चु बनवण्याचा प्रकार आहे, निव्वळ मोदीगिरी , दूसरे काही नाही!!

हे खरे प्रेम एकदाच वाली भानगड मला कधीच कळली नाही.  या सगळ्या पोरींवर मी तेवढयाच उत्कटतेने, सच्चे दिल से वगैरे प्रेम केले. तिने मला घास डाला, तिने  नही डाला असला आपपर भाव ठेवला नाही. म्हणून तर मला त्या सगळ्या लख्ख आठवतात आणि बऱ्याच जणी सध्या काय  करतात हे ही ठाऊक आहे.
पहिलीपासून माझी फेकाफेकी सुरु असावी असे अंधुक अंधुक आठवते. स्पष्ट आठवते ती पहिली पोरगी पाचवीत तिच्याकडे दिल फेकलेले.  दहावीपर्यंत दुसऱ्या कोणाकडे दिल फेकण्याचा अजिबात मोह झाला नाही.

या बाबतीत मात्र मी भयंकर एकवचनी आणि तत्वनिष्ठ माणूस होतो. हायस्कूलमध्ये ती एकच, ज्युनियरला ती एकच, सिनियरला एकच, बीएड  ला एकच, एम ए ला एकच,  गावात एकच, तालुक्याला एकच, शेजारच्या गावात एकच. अर्थात या सगळ्याजणी वेगवेगळ्या होत्या. पण तरीही या आगळया एकवचनी बाण्याला दाद मिळायलाच हवी.

तर पहिली ती पाचवीतली .. तिच्यावर मर मर मरायचो. 6 वर्षे डोळे झिजवले तिच्यासाठी. पण कधी एक चकार शब्द ही बोलणे झाले नाही तिच्याशी. अगदी पाहिल्यांदा तिच्याशी बोललो ते इथे फेसबुकवर. तोवर तिला दोन पिल्ली व मला दोन पिल्ली झाली होती. तरीही आताही तिच्याशी पहिल्यांदा च्याट करताना काळीज धडधड करत होते. तिने माझ्या लिखानाचे कौतुक केले तेव्हा मनावर मोरपीस फिरले. मी तुझी वॉल नियमित वाचते आणि फक्त तुझीच वॉल वाचते अस म्हणाली तेव्हा कृतकृत्य झालो मी.
तर ही वाली ती काय करते ते इकडे समजले.

दूसरी ती दहावीच्या समर व्हेकेशनमध्ये भेटली. ही माझी दिलफेक फेक झेलणारी पहिली ती होती. ही देखील काय करते ते मला इथेच फेसबुक वर ठाऊक झाले. अर्थात यांना फेसबुकवर शोधण्यासाठी व संपर्क करण्यासाठी मला किती श्रम पडले असतील ते जे आपली ती इथे शोधतात त्यांनाच समजेल.

इथून पुढे ही ती, ती ती, इकड़ची ती, तिकड़ची ती असा सपाटा सुरु होता.

एक आठवणीत राहील अशी ती बी एड मध्ये माझ्या आयुष्यात आली. ती जास्त आठवणीत राहण्याचे कारण म्हणजे तिच्यापेक्षा तिची मैत्रिण. आणि ही मैत्रीण आठवणीत राहण्याचे कारण म्हणजे 'ही' ने मी फेकलेले दिल असे झेलले की परत सोडलेच नाही. अर्थात ती आता माझी सखी राज्ञी जयती बायको आहे.

आता इथून पुढे मात्र माझ्या दिलफेक वृत्तीला लगाम बसला (काय म्हणालात ? विश्वास बसत नाही ? कठीण आहे बुवा तुम्हा संशयी लोकांचे )

आणि ही गोष्ट इथेच संपवणे माझ्या सुरक्षेच्या व पोटाच्या दृष्टीने हिताचे आहे.
©सुहास भुसे.


मोदींच्या तोडीचा नेता कोण ?

चर्चेत काँग्रेसच्या नेत्यांना हमखास विचारला जातो असा पत्रकारांचा आवडता प्रश्न म्हणजे
' मोदींच्या तोडीचा कोणी नेता आहे का तुमच्याकडे ? '

याचे सुयोग्य उत्तर काय असू शकते हे जाणून घेण्याआधी हा प्रश्न समजून घ्यायला हवा.
मोदींच्या तोडीचा याचा अर्थ काय ?
लोकशाही धाब्यावर बसवुन सर्व सत्ता व्यक्तीकेंद्री बनवणारा हुकुमशाह ?
वाट्टेल त्या थापा मारून जनतेला मुर्ख बनवणारा जुमलेबाज ?
प्रतिमाप्रेमापोटी अंध होऊन जनतेला शिसारी येईल इतपत स्वतःच्या चेहऱ्याचा जनतेवर मारा करून हसू करून घेणारा आत्ममग्न विदूषक ?
संसदेला फाट्यावर मारून लोकशाहीला काळीमा फासणारा खलनायक ?

मोदींच्या तोडीचा किंवा मोदींसारखाच नेता हवाय कोणाला ?
भारतात अध्यक्षीय लोकशाही नाही तर संसदीय लोकशाही आहे. लोकांना आता प्रभावी नेतृत्वाच्या मोहात हुकुमशाही लादून घ्यायची नाही. आता नेता हवा तो जरा कमी समज असलेला, कमी प्रभावशाली असेल तरी चालेल, पण सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, सहकाऱ्यांच्या सल्ल्याची गरज असणारा व त्यांचा आदर ठेवणारा नेता हवा. संसदेचा सन्मान करणारा, तिला बांधील असणारा नेता हवा.

मोदींच्या तोडीचा कोणी नेता आहे का हा प्रश्नच मुळी गुलाम मानसिकतेचे द्योतक आहे.
©सुहास भुसे


हुमनं

गावाकडे 'हुमनं ' हा एक फार मनोरंजक प्रकार असतो. शेतात काम सुरुय. खुरपण्याची पात धरलीय आणि एक बाई हुमन घालते... पात लावत लावत बाकीच्या बायका विचार करत राहतात .. दोन, तीन पाती लागेस्तो अनेक उत्तरे ट्राय करून होतात... पण सहसा योग्य उत्तर हुमन सांगणाऱ्याकडेच असते ...
ती उत्तर सांगते तेव्हा वाटत ' अरेच्चा, हे कळल कस नाही आपल्याला ? अगदी सोपे तर होते '

आता ही हुमनं फार कौशल्याने तयार केलेली असतात. बहुसंख्य हुमनं अशी असतात की याचे उत्तर अगदी अश्लील असणार अस वाटावे ...
उदा. " वरचे फुकट, खालचे विकत "
अस हुमन घातले की ऐकणाराच्या मन में लड्डू फुटतो .
तो त्याच ट्रैकवरुन उत्तर शोधत राहतो.. आणि चकतो .. हुमनाला दिलेली अश्लील डूब निव्वळ चकवण्याचा प्रकार असतो ...
आणि शेवटी उत्तर येते ते अगदी साधे .. ' कुंकवाचा करंडा '
अर्थात वरचा करंडा फुकट म्हणजे बिगर महत्वाचा, खालचे/आतले कुंकु खरे महत्वाचे !

अनेक हुमने मध्यमवर्गीय श्लील, अश्लीलतेच्या परिभाषेमुळे इथे उध्रुक्त करणे कठीण आहे.
एकच उदाहरण दखल ..
"लाल लाल करुन काळं आत सारलं,
चवड्यावर बसून हापकं दिलं "
आता असल्या भयंकर हुमनाचे प्योर वेज उत्तर असेल अस कोणाला वाटेल ?
ऐकणाऱ्याला भयंकर गुदगुल्या होतात. वेगवेगळया इंटरेस्टिंग उत्तरांवर तो विचार करू लागतो, पण दरवेळी चकतो ..
आणि नेहमीप्रमाणे उत्तर अगदी साधे असते.
'लोहाराचा भाता '

अशी अनेक हुमनं ग्रामीण प्रतिभेचा खजिना आहेत. कल्पकता, मनोरंजन, काव्यालंकार आदी गुणांनी नटलेली आहेत. पण आता जवळ जवळ विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहेत. यांचे संकलन करून हा ग्रामीण मनोरंजनाचा अस्सल देशी ठेवा जतन करण्याची गरज आहे.
©सुहास भुसे.


Thursday 12 January 2017

राज ठाकरेंचा इतिहास

राज ठाकरे यानी काल छत्रपती शंभु महाराजांबद्दल जे वक्तव्य केले ते खरे तर सगळ्यांनाच या सर्व प्रकरणाबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडनारे आहे. बाळाजी आवजी चिटनिसाला राजद्रोहाच्या आरोपाखाली हत्तीच्या पायी दिले याचा डुख मनात धरुन त्याचा खापरपणतु मल्हार रामराव चिटनिसाने 'श्रीशिवछत्रपतींची सप्तप्रकरणात्मक बखर' या आपल्या कुप्रसिद्ध बखरीत शंभुराजांची बदनामी करून त्यांचे चरित्र विपर्यस्त करून टाकले.  यानंतर गडकरीनी हीच बखर समोर ठेऊन त्यात आपल्या मनाची अधिक भर घालत 'राजसंन्यास' या नाटकात ही प्रतिमा आणखीनच विपर्यस्त करून टाकली. राजसंन्यासाच्या प्रभावाखाली त्यानंतरच्या काळातही जी नाटके, ललितकृती, सिनेमे आले त्यात शंभुराजांची ही गडकरीप्रभावित प्रतिमाच रंगवली गेली. सर्वसामान्य माणूस ऐतिहासिक साधने वाचत नाही. त्याच्या मनातील इतिहासाची घडण ही या ललित साहित्यातुनच होत असते.

वा सी बेंद्रे यांनी 40 वर्षे अथक मेहनत घेऊन, सगळ्या अस्सल संदर्भांची आणि ऐतिहासिक साहित्याची चाळणी करून शंभु चरित्रावरचे डाग धुवून काढले. रियासतकारांपासून चिटनिसापर्यंत सगळ्यांचे अवास्तव लेखन पुराव्यानिशी खोडून काढत शंभु चरित्राची नव्याने मांडणी केली. 'छत्रपती संभाजी महाराज' या त्यांच्या शंभु चरित्रानंतर शेकडो वर्षे अन्याय झालेला इतिहासनायक पुन्हा एकदा नव्या तेजाने झळाळुन उठला. हे जरी वास्तव असले तरी पुन्हा आपला पहिलाच महत्वाचा प्रश्न उरतो तो असे जड जड ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ वाचतो कोण ?

सामान्य माणसाच्या मनावर ललितकृतींचाच पगडा असतो.
राज ठाकरे, ज्यांच्या घराण्याने केवळ 'शिवाजी ' या एका नावाच्या महात्म्याखाली आपल्या राजकारणाची पाळेमुळे रोवली, जे प्रबोधनकारांचे नातू म्हणवतात त्यांना ही सगळी पार्श्वभूमी ठाऊक नसावी हे आश्चर्यकारक असले तरी विचारप्रवृत्त करणारे आहे. या वरुन लक्षात येते की गडकरीनी तयार केलेल्या शंभु राजांच्या अवास्तव प्रतिमेचाच अजुनही सामान्य लोकांवर किती पगडा आहे. तसेच गडकरींच्या पूतळयाचे उच्चाटन करुन यासंदर्भातील चर्चेला तोंड फोडणे देखील किती आवश्यक होते हेच राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन दिसून येते.

या सगळ्या प्रकरणानंतर तरी सामान्य लोक, गडकरीना बाप मानणारे कलावंत, गडकरींना देव मानणारे साहित्यिक वा सी बेंद्रे, कमल गोखले संशोधित इतिहास वाचतील. हळू हळू शंभु राजांची विपर्यस्त प्रतिमा समाजातून नाहिशी होण्यास या पुतळा प्रकरणापासून सुरवात होईल अशी आशा आहे.

ता क - संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांना वासी बेंद्रे लिखित शंभु चरित्र समारंभपूर्वक भेट देऊन ठाकरे घराण्याची वाचन संस्कृतीशी मागील दोन पिढ्यांत तूटलेली नाळ पुन्हा सांधन्याचे समाजकार्य करावे अशी संबंधिताना आग्रही विनंती..
©सुहास भुसे.


Wednesday 4 January 2017

संभाजी ब्रिगेड- समज आणि वास्तव

संभाजी ब्रिगेड या संघटनेची मला फेसबुकवर येईपर्यंत फारशी ओळख नव्हती. इथे आल्यावर हिंदुत्ववाद्यांनी पेरलेल्या समजुतीबरहुकुम पहिली ओळख झाली ती तरुणांची माथी भडकवणारी ब्राह्मणविरोधी संघटना म्हणून.. आणि आज जी शेरेबाजी होतेय तशी अडाणी, अशिक्षित लोकांची संघटना म्हणून ...

हळू हळू ब्रिगेडमधील अनेक मित्रांच्या संपर्कात येत गेलो, अनेक दिग्गज अभ्यासकांचा दुर्मिळ सहवास लाभला आणि मनावरील गैरसमजुतीची पुटे निखळत गेली.

संभाजी ब्रिगेड ही मिडिया हातात असणाऱ्या सांस्कृतिक दहशतवाद्यांनी इमेज बनवली आहे त्याच्या पूर्ण उलट संघटना आहे. वाचनसंस्कृती हा संभाजी ब्रिगेड चा आत्मा आहे. ही माणसे अखंड वाचत असतात. माणसांची श्रीमंती ते पुस्तकात मोजतात.
एक ब्रिगेड मधील स्नेही एकदा सांगत होते, " त्या अमक्याच्या घरी गेलो होतो, दाराशी 20 लाखाची गाडी, भला मोठा आलिशान बंगला, आम्हाला सगळा फिरून दाखवला, आम्ही बघत होतो पण घरात एकही पुस्तकांचे कपाट नाही. एका शेल्फवर दोन पुस्तके दिसली तेवढी चुकुन. अगदीच दरिद्री माणूस !"
यांची नजर आणि पारख ही अशी आहे.

अजुन एक स्नेही आहेत, यांना अमुक पुस्तक कुठे मिळेल, किंवा अमुक संदर्भ अमुक पुस्तकात सापडेल का ? अस नुसते विचारण्याचीच खोटी, तुमच्या पत्त्यावर ते पुस्तक घरपोच झालेच म्हणून समजा. मग ते पुस्तक दोनशे रूपयांचे असो की दोन हजार रूपयांचे. ब्रिगेड मधील इतर लोक ही अखंड पुस्तके भेट देत असतात. तुम्ही फक्त दोनेक वर्ष या लोकांच्या संपर्कात राहिलात तर एक नया पैसा खर्च न करता तुमचे कपाट पुस्तकांनी आणि जीवन ज्ञानाने समृद्ध झालेले असेल.

इतिहास म्हणजे या लोकांचा श्वास. अगदी सामान्य कार्यकर्ता असू द्या. त्याला सत्य जाणून घेण्याची आस असते. प्रत्येकजण सोबतच्या लोकांचे अखंड प्रबोधन करत असतात. किरकोळ संदर्भ विचारला तर तासन तास बोलत राहतील. माझे काही स्नेही असे आहेत ज्यांना मी जेव्हा दोनेक तास निवांत वेळ असेल तेव्हाच कॉल करतो. त्याच्या आत सुट्टीच नाही. 😀
शरद पाटिल, आ ह साळुंखे, न र फाटक, वा सी बेंद्रे, कमल गोखले, वि का राजवाडे, डॉ नीरज साळूंखे, इंद्रजीत सावंत यांच्या जिभेवर खेळत असतात. असंख्य संदर्भ, सनावळया अगदी मुखोदगत.

ब्रिगेडच्या काही मेळाव्याना, इतिहास चिंतन शिबिरांना जाण्याचा योग आला. ज्ञान घ्या ज्ञान द्या, माथी भडकवणाऱ्या राजकारणापासून दूर रहा, आपल्या आणि आपल्या समाजाच्या सर्वंकश प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील रहा यापरता दूसरा संदेश कधी कानावर आला नाही.

ब्रिगेडच्या लोकांची वार्षिक महायात्रा म्हणजे 12 जानेवारीला मातृतीर्थावर भरणारा महामेळा. ही तर फक्त ग्रंथयात्राच असते. सगळीकडे फक्त भारावलेली माणसे आणि ग्रंथ.

इतकी ज्ञानपिपासु दूसरी संघटना माझ्या पाहण्यात नाही. गडकरीचा पुतळा फोडणे हे अनेकांना योग्य वाटेल अनेकांना नाही. ब्रिगेडवर टीका होईल, होत आहे फक्त त्यांना अडाणी आणि अशिक्षित समजण्याची चुक करू नका. तुम्ही जेवढे वाचले आहे त्याच्या दसपट ब्रिगेडीनी वाचलेले असते. त्यांना इतिहास शिकवण्याच्या फंदात पडू नका. इतिहासाच्या ज्ञानाच्या बाबतीत ते तुमचे बाप आहेत.
©सुहास भुसे