About

Sunday 23 July 2017

उदयनराजेंचा वारसा

वैचारिक वारस वगैरे तात्विक चर्चा ठीक आहेत. पण
श्रीमंत छत्रपती उदयनराजे छत्रपतींचे वारस आहेत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तुम्ही घरी माजघरात बसून फेसबुकवर काय मत मांडता त्याने त्यावर काही फरक पडत नाही.

छत्रपतींचा वारसा उदयन राजेंनी सांगू नये असं वाटत असेल तर आधी बापाच्या इस्टेटीवरील हक्क सोडा. स्वतःची जी काही मिळकत आहे ती दान करून टाका. मुलांना इस्टेटीतून बेदखल करा. मग वारश्याबद्दल 'क्रांतिकारी' मते मांडा. घरात असो की राजकारणात पुत्र पुत्री प्रेमापोटी पुतण्यांच खच्चीकरण केलं जातं. पोराऐवजी पुतण्या चालत नाही आणि हे वैचारिक वारसाच तत्वज्ञान मांडायला निघाले.

'लोकशाहीत' राजकीय पदे वारसा हक्कानेच मिळतात हे ही वास्तव ध्यानात घ्यायला हवं. पुढाऱ्याचा मुलगा वयात आला की बाय डिफॉल्ट युवा नेता होतो. सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते सतरंज्याच उचलत राहतात. एका घरात नेता, त्याची बायको, मुलगा, मुलगी, सून, जावई असं अख्ख कुटुंबच्या कुटुंब वेगवेगळी पदे भोगतं. एका 'समाजवादी' परिवारातील 50-60 सदस्य एकाच वेळी राजकीय पदे भोगत आहेत . हे सगळं चालतं पण उदयनराजे तेवढं खटकतात. असा सिलेक्टिव्ह एप्रोच कसा चालेल बरं ?

माणूस मूलतः इतिहासप्रेमी असतो. इतिहासाशी आणि ऐतिहासिक वारश्यांशी त्याच्या भावना निगडित असतात. आमचा राजा ही आमची भावनिक गरज आहे. बाकी लोकशाही, कायद्यापुढं सगळे समान हे आम्हालाही ठाऊक आहे व आमच्या राजालाही मान्य आहे. राहिला भावनिक राजकारणाचा प्रश्न. तर दंगली घडवून त्या भावनांच्या लाटेवर इथं सहज सत्ता मिळवता येते, आईच्या हत्येच्या सहानुभूतीच्या लाटेवर तत्पूर्वी राजकारणाचा गंध नसणारा मुलगा थेट पंतप्रधान बनतो. (ही टीका नव्हे वास्तव आहे). बापाच्या मृत्यूपश्चात केवळ सहानुभूती व भावनांच्या लाटेत कर्तृत्वशून्य मुली मंत्री बनतात. ज्या मतदार संघात तिथल्या आमदार खासदाराचे निधन होते तिथल्या पोटनिवडणुकीत हमखास त्याचा रक्ताचा वारसच निवडून येतो.

अश्या या देशात फक्त उदयनराजेंच्या बाबतीत वैचारिक वारश्याचे तत्वज्ञान मांडण किंवा फक्त उदयनराजेंच्या समर्थकांवर भावनिकतेचा आरोप करणे हा सिलेक्टिव्ह एप्रोच आहे, 'सोयीस्करवाद' आहे, पक्षपात आहे, छत्रपतींच्या घराण्याबद्दल खदखदणारा पावणे चारशे वर्षे जुना द्वेष आहे, दुसरं तिसरं काही नाही !!
©सुहास भुसे

No comments:

Post a Comment