About

Wednesday 26 July 2017

सत्ताबदलाने झालेला थेट फरक

देशात सत्ताबदल होण्याचे महत्वाचे कारण होते काँग्रेसचा भ्रष्टाचार व त्यामुळं तयार झालेले नकारात्मक जनमत. ह्या कथित घोटाळ्यांचे भाजपने असे काही मोठाले आकडे लोकांच्या मनावर बिंबवले की कोणाला ते आकडे धड लिहिताही येऊ नयेत. त्या घोटाळ्यांचे पुढे काय झाले ? कितीजणांवर काय कारवाई झाली ? देशाच्या बजेट पेक्षा मोठ्या घोटाळ्यांवर सत्ताबदल होऊनही कारवाई का होत नसावी हे मोठे गहन प्रश्न आहेत.

तर सांगायचा मुद्दा हा की कथित कोळसा घोटाळ्यामुळे जनजीवनावर कोणता दुष्परिणाम झाला होता ?
कथित टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे कोणाच्या खिशाला चाट बसली ?
कथित सी डब्ल्यू जी घोटाळ्यामुळे नागरिकांना कोणता त्रास सहन करावा लागला ?
कथित अगस्ता वेस्टलँड घोटाळ्यामुळे किती जणांना कोणत्या रांगेत उभे राहावे लागले ?

सध्याच्या सरकारचे भ्रष्टाचाराचे उस्से भी जादा कारनामे तर समोर येत आहेतच पण त्यांच्या मनमानी कारभाराचा लोकांना थेट फटका बसतोय. नोटबंदीमुळे विस्कळीत झालेली व्यवस्था अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. रांगेत कित्येक लोक प्राणास मुकले, अनेकांचे व्यावसायिक नुकसान झाले, लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या. रांगेत अनेकांचा बहुमूल्य वेळ गेला. GST असो, विविध दरवाढी असोत की नोटबंदी..  सरकार लोकांच्या थेट खिशात हात घालतय. सरकारी गायगुंड लोकांचे खून पाडत सुटलेत तो एक वेगळाच विषय. सरकारच्या कारभारातली अनागोंदी पूर्वी फक्त वृत्तपत्रांत वाचण्यापुरती व न्यूज चॅनेल वर पाहण्यापुरती मर्यादित गोष्ट होती पण आता हेडलाईन मध्ये "मितरो ... " ही भरतवाक्याची नांदी ऐकली की लोक खिसे चापचतात, पाचावर धारण बसते. आता काय नवीन लचांड गळ्यात पडते म्हणून गाळण उडते.

इतर कित्येक फरक असतील पण पूर्वीच्या व आताच्या सरकारमधील हा महत्वाचा फरक आहे. बाकी विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सरकार कोणतेही असले तरी त्याने फरक पडत नाही.
©सुहास भुसे

No comments:

Post a Comment