About

Wednesday 26 July 2017

सत्ताबदलाने झालेला थेट फरक

देशात सत्ताबदल होण्याचे महत्वाचे कारण होते काँग्रेसचा भ्रष्टाचार व त्यामुळं तयार झालेले नकारात्मक जनमत. ह्या कथित घोटाळ्यांचे भाजपने असे काही मोठाले आकडे लोकांच्या मनावर बिंबवले की कोणाला ते आकडे धड लिहिताही येऊ नयेत. त्या घोटाळ्यांचे पुढे काय झाले ? कितीजणांवर काय कारवाई झाली ? देशाच्या बजेट पेक्षा मोठ्या घोटाळ्यांवर सत्ताबदल होऊनही कारवाई का होत नसावी हे मोठे गहन प्रश्न आहेत.

तर सांगायचा मुद्दा हा की कथित कोळसा घोटाळ्यामुळे जनजीवनावर कोणता दुष्परिणाम झाला होता ?
कथित टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे कोणाच्या खिशाला चाट बसली ?
कथित सी डब्ल्यू जी घोटाळ्यामुळे नागरिकांना कोणता त्रास सहन करावा लागला ?
कथित अगस्ता वेस्टलँड घोटाळ्यामुळे किती जणांना कोणत्या रांगेत उभे राहावे लागले ?

सध्याच्या सरकारचे भ्रष्टाचाराचे उस्से भी जादा कारनामे तर समोर येत आहेतच पण त्यांच्या मनमानी कारभाराचा लोकांना थेट फटका बसतोय. नोटबंदीमुळे विस्कळीत झालेली व्यवस्था अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. रांगेत कित्येक लोक प्राणास मुकले, अनेकांचे व्यावसायिक नुकसान झाले, लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या. रांगेत अनेकांचा बहुमूल्य वेळ गेला. GST असो, विविध दरवाढी असोत की नोटबंदी..  सरकार लोकांच्या थेट खिशात हात घालतय. सरकारी गायगुंड लोकांचे खून पाडत सुटलेत तो एक वेगळाच विषय. सरकारच्या कारभारातली अनागोंदी पूर्वी फक्त वृत्तपत्रांत वाचण्यापुरती व न्यूज चॅनेल वर पाहण्यापुरती मर्यादित गोष्ट होती पण आता हेडलाईन मध्ये "मितरो ... " ही भरतवाक्याची नांदी ऐकली की लोक खिसे चापचतात, पाचावर धारण बसते. आता काय नवीन लचांड गळ्यात पडते म्हणून गाळण उडते.

इतर कित्येक फरक असतील पण पूर्वीच्या व आताच्या सरकारमधील हा महत्वाचा फरक आहे. बाकी विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सरकार कोणतेही असले तरी त्याने फरक पडत नाही.
©सुहास भुसे

उदयनराजेंच्या मागे जनमत का एकवटतय?

उदयनराजेंच्या मागे लोकांची सदभावना एकवटत आहे. हे पाहून काही विजारवंतांच्या 'फ्लेग्जीबल' पाठीच्या कण्यातून थंड लहर दौडली. लोकांचा सरंजामशाहीकडे असणारा ओढा पाहून काही विजारवंतांची गाळण उडून ते घामेघुम झाले. तर काही मोदिशाही समर्थक विजारवंताना पुन्हा एकदा राजेशाही अवतरते की काय या भीतीने निद्रानाशाचा विकार जडला.

पण यापैकी कोणालाही या घटनाक्रमामागच्या षडयंत्राबद्दल बोलावेसे वाटले नाही. याचिकाकर्ता व पूर्वाश्रमीचा तडीपार गुंड पण सध्याचा एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यातील नातेसंबंधांवर शंका आली नाही.

कायदा व सुव्यवस्थेचे काय होणार या काळजीने अर्धमेल्या झालेल्यांना भाजपमधील विविध गंभीर आरोप असणारे पण मोकाट फिरणारे गुंड नेते दिसत नाहीत. एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, राम शिंदे, पंकजा मुंडे जवळ जवळ प्रत्येक मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. विनयभंगासारखा गंभीर गुन्हा असणारा गणेश पांडे मोकाट आहे. बलात्काराचा अजामीनपात्र गुन्हा  करणाऱ्या रोहित टिळकला तात्काळ जामीन मंजूर होतो पण राजकीय आरोप असणाऱ्या उदयनराजेंचा जामीन अर्ज फेटाळला जातो यातही कोणाला काळेबेरे दिसले नाही.

उदयन राजे तर छत्रपती आहेत व गडगंज श्रीमंत आहेत पण भाजप मधील पूर्वाश्रमीचे मंडप काँट्रॅक्टर, भेळवाले, मालगुजर आज कोट्याधीश कसे झाले ? निवडणुकीसाठी 50-100 रुपयांनी पट्टी गोळा करणाऱ्या सदाभाऊ खोतने मुलाचे राजेशाही लग्न कसे केले ? सभेच्या हॉलचे भाडे उधार ठेवणाऱ्या महादेव जानकरने फडणवीसला अकरा लाखांचा चेक कुठून दिला ? मंडपाच्या बांबूसाठी खड्डे रोवणाऱ्या रावसाहेब दानवेने मुलाच्या लग्नाचा पंचतारांकित मंडप कसा उभारला ? साधनशुचितेचा पाठ पढवणाऱ्या नितीन गडकरीने पत्रकार परिषदेत प्रेसनोटसोबत नोटांनी भरलेली पाकिटे का वाटली ? अश्या लघु/दीर्घ शंकाही कोणा विजारवंतांना भेडसावल्या नाहीत. कुठून आणतात हे पैसे ? खंडणी गोळा करतात की दरोडे घालतात ?

लोक आता सुजाण होत चालले आहेत. उदयनराजे केवळ छत्रपती आहेत म्हणून नव्हे तर त्यांना सत्तेचा गैरवापर करून अडकवले जात आहे, त्यांच्याविरुद्ध रचलेले हे खोटे कुंभाड आहे हे पक्के ठाऊक असल्यामुळे उदयनराजेंच्या मागे एकवटत आहेत. उदयनराजेही कायदा व संविधानाचा मान ठेवत पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. पण पुन्हा एकदा भाजपने दगा करत त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत डांबले आहे. भाजप सरकारच्या या कृतीने अजूनही भाजपच्या बदनितीबाबत संभ्रमित असणारांचे डोळे खाडकन उघडतील व ते या लोकांच्या संमोहनातून बाहेर येतील हीच अपेक्षा !!
©सुहास भुसे

Monday 24 July 2017

माझी देवपूजा

"आज श्रावण सोमवार आहे तेव्हा आज देवपुजा तुम्ही करा"
आमच्या कलत्राने सकाळी सकाळी असा अध्यादेश जारी करत वातावरण तंग करून सोडले. तसा मी अगदीच नास्तिक नाही. सहज जाणे झाले तर देवळातही जातो, नमस्कार करतो. पण पूजा, फुलं वाहणे, प्रदक्षिणा वगैरे आवाक्याबाहेरचे प्रकार, थोडक्यात देखल्या (दिसला तरच) देवाला दंडवत असा प्रकार.

पण कालच्या घमासान चर्चेत घरकामात मदत करायची म्हटलं की मी फडणवीसला कर्जमाफी मागितल्यासारखा चेहरा करतो, तो तुमचा अमका मित्र बघा, तो तमका भाऊ बघा असे मुद्दे पुढे आले. थोडक्यात इतर लोक घरकामात चीन आहेत तर मी 10 दिवसांचा दारुगोळा उरलेला भारत आहे असा निष्कर्ष काढला गेला. त्यावर भक्तांच्या राष्ट्रप्रेमाने भारलेल्या विजीगीषु बाण्याने मी चवताळून गर्जना केली की उद्यापासून जोरदार घरकाम अंगावर घेतले जाईल. त्याच पडत्या फळाची आज्ञा घेऊन हा अध्यादेश निघाला होता. मोदी वाटेल ती आश्वासने देऊन जनतेला फसवू शकतात पण बायकोला फसवणे इतके सोपे नसते हे त्यांना जसोदाबेन सोबत असत्या तर चांगलं कळलं असतं.

तर मन मारून अडवाणी जसं कोविंद यांचं अभिनंदन करत होते तसं मी देव्हाऱ्यापुढं उभा राहिलो. मुलांचं आवरत आवरत कलत्राच्या सूचनांचा सपाटा कानावर कोसळत होता. बेल वाहा, फुलं वाहा, धूप लावा, अगरबत्ती, कापूर लावा, गंधाच्या डब्या तिकडे ठेवल्या आहेत. आज शिवामुठ तांदूळ आहे ... यांव त्यांव ...वगैरे. त्या गाईडलाईन फॉलो करत कामगिरी पार पाडायची होती.

तर अस्मादिक सावरून देव्हाऱ्यापुढं उभे राहिले. देव्हाऱ्यात 33 कोटी देवांची मांदियाळी माजली होती. जागेची टंचाई व देवांची खचाखच गर्दी पाहता हा आमच्या गावातल्याऐवजी मुंबईतला देव्हारा वाटत होता. काय त्या पूजेचे अवडंबर माजवते ही.. हाय काय अन नाय काय.. दोन मिनिटांत होत्याचं नव्हतं करून टाकतो. असं पुटपुटत मी बेल, फुल, गंध जे हाताला लागेल ते जिथं मोकळी जागा दिसेल तिकडे ठेवून दिले. सुमारे साडे बहात्तर सेकंदात यथासांग देवपूजा आटोपून मी छाती काढत दिवाणखान्यात सोफ्यावर जाऊन बसलो. व पायावर पाय टाकत ऐटीत चहाची वाट पाहू लागलो.

पण चहाऐवजी आतून "अहो, काय करून ठेवलय हे, इकडे या पटकन" अशी भीमगर्जना ऐकू आल्याने मी दबकत दबकत आत गेलो.
" अहो, देव कुठं आहेत, फुल कुठं वाहिलीत? धूप विझलाय ? बेल कोणाला वाहतात ? पिंडी दिसते का कुठं आहे ? काय प्रकार आहे हा ? ***, ****, ***, ****, "
या माऱ्याने मी पुरता बावचळून गेलो. आधीच ही ट्रम्प तात्या मीडियावर चिडून असतात तशी तुंबलेली त्यात मोदीने नोटबंदी करून देशात धुमाकूळ माजवून दिल्यासारखा मी देव्हाऱ्यात धुमाकूळ माजवला होता. ड्यामेज कंट्रोल साठी पुन्हा देवपूजा करणं भाग होतं.
मग ही रखुमाई सारखी कमरेवर हात ठेवून शेजारी उभी राहिली..

"चला मी सांगते तसं करा, एक एक फुल घेऊन एका एका देवाच्या डोक्यावर व्यवस्थित ठेवा."
मी आपलं स्वयंसेवक जसं स्वतःच डोकं न चालवता सरसंघचालकांच्या आदेशाचे निमूट पालन करतात तसं करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केली.
"पिंडी शोधा आधी, ती बघा भैरवनाथाच्या मागे आहे. अहो, तिथं नव्हे तो जोतिबा, छे तो खंडेराया, घोड्यावर बसलेले सगळेच देव भैरोबा नसतात, हां हां ...आता तिला बाहेर पाटावर ठेवा, पाणी वाहा, बेल वाहा.. अमुक *** तमुक *** यांव ** त्यांव "
सुमारे साडे तेवीस मिनिटे निकराची झुंज दिल्यावर रखुमाईने कमरेवरचे हात खाली घेतले व समाधानाने मान डोलावली.
" याला म्हणतात पूजा, आता कसं प्रसन्न दिसतोय बघा देव्हारा "

मी घाम पुसत आजवर पूजा करणाऱ्या भटजींवर तोंडसुख घेतल्याचा मनातल्या मनात पश्चाताप व्यक्त करत देवपूजा म्हणजे खायचे काम नव्हे आणि आपले तर खचितच नव्हे असा निष्कर्ष काढत उद्यासाठी सोप्यातले सोपे कोणते घरकाम अंगावर घेता येईल याचा विचार करण्यात गुंग झालो.
©सुहास भुसे

Sunday 23 July 2017

उदयनराजेंचा वारसा

वैचारिक वारस वगैरे तात्विक चर्चा ठीक आहेत. पण
श्रीमंत छत्रपती उदयनराजे छत्रपतींचे वारस आहेत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तुम्ही घरी माजघरात बसून फेसबुकवर काय मत मांडता त्याने त्यावर काही फरक पडत नाही.

छत्रपतींचा वारसा उदयन राजेंनी सांगू नये असं वाटत असेल तर आधी बापाच्या इस्टेटीवरील हक्क सोडा. स्वतःची जी काही मिळकत आहे ती दान करून टाका. मुलांना इस्टेटीतून बेदखल करा. मग वारश्याबद्दल 'क्रांतिकारी' मते मांडा. घरात असो की राजकारणात पुत्र पुत्री प्रेमापोटी पुतण्यांच खच्चीकरण केलं जातं. पोराऐवजी पुतण्या चालत नाही आणि हे वैचारिक वारसाच तत्वज्ञान मांडायला निघाले.

'लोकशाहीत' राजकीय पदे वारसा हक्कानेच मिळतात हे ही वास्तव ध्यानात घ्यायला हवं. पुढाऱ्याचा मुलगा वयात आला की बाय डिफॉल्ट युवा नेता होतो. सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते सतरंज्याच उचलत राहतात. एका घरात नेता, त्याची बायको, मुलगा, मुलगी, सून, जावई असं अख्ख कुटुंबच्या कुटुंब वेगवेगळी पदे भोगतं. एका 'समाजवादी' परिवारातील 50-60 सदस्य एकाच वेळी राजकीय पदे भोगत आहेत . हे सगळं चालतं पण उदयनराजे तेवढं खटकतात. असा सिलेक्टिव्ह एप्रोच कसा चालेल बरं ?

माणूस मूलतः इतिहासप्रेमी असतो. इतिहासाशी आणि ऐतिहासिक वारश्यांशी त्याच्या भावना निगडित असतात. आमचा राजा ही आमची भावनिक गरज आहे. बाकी लोकशाही, कायद्यापुढं सगळे समान हे आम्हालाही ठाऊक आहे व आमच्या राजालाही मान्य आहे. राहिला भावनिक राजकारणाचा प्रश्न. तर दंगली घडवून त्या भावनांच्या लाटेवर इथं सहज सत्ता मिळवता येते, आईच्या हत्येच्या सहानुभूतीच्या लाटेवर तत्पूर्वी राजकारणाचा गंध नसणारा मुलगा थेट पंतप्रधान बनतो. (ही टीका नव्हे वास्तव आहे). बापाच्या मृत्यूपश्चात केवळ सहानुभूती व भावनांच्या लाटेत कर्तृत्वशून्य मुली मंत्री बनतात. ज्या मतदार संघात तिथल्या आमदार खासदाराचे निधन होते तिथल्या पोटनिवडणुकीत हमखास त्याचा रक्ताचा वारसच निवडून येतो.

अश्या या देशात फक्त उदयनराजेंच्या बाबतीत वैचारिक वारश्याचे तत्वज्ञान मांडण किंवा फक्त उदयनराजेंच्या समर्थकांवर भावनिकतेचा आरोप करणे हा सिलेक्टिव्ह एप्रोच आहे, 'सोयीस्करवाद' आहे, पक्षपात आहे, छत्रपतींच्या घराण्याबद्दल खदखदणारा पावणे चारशे वर्षे जुना द्वेष आहे, दुसरं तिसरं काही नाही !!
©सुहास भुसे

कडवटपणाने काय साध्य होणार ?

देवस्थानच्या पूजेच्या वहिवाटीवरून मारामाऱ्या होतात. टीचभर दक्षिणेचा मोह सुटत नाही. कोर्टकज्जे होतात. झाटभर काजू, नारळाच्या कलमावरून भावभावकीच्या भांडणात वकिलांच्या अनेक पिढ्या जगल्या. बांधाच्या भांडणात सर्वाधिक खून पडतात. भावाभावाच्या वाटण्या होताना सुतळीचा तोडा सुद्धा अर्धा अर्धा तोडून घेतला जातो.

आणि हे तमाम दुतोंडे सार्वजनिक व्यासपीठावरून ज्ञान पाजळतात. उदयनराजांची हजारो एकर जमीन त्यांच्या डोळ्यात खुपते. जी जमीन राजे कसत नाहीत अगर कुळांकडून एक नया पैसा खंड, बटई दखल घेत नाहीत. प्रतापगड, शिंगणापूर राजांच्या मालकीचे कसे म्हणून हे 'सुतळी तोडा' फेम लोक आश्चर्य व्यक्त करतात. वारसा बिरसा सगळं झूट, राजेशाही केव्हाच संपली वगैरे कुठेतरी वाचलेली वाक्ये सटासट फेकून हाणतात.

परवा बीजेपी माझाने बातमी चालवली की,
"भोसले कुठं फरार आहेत ?"
हजारो वर्षे गुलामगिरीत काढलेल्या लोकांच्या हाती लोकशाही म्हणजे माकडाच्या हातात कोलीत या विस्टन चर्चिलच्या उदगारांचे स्मरण झाले. राजेशाही जरी कागदोपत्री संपली असली तरी माणूस हा भावनांवर जगतो. छत्रपतींच्या गादीशी, तिच्या वारसाशी त्यांच्या श्रद्धा निगडित आहेत. इंग्लड सारख्या लोकशाहीच्या जन्मदात्या राष्ट्रात राजा राणीला मानाचे स्थान आहे. औपचारिक सत्ताधारी जरी विधिमंडळ व पंतप्रधान असले तरी तिथल्या लोकांच्या मनावर अजूनही राजराणीच राज्य करतात.

स्वातंत्र्याचा व समतेचा अर्थ उद्दामपणा नव्हे अगर व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे कडवटपणा नव्हे. वारसा बिरसा सगळं झूट अशी भीमगर्जना करून तुम्ही विवेकवादी वगैरे म्हणून एकमेकांच्या टिरी खाजवून त्या लाल करून घेऊ शकाल. पण जिथे मान लववावी, ज्यामूळ तुमची छाती अभिमानाने भरून यावी अश्या जागा जर नसतील तर तुम्हाला जीवनात कडवटपणा व शून्याखेरीज काहीही हाती लागणार नाही.
©सुहास भुसे

मर्कटलीला

गावात एक माकड आलय. या भागात बजरंग बलीचा अवतार फारसा फिरकत नाही. त्यामुळं लोकांना पण अप्रूप वाटतं. लोक काही बाही खायला देत राहतात. माकडही आता गावात चांगलच रमलय. पण त्याच्या खोड्यानाही उत आलाय. एखादी बाई बापडी अंगणात एकटी दिसली की दात फिसकारत भीती दाखवतय.  हातात जे असेल ते हिसकावून घेतय. पोरा सोराना हात पाय उगारत भीती दाखवतय.
काल तर गंमतच झाली..
मंगला आक्का खाली वाकून अंगणातला केर लोटत होती. माकडाने शेजारच्या भिंतीवरून आक्काच्या पाठीवरच उडी मारली. व तिथच आरामात ठिय्या जमवला. माकड तसं छोटं व वजनाने हलकं असल्याने आक्काला वाटलं तिचा नेहमी अंगाला झटणारा नातू गण्याच आहे. त्याला लाडे लाडे रागे भरत ती उतर खाली काम करू दे मुडद्या म्हणत खाली वाकून लोटतच होती..
तिच्याकडे गप्पा टाकायला नेहमीच्या वेळेला आलेली तुळसा नानी हे दृश्य बघून हक्का बक्का झाली..
बोबडी वळल्याने तोंडातून कसं बसा आवाज काढत ती ओरडली.
"आक्काsss माकडsss "
तरीही आक्का तिच्याच नादात.. आक्का म्हणते,
"कुठय ग ? ये गण्या उतर मुडद्या. त्ये बग माकड आलय म्हण. "
नानी पुन्हा ओरडली..
"आग आक्का तुझ्याच पाठीवर बसलंय "
आक्काने वाकल्या वाकल्या मान वळवून पाठीवर बघितलं. माकडाने आक्काकडे बघत दात काढून फिस्स केलं. आता मात्र आक्काची पाचावर धारण बसली. आता उठावे की पळावे की ओरडावे काहीच कळेना. थरथर कापत तिने हातातला झाडू माकडाला मारला. तो चुकवण्यासाठी माकडाने खाली वाकत तिच्या गळ्यातच हात टाकले आणि आक्काला मिठीच मारली.
मग मात्र आक्का मागचा पुढचा विचार न करता जोरात ओरडत किंचाळत अंगणात इकडे तिकडे धावू लागली.
मघाच पासून आपल्याला पाठकुळी घेऊन निवांत लोटणारी ही म्हातारी अचानक का किंचाळायली हे माकडाला कळेना.. ते दचकून उडी मारुन शेजारच्या भिताडावर बसलं आणि घाबरून आक्काकडं बघू लागलं.
हा सगळा नाट्यमय प्रकार घडेपर्यंत तिथं जमा झालेल्या बाळगोपाळांची व आमच्यासारख्या बघ्यांची मात्र हसून हसून मुरकुंडी वळली.
©सुहास भुसे

अश्रू

मा प्रधानसेवक मोदीजी गांधी घराण्यावर कितीही टीका करत असले तरी त्यांचे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या लोकोत्तर प्रतिमेचे आकर्षण लपून राहिलेले नाही. विशेषतः इंदिराजींची भ्रष्ट नक्कल करण्याच्या ते सदैव प्रयत्नात असतात.

या संदर्भात एक सहज जाणवलेली तुलनात्मक गोष्ट.
संजय गांधी यांच्या अंत्यविधीच्या वेळी इंदिराजीनी काळा चष्मा घातला होता. राजीव गांधी यांच्या अंत्यविधीप्रसंगी सोनिया गांधींनी देखील काळा चष्मा घातला होता. अश्रू हे कमजोरपणाचे लक्षण मानले जाते. या कठीण प्रसंगी आपण गर्भगळीत दिसलो तर आपल्या कुटुंबियांवर, आपल्यावर प्रेम करणाऱ्या उपस्थित लोकांवर त्याचा चांगला परिणाम होणार नाही. त्यामुळे मोठ्या धीरोदात्तपणे अश्रू थोपवून धरले असले तरी त्यातूनही डोळ्यांतून ओघळणारा एखादा चुकार अश्रूबिंदू लोकांना दिसू नये हा उद्देश काळा चष्मा घालण्यामागे होता.

या पार्श्वभूमीवर आपले प्रधानसेवक भर सभेत धाय मोकलून रडतात. 'मैंने देश के लिये घर बार, सबकुछ छोडा' असं आर्त टाहो फोडून सांगतात. महनीय व लोकोत्तर व्यक्तिमत्वांचे अनुकरण करणेदेखील इतके सहजसाध्य व सोपे नसते. वागण्याबोलण्यातली सुसंस्कृता, शालीन वावर, वैचारिक परिपक्वता ही पिढ्यानपिढ्यांच्या संस्कारांमधूनच अंगात मुरत असते. शेवटी खानदानी, घरंदाज, सुसंस्कृत लोकांत आणि उठवळ, लाटेवर स्वार होऊन मोठ्या झालेल्या, उथळ, सवंग लोकांत फरक हा राहणारच...
कितीही झालं तरी .....
©सुहास भुसे

मेरे रशके कमर

मेरे रशके कमर ... ज्यांनी पूर्वी ऐकलं नव्हतं त्यांनीही अलीकडे ऐकलं असेल .. एकदा ऐकलं की मनावर गारुड होतं या गाण्याचं. ऐकतच राहतो माणूस. ऐकत नसतानाही मनात तेच सूर घोळत राहतात.. अर्थात हा अनुभव येण्यासाठी नुसरत फतेह अली खाँ साहेबांच्या आवाजातली मूळ कव्वाली ऐकायला हवी..

'बेहिजाबाना वो सामने आ गये
और जवानी जवानी से टकरा गयी'
खाँ साहेब हे अश्या नजाकतीने म्हणून जातात की तो टकराव आपण अक्षरशः अनुभवतो..ऐकता ऐकताच एक सूक्ष्म थरथर होते.
एका स्पीड मध्ये कव्वाली सुरू असताना शेवटच्या ध्रुवपदाला मेरे ss रशके ss के कमर नुसरत साहेब असं सावकाश असं लचकत म्हणतात जणू 'ती' समोरून ठुमकत, मुरडत येत असावी असा फील येतो.

फना बुलंद शहरी ची ही खर तर गजल आहे. पण नुसरत साहेबांनी ती गायली कव्वालीसारखी. आणि हे काँम्बीनेशन किती जबरदस्त जमून गेलेय ते तब्बल साडेसतरा मिनिटं आपण मंत्रमुग्ध होऊन अनुभवत राहतो.

प्रेम करावं तर उर्दूत.. उर्दूची लचक, शिद्दत, नजाकत जगातल्या दुसऱ्या कोणत्या भाषेत असेलसं वाटत नाही.
'चाँद के साये मे ए मेरे साकीया
तुने ऐसी पिलाई मजा आ गया'
साकीया शब्दाला काय प्रतिशब्द योजता येईल? कप बेअरर? बार अटेंडन्ट? किती रुक्ष वाटत हे. मराठीत तर हा साकीया बिकिया प्रकारच नाही.
'आँख मे थी हया हर मुलाकात पर
सुर्ख आरिझ हुये वस्ल की बात पर'
लाजण्याच वर्णन इतक्या गहिऱ्या उत्कटतेने दुसऱ्या शब्दात, दुसऱ्या भाषेत करणं कठीण!
'उस ने शर्मा के मेरे सवालात पर
ऐसे गर्दन झुकायी मजा आ गया ..'
लाजण्याच्या फँटसीने एक सुखद संवेदना उमटते. ते लाजणं काळजात आरपार होतं..
ऐकत ऐकत आपणही शेवटी या गाण्यावर त्या शेख साहिब सारखं आपलं इमान हरवून बसतो..
नुसरत फतेह अलींच्या इतर कव्वालींएवढी ही हिट झाली नसली तरी मला ती नुसरत फतेह अलींची सगळ्यात श्रेष्ठ कव्वाली वाटते ..
©सुहास भुसे

सुप्रिया ताईंशी एक मनमोकळा संवाद

सुप्रिया ताईं ची राहणी आणि व्यक्तित्व इतकं साधं आहे की त्यांच्याशी बोलताना कसलंही दडपण वाटत नाही.. कसलाही पोकळ डामडौल नाही की कसला बडेजाव नाही. सामान्यातला सामान्य माणूसही त्यांना सहज भेटू शकतो, संवाद साधू शकतो ..
आपल्या ऋजु, सौम्य शैलीत बोलत सुप्रियाताई त्याला बोलतं करतात.
काही दिवसांपूर्वी ताईंशी मनमोकळी अनौपचारिक चर्चा करण्याचा योग्य आला. सद्य राजकीय परिस्थितीची सुप्रिया ताई ना उत्तम जाण आहे. वादग्रस्त विषयांवरची त्यांची मते स्पष्ट व ठाम आहेत.

सध्या धर्माचे जे अवडंबर माजवले जात आहे त्याबद्दल ताईंना विचारले असता ताई म्हणाल्या,
"माझी श्रद्धा व माझा धर्म मी वैयक्तिक ठेवते. त्याच प्रदर्शन मांडायला मला आवडत नाही. मोठे साहेब तर कधीच कोणत्या मंदिरात जात नाहीत. मी क्वचित, मनात आलं तर एका मंदिरात जाते.. ते मी लपवत नाही अगर मुद्दामहुन सांगत ही नाही. तो नॉन ईश्शू व पूर्णतः पर्सनल मुद्दा आहे."

भाजपच्या मीडिया सेल ला उत्तर देण्यासाठी आपण तोडीस तोड मीडिया सेल का बनवत नाही असं विचारलं असता ताई म्हणाल्या,
"राष्ट्रवादीचा मीडिया सेल आहे. पण तो फक्त पक्षाचा प्रसिद्धी विभाग आहे. पक्षाच्या धोरणांना, शीर्ष नेत्यांच्या मतांना प्रसिद्धी देणे इतकेच काम तो करतो. त्यापुढे जाऊन आपल्याला पेड ट्रोल्स बनवायचे नाहीत."
भाजपच्या ग्लोबेल्स नीतीपुढं आपण कमी पडतो आहोत का याच स्पष्टीकरण देत ताई पुढं म्हणाल्या की " सकृत दर्शनी तसं वाटतं असलं तरी ते अर्धसत्य आहे. अश्या गोष्टींचा तात्कालिक परिणाम दिसतो पण दूरगामी विचार केला तर त्याचे दुष्परिणामच होतात. तुम्ही तीनच वर्षात कंटाळलात की नाही या जाहिरातबाजीला ? आणि आपल्याला कंटाळायला लोकांना 15 वर्षे लागली.
लोक जेव्हा पर्यायाचा विचार करतील तेव्हा त्यांच्यापुढे ऑप्शन हवा...
काम न करता जाहिरातींचा मारा करणारे
आणि काम करूनही जाहिरात न करणारे .."

सुप्रिया ताईं शी बोलताना आपल्या समाजवादी आजीचा व पुरोगामी पित्याचा वैचारिक वारसा समर्थपणे पेलण्याची धमक त्यांच्यात आहे याची मनोमन खात्री पटत होती ..
***

सुप्रियाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
अभिष्टचिंतन ....
©सुहास भुसे


नेत्यांविषयीची सामाजिक मानसिकता

मोदी व्हाइट हाऊसवर उतरले तेव्हा परंपरेप्रमाणे गार्ड ने मोदींच्या पत्नीसाठी गाडीचा दरवाजा उघडून धरला. बराच वेळ वाट पाहूनही त्या दरवाज्यातून कोणीच खाली उतरलं नसल्याने गार्डचा भ्रमनिरास झाला असावा.
पत्नी असूनही राष्ट्राध्यक्षांच्या 10-5 गर्लफ्रेंड असणे कॉमन मानणाऱ्यांच्या देशात देशसेवेसाठी (!) पत्नीचा त्याग करणारा प्रधानसेवक विजोड वाटल्यास नवल नाही.

आपली सामाजिक मानसिकता दांभिक आहे. महानतेच्या व्याख्या तकलादू आहेत. आपल्याकडे 'दिसणे' हे 'असण्या' पेक्षा जास्त महत्वाचे असते. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांना आपण कधीच महत्व देत नाही. ज्यांचा विचारही करण्याची गरज नाही त्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या असतात..

आपण नोटबंदी का केली याचा जाब विचारण्यापेक्षा नेता 18 तास (!) काम करतो, योगा करतो यावर चर्चा रंगवणार.
3 वर्षांपूर्वी 14% GST ला विरोध करणारा नेता 28% GST कसं काय लादू शकतो याच्यापेक्षा आपल्याला तो काय 9 लाखांचा सूट घालतो, दीड लाखाचा मेकअप करतो, 34 हजारांचे मशरूम खातो यात जास्त रस असतो.

नेत्याने जनतेला भूलथापा देऊन सरळ सरळ फसवल्यास आपली तक्रार नसते. पण त्याच्या कथित शुचितेवर व राहणीवर आपलं अधिक लक्ष असतं. जीन्स, टी शर्ट घालून आपले नेते स्टेजवरून भाषण देऊ शकत नाहीत. पण त्यांनी भ्रष्टाचार केल्यास आपली फारशी हरकत नसते.

असल्या दांभिक सामाजिक मानसिकतेमुळे आपले नेते आपला दुटप्पीपणा लपवत नाहीत, भ्रष्टाचार लपवत नाहीत, पण प्रेमप्रकरणे लपवतात. 'स्नुपगेट' सारखी प्रकरणे चिरडून टाकली जातात. काही नेते 'ब्रह्मचारी' राहतात. तर काही पत्नीचा त्याग हे महानतेचे प्रतीक म्हणून प्रोजेक्ट करतात. गुड गव्हर्नन्स सारख्या फालतू गोष्टी प्रोजेक्ट करण्याची  गरजच काय !!
©सुहास भुसे

इतिहासाची ऐसीतैशी

इतिहासावर एक सचित्र ग्रंथ लिहिण्याचा मनोदय आहे. त्यात पानपताच्या युद्धात मराठ्यांचा विजय झाला व अब्दाली पराभूत होऊन पळून गेला अस लिहिण्याचा मानस आहे. तसेच शक, हूण, मुघल, पोर्तुगीज, इंग्रज यांना प्रत्येक लढाईत एत्तदेशीयांनी पराभूत केले व हा देश कधीही गुलाम नव्हता अस क्रांतिकारक प्रकरण टाकणार आहे.
यातुन प्रेरणा घेऊन भारतीय लोकांची गुलाम, पराभूत मानसिकता बदलावी असा माझा उदात्त हेतू आहे.

पेशवे हे ब्राह्मण नसून शूद्र होते हे मी आवर्जून नमूद करणार आहे. तसेच दुसऱ्या बाजीरावाने वटहुकूम काढून आपल्या राज्यात आंतरजातीय विवाह सक्तीचे केले होते. त्यामुळे त्या काळात झालेला प्रत्येक विवाह हा आंतरजातीय होता यावरही एक प्रकरण लिहिण्याचा मानस आहे. यामुळे ब्राह्मण द्वेष कमी होऊन जातीय सलोखा वाढीस लागावा असा उदात्त हेतू आहे.

शिवाजी महाराजांच्या सैन्यात 2245 तुकड्या होत्या. व त्या प्रत्येक तुकडीत भारतातल्या 2245 नोंदीकृत जातींचा एक एक प्रतिनिधी शिलेदार होता. आणि या सर्व तुकड्यांवर 2245 वेगवेगळ्या जातींचे सेनानायक होते. यावर विस्तृत प्रकरण लिहिणार आहे. छत्रपतींच्या प्रतिमेचा फायदा होऊन या लेखनामुळे जातीअंताच्या लढ्यास बळ मिळावे, एकसंध समाज निर्माण व्हावा असा आदर्शवाद यामागे आहे.

या सर्व लेखनाला मी कोणताही पुरावा देणार नाही. कारण लिखित पुराव्याना आम्ही ब्राह्मणी पद्धत मानतो. 'जाणीवेला' जाणवते तेच सत्य मानण्याने आपली फसगत होते. 'नेणिवे' तल्या नोंदीच दिशा दिग्दर्शनाचे काम करतात. त्यामुळे हे सर्व तर्कट मी केवळ 'तर्काच्या' आधारे रचणार आहे.

प्रस्तावना लिहिण्यासाठी होतकरू इतिहास लेखक श्री श्रीमंत कोकाटेना विनंती करणार आहे. हे पुस्तक कोणीच प्रकाशकाने प्रसिद्ध केले नाही तर स्वतःच फेसबुकवर प्रसिद्ध करण्याचा व कोणीच वाचले नाही तर स्वतः च 200 फेक अकाऊंट काढून प्रत्येक अकाउंट वरून आठवडाभर अस वाचून पारायणे करण्याचाही मानस आहे.

©सुहास भुसे

अभ्यासू ब्राह्मण

एका गावात देवेंद्रपंत नावाचा एक दशग्रंथी ब्राह्मण राहत होता. स्नान, संध्या, जपतप सगळं सोवळ्यात काम. कोणत्याही गोष्टीची अभ्यासाच्या नावाखाली अतिचिकित्सा करून प्रश्न लोंबकळवत ठेवण्याची त्याला उत्तम हातोटी होती.

एक दिवस नदीवर गेला. स्नान करून ओल्या वस्त्रात परतताना पायाखाली एक चिंधी आली. देवेंद्रपंतांचे अभ्यासू चिकित्सक मन जागे झाले. ही चिंधी कोणाची ? स्पृश्याची की अस्पृश्याची ?
शंकेला जागा नको म्हणून पंत पुन्हा नदीवर गेले व चार बुड्या मारल्या. ओंजळीत पाणी घेऊन आचमन करताना भाताचे एक शीत तोंडात गेले. झालं. देवेंद्रपंतांचे चिकित्सक मन पुन्हा जागे झाले. हे कुणाचं खरकट ?
या प्रश्नाचा आता समूळ अभ्यास केला पाहिजे.

शीत कोणाचे याचा अभ्यास करण्यासाठी देवेंद्रपंत नदीकाठाने वर निघाले. चांगले पाच सहा मैल चालत गेल्यावर वरच्या अंगाच्या गावात काही लोक मोठं मोठी भांडी धूत होते.
पंतांनी विचारलं, भाताचे भांडे तुम्हीच घासले का ?
लोक म्हणाले, हो.
पंतांनी पुढचा अभ्यासू प्रश्न केला. 'कशाचे जेवण होते ?'
लोक म्हणाले, ' पाटलाच्यात काल जागरण गोंधळ होता, पाच बोकडं कापली होती. त्याचीच भांडी आम्ही धूत होतो.'
पंत कुचमले. शिव शिव म्हणत नदीत पुन्हा चार बुड्या मारल्या.

हा सगळा प्रकार होईपर्यंत त्यांना चांगलीच भूक लागली होती. गावात एखादे ब्राह्मणाचे घर आहे का याचा अभ्यास करून आधी जेवले पाहिजे बुवा.
विचारत विचारत पंत एका घरासमोर आले. घरातून बाई म्हणाली,
'हो, हे ब्राह्मणाचे घर आहे.'
भरपेट जेवण झालं. सगळं व्यवस्थित झाल्यावर बाईनी विचारलं,
'तुम्ही फार अभ्यासू दिसता तोंडावरून. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला योग्य मार्ग दाखवा.'
पंत म्हणाले बोला.
बाई म्हणाली, ' माझा नवरा ब्राह्मण आहे व मी मुसलमानाची आहे. त्यामुळे प्रश्न असा निर्माण झालाय की आमचा जो मुलगा आहे त्याची सुंता करावी कि मुंज ?'

पंत पुन्हा कुचमले. चिकित्सक मन जागृत झालं. प्रायश्चित्त म्हणून जंगलात जाऊन तपोभ्यास करावा म्हणून स्वारी निघाली.
जंगलात अभ्यास करता करता रात्र झाली.
देवेंद्रपंत आपलं पोट सावरत एका झाडावर चढले.
वर जाताना एका फांदीवरून पाय घसरला. पंत फांदीच्या जाळ्यातून खाली पडू लागले.
पडता पडता हाताला एक फांदी लागली. पंत तिला पकडून लोंबकाळू लागले.
आता काय करावे ? बिकट प्रश्न असला तरी अभ्यास केल्याशिवाय निर्णय कसा घ्यायचा बरं ? खाली खोल दरीच असली म्हणजे ?
देवेंद्रपंत रात्रभर त्या फांदीला धरून लोंबकळत राहिले.
सकाळी फटफटल्यावर खाली पाहतात तो दोन फुटावर जमीन !

:- साठा उत्तराची कहाणी.. अभ्यास पूर्ण झाल्यावर सगळी चिकित्सा करून पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करण्यात येईल.

©सुहास भुसे