About

Sunday 23 July 2017

कडवटपणाने काय साध्य होणार ?

देवस्थानच्या पूजेच्या वहिवाटीवरून मारामाऱ्या होतात. टीचभर दक्षिणेचा मोह सुटत नाही. कोर्टकज्जे होतात. झाटभर काजू, नारळाच्या कलमावरून भावभावकीच्या भांडणात वकिलांच्या अनेक पिढ्या जगल्या. बांधाच्या भांडणात सर्वाधिक खून पडतात. भावाभावाच्या वाटण्या होताना सुतळीचा तोडा सुद्धा अर्धा अर्धा तोडून घेतला जातो.

आणि हे तमाम दुतोंडे सार्वजनिक व्यासपीठावरून ज्ञान पाजळतात. उदयनराजांची हजारो एकर जमीन त्यांच्या डोळ्यात खुपते. जी जमीन राजे कसत नाहीत अगर कुळांकडून एक नया पैसा खंड, बटई दखल घेत नाहीत. प्रतापगड, शिंगणापूर राजांच्या मालकीचे कसे म्हणून हे 'सुतळी तोडा' फेम लोक आश्चर्य व्यक्त करतात. वारसा बिरसा सगळं झूट, राजेशाही केव्हाच संपली वगैरे कुठेतरी वाचलेली वाक्ये सटासट फेकून हाणतात.

परवा बीजेपी माझाने बातमी चालवली की,
"भोसले कुठं फरार आहेत ?"
हजारो वर्षे गुलामगिरीत काढलेल्या लोकांच्या हाती लोकशाही म्हणजे माकडाच्या हातात कोलीत या विस्टन चर्चिलच्या उदगारांचे स्मरण झाले. राजेशाही जरी कागदोपत्री संपली असली तरी माणूस हा भावनांवर जगतो. छत्रपतींच्या गादीशी, तिच्या वारसाशी त्यांच्या श्रद्धा निगडित आहेत. इंग्लड सारख्या लोकशाहीच्या जन्मदात्या राष्ट्रात राजा राणीला मानाचे स्थान आहे. औपचारिक सत्ताधारी जरी विधिमंडळ व पंतप्रधान असले तरी तिथल्या लोकांच्या मनावर अजूनही राजराणीच राज्य करतात.

स्वातंत्र्याचा व समतेचा अर्थ उद्दामपणा नव्हे अगर व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे कडवटपणा नव्हे. वारसा बिरसा सगळं झूट अशी भीमगर्जना करून तुम्ही विवेकवादी वगैरे म्हणून एकमेकांच्या टिरी खाजवून त्या लाल करून घेऊ शकाल. पण जिथे मान लववावी, ज्यामूळ तुमची छाती अभिमानाने भरून यावी अश्या जागा जर नसतील तर तुम्हाला जीवनात कडवटपणा व शून्याखेरीज काहीही हाती लागणार नाही.
©सुहास भुसे

No comments:

Post a Comment