About

Thursday 12 January 2017

राज ठाकरेंचा इतिहास

राज ठाकरे यानी काल छत्रपती शंभु महाराजांबद्दल जे वक्तव्य केले ते खरे तर सगळ्यांनाच या सर्व प्रकरणाबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडनारे आहे. बाळाजी आवजी चिटनिसाला राजद्रोहाच्या आरोपाखाली हत्तीच्या पायी दिले याचा डुख मनात धरुन त्याचा खापरपणतु मल्हार रामराव चिटनिसाने 'श्रीशिवछत्रपतींची सप्तप्रकरणात्मक बखर' या आपल्या कुप्रसिद्ध बखरीत शंभुराजांची बदनामी करून त्यांचे चरित्र विपर्यस्त करून टाकले.  यानंतर गडकरीनी हीच बखर समोर ठेऊन त्यात आपल्या मनाची अधिक भर घालत 'राजसंन्यास' या नाटकात ही प्रतिमा आणखीनच विपर्यस्त करून टाकली. राजसंन्यासाच्या प्रभावाखाली त्यानंतरच्या काळातही जी नाटके, ललितकृती, सिनेमे आले त्यात शंभुराजांची ही गडकरीप्रभावित प्रतिमाच रंगवली गेली. सर्वसामान्य माणूस ऐतिहासिक साधने वाचत नाही. त्याच्या मनातील इतिहासाची घडण ही या ललित साहित्यातुनच होत असते.

वा सी बेंद्रे यांनी 40 वर्षे अथक मेहनत घेऊन, सगळ्या अस्सल संदर्भांची आणि ऐतिहासिक साहित्याची चाळणी करून शंभु चरित्रावरचे डाग धुवून काढले. रियासतकारांपासून चिटनिसापर्यंत सगळ्यांचे अवास्तव लेखन पुराव्यानिशी खोडून काढत शंभु चरित्राची नव्याने मांडणी केली. 'छत्रपती संभाजी महाराज' या त्यांच्या शंभु चरित्रानंतर शेकडो वर्षे अन्याय झालेला इतिहासनायक पुन्हा एकदा नव्या तेजाने झळाळुन उठला. हे जरी वास्तव असले तरी पुन्हा आपला पहिलाच महत्वाचा प्रश्न उरतो तो असे जड जड ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ वाचतो कोण ?

सामान्य माणसाच्या मनावर ललितकृतींचाच पगडा असतो.
राज ठाकरे, ज्यांच्या घराण्याने केवळ 'शिवाजी ' या एका नावाच्या महात्म्याखाली आपल्या राजकारणाची पाळेमुळे रोवली, जे प्रबोधनकारांचे नातू म्हणवतात त्यांना ही सगळी पार्श्वभूमी ठाऊक नसावी हे आश्चर्यकारक असले तरी विचारप्रवृत्त करणारे आहे. या वरुन लक्षात येते की गडकरीनी तयार केलेल्या शंभु राजांच्या अवास्तव प्रतिमेचाच अजुनही सामान्य लोकांवर किती पगडा आहे. तसेच गडकरींच्या पूतळयाचे उच्चाटन करुन यासंदर्भातील चर्चेला तोंड फोडणे देखील किती आवश्यक होते हेच राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन दिसून येते.

या सगळ्या प्रकरणानंतर तरी सामान्य लोक, गडकरीना बाप मानणारे कलावंत, गडकरींना देव मानणारे साहित्यिक वा सी बेंद्रे, कमल गोखले संशोधित इतिहास वाचतील. हळू हळू शंभु राजांची विपर्यस्त प्रतिमा समाजातून नाहिशी होण्यास या पुतळा प्रकरणापासून सुरवात होईल अशी आशा आहे.

ता क - संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांना वासी बेंद्रे लिखित शंभु चरित्र समारंभपूर्वक भेट देऊन ठाकरे घराण्याची वाचन संस्कृतीशी मागील दोन पिढ्यांत तूटलेली नाळ पुन्हा सांधन्याचे समाजकार्य करावे अशी संबंधिताना आग्रही विनंती..
©सुहास भुसे.


No comments:

Post a Comment