About

Tuesday 18 August 2015

ससा आणि कासवाची गोष्ट : बाबा इश्टाइल

छोटासा बाल फावडे नेहमीप्रमाणे बाबांकडे गोष्ट सांगा म्हणून हट्ट धरून बसला होता. बाबा त्याला समजावत होते.

“ हे बघ बाळ फावडू ..असा हट्ट नाय करायचा. आता काही आधीसारखा वेडा नाही तू.. थोडा मोठा झाला आहेस..”

बाल फावडू काही ऐकत नव्हता.

“ नाय मंजे नाय बाबा. मला गोष्ट नाय सांगितली तर मी तुमची दाढी ओढणार.”

अस म्हणून बाल फावडू ने बाबांच्या लांबलचक दाढीलाच हात घातला. मग मात्र बाबांचा नाईलाज झाला.

“ अरे शोड शोड शोन्या ..दाढी शोड आधी ..सांगतो मी गोष्ट. “

अस म्हणत बाबांनी ते नेहमी बाल फावडूला सांगत ती गोष्ट सांगायला सुरवात केली.

“फार फार वर्षापूर्वी या महान भूमीत घनदाट जंगल होत बर का फावडू. आणि तिथे एक ससा आणि कासव राहायचं. एकदा त्या सश्याने कासवाला शर्यतीचे आव्हान दिले. आणि आपले कासव चिंतातूर झाले.

ससा कसला भला मोठा दैत्यच तो. काय त्याचे ते अक्राळ विक्राळ रूप. काय त्याचे ते भयंकर सुळे. काय त्याचे ते लालबुंद डोळे. चार दातांचा बोकडच जणू.  कासव फारच काळजीत पडले. मग ते आपल्याला बालपणापासून पळण्याचे धडे देणाऱ्या आपल्या गुरूकडे अर्थात ऑलिम्पिक विजेत्या लंगड्या लांगोजी कडे गेले."

इथे बाल फावडू ला एक शंका आली.

“ बाबा तो लंगडा तर लांडगा होता ना ?”

त्यावर बाबा म्हणाले,

“ होय रे बाळ फावडू पण आपण ते उघड नाही सांगायचं. आपण ते दडपून ठेवायचं. आपली उत्क्रांती त्याच लांडग्यापासून झाली आहे.”

त्यावर बाल फावडूचे थोडे समाधान झाले.

“पण बाबा त्याचा पाय कशाने तुटला होता हो ?”
बाल फावडूला लांगोजीचा पाय तुटलेली कहाणी ऐकायला आवडायचं. म्हणून तो मुद्दाम हे दरवेळी विचारायचा. पण त्याची ही खोड माहित असल्याने बाबा थोडक्यात सांगत म्हणाले.

“ बाल फावडू ..अरे एकदा जंगलात झालेल्या घनघोर युद्धात त्याचा पाय तुटला होता.”

“ काहीही हं बाबा ( फावडू श्री जान्हवीचा पण फॅन ) तुम्ही तर मागे मला सांगितलेले की लांगोजी ने सिंह महाराजांची शिकार चोरली म्हणून महाराजांनी त्याचा पाय कलम केला.”
बाबा थोडेसे चिडले.

“ फावड्या तुला कितीवेळा सांगितले आहे की अस खर खर सगळ सांगायचं नसत म्हणून. पुढे सांगू गोष्ट की राहू दे ? “

त्यावर बाल फावडू ने माघार घेतली.

“ ठीक आहे सांगा पुढे बाबा.”

बाबांनी पुढे सांगायला सुरवात केली.

“ तर लांगोजी ने आपले सर्व कारभारी मंडळ बोलावले. त्यात तरस, गिधाड, साळिंद्र, रानडुक्कर, गांडूळ असे सर्व दिग्गज, विद्वान आणि जातिवंत हुशार प्राणी होते. या सर्व विद्वान कारभाऱ्यानी एक परिपूर्ण योजना तयार केली. ती कासवाला व्यवस्थित समजावून दिली. मग अशी जय्यत तयारी झाल्यावर कासव भल्या पहाटे उठून जवळच्याच तळ्यात राहणाऱ्या आपल्या अध्यात्मिक प्रेरक अश्या गुरूंच्या ह.भ.प. बकस्वामींच्या दर्शनाला निघाले.”

इथे आपल्या बाल फावडूला दुसरी शंका आली.

“ पण बाबा ते बकस्वामी तर तिकडे लांब दुसऱ्या जंगलातल्या तळ्यात राहायचे ना ? तिकडे इतक्या लांब तर कासव कधी गेलेच नव्हते.”

बाबा पुन्हा भडकले.

“ फावड्या तुला पुन्हा त्या मोठ्या मोठ्या गोळ्या सुरु करू काय ?  अरे बाळ फावडू तुला किती वेळा सांगितले की अस सगळ खर खर सांगायचं नसत. अरे ही गोष्ट आहे. ललित आहे. इतिहास नाही. यात खपून जात असल काही बाही. “

बाल फावडू बाबा पुन्हा गोष्ट थांबवतील या भीतीने गप्प बसला व बाबा पुढे सांगू लागले.

“ तर मग काय ते बकस्वामींचे ध्यान !! अहाहा !! एक डोळा मिटलेला. एक डोळा पाण्यात माश्यावर रोखलेला. एक पाय पाण्यात, एक अर्धा उचललेला. धन्य धन्य ते स्वामी. तर कासवाने त्यांना मनोभावे नमस्कार केला. त्यावर चुकून बकस्वामीनी आपला पाण्यात असलेला एकमेव पाय आशीर्वादासाठी उचलला आणि धप्पकन ते पाण्यात पडले. कासवाला त्यांची ती मनोज्ञ समाधीवस्था पाहून खूप आनंद झाला. नाकातोंडात पाणी गेल्याने ठसकत बकस्वामी मोठ्याने ओरडले, “ स्थापन कराव्या बकमंडळया..सहस्र बकभोजने सुरु करा. तुमचे मनोरथ पूर्ण होतील.”

ऐकुंन धन्य झालेलं कासव शर्यतीच्या मैदानात आले. होता होता शर्यत सुरु झाली. ससा धावू लागला. आपल्या गुरुच्या ऑलिम्पिक विजेत्या लंगड्या लांगोजीच्या ट्रेनिंग आणि कारभारीमंडळीच्या व्युहाप्रमाणे कासवही जोरात धावू लागले. ससा जोरात ..कासव आणखी जोरात ..ससा तावात ...कासव जोशात ...ससा घामेघूम झाला. त्याला कळून चुकले ही लांगोजी च्या ट्रेनिंग ची आणि बकस्वामींच्या आशीर्वादाची किमया. आपण हरणार. तो हताश होऊन तिथेच बसला. इकडे मोठ्या जोशात कासवाने पी टी उषा ला लाजवेल अशी दौड मारून शर्यत जिंकली.”

छोटा बाल फावडू नेहमी प्रमाणे खुश होऊन टाळ्या वाजवू लागला . बाबा खुश झाले. त्यांनी प्रेमाने बाल फावडू च्या डोक्यावरून हात फिरवला. त्यावर लाडात येऊन बाल फावडू म्हणाला ..

“ बाबा पण तुम्ही ना अश्शे लब्बाड आहेत ना ...मला माहित आहे अश्शे काहीच झाले नव्हते. तो ससा किणी झोपला. मग कासव चिकाटीने आणि दृढनिश्चयाने चालत राहिले. आपल्या अटळ ध्येयनिष्ठेमुळे आणि आपल्या अंगच्या गुणांमुळे ते शर्यत जिंकले."

बाबांनी हताश होऊन बालफावडू कडे पाहिले आणि मोबाईल घेऊन दुख्खद अंतकरणाने मेंटल हॉस्पिटल ला फोन लावला.

                                                          -सुहास भुसे.

Disclaimer – हे एक निव्वळ विनोदी प्रहसन आहे. याचा जर कोणत्या जीवित व मृत व्यक्तीशी सबंध आढळल्यास तो योगायोग न समजता तसा सबंध आहेच अस बिनदिक्कत समजावे.


No comments:

Post a Comment