About

Showing posts with label स्फुट ललित. Show all posts
Showing posts with label स्फुट ललित. Show all posts

Thursday, 6 April 2023

टोकाची निरिच्छता

 काही गोष्टी, काही माणसं, काही घटना प्रचंड मानसिक त्रास देऊ शकतात. अशा गोष्टी मागं टाकता यायला हव्यात. अशी माणसं डोक्यातुन काढून टाकता यायला हवीत. अशांसाठी एक क्लोजड सब्जेक्टसची फाईल बनवता यायला हवी. एकदा विषय बाजुला टाकला म्हणजे टाकलाच..


आमचे पणजोबा योग्य वयात आपल्या चार कर्त्या मुलांकडे प्रपंच सोपवुन निरिच्छ झाले. वानप्रस्थाश्रम स्वीकारला. सकाळी उठावं प्रातर्विधी उरकेपर्यंत सुनांनी गरम पाण्याचं घंगाळ तयार ठेवायचं. अंघोळ उरकुन कपडे करून तयार होईपर्यंत भाकरी, वरण व थोडासा भात.. सुनांनी ताट तयार करून ठेवावं. अन्नाप्रति निरिच्छता. उर्वरित आयुष्यात या साध्या आहाराव्यतिरिक्त कोणताही आहार घेतला नाही. कोणाशीही अपवाद वगळता एका शब्दाने संभाषण नाही. सगळे दैनंदिन शेड्यूल न बोलताच सुरू राहिलं.


निरिच्छता अशा टोकाची आणि एकदा स्वीकारलेली स्थितप्रज्ञता एवढी ठाम होती.. की एकदा एका प्रसंगात तिचा कस लागला. यथावकाश चार भावंडांमध्ये मतभेद सुरू झाले. ते टोकाला जात वाटण्यापर्यंत वेळ आली.


जुन्या काळात वाटण्यांचे मोठे प्रकरण असायचे. काही जमिनी कोरडवाहू, काही बागायत..काही हलक्या, काही भारी.. काही मळे गावालगत असतं. काही गावापासून लांब. कोणी काय घ्यायचं हे ठरवणं मोठं वादग्रस्त व्हायचं.


तर वाटण्यांच्या बैठकीत वाद सुरू झाला. पैपाहुण्यांच्या उपस्थितीत चारी भाऊ हमरीतुमरीवर आले. वाद विकोपाला जाऊ लागले. भाऊ भाऊ एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले. हाणामारी पेटली.


पोटची कर्तीसवरती मुलं डोळ्यासमोर एकमेकांचे गळे पकडत होती.. आणि पणजोबा लोडाला टेकुन एखादं सिनेमातले दृश्य असावं जणु असं एक ही शब्द न बोलता सगळं काही पाहत होते. संपुर्ण प्रसंगात एक ही शब्द त्यांनी तोंडातून काढला न चेहऱ्यावर काही भाव उमटले.


टोकाची निरिच्छता .. एकदा प्रपंचाचा विषय सोडला म्हणजे सोडलाच.

गोष्ट छोटी डोंगराएवढी

 बागेच्या फौंडेशन साठी दगडांची गाडी आली होती. गड्यानी अर्धी गाडी खाली केली व थोडा विसावा केला. जवळच ऊसाचा एक ट्रेलर सोडून ट्रॅक्टर दुसरा ट्रेलर आणायला गेला होता. दोघा तिघांनी ऊस काढून खायला सुरवात केली. अर्धेअधिक खाल्ले तोवर मुकादम म्हणाला चला उठुया.


एकाने उरलेला ऊस ट्रेलर मध्ये मोळीत खोवुन ठेवला व दुसऱ्यांनाही सांगितलं. बाबांनो शेतकऱ्याच्या चार कांड्यांची नासाडी करू नका. आधीच बिचाऱ्यांना काही राहत नाही. दुसऱ्या गड्यानी त्याला दुजोरा देत आपापल्या उरलेल्या कांड्या मोळीत नीट बसवुन दिल्या.


अगदी छोटीशी गोष्ट. पण त्या मागची भावना मनाला स्पर्श करून गेली. ज्याची शेतीशी असलेली नाळ तुटलेली नाहीय त्या प्रत्येकाची या कठीण काळात शेतकऱ्यांप्रति सद्भावनाच आहे.


हां .. आता परवडत नसेल तर करू नका शेती म्हणणारेही आहेत. पण कशी सोडावी शेती?


परवडेल किंवा न परवडेल. शेतकरी कर्जबाजारी होईल. पण शेती सोडणार नाही. भांडवलशाहीच्या युगात इतर व्यवसायांसारखा शेती हा ही एक व्यवसायच समजला जातो.  


पण शेती हा आमचा व्यवसाय नाही तर ती आमची संस्कृती आहे. आमची जीवनपद्धती आहे. आमचा धर्म आहे. आमचे सगळे कुलाचार, रीतीभाती, सण समारंभ शेतीच्या चक्रावरच उभे आहेत. आमच्या हजारो पिढ्या, वाडवडील जगले तसेच आम्हीही जगत राहू.. विकता न आलेली पिके मोत्यासारखी फुलवत राहु.


शेती सोडणं म्हणजे जगणंच सोडणं !!!!

Wednesday, 27 December 2017

वाकन

"ह्या वाकनात करायचा का नाय पेरा सोयरं ?"
"नाय, ही पट्टी वांध्यातली हाय पाव्हण, वळवा बैलं."
"किती रान हाय ह्ये?"
"आसन की अर्धा एकर"
"कुणा कुणाचं वांद हाय पर?"
"आमी तिग भाव आणि छबुराव पाटील"
"लय दिसापसन वांद सुरू हाय जणू ! पार गचपन माजलय वाकनात !"
"तर ओ, आता बगा झाली की 12 सालं"
"ऑ !! पैका बी बख्खळ गेला आसन मंग"
"पैका मंजी बगा, आमी तिगा भावानीबी एकर एकर इकला न्हवं या वांद्यापायी "
"आग बाबो, ह्यो कसला वेव्हार मनायचा सोयरं ? अरदा एकर रानापाई तुमी तीन एकर रान घालवून बसलाव. आपल्या त डोसक्यात नाय शिरल बा ह्ये"
"पाव्हण ह्यो आकडा बघितला का मिशीचा. ह्येला इरस मनत्यात. आओ तीन एकर काय समदं तीस एकर जाऊ द्या की, पण छबुरावपूड मान खाली नाय घालणार ह्यो हिंमतराव !!"
हिंमतराव बैलक्यासमोर मिशीला पीळ भरू लागला. व बैलक्या एका हातानं कासरं आकडून व एका हातात शाळूची मूठ तशीच धरून स्तंभित होऊन पाहत राहिला.
©सुहास भुसे


मटण झोल

सव्वा चार वाजत आले होते. कामावर शेवटचा हात मारत असताना टेबलवरचा फोन घणघणला. समोरून बायकोचा आवाज आल्यावर मध्याने शेजारच्या टेबलवरील अविवाहित गण्याला जळवण्यासाठी मुद्दामच मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली..

".......काय म्हणतेस ? लवकर घरी येऊ ?
........अच्छा, पण कारण सांगशील की नाही ?
...... ओह... काय सांगतेस ? मटण बनवतेयस ?
(शेजारच्या टेबलवरून की पॅड बडवण्याचा आवाज वाढला )
........व्वा, बंगाली झोल, मटण करी आणि मालवणी मटणवडे.
(शेजारी की बोर्ड आदळल्याचा आवाज )
..... लवकर म्हणजे काय, धावत धावत येतो,
.......चल मग बाकी आल्यावर"

गण्या चांगलाच वैतागला.
"खा लेको, मटण खा, तंगडी खा, वडे खा, मजा करा. आम्ही आपलं चिवडत बसतो खानावळीतली फुळुक भाजी आणि बेचव भाताची डिखळं .. "
खो खो हसत मध्या म्हणाला,
"साल्या कर ना लग्न मग, रोज नवी फर्माइश करत जा, चमचमीत खा व टुणटुणीत हो."
गण्याच्या त्राग्यामुळे खुश होत मध्याने टेबल आवरलं.

5 ला 2 मिनिटं कमी असताना पुन्हा फोन घणघणला.
मध्याने मुद्दाम स्पीकर ऑन केला.
"अहो, निघालात का?"
"निघतोयच हनी, तुझं आटपेपर्यंत हजर होतो."
"अहो, काय झालं माहितीय का ? ती माझी बालमैत्रिण बनी नाही का? ती घरी आली होती. तिच्या सर्किट नवऱ्याबद्दल सांगत होती.. "
" अच्छा, म्हणजे तुम्हा बायकांचा फेव्हरेट विषय"
"अहो ऐका न, तुम्ही बिल्कुल असे नाहीत, कित्ती चांगले आहात तुम्ही,
(मध्याने हळूच हसत डोळ्यांच्या कोपऱ्यातून गण्याकडे पाहिले)
"तेच बनीला सांगत होते, आणि तेवढ्यात एक छोटीशी गंमत झाली. "
"काय गंमत झाली हनी?"
"मी कढईत पाणी टाकायचं विसरले आणि मटण जळाल सगळं"
(मध्याने हातातील पेन्सील खटकन मोडल्याचा आवाज आला.)
".........."
"अहो, ऐकताय न, तर येताना कालच्या सारखं जेवण घेऊन या हॉटेलमधुन, आणि बनी पण थांबतेय बरं का जेवायला. "

रिसिव्हर खाडकन आदळल्याचा आवाज गण्याच्या गडगडाटी हसण्यात विरून गेला.
©सुहास भुसे


दाढीवाला वर्सेस दाढीवाला

ब मो पुरंदरे यांचा एक किस्सा प्रसिद्ध आहे.
गो नी दांडेकर यांच्या घरी भिंतीवर टांगलेली एक तलवार पुरंदरेंच्या मनात खूप भरली होती. या न त्या प्रकारे ती तलवार आपल्याजवळ यावी असं ब मों च्या फार मनात होतं.

एकदा गो नी दांडेकरांच्या घरी सकाळी सकाळी जाऊन ब मो त्यांना म्हणाले,
" आज माझ्या स्वप्नात भवानीदेवी आली होती. ती म्हणाली आज तू अशा न अशा दाढीवाल्या माणसाच्या घरी जा. तो तुला त्याच्याकडील तलवार भेट म्हणून देईल."
(एवढ्यावरून ब मो नी सगळ्या वस्तू अशाच जमवल्या असतील असा वाचकांनी निष्कर्ष काढू नये किंवा काढल्यास त्याला काय इलाज ? )

तर गो नी दांडेकर उर्फ आप्पासाहेब हे देखील एक पोहोचलेलं व्यक्तिमत्व होतं.. ते ब मो ना म्हणाले,
" माझ्याही स्वप्नात आजच भवानी देवी आली होती. ती म्हणाली आज असा असा दाढीवाला तुझ्याकड येईल, मी त्याच्या स्वप्नात आल्याचे सांगेल. पण मी तर इथं तुझ्या स्वप्नात असल्यामुळे त्याच्याकडे गेलेली नाही. तेव्हा त्या लबाड दाढीवाल्यावर तू विश्वास ठेवू नको. "

यावर अकबराला पाठवलेलं पत्र संभाजी राजांनी पकडल्यावर आण्णाजी दत्तोचा चेहरा झाला असेल तसा ब मों चा चेहरा झाला.
©सुहास भुसे


Tuesday, 22 August 2017

गावाकडची टोपणनावे

गावाकडची टोपणनावे वेगळी असतात. ती शोनु, पिंकी, पप्पू, टिकू अशी गोंडस नसतात. आणि दुसरं म्हणजे ही टोपणनावे घरचे देत नाहीत तर समाज देतो. गावाकडे भावकी फार मोठी असते. एकेका आडनावाची अख्खी गावेच असतात. भोसले तर सगळे भोसलेच, काळे तर सगळे काळेच. राजू कोणाचा तर शिंद्यांचा एवढं सांगून भागत नाही. शिंद्यांच्यात आठ दहा राजू असतात. शिवाय ओळखीसाठी आडनाव वापरणे गावाच्या औपचारिकतेत बसत नाही..

मग एक प्रकार आई-बापाचे नाव जोडणे ..
यात आई व बाप यातलं गावात जो जास्त लोकप्रिय असेल त्याच नाव जोडले जाते.
उदा. छबुरावचा म्हारत्या, म्हाळाप्पाचा हानम्या किंवा बुकाबाईचा बाळू, तुळसानानीचा बंडू..

टोपणनावे ही कधी कधी गुणवैशिष्ट्ये बघून मिळतात..
उदा. खादुडा तुकाराम, खोडकर रामा.
आता हा खोडकर रामा म्हणजे एखादा 14-15 वर्षाचा मुलगा असावा असा सकृतदर्शनी समज होतो. पण हे नाव धारण करणारे चक्क 80 वर्षांचे आजोबा आहेत. गावाकडे असचं असतं.. एकदा टोपणनावाशी कमिटमेंट कर ली म्हणजे कर ली च. मग नो कॉम्प्रमाईज.

पण सगळ्यात जास्त टोपणनावे ही शारीरिक गुणवैशिष्ट्ये पाहून दिली जातात.
उदा. लांबरी अण्णा, काटाळ रामा, नकटा श्यामा, वाकडा आबा, मोठ्या डोळ्याची फुला, मिशाळू आबा.

बरं ही सन्मानजनक नावे गुपचूप किंवा कुचाळक्यासाठी वापरली जातात असं नाही. ती थेट संबंधिताच्या तोंडावर, मुलाबाळांच्या देखत, पै पाहुण्यांसमोर वापरली जातात. एखाद्याला नकटा, वाकडा अस म्हणण्यात काही अशिष्ट आहे, सभ्यतेला सोडून आहे असे म्हणणाऱ्यालाही वाटतं नाही व ऐकणाऱ्यालाही वाटत नाही.
©सुहास भुसे

Monday, 24 July 2017

माझी देवपूजा

"आज श्रावण सोमवार आहे तेव्हा आज देवपुजा तुम्ही करा"
आमच्या कलत्राने सकाळी सकाळी असा अध्यादेश जारी करत वातावरण तंग करून सोडले. तसा मी अगदीच नास्तिक नाही. सहज जाणे झाले तर देवळातही जातो, नमस्कार करतो. पण पूजा, फुलं वाहणे, प्रदक्षिणा वगैरे आवाक्याबाहेरचे प्रकार, थोडक्यात देखल्या (दिसला तरच) देवाला दंडवत असा प्रकार.

पण कालच्या घमासान चर्चेत घरकामात मदत करायची म्हटलं की मी फडणवीसला कर्जमाफी मागितल्यासारखा चेहरा करतो, तो तुमचा अमका मित्र बघा, तो तमका भाऊ बघा असे मुद्दे पुढे आले. थोडक्यात इतर लोक घरकामात चीन आहेत तर मी 10 दिवसांचा दारुगोळा उरलेला भारत आहे असा निष्कर्ष काढला गेला. त्यावर भक्तांच्या राष्ट्रप्रेमाने भारलेल्या विजीगीषु बाण्याने मी चवताळून गर्जना केली की उद्यापासून जोरदार घरकाम अंगावर घेतले जाईल. त्याच पडत्या फळाची आज्ञा घेऊन हा अध्यादेश निघाला होता. मोदी वाटेल ती आश्वासने देऊन जनतेला फसवू शकतात पण बायकोला फसवणे इतके सोपे नसते हे त्यांना जसोदाबेन सोबत असत्या तर चांगलं कळलं असतं.

तर मन मारून अडवाणी जसं कोविंद यांचं अभिनंदन करत होते तसं मी देव्हाऱ्यापुढं उभा राहिलो. मुलांचं आवरत आवरत कलत्राच्या सूचनांचा सपाटा कानावर कोसळत होता. बेल वाहा, फुलं वाहा, धूप लावा, अगरबत्ती, कापूर लावा, गंधाच्या डब्या तिकडे ठेवल्या आहेत. आज शिवामुठ तांदूळ आहे ... यांव त्यांव ...वगैरे. त्या गाईडलाईन फॉलो करत कामगिरी पार पाडायची होती.

तर अस्मादिक सावरून देव्हाऱ्यापुढं उभे राहिले. देव्हाऱ्यात 33 कोटी देवांची मांदियाळी माजली होती. जागेची टंचाई व देवांची खचाखच गर्दी पाहता हा आमच्या गावातल्याऐवजी मुंबईतला देव्हारा वाटत होता. काय त्या पूजेचे अवडंबर माजवते ही.. हाय काय अन नाय काय.. दोन मिनिटांत होत्याचं नव्हतं करून टाकतो. असं पुटपुटत मी बेल, फुल, गंध जे हाताला लागेल ते जिथं मोकळी जागा दिसेल तिकडे ठेवून दिले. सुमारे साडे बहात्तर सेकंदात यथासांग देवपूजा आटोपून मी छाती काढत दिवाणखान्यात सोफ्यावर जाऊन बसलो. व पायावर पाय टाकत ऐटीत चहाची वाट पाहू लागलो.

पण चहाऐवजी आतून "अहो, काय करून ठेवलय हे, इकडे या पटकन" अशी भीमगर्जना ऐकू आल्याने मी दबकत दबकत आत गेलो.
" अहो, देव कुठं आहेत, फुल कुठं वाहिलीत? धूप विझलाय ? बेल कोणाला वाहतात ? पिंडी दिसते का कुठं आहे ? काय प्रकार आहे हा ? ***, ****, ***, ****, "
या माऱ्याने मी पुरता बावचळून गेलो. आधीच ही ट्रम्प तात्या मीडियावर चिडून असतात तशी तुंबलेली त्यात मोदीने नोटबंदी करून देशात धुमाकूळ माजवून दिल्यासारखा मी देव्हाऱ्यात धुमाकूळ माजवला होता. ड्यामेज कंट्रोल साठी पुन्हा देवपूजा करणं भाग होतं.
मग ही रखुमाई सारखी कमरेवर हात ठेवून शेजारी उभी राहिली..

"चला मी सांगते तसं करा, एक एक फुल घेऊन एका एका देवाच्या डोक्यावर व्यवस्थित ठेवा."
मी आपलं स्वयंसेवक जसं स्वतःच डोकं न चालवता सरसंघचालकांच्या आदेशाचे निमूट पालन करतात तसं करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केली.
"पिंडी शोधा आधी, ती बघा भैरवनाथाच्या मागे आहे. अहो, तिथं नव्हे तो जोतिबा, छे तो खंडेराया, घोड्यावर बसलेले सगळेच देव भैरोबा नसतात, हां हां ...आता तिला बाहेर पाटावर ठेवा, पाणी वाहा, बेल वाहा.. अमुक *** तमुक *** यांव ** त्यांव "
सुमारे साडे तेवीस मिनिटे निकराची झुंज दिल्यावर रखुमाईने कमरेवरचे हात खाली घेतले व समाधानाने मान डोलावली.
" याला म्हणतात पूजा, आता कसं प्रसन्न दिसतोय बघा देव्हारा "

मी घाम पुसत आजवर पूजा करणाऱ्या भटजींवर तोंडसुख घेतल्याचा मनातल्या मनात पश्चाताप व्यक्त करत देवपूजा म्हणजे खायचे काम नव्हे आणि आपले तर खचितच नव्हे असा निष्कर्ष काढत उद्यासाठी सोप्यातले सोपे कोणते घरकाम अंगावर घेता येईल याचा विचार करण्यात गुंग झालो.
©सुहास भुसे

Sunday, 23 July 2017

मर्कटलीला

गावात एक माकड आलय. या भागात बजरंग बलीचा अवतार फारसा फिरकत नाही. त्यामुळं लोकांना पण अप्रूप वाटतं. लोक काही बाही खायला देत राहतात. माकडही आता गावात चांगलच रमलय. पण त्याच्या खोड्यानाही उत आलाय. एखादी बाई बापडी अंगणात एकटी दिसली की दात फिसकारत भीती दाखवतय.  हातात जे असेल ते हिसकावून घेतय. पोरा सोराना हात पाय उगारत भीती दाखवतय.
काल तर गंमतच झाली..
मंगला आक्का खाली वाकून अंगणातला केर लोटत होती. माकडाने शेजारच्या भिंतीवरून आक्काच्या पाठीवरच उडी मारली. व तिथच आरामात ठिय्या जमवला. माकड तसं छोटं व वजनाने हलकं असल्याने आक्काला वाटलं तिचा नेहमी अंगाला झटणारा नातू गण्याच आहे. त्याला लाडे लाडे रागे भरत ती उतर खाली काम करू दे मुडद्या म्हणत खाली वाकून लोटतच होती..
तिच्याकडे गप्पा टाकायला नेहमीच्या वेळेला आलेली तुळसा नानी हे दृश्य बघून हक्का बक्का झाली..
बोबडी वळल्याने तोंडातून कसं बसा आवाज काढत ती ओरडली.
"आक्काsss माकडsss "
तरीही आक्का तिच्याच नादात.. आक्का म्हणते,
"कुठय ग ? ये गण्या उतर मुडद्या. त्ये बग माकड आलय म्हण. "
नानी पुन्हा ओरडली..
"आग आक्का तुझ्याच पाठीवर बसलंय "
आक्काने वाकल्या वाकल्या मान वळवून पाठीवर बघितलं. माकडाने आक्काकडे बघत दात काढून फिस्स केलं. आता मात्र आक्काची पाचावर धारण बसली. आता उठावे की पळावे की ओरडावे काहीच कळेना. थरथर कापत तिने हातातला झाडू माकडाला मारला. तो चुकवण्यासाठी माकडाने खाली वाकत तिच्या गळ्यातच हात टाकले आणि आक्काला मिठीच मारली.
मग मात्र आक्का मागचा पुढचा विचार न करता जोरात ओरडत किंचाळत अंगणात इकडे तिकडे धावू लागली.
मघाच पासून आपल्याला पाठकुळी घेऊन निवांत लोटणारी ही म्हातारी अचानक का किंचाळायली हे माकडाला कळेना.. ते दचकून उडी मारुन शेजारच्या भिताडावर बसलं आणि घाबरून आक्काकडं बघू लागलं.
हा सगळा नाट्यमय प्रकार घडेपर्यंत तिथं जमा झालेल्या बाळगोपाळांची व आमच्यासारख्या बघ्यांची मात्र हसून हसून मुरकुंडी वळली.
©सुहास भुसे

मेरे रशके कमर

मेरे रशके कमर ... ज्यांनी पूर्वी ऐकलं नव्हतं त्यांनीही अलीकडे ऐकलं असेल .. एकदा ऐकलं की मनावर गारुड होतं या गाण्याचं. ऐकतच राहतो माणूस. ऐकत नसतानाही मनात तेच सूर घोळत राहतात.. अर्थात हा अनुभव येण्यासाठी नुसरत फतेह अली खाँ साहेबांच्या आवाजातली मूळ कव्वाली ऐकायला हवी..

'बेहिजाबाना वो सामने आ गये
और जवानी जवानी से टकरा गयी'
खाँ साहेब हे अश्या नजाकतीने म्हणून जातात की तो टकराव आपण अक्षरशः अनुभवतो..ऐकता ऐकताच एक सूक्ष्म थरथर होते.
एका स्पीड मध्ये कव्वाली सुरू असताना शेवटच्या ध्रुवपदाला मेरे ss रशके ss के कमर नुसरत साहेब असं सावकाश असं लचकत म्हणतात जणू 'ती' समोरून ठुमकत, मुरडत येत असावी असा फील येतो.

फना बुलंद शहरी ची ही खर तर गजल आहे. पण नुसरत साहेबांनी ती गायली कव्वालीसारखी. आणि हे काँम्बीनेशन किती जबरदस्त जमून गेलेय ते तब्बल साडेसतरा मिनिटं आपण मंत्रमुग्ध होऊन अनुभवत राहतो.

प्रेम करावं तर उर्दूत.. उर्दूची लचक, शिद्दत, नजाकत जगातल्या दुसऱ्या कोणत्या भाषेत असेलसं वाटत नाही.
'चाँद के साये मे ए मेरे साकीया
तुने ऐसी पिलाई मजा आ गया'
साकीया शब्दाला काय प्रतिशब्द योजता येईल? कप बेअरर? बार अटेंडन्ट? किती रुक्ष वाटत हे. मराठीत तर हा साकीया बिकिया प्रकारच नाही.
'आँख मे थी हया हर मुलाकात पर
सुर्ख आरिझ हुये वस्ल की बात पर'
लाजण्याच वर्णन इतक्या गहिऱ्या उत्कटतेने दुसऱ्या शब्दात, दुसऱ्या भाषेत करणं कठीण!
'उस ने शर्मा के मेरे सवालात पर
ऐसे गर्दन झुकायी मजा आ गया ..'
लाजण्याच्या फँटसीने एक सुखद संवेदना उमटते. ते लाजणं काळजात आरपार होतं..
ऐकत ऐकत आपणही शेवटी या गाण्यावर त्या शेख साहिब सारखं आपलं इमान हरवून बसतो..
नुसरत फतेह अलींच्या इतर कव्वालींएवढी ही हिट झाली नसली तरी मला ती नुसरत फतेह अलींची सगळ्यात श्रेष्ठ कव्वाली वाटते ..
©सुहास भुसे

सुप्रिया ताईंशी एक मनमोकळा संवाद

सुप्रिया ताईं ची राहणी आणि व्यक्तित्व इतकं साधं आहे की त्यांच्याशी बोलताना कसलंही दडपण वाटत नाही.. कसलाही पोकळ डामडौल नाही की कसला बडेजाव नाही. सामान्यातला सामान्य माणूसही त्यांना सहज भेटू शकतो, संवाद साधू शकतो ..
आपल्या ऋजु, सौम्य शैलीत बोलत सुप्रियाताई त्याला बोलतं करतात.
काही दिवसांपूर्वी ताईंशी मनमोकळी अनौपचारिक चर्चा करण्याचा योग्य आला. सद्य राजकीय परिस्थितीची सुप्रिया ताई ना उत्तम जाण आहे. वादग्रस्त विषयांवरची त्यांची मते स्पष्ट व ठाम आहेत.

सध्या धर्माचे जे अवडंबर माजवले जात आहे त्याबद्दल ताईंना विचारले असता ताई म्हणाल्या,
"माझी श्रद्धा व माझा धर्म मी वैयक्तिक ठेवते. त्याच प्रदर्शन मांडायला मला आवडत नाही. मोठे साहेब तर कधीच कोणत्या मंदिरात जात नाहीत. मी क्वचित, मनात आलं तर एका मंदिरात जाते.. ते मी लपवत नाही अगर मुद्दामहुन सांगत ही नाही. तो नॉन ईश्शू व पूर्णतः पर्सनल मुद्दा आहे."

भाजपच्या मीडिया सेल ला उत्तर देण्यासाठी आपण तोडीस तोड मीडिया सेल का बनवत नाही असं विचारलं असता ताई म्हणाल्या,
"राष्ट्रवादीचा मीडिया सेल आहे. पण तो फक्त पक्षाचा प्रसिद्धी विभाग आहे. पक्षाच्या धोरणांना, शीर्ष नेत्यांच्या मतांना प्रसिद्धी देणे इतकेच काम तो करतो. त्यापुढे जाऊन आपल्याला पेड ट्रोल्स बनवायचे नाहीत."
भाजपच्या ग्लोबेल्स नीतीपुढं आपण कमी पडतो आहोत का याच स्पष्टीकरण देत ताई पुढं म्हणाल्या की " सकृत दर्शनी तसं वाटतं असलं तरी ते अर्धसत्य आहे. अश्या गोष्टींचा तात्कालिक परिणाम दिसतो पण दूरगामी विचार केला तर त्याचे दुष्परिणामच होतात. तुम्ही तीनच वर्षात कंटाळलात की नाही या जाहिरातबाजीला ? आणि आपल्याला कंटाळायला लोकांना 15 वर्षे लागली.
लोक जेव्हा पर्यायाचा विचार करतील तेव्हा त्यांच्यापुढे ऑप्शन हवा...
काम न करता जाहिरातींचा मारा करणारे
आणि काम करूनही जाहिरात न करणारे .."

सुप्रिया ताईं शी बोलताना आपल्या समाजवादी आजीचा व पुरोगामी पित्याचा वैचारिक वारसा समर्थपणे पेलण्याची धमक त्यांच्यात आहे याची मनोमन खात्री पटत होती ..
***

सुप्रियाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
अभिष्टचिंतन ....
©सुहास भुसे


इतिहासाची ऐसीतैशी

इतिहासावर एक सचित्र ग्रंथ लिहिण्याचा मनोदय आहे. त्यात पानपताच्या युद्धात मराठ्यांचा विजय झाला व अब्दाली पराभूत होऊन पळून गेला अस लिहिण्याचा मानस आहे. तसेच शक, हूण, मुघल, पोर्तुगीज, इंग्रज यांना प्रत्येक लढाईत एत्तदेशीयांनी पराभूत केले व हा देश कधीही गुलाम नव्हता अस क्रांतिकारक प्रकरण टाकणार आहे.
यातुन प्रेरणा घेऊन भारतीय लोकांची गुलाम, पराभूत मानसिकता बदलावी असा माझा उदात्त हेतू आहे.

पेशवे हे ब्राह्मण नसून शूद्र होते हे मी आवर्जून नमूद करणार आहे. तसेच दुसऱ्या बाजीरावाने वटहुकूम काढून आपल्या राज्यात आंतरजातीय विवाह सक्तीचे केले होते. त्यामुळे त्या काळात झालेला प्रत्येक विवाह हा आंतरजातीय होता यावरही एक प्रकरण लिहिण्याचा मानस आहे. यामुळे ब्राह्मण द्वेष कमी होऊन जातीय सलोखा वाढीस लागावा असा उदात्त हेतू आहे.

शिवाजी महाराजांच्या सैन्यात 2245 तुकड्या होत्या. व त्या प्रत्येक तुकडीत भारतातल्या 2245 नोंदीकृत जातींचा एक एक प्रतिनिधी शिलेदार होता. आणि या सर्व तुकड्यांवर 2245 वेगवेगळ्या जातींचे सेनानायक होते. यावर विस्तृत प्रकरण लिहिणार आहे. छत्रपतींच्या प्रतिमेचा फायदा होऊन या लेखनामुळे जातीअंताच्या लढ्यास बळ मिळावे, एकसंध समाज निर्माण व्हावा असा आदर्शवाद यामागे आहे.

या सर्व लेखनाला मी कोणताही पुरावा देणार नाही. कारण लिखित पुराव्याना आम्ही ब्राह्मणी पद्धत मानतो. 'जाणीवेला' जाणवते तेच सत्य मानण्याने आपली फसगत होते. 'नेणिवे' तल्या नोंदीच दिशा दिग्दर्शनाचे काम करतात. त्यामुळे हे सर्व तर्कट मी केवळ 'तर्काच्या' आधारे रचणार आहे.

प्रस्तावना लिहिण्यासाठी होतकरू इतिहास लेखक श्री श्रीमंत कोकाटेना विनंती करणार आहे. हे पुस्तक कोणीच प्रकाशकाने प्रसिद्ध केले नाही तर स्वतःच फेसबुकवर प्रसिद्ध करण्याचा व कोणीच वाचले नाही तर स्वतः च 200 फेक अकाऊंट काढून प्रत्येक अकाउंट वरून आठवडाभर अस वाचून पारायणे करण्याचाही मानस आहे.

©सुहास भुसे

Friday, 2 June 2017

ग्रामीण खाद्य जीवन

शीर्षटीप :- कमजोर ह्रदयाच्या आणि सोवळ्या लोकांनी स्वतःच्या जबाबदारीवर वाचावे.

मटण म्हटलं की आपल्याला दोनच प्रकार ठाऊक असतात. बोकडाचे किंवा कोंबडीचे.
ग्रामीण भागातले खाद्य जीवन पूर्वापारपासून या बाबतीत खूप समृद्ध आहे. रानडुकराची शिकार करून अत्यंत चवीने खातात लोक. डुकराचे मांस चवदार व चरबीयुक्त असते. ते खाताना चवीपुरतीच भाकरी भात घेतात लोक. बोकडाचे मटण ताटात. तर हे डायरेक्ट पातेलीच घेऊन बसतात. याची कातडी तर खोबऱ्यासारखी चवदार लागते असं जाणकार म्हणतात.  शिकारीत कातड्याच्या वाट्यावरून वाद होतात.
बरं रानडुकराचं वजन अफाट असतं. वाटे घालून, घरी खाऊन, पै पाहुणे बोलावून, गल्लीत वाटून ही संपत नाही. मग या मटणाचे लोणचे घालतात. पोर्कचे लोणचे हा अत्यंत चवदार व लोकप्रिय प्रकार आहे. त्याची किंमत 2000 ते 3000 रु किलो पर्यंत असते.

सश्याची शिकार हा तर पोरा ठोरांचा खेळ.
त्यासाठी लागणाऱ्या घरघुती मेडच्या वाघरी अर्थात जाळी गल्लोगल्ली उपलब्ध असतात. सश्याचे माग शोधणे, गवताचे खुडलेले शेंडे, मातीतली पावले हा शॉरलॉक होम्सच्या तोंडात मारणारा इंटरेस्टिंग प्रकार आहे. पोरं सगळा माल मसाला सोबतच घेऊन असतात. शिकार साधली की लगेच माळावरच त्याचा फन्ना उडवला जातो. कधी भाजून तर कधी तिकडेच तीन दगडांची चूल मांडून.

घोरपड ही क्वचित सापडणारी अपवादात्मक शिकार. त्यामुळे त्याला फार भाव. घोरपड छोटी असते बऱ्याचदा. म्हणून शिकारकरे गुपचूप कार्यक्रम करतात. घोरपड सापडली असं मंडळाला कळलं तर एक एक मणी वाट्याला येणे मुश्किल. घोरपडीच्या मटणापुढे बोकडाचे मटण म्हणजे अळूचे फदफदे.

तित्तर ही एक अशीच अवघड शिकार. हा पक्षी फार चलाख व चतुर असतो. म्हणून याला चतुर असही म्हणतात. याचे खास पिंजरे असतात. महिनोन महिने नजर ठेवून मोक्याच्या जागी ते लावले जातात. तित्तराचा लेगपीस खाताना खाद्यानंदी टाळी लागते. काळ्या तिखटातला त्याचा रस्सा तर ओरपुन ओरपुन पितात. ताटे फोडून खातात.

पारवे, होले हे स्टार्टर म्हणून वापरतात. ड्रिंक वगैरे करत असाल तर चखना म्हणून भाजलेले होले खाणे हा जेवणावर कडी करणारा प्रकार आहे. होले खाण्याच्या नादात प्रसंगी ग्लास तसाच भरलेला राहून जातो.

पाऊस पडला की ओढ्या नाल्यांना खेकड्यांची शिकार केली जाते. काठावर बिळे असतात. त्यात बाहेरची पावलवट ओळखून आत खेकडा आहे की नाही हे हेरतात. क्वचित त्या बिळात साप असण्याचा धोका असतो. एकदा कोणत्या बिळात खेकडा आहे कळलं की पुढे खूप सोपा प्रकार. एक गवताची काडी बिळात घालून हलवायची. खेकड्याने ती पकडली की पटकन बाहेर काढून खेकड्याची नांगी मोडायची आणि पाटीत टाकायचा. चांगला एरिया असेल तर तासाभरात पाटी भरते. त्यात जर एखादी गाभण मादी मिळाली तर शिकारकरे भयंकर खुश होतात. गाभण मादीला अमृततुल्य चव असते असं त्याचं निरीक्षण असत.

अजून बऱ्याच प्राण्यांच्या- पक्षांच्या शिकारी साधण्यात ग्रामीण भारतीय वस्ताद आहेत. वरील शिकारी फक्त देशावरच्या आणि पठारी भागातल्या. कोकणात आणि जंगल जवळ असणाऱ्या भागात अजूनच व्हरायटी असते शिकारींमध्ये. भटक्या विमुक्त जमातींत तर वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण तऱ्हा आहेत शिकारींच्या. उदा. कातकरी उंदरांची शिकार करतात. ढिगाने उंदीर पकडून मेजवानी करतात. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.
©सुहास भुसे


Sunday, 15 January 2017

ती सध्या काय करते ?

ती सध्या काय करते हा प्रश्न माझ्यापुरता त्या सध्या काय करतात असा व्यापक करुन घेतो.
याचे कारण म्हणजे मी भयंकर दिलफेक ...
दिसली जरा बरी पोरगी की फेकलेच दिल.
आता मी फेकले म्हणजे तिने झेलले असे क्वचितच होई हा भाग अलहिदा. पण प्रँक्टिस मेक्स म्यान परफेक्ट या उक्तीप्रमाणे उत्तरोत्तर फेकने आणि झेलने यातले व्यस्त प्रमाण कमी होत गेले.
सच्चा प्यार सिर्फ एक बार ही होता है
आपल्या तमाम सिनेमावाल्यांनी हा हग्या दम देऊन ठेवल्यामुळे आजवर हे सांगायचे धाडस मात्र होत नव्हते ...
पण आता कळले की हा सगळा पुरुषाला चु बनवण्याचा प्रकार आहे, निव्वळ मोदीगिरी , दूसरे काही नाही!!

हे खरे प्रेम एकदाच वाली भानगड मला कधीच कळली नाही.  या सगळ्या पोरींवर मी तेवढयाच उत्कटतेने, सच्चे दिल से वगैरे प्रेम केले. तिने मला घास डाला, तिने  नही डाला असला आपपर भाव ठेवला नाही. म्हणून तर मला त्या सगळ्या लख्ख आठवतात आणि बऱ्याच जणी सध्या काय  करतात हे ही ठाऊक आहे.
पहिलीपासून माझी फेकाफेकी सुरु असावी असे अंधुक अंधुक आठवते. स्पष्ट आठवते ती पहिली पोरगी पाचवीत तिच्याकडे दिल फेकलेले.  दहावीपर्यंत दुसऱ्या कोणाकडे दिल फेकण्याचा अजिबात मोह झाला नाही.

या बाबतीत मात्र मी भयंकर एकवचनी आणि तत्वनिष्ठ माणूस होतो. हायस्कूलमध्ये ती एकच, ज्युनियरला ती एकच, सिनियरला एकच, बीएड  ला एकच, एम ए ला एकच,  गावात एकच, तालुक्याला एकच, शेजारच्या गावात एकच. अर्थात या सगळ्याजणी वेगवेगळ्या होत्या. पण तरीही या आगळया एकवचनी बाण्याला दाद मिळायलाच हवी.

तर पहिली ती पाचवीतली .. तिच्यावर मर मर मरायचो. 6 वर्षे डोळे झिजवले तिच्यासाठी. पण कधी एक चकार शब्द ही बोलणे झाले नाही तिच्याशी. अगदी पाहिल्यांदा तिच्याशी बोललो ते इथे फेसबुकवर. तोवर तिला दोन पिल्ली व मला दोन पिल्ली झाली होती. तरीही आताही तिच्याशी पहिल्यांदा च्याट करताना काळीज धडधड करत होते. तिने माझ्या लिखानाचे कौतुक केले तेव्हा मनावर मोरपीस फिरले. मी तुझी वॉल नियमित वाचते आणि फक्त तुझीच वॉल वाचते अस म्हणाली तेव्हा कृतकृत्य झालो मी.
तर ही वाली ती काय करते ते इकडे समजले.

दूसरी ती दहावीच्या समर व्हेकेशनमध्ये भेटली. ही माझी दिलफेक फेक झेलणारी पहिली ती होती. ही देखील काय करते ते मला इथेच फेसबुक वर ठाऊक झाले. अर्थात यांना फेसबुकवर शोधण्यासाठी व संपर्क करण्यासाठी मला किती श्रम पडले असतील ते जे आपली ती इथे शोधतात त्यांनाच समजेल.

इथून पुढे ही ती, ती ती, इकड़ची ती, तिकड़ची ती असा सपाटा सुरु होता.

एक आठवणीत राहील अशी ती बी एड मध्ये माझ्या आयुष्यात आली. ती जास्त आठवणीत राहण्याचे कारण म्हणजे तिच्यापेक्षा तिची मैत्रिण. आणि ही मैत्रीण आठवणीत राहण्याचे कारण म्हणजे 'ही' ने मी फेकलेले दिल असे झेलले की परत सोडलेच नाही. अर्थात ती आता माझी सखी राज्ञी जयती बायको आहे.

आता इथून पुढे मात्र माझ्या दिलफेक वृत्तीला लगाम बसला (काय म्हणालात ? विश्वास बसत नाही ? कठीण आहे बुवा तुम्हा संशयी लोकांचे )

आणि ही गोष्ट इथेच संपवणे माझ्या सुरक्षेच्या व पोटाच्या दृष्टीने हिताचे आहे.
©सुहास भुसे.


हुमनं

गावाकडे 'हुमनं ' हा एक फार मनोरंजक प्रकार असतो. शेतात काम सुरुय. खुरपण्याची पात धरलीय आणि एक बाई हुमन घालते... पात लावत लावत बाकीच्या बायका विचार करत राहतात .. दोन, तीन पाती लागेस्तो अनेक उत्तरे ट्राय करून होतात... पण सहसा योग्य उत्तर हुमन सांगणाऱ्याकडेच असते ...
ती उत्तर सांगते तेव्हा वाटत ' अरेच्चा, हे कळल कस नाही आपल्याला ? अगदी सोपे तर होते '

आता ही हुमनं फार कौशल्याने तयार केलेली असतात. बहुसंख्य हुमनं अशी असतात की याचे उत्तर अगदी अश्लील असणार अस वाटावे ...
उदा. " वरचे फुकट, खालचे विकत "
अस हुमन घातले की ऐकणाराच्या मन में लड्डू फुटतो .
तो त्याच ट्रैकवरुन उत्तर शोधत राहतो.. आणि चकतो .. हुमनाला दिलेली अश्लील डूब निव्वळ चकवण्याचा प्रकार असतो ...
आणि शेवटी उत्तर येते ते अगदी साधे .. ' कुंकवाचा करंडा '
अर्थात वरचा करंडा फुकट म्हणजे बिगर महत्वाचा, खालचे/आतले कुंकु खरे महत्वाचे !

अनेक हुमने मध्यमवर्गीय श्लील, अश्लीलतेच्या परिभाषेमुळे इथे उध्रुक्त करणे कठीण आहे.
एकच उदाहरण दखल ..
"लाल लाल करुन काळं आत सारलं,
चवड्यावर बसून हापकं दिलं "
आता असल्या भयंकर हुमनाचे प्योर वेज उत्तर असेल अस कोणाला वाटेल ?
ऐकणाऱ्याला भयंकर गुदगुल्या होतात. वेगवेगळया इंटरेस्टिंग उत्तरांवर तो विचार करू लागतो, पण दरवेळी चकतो ..
आणि नेहमीप्रमाणे उत्तर अगदी साधे असते.
'लोहाराचा भाता '

अशी अनेक हुमनं ग्रामीण प्रतिभेचा खजिना आहेत. कल्पकता, मनोरंजन, काव्यालंकार आदी गुणांनी नटलेली आहेत. पण आता जवळ जवळ विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहेत. यांचे संकलन करून हा ग्रामीण मनोरंजनाचा अस्सल देशी ठेवा जतन करण्याची गरज आहे.
©सुहास भुसे.


Sunday, 25 December 2016

संस्कृतींची स्मारके

इंका लोकांनी श्वास घ्यायला कठीण अश्या उंच डोंगरावर बांधलेली प्रचंड दगडी बांधकामे ही इंका संस्कृतीची ओळख आहे. कोलासियम, फोरम, पैंथेऑन, प्रचंड आणि अद्भुत स्थापत्य पेश करणारी अनेकानेक स्मारके ही रोमची आणि रोमन लोकांची ओळख आहे. इजिप्तमधले पिरॅमिड ही इजिप्तीशियन लोकांची ओळख आहे. नाईल नदीच्या पात्राजवळ अबु सिंबेल येथे फॅरॉव रामासिसचे प्रचंड पुतळे अनेक वर्षे नाईलच्या पात्रातुन वाहतूक करणाऱ्या परदेशस्थांवर इजिप्शियन सत्तेचा, ऐश्वर्याचा, सामर्थ्याचा वचक ठेऊन होते. ग्रिकांचे एक्रोपोलीस, अथिनाचे भव्य पुतळे, पार्थेनॉन, क्रीटचा भूलभूलैया राजवाडा ही ग्रीकांची ओळख आहे.

काय प्रेरणा असतात भव्य दिव्य स्मारके बांधण्यामागे ?
मानवी संस्कृतीच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर मानवाने आपले सर्वस्व ओतुन अशी भव्य दिव्य स्मारके का उभी केली असावीत ?

दुसऱ्या कंगोऱ्यातुन विचार करू.
पाच शाह्यांच्या संयुक्त सैन्याने विजय नगरचा विध्वंस का केला ?
मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी जेथे जातील तिथल्या प्रार्थनास्थळांचा, स्मारकांचा विध्वंस का केला?
लादेनने बामियान मधील बुद्धाच्या मूर्त्या का फोडल्या ?
आक्रमकांनी अलेक्झांड्रीया, नालंदा अशी विद्यास्थाने का नष्ट केली ?
दूसरे महायुद्ध संपल्यावर दोस्त राष्ट्रानी, थर्ड राइशची जवळ जवळ सगळी भव्य बांधकामे,  हिटलर, मुसोलिनीच्या नामोनिशाण्या का नष्ट केल्या ?

या विध्वंसाचे कारण निव्वळ बदला किंवा धर्मवेड नसून त्याहुन अधिक काहीतरी आहे. एखादे भव्य स्मारक किंवा धार्मिक स्थान संबंधित समुदायाच्या अभिमानाचे भावनात्मक केंद्र असते. त्यांच्या पिढ्यानपिढ्यांचे संचित असते. ते त्यांना जगण्याचे बळ देत असते. तो त्यांचा प्रेरणास्त्रोत असतो. आणि त्यावर घाव घातला, एकदा ते नष्ट केले की मनोधैर्य ढासळलेल्या लोकांचा पराजय करणे, त्यांना गुलाम बनवणे अगदी सोपे असते.

भव्यतेची ओढ आणि दिव्यतेचे आकर्षण ही मानवाची आदिम प्रेरणा आहे. संस्कृत्या उदय पावत राहतील, नष्ट होत राहतील, आपल्या चिरंतन स्मारकांद्वारे त्यांनी काळावर उमटवलेले अमिट ठसे मात्र कायम राहतील. अनंत काळापर्यंत जगाला त्या संस्कृतिच्या, त्या राष्ट्राच्या महानतेची आठवण करून देत राहतील.
सुहास भुसे

Saturday, 24 December 2016

स्मारक विरोधकांची वर्गवारी

सामान्य शिवप्रेमी जनतेला राजकीय डावपेच कळत नाहीत. त्यांची प्रामाणिक इच्छा आहे, आपल्या थोरल्या छत्रपतींचे त्यांच्या कार्याला साजेसे भव्य दिव्य स्मारक व्हावे. त्यांना हे स्मारक काँग्रेसच्या की भाजपाच्या कारकिर्दीत बनतेय याच्याशीही काही घेणे देणे नाही...
मात्र काही लोक शिवस्मारकाला विरोध करत आहेत. छत्रपतींच्या महाराष्ट्रात हे व्हावे ही खरे तर दुर्दैवी गोष्ट आहे. यात प्रामुख्याने तीन प्रकारचे लोक आहेत.

1. हे लोक छत्रपतींचा पूर्वापारपासून दुःस्वास करतात. छत्रपतींच्या इतिहासातील नगण्य पात्रांचे उदात्तीकरण करणारे हेच लोक ... छत्रपती शंभु राजांचे चरित्र विपर्यस्त करणारे हेच लोक.

2. या प्रकारचे लोक हे वरच्या पहिल्या प्रकारच्या लोकांनी बुद्धिभेद केलेले लोक असतात. पाहिल्या प्रकारातील लोकांनी सांगावे आणि यांनी माना डोलवाव्या हे ही पूर्वापारपासून चालत आलेले आहे.

3. तिसऱ्या प्रकारचे लोक हे सवंग प्रसिद्धीसाठी हपापलेले आणि स्वतःला बुद्धिवादी म्हणवुन घेणारे लोक असतात. यांना प्रवाहाच्या विरुद्ध मत मांडण्याची प्रचंड खाज असते. लाखो लोक स्मारक व्हावे म्हणत आहेत मग मीही तेच म्हणालो तर माझे वेगळेपण ते काय राहिले ?
अश्या विचाराने हे लाइककमेंट पिपासु लोक स्मारकाला विरोध करत राहतात. त्यासाठी ते दुर्गसंवर्धना पासून आदिवासी शिक्षणापर्यंत आणि उदबत्ती पासून हत्तीपर्यंत एकूण एक यच्चयावत विषय स्मारकाच्या विषयात घुसडतात. वरच्या दोन प्रकारच्या लोकांच्या तुलनेत हे लोक अधिक घातक आणि अस्तनीतले निखारे असतात.

शिवप्रेमींनी स्मारकाला विरोध करणारे लोक यापैकी कोणत्या प्रकारात येतात याची वर्गवारी करून त्यांच्यापासून सावध राहावे.

©सुहास भुसे





Wednesday, 19 October 2016

प्रेस्टीज आणि ख्रिस्तोफर नोलन

काल सहज एका साइटवर प्रेस्टीज सापडला. खुप दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये असताना पाहिलेला. टीवीवरही सहसा लागत नाही. माझ्या तर जवळ जवळ विस्मृतित गेलेला. पण काल परत एकदा पाहिला.
मला ख्रिस्तोफर नोलन भयंकर आवडतो .  
कोणताही मूवी फक्त त्याच्या नावावर पहावा.
नोलनचे सिनेमे एक्शनपट, थरारपट वगैरे काहीही नसतात. ते फक्त नोलनपट असतात.
एखादा दिग्दर्शक चित्रपटावर आपला इतका अमिट ठसा उमटवण्यात फार अपवादाने यशस्वी होतो.
कुठलाही विषय नोलन अश्या उंचीवर नेऊन ठेवतो की आपण चकित होतो.
बॅटमॅन सारख्या फैंटसी एक्शनपटाला नोलनने जी एथिकल , फिलोसोफीकल आणि सोशलॉजीकल डूब दिली आहे त्याला खरेच तोड़ नाही.
कुठलीही कन्सेप्ट नोलन याच पद्धतीने हाताळतो. आणि साध्या सरळ लौकिक कहानीला अलौकिक बनवून सोडतो .

प्रेस्टीज ही दोन जादूगारांमधील व्यावसायिक स्पर्धेची कहाणी आहे. ह्यू जॅकमॅन आणि  क्रीस्टीअन बेल या दोन तुल्यबळ अभिनेत्यांची जुगलबंदी पाहणेबलच आहे. एकमेकांवर कुरघोडी करत, एकमेकांची सीक्रेट्स चोरत या दोघांची कारकीर्द सुरु असते. दरम्यान एका अपघातादरम्यान ह्यू जॅकमॅनची पत्नी क्रीस्टीअन बेलच्या चुकीमुळे मरते आणि या वैराला वेगळीच धार येते.

जादूगर जादू तीन भागात सादर  करतो, द प्ले, तो एखादी वस्तु दाखवतो. टर्न, मग ती वस्तु गायब करतो. आणि प्रेस्टीज, ती वस्तु अनपेक्षित ठिकाणी प्रकट करतो. या तिन्ही भागांचे अचंबित करणारे सादरीकरण करणारी एक ट्रांसपोर्टेड मॅन नावाची ट्रिक क्रीस्टीअन बेल शोधतो आणि ह्यू ती ट्रिक चोरण्याच्या मागे लागतो. दरम्यान फ्लॅशबॅक तंत्राचा वापर करत नोलन प्रेक्षकांना असे जोरदार धक्के देत राहतो की सुरवातीला खुर्चीला खिळलेला प्रेक्षक सिनेमा संपला तरी त्यातून बाहेर येत नाही.

अजुनही बघितला नसेल किंवा बरेच दिवसांपूर्वी पाहिला असेल तर परत एकदा, पुन्हा पुन्हा बघावा असा नोलनपट म्हणजे प्रेस्टीज ... हाच नव्हे तर बॅटमॅन ट्रिलजीसहित इंस्पेशन, इंटरसेलर असे नोलनपट शोधून शोधून पाहावेत, संग्रही ठेवावेत, पुन्हा पुन्हा पाहत पुनः प्रत्ययाचा आनंद घेत राहावा.
©सुहास भुसे


Friday, 30 September 2016

कष्टेवीन फळ नाही ?

एक म्हातारा शेतकरी मृत्युशय्येवर असताना आपल्या चार मुलांना बोलावुन त्यांना आपण शेतात गुप्तधन पूरले आहे अस गुह्य सांगतो, आणि मुले मग सगळे शेत खणून काढतात. गुप्तधन तर सापडत नाही पण मशागत चांगली झाल्याने पीक जोमदार येते व ती मुले सुखी होतात.
तात्पर्य:- कष्टेवीन फळ नाही.

मूल्यशिक्षणाच्या पहिल्या तासाला शिक्षक ही गोष्ट सांगतात. पण विद्यार्थी सकाळी नाष्टा करताना गुजरातमध्ये संगीत रजनीच्या कार्यक्रमात धनदांडग्यांनी पाडलेला नोटांचा पाऊस आणि त्यात पखवाज, तबले अर्धेअधिक पूरले गेलेले न्यूजमध्ये बघुन आलेला असतो.
आदल्या रात्री होमवर्क आटोपुन त्याने अब्बास मस्तानचा रेस 2 सारखा मुव्ही बघितलेला असतो. त्यातील व्हाइट कॉलर गुन्हेगारांची आलिशान जीवनशैली पाहिलेली असते.

दुसरीकडे वृत्तपत्रात त्याने मराठा क्रांती मूक मोर्च्यांमागच्या खदखदीची विश्लेषणे वाचलेली असतात. शेती आणि त्यात राब राबणाऱ्या शेतकऱ्यांची दुरावस्था तो उघड्या डोळ्यांनी बघत असतो. विद्यार्थ्याचं सामान्य ज्ञान इतके तरी खचितच पक्के झालेले असते की शेतकऱ्यांच्या 200 पिढ्या कष्टच करत आल्या आहेत. पुढच्या दोनशे पिढ्या जरी कष्ट करत अश्याच त्या काळ्या मातीत मेल्या तरीही तो नोटांची तशी मोजोरडी उधळण करू शकणार नाही.

सर मोठे आलेत सांगणारे, म्हणे कष्टेवीन फळ नाही. कष्ट केल्यावर घंटा फळ मिळते !! फळ मिळण्यासाठी तर कष्ट सोडून दूसरेच काहीतरी करायला लागते.
पुस्तकात आहे म्हणून सरांना शिकवावे लागते. आपल्याला पेपर लिहायचा असतो म्हणुन शिकावे लागते एवढाच त्याचा माफक अर्थ !!

गोष्टीच्या तात्पर्यासबंधी अस विचारचक्र विद्यार्थ्याच्या मनात सुरु असेल तर त्यात त्याचा दोष कसा म्हणायचा ?
©सुहास भुसे


Friday, 9 September 2016

सनातनी बनवण्याची रेसेपी

*सनातनी बनवण्याची रेसेपी*

सर्व प्रथम एक फ्रेश अजिबात वापर न झालेला मेंदू निवडावा.
मग त्याला कढईत घालून खालून प्रखर असा शिवसूर्यजाळ लावावा.
त्यात एक वाटी नथुराम आणि दोन वाट्या सावरकर टाकावेत.
हे मिश्रण चांगले रटरटू द्यावे.

तोवर इतिहासाची भाजी निवडायला घ्यावी.
गांधी नेहरू खुडून बाजूला काढून फेकून द्यावेत.
सरदार पटेल, नेताजी, भगतसिंग वेचून निवडून घ्यावेत.

मग कढईत अखंड हिंदूराष्ट्राच्या तेलाची धार सोडावी.
कढीपत्त्याच्या जागी राममंदिराची योजना करुन चरचरित फोडणी द्यावी.
त्यात एक मोठी वाटी मुस्लीम द्वेष टाकावा.
एक चमचा हेगडेवार एक चमचा गोळवलकर टाकावेत.
चिमुटभर भिडे गुरुजी, चिमुटभर आफळे गुरुजी, चिमुटभर पपु आठवले टाकावेत.
चवीपुरता भगवा आतंकवाद टाकावा.

हे सर्व मिश्रण चांगले हलवून घ्यावे.

शिवसूर्यजाळावर सतत फुंकर घालत राहावी.
मिश्रण चांगले रटरटून गडद केशरी रंगांचा तवंग आला की अस्सल रुचकर चवदार सनातनी तयार झाला म्हणून समजावे.
©सुहास भुसे.


पावसाचे वेड

बाहेर असताना पाऊस आला आणि लोकं आडोसा जवळ करू लागली की मला मिस्किल हसु फूटते. मोबाइल वगैरे सेफ करुन मी घाई घाईने आडोसा असला तर सोडतो..
काय हा वेडेपणा अश्या नजरेने कोणी बघितले तर अर्जेन्ट काम असल्याची थाप ठोकतो..

मुसळधार पावसाचा मारा अंगावर झेलत मोटरसाइकलवरुन फिरण्याची मजा काही औरच असते.
सपसप टाचण्या टोचल्यासारखा पाऊस चेहऱ्याला टोचत असतो.
हाताचा वायपर करुन भिवयावरील पाणी निपटत आजूबाजूची दृश्ये बघत सावकाश गाडी चालवायची..
शेतातून बांध फोडून वेगवेगळ्या रंगाचे गढुळ पाणी ओसंडत असते..
झाडे वाऱ्याने वाकत पाऊस झेलत असतात.
त्यांची नितळती झळाळी आणि तकाकी पड़त्या पावसातच पाहावी..
या दृश्यांमधली जिवंत मजा पाऊस थांबल्यावर नाही..

रस्त्यावरुन महामुर पाणी वाहत असते.
त्यातून बाइक वेगात घालून ते पाणी उडवण्याचा आनंद मनमुराद लुटावा..
आणि मुसळधार पावसात तुमचा हा वेडेपणा पाहायला कोणी नसते..
कोणी असले तर पावसामुळे दिसत नाही..
मी तर मोठ्यांदा गाणी सुद्धा म्हणतो 😉
पावसाच्या आवाजात कोणी ऐकत नाही ..
..
पाऊस माणसाला थेट शैशवात नेऊन सोडतो...
©सुहास भुसे