About

Friday 21 August 2015

महाराष्ट्र भूषण वादावर खरेच पडदा पडलाय का ?

     पुरंदरे यांना कडेकोट बंदोबस्तात व मोजक्या २५० लोकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण दिला गेला. हुश्श्य ! चला एक अध्याय संपला, म्हणून काहीजनांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल. तथापि या पुरस्काराच्या नितीत्ताने महाराष्ट्रात निर्माण झालेले वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक वादळ खरेच शमले आहे का ?


पुरंदरे त्यांनी लिहिलेला भला बुरा इतिहास यावर भरपूर चर्चा करून झाली आहे. तथापि एकूणच या पुरस्कारासंदर्भात सामान्य माणूस व विविध विचारवंत यांच्या प्रतिक्रिया तटस्थ वृत्तीने बघितल्यानंतर काय दिसते ? दोन्ही बाजूंनी उन्माद व्यक्त झाला, वगैरे वरवरच्या प्रतिक्रिया चर्चा म्हणून ठीक आहेत पण ते परिस्थितीचे अचूक विश्लेषण नव्हे. या निमित्ताने समाजाच्या वैचारिकतेचा पाया म्हणवल्या गेलेल्या विचारवंतांनी, सरकारने, व खुद्द पुरस्कार मूर्तींनी अनेक चुकीचे पायंडे पाडले आहेत. त्याचा दूरगामी परिणाम आगामी काळात दिसून येणार आहे.

या निमित्ताने कधी नव्हे ते महाराष्ट्रात दोन उभे तट दिसून आले. अनेकजण पुरंदरेचे समर्थन करत होते तर अनेकजण विरोध. विरोध करणारा किंवा समर्थन करणारा समुदाय जितका व्यापक व मोठा असेल तितके त्यातील लोकांच्या ती बाजू घेण्याच्या कारणांचे वैविध्य वाढत जाते. एखाद्या देवाची यात्रा असेल तर तिथे जमलेले सर्वचजण भक्तीभावाने देवदर्शनाला आलेले असतात असे म्हणणे फारच भोळेपणा ठरेल. काहीजण तिथे प्रसाद व विविध वस्तू विकायला आलेले असतात. काहीजण पर्यटन म्हणून, काहीजण गर्दीत खिसे कापायला..व्यक्तिगणिक कारणे वाढत जातात. असे जरी असले तरी या इतर कारणांसाठी जमा झालेल्या लोकांची संख्या कधीच भक्तांच्या संख्येइतकी असू शकत नाही. तद्वताच पुरंदरे यांना विरोध करणारे सर्वच एकाच समान कारणासाठी विरोध करत होते असे म्हणणे फसवणूक ठरेल. यात निश्चित काहीजण राजकीय हेतूने प्रेरित होते. काहीजण पुरंदरे ब्राह्मण आहेत म्हणून ब्राह्मणद्वेषापोटीही विरोध करत असतील. तथापि अश्या लोकांची संख्या ही पुरंदरे यांची बाजू चूक आहे म्हणून विरोध करणाऱ्या सर्वसामान्य शिवप्रेमी लोकांच्या तुलनेत नगण्यच होती हे या कडे थोडे तटस्थ वृत्तीने पाहून विविध स्तरातून व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांचा अंदाज घेतला तर सहज लक्षात येऊ शकते.

     पुरंदरे यांचे समर्थक या सर्व वादादरम्यान संभाजी ब्रिगेड या संघटनेला व जितेंद्र आव्हाड यांनाच लक्ष करत राहिले. पण या विरोधी प्रतिक्रिया किती मोठ्या स्तरातून येत आहेत इकडे त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केले. व हा सर्व विरोध जातीय ठरवण्यात धन्यता मानली. असे करणे त्यांच्या समर्थनाच्या रणनीतीच्या दृष्टीने फायदेशीर असले तरी सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हानिकारक ठरले आहे. त्यांच्या या भूमिकेतून समाजात जातीय धृवीकरण झाल्याचे चित्र निर्माण झाले. बहुतांश ब्राह्मण समुदाय पुरंदरे यांच्या समर्थनार्थ एकवटला. या दरम्यान ब्राह्मण पुरोगामी विचारवंतांची कचखाऊ वृत्तीही समोर आली. मोक्याच्या क्षणी पुरोगामित्व सोडून ते प्रतिगाम्यांच्या कळपात शिरतात हे निर्माण झालेले चित्र त्यांच्या विश्वासाहार्यतेसाठी आगामी काळात प्रश्नचिन्हांकित राहणार आहे. काही ब्राह्मण किंवा मराठा नसलेल्या विचारवंतानी तटस्थ राहत किंवा संदिग्ध प्रतिक्रिया देत हा वाद मराठा व ब्राह्मण जातीत आहे आपल्याला काय घेणे देणे असा कपाळकरंटेपणा ही दाखवला. अस करताना आपण लिहित असतो ते तत्वज्ञान  व वागतोय तो व्यवहार यात पडलेली तफावत लक्षात येणारी आहे याची तमा बाळगली नाही.  

ब मो पुरंदरे हा पुरस्कार स्वीकारल्यावर आपल्या भाषणाच्या सुरवातीसच म्हणाले की " इतिहासकाराने आपल्या लिखाणावर येणाऱ्या प्रतिक्रियांविषयी जागरूक असले पाहिजे. नवे पुरावे समोर आले तर बदलास तयार राहिले पाहिजे."  त्यांच्या भाषणात मला हे सर्वात महत्वाचे विधान वाटले. आता प्रश्न असा आहे की या आपल्या विधानाप्रमाणे पुरंदरे स्वत: का वागले नाहीत. बोलणे आणि कृती यात इतकी प्रचंड तफावत त्यांनी स्वत: दाखवून देऊन ही लोकांना समजणार नाही इतकी खुळी जनता आता राहिली आहे का ? पुरंदरे यांनी चुकीचा इतिहास लिहिला. त्यांच्या लेखनातला काही भाग विकृत म्हणून समोर आला. हे कदाचित त्यांनी मुद्दाम केले नसेल. त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधनांवरून त्यांनी तस लिहिले असेल. पण जेव्हा नवी संशोधित साधने समोर आली. रामदास व शिवाजी महाराज यांची भेटच झाली नव्हती हे सिद्ध झाले. दादोजी कोंडदेव कुलकर्णी हा शिवाजी महाराजांचा गुरु नव्हता हे समोर आले तेव्हा आपल्याच विधानाप्रमाणे आपल्या लेखनात बदल करण्यास पुरंदरे का पुढे आले नाहीत ? जेम्स लेन बद्दल त्यांच्या भूमिकेवर सतत संशय व्यक्त होत राहिला व ते १३ वर्षे यावर मौन बाळगून राहिले. पुरंदरे यांचे समर्थक ते फार मोठे शिवभक्त असल्याची द्वाही देत असतात. मग इतक्या मोठ्या बदनामीवर पुरंदरे यांनी का कधीही जाहीर प्रतिक्रिया दिली नाही ? ते म्हणतात तसे अश्या मोठ्या शिवभक्ताची अश्या संवेदनशील प्रकरणात फक्त ऑक्सफर्ड प्रेस ला एक पत्र पाठवून जबाबदारी संपते का ? जर त्यांच्या लेखनातील काही भागावर ते विकृत आहे असा आक्षेप घेतला जात असेल तर ते जनभावनेचा आदर करून व आपल्या शिवप्रेमाला स्मरून सदर लिखाण त्यांनी वगळले का नाही ? हे सर्व बदल करून देखील त्यांची ‘राजा शिवछत्रपती’ तितकीच वाचनीय राहिली असती. नव्हे तिची झळाळी अधिकच वाढली असती. मग का केल नाही अस त्यांनी ?

या संपूर्ण प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची व त्यांच्या सरकारची भूमिका संशयास्पद राहिली. इतका वाद होत असताना ही सर्व गोष्टींकडे ते तटस्थपणे पाहत राहिले. त्यामुळे हा वाद असाच पेटता राहावा अशीच त्यांची सुप्त इच्छा आहे असा जनतेचा समज होण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळ्यात माननीय फडणवीस महोदयांनी एक अत्यंत आक्षेपार्ह्य विधान केले. आपल्या भाषणात म्हणाले की  “आज जर महाराज असते तर पुरंदरे यांना विरोध करणारांचा त्यांनी कडेलोट केला असता.”  हे विधान करताना मुख्यमंत्री आपण एका समाजाचे, एका जातीचे, एका विचारसरणीशी बांधील मुख्यमंत्री नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत, इथल्या सर्व विचारांच्या जनतेशी आपली बांधिलकी आहे, सर्व जातिधर्म आपणास समान आहेत ही आपण पद स्वीकारताना घेतलेली शपथ ते विसरले. एका संपूर्ण लोकशाही मार्गाने चाललेल्या जनआंदोलनाचा व त्यात सहभागी लक्ष लक्ष सर्वसामान्य जनतेचा त्यांनी अपमान केला. का कडेलोट केला असता महाराजांनी पुरंदरेंच्या प्रक्षेपित इतिहासाला लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्यांचा ? त्यांनी कुठे बॉम्बस्फोट केलेत की कोणा बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंतांना गोळ्या घातल्यात ? की फडणवीसांना विरोध केला की सरळ कडेलोट लगेच ? फडणवीस यांचे विधान अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या विधानामुळे फडणवीस यांचे सरकार ब्राह्मणांचे लांगुलचालन करणारे सरकार आहे, संघी, फॅसिस्ट विचारांचे सरकार आहे हा जनतेत हळूहळू दृढ होत असलेला समज अधिकच दृढ झाला आहे.

    अश्या प्रकारे या वादाचे सर्व अंगाने विश्लेषण केले असता महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या चिंधड्या उडाल्या आहेत व जातीय सामाजिक सलोख्याची दीर्घकाळ भरून न येणारी हानी या वादाला चुकीच्या पद्धतीने हाताळले गेल्याने झाली आहे असेच म्हणावे लागते.
                            -सुहास भुसे


 

No comments:

Post a Comment