About

Sunday 26 February 2017

इव्हीएम मशीन घोटाळा

EVM मशीन्स मधल्या घोटाळ्यांच्या तक्रारीना पराभवानंतरचे रडगाणे समजून उडवून लावणे आत्मघातक ठरेल. राज्यभर अनेक उमेदवारांनी न्यायालयात याबद्दल तक्रारी दाखल केल्या आहेत. काही माजी नगरसेवकांना प्रचंड कामे करून, प्रभागात चांगली लोकप्रियता असून, समोर कमजोर उमेदवार असूनही शून्यापासून हजारांपर्यंत संशयास्पद रित्या कमी मते पडली आहेत. एखाद्या उमेदवाराला शून्य मते कशी काय मिळू शकतात ? शिवाय एकूण मतांच्या बेरजेमध्ये प्रचंड तफावती आहेत. EVM मशीनला पेपर ट्रेल लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात निर्देश देऊन सुद्धा निवडणूक आयोगाने ते निर्देश धाब्यावर बसवत पेपर ट्रेल विरहित मशीन्स वापरल्या आहेत.

हा सर्वच प्रकार खुप चिंताजनक आहे. कोण जिंकले कोण हरले हे गौण आहे. पराभूत उमेदवार व पक्ष याबद्दल काही करतील न  करतील, जनतेकडून याबद्दल एक उत्स्फूर्त व्यापक जनआंदोलन छेडले जायला हवे.
सर्वपक्षीय अगदी भाजपा समर्थक नागरिकांनी देखील यात सहभागी होणे गरजेचे आहे.

भारतीय लोकशाहीचे एक सर्वात मोठे वैगुण्य आहे की एकदा तुम्ही चुकीचे लोक निवडून दिले की त्यांना पाच वर्षे सहन करण्याशिवाय कोणताही पर्याय असत नाही.  पण याचा सकारात्मक पैलू हा की चुकीच्या लोकांना तुम्ही किमान पाच वर्षांनी तरी त्यांची जागा दाखवु शकता.

पण EVM मशीन्स मधील घोटाळ्यांमध्ये जर तथ्यांश असेल तर हे घोटाळे करणारे, करू शकणारे लोक तुमच्या बोडक्यावरुन खाली उतरणारच नाहीत. हे अत्यंत भीतिदायक वास्तव आहे. स्वायत्त संस्थांच्या अधिकारात सत्ताधीश करत असलेली ढवळाढवळ आपण नोटबंदी प्रकरणात पाहिली आहेच. रिजर्व बँकेसारख्या ताकदवान स्वायत्त संस्थेला पायाची बटिक बनवणे इतके सहजसाध्य असेल तर निवडणूक आयोग यापासून अस्पर्श राहील अशी अपेक्षा करणे निव्वळ भाबडेपणा होईल !!
©सुहास भुसे


Wednesday 22 February 2017

शरद पवार : संसदीय कारकिर्दीची पन्नास वर्षे

आज पवार साहेब संसदीय कारकिर्दीची 50 वर्षे पूर्ण करत आहेत. पवारांबद्दल अनेक प्रकारचे मतप्रवाह आढळतात. पण या मुद्द्यावर जवळ जवळ सर्वांचे एकमत आहे.

' पवार साहेब प्रचंड क्षमता असणारा नेता आहे. पण त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार पद मिळाले नाही. अर्थात पंतप्रधान पद !!'

का मिळाले नाही यासाठी विरोधकांचीे बेभरवशीपणा, घातपाती राजकारण वगैरे कारणे असतात. तर समर्थकांची कॉंग्रेस श्रेष्ठीची सततची इनसिक्युरिटीची भावना आणि त्यासाठी महत्वाकांक्षी नेत्यांचे पंख छाटणे वगैरे कारणे असतात. पण पवार साहेब या पदासाठी त्यांच्या कारकिर्दीच्या काळातले सर्वात लायक उमेदवार होते यावर विरोधक समर्थकांचे एकमत असते.

या सगळ्या कारणांपेक्षा मला पवारांना महाराष्ट्रातुन एकमुखी पाठिंबा न मिळणे हे याचे महत्वाचे कारण वाटते.  मोदींना गुजरात मधून एकमुखी पाठिंबा मिळाला कारण गुजरात आणि इतर राज्ये आणि महाराष्ट्र यात एक बेसिक फरक आहे.

महाराष्ट्र हा जसा फुले शाहू आंबेडकरी परंपरेसाठी ओळखला जातो तसा तो पूर्वीपासून सनातनवादाचाही अड्डा राहिलेला आहे. मराठी लोक कधीच एका झेंड्याखाली एक झालेले नाहीत. पेशावाई ते थेट टिळकांच्या काळापासून इथल्या सनातनी कारवाया आज तागायत अथकपणे सुरु आहेत. याची काही उदाहरणे बघायची झाली तर महाराष्ट्रातील बहुसंख्य ब्राह्मण वर्ग कधीही बीजेपी सोडून मतदान करत नाही. इतर राज्यात असे नाही. दाक्षिणात्य राज्यात तर भाजपा औषधालाही नाही. उत्तर प्रदेश मध्ये ब्राह्मण आणि दलित मोट बांधून बहन मायावती सत्तेत आल्या होत्या. बिहार, बंगाल, पंजाब कुठेही बीजेपीला ब्राह्मणांचे एकगठ्ठा मतदान नाही.

आजचे सनातनवादाचे सर्वोच्च केंद्र असलेल्या संघाची सुरवात इथेच झाली. हेगड़ेवार इथलेच, गोळवलकर इथलेच.
बहुजन वर्ग संसदेत जाऊन काय नांगर हाकणार का असे प्रामाणिक मत असणारे टिळक इथलेच.
जोतिबा, सावित्री माई वर शेण फेकणारे इथलेच.
दाभोळकर, पानसरे यांच्या हत्या याच राज्यात झाल्या.

या सनातनी वर्गाला महाराष्ट्रात कधीही पुरते पाय रोवु न देता 50 वर्षातली बहुतेक वर्षे त्यांना सर्वंकष सत्ता हस्तगत करण्यापासून दूर ठेवले हे पवार साहेबांचे सर्वात मोठे काम आहे असे मी मानतो. हेच कारण आहे की पवार साहेब हे धर्मांध आणि सनातनी शक्तींच्या कायम निशाण्यावर राहिले आहेत. 'बदनाम करा, बाजूला सारा' या सनातन्यांच्या मोड्स ऑपरेंडीचे सर्वाधिक शिकार बनले आहेत.

वाईट फक्त इतकेच वाटते की सनातन्यांच्या या हेतुपुरस्पर केल्या जाणाऱ्या अपप्रचाराला बहुजन वर्गही बळी पडला, पडतोय आणि पवार साहेबांच्या कर्तुत्वाला एका जातीच्या सिमित परिघात बंदिस्त करू पाहतोय !!
येणाऱ्या काळात सनातनी विरोधक आणि पुरोगाम्यांना उपरती होऊन ते एकमुखाने साहेबांच्या मागे एकवटोत या सदिच्छांसह पवार साहेबांच्या 50 वर्षांच्या दैदीप्यमान कारकिर्दीला सलाम आणि साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
©सुहास भुसे


Monday 20 February 2017

लोकशाहीचा सडलेला चौथा स्तंभ

'भले तरी देऊ गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठी देऊ माथा ।।
जगदगुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग गाथेचे संकलन करणाऱ्या विष्णुशास्त्रीना अश्लील वाटला. त्यांनी 'गांडीची ' हा शब्द बदलून 'कासेची' या शब्दाची योजना केली. आणि पुढे तो शब्द रूढ़ झाला.
तुकारामांच्या गाथेत आज अनेकांना अश्लील वाटू शकतील असे अनेक शब्द आहेत. रांडा हा शब्द तर कित्येक अभंगात येतो.
ग्रामीण भागात बोलीभाषेत अश्या अनेक अश्लील वाटणाऱ्या शब्दांची, म्हणीची, वाकप्रचारांची सहज येताजाता योजना केली जाते.
त्यात कोणालाही काहीही अश्लील वाटत नाही.
'........ मग काय मुतु काय ? '
हा वाकप्रचार तर अगदी सहज बोलता बोलता कोणीही वापरते.
गाडीत पेट्रोल नाही तर काय मुतु काय ?
विहीरित पाणी नाही पिकाला काय मुतु काय ?
ज्याची ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे अश्या कोणालाही हा शब्द खटकणार नाही. अगदी थोडक्यात सांगायचे तर अभिजन म्हणवल्या जाणाऱ्या वर्गाची आणि ग्रामीण बहुजन वर्गाची अश्लीलतेची परिभाषा वेगळी आहे. तुंपभातात आणि भाकरी-मिर्चीच्या खर्ड्यात जेवढा फरक आहे तेवढाच अभिजन व बहुजन भाषांमध्ये आहे.

राष्ट्रवादी हा ग्रामीण भागात पाळेमुळे असणारा पक्ष आहे. राष्ट्रवादीचे नेते हे शहरी भागात मोठे झालेले, ए सी ऑफिसच्या काचेच्या खिडकीतुन समाज बघणारे नेते नाहीत. सतत ग्रामीण भागात फिरणे आणि नेहमी ग्रामीण लोकांत वावर याचा परिणाम म्हणून बहुतांश राष्ट्रवादी नेत्यांची भाषा आणि तिचा बाज ग्रामीण ढंगाचा आहे.

अजितदादा ' धरणातच पाणी नाही तर काय मुतु काय ' हा वाकप्रचार अगदी सहजपणे बोलून गेले होते. त्यात त्यांचा कोणताही गैरहेतु नव्हता हे ग्रामीण भाषेची साधी तोंडओळख असणारा कोणीही सांगू शकेल. पण त्यावेळी मिडियाने केलेला गहजब आठवा. रात्रंदिवस पाच पाच मिनिटाला या विधानाच्या बाइट्स दाखवल्या जात होत्या. अजितदादा पवार या तरुण, तडफदार नेत्याला सुपारी घेऊन मेन स्ट्रीम मधून बाजूला सारण्याचे काम मिडियाने किंवा मीडियामधील अभिजनांनी हेतुपुरस्पर केले. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीची सत्ता जाण्याच्या काही कारणांपैकी या विधानाला ठरवून दिलेली प्रचंड प्रसिद्धी हे एक महत्वाचे कारण होते.

2014 साली राज्यातली आणि केंद्रातली सत्ता भाजपाच्या ताब्यात आली. तेव्हापासून भाजपाच्या शीर्षगामी नेत्यांसहित दुसऱ्या तिसऱ्या फळीच्या अनेक नेत्यांनी कमालीची आक्षेपार्ह विधाने केली आहेत. शेतकरी नामर्द आहेत, लफड़ेबाज आहेत, मोबाईल बील भरायला पैसे असतात वीज बिल भरायला नसतात, शेतकरी फॅशन म्हणून आत्महत्या करतात, आदिवासी मुले कुपोषणाने मरतात तर मरु द्या अशी एकापेक्षा एक असंवेदनशील आणि संतापजनक विधाने भाजपा नेते जवळ जवळ दररोज आणि चढाओढीने करत असतात.
असंवेदनशील विधानांचा कळस मागच्या चार दिवसात दोन भाजपा नेत्यांनी केला आहे.
‘आत्महत्या करणारे शेतकरी म्हणजे सवलती लाटणारे व्यापारी’
– रामेश्वर शर्मा, भाजपा आमदार
'सैनिक बॉर्डरवर असताना त्याची बायको बाळंत होते, तो वर्षभर घरी आलेला नसतो. त्याला तार येते पोरगा झाला आणि तो तिकडे पेढे वाटतो'
-प्रशांत परिचारक, भाजपा आमदार

या एकूण एक सर्व विधानाना केवळ सोशल मीडियातुन वाचा फुटल्याने जगाच्या लाजे काजे एखादा दूसरा दिवस न्यूज चॅनेल्सनी पाच दहा मिनिटे वेळ दिलेला आहे. ही विसंगती अगदी प्रकर्षाने नजरेत भरते. अजितदादा बोलले तो केवळ एक वाकप्रचार होता. धरुन चालू की तो अश्लील किंवा आक्षेपार्ह शेरा होता. केवळ शाब्दिक निवडीतील चुकीवर इतका कांगावा आणि ज्यांचा शब्द न शब्द निर्लज्ज माजोरडेपणाने आणि असंवेदनशील हरामखोरीने बरबटला आहे त्यांच्या विधानाना इतकी कमी प्रसिद्धी आणि टीका ?

शेवटी लोकशाहीचा हा चौथा स्तंभ पैसा आणि सत्तेच्या वाळवीने पूर्णपणे पोखरला आहे आणि काही ठराविक शक्तिंसाठी तो न्यूजमेकिंगचे काम करत असतो असाच या सर्वांचा निष्कर्ष काढावा लागेल. जनतेने यापुढे मिडियाचा उपयोग एखाद्या पक्ष, नेता किंवा विचारसरणी बद्दल आपली मते बनवण्यासाठी करू नये हेच उत्तम !!!
©सुहास भुसे.


Thursday 2 February 2017

ढोंगी प्रतिगांधी

अण्णा हजारे ! एकेकाळी राळेगणसिद्धिचे गांधी म्हणून अण्णा हजारेना लोक ओळखत असत. अण्णांच्या लोकपाल आंदोलनात सगळा देश त्यांच्या मागे उभा राहिला. लोक अण्णांमध्ये आपल्या प्रिय बापुंना बघत. बापुंसारख कोणीतरी या देशात असावे या लालसेपोटी ते अण्णांच्या दोन तासाला बदलल्या जाणाऱ्या, कधीही एक सुरकुतीही नसणाऱ्या शुभ्र धवल परीटघडीच्या कपड्यांकडे दुर्लक्ष करत. तो महात्मा आयुष्यभर एक साधा पंचा नेसुन वावरला हे लोकांना ठाऊक नसे अस नव्हे. महात्म्याचे खपाटीला गेलेले पोट, गाल, बारीकशी कुडी आठवत लोक अण्णांचे लाली चढलेले, वर येणारे गाल बघत असत. महात्म्याच्या तोंडावरचे जनसेवेचे, सत्याच्या प्रयोगांचे तेज आठवत अण्णांच्या तोंडावर चढणारे सुखाचे तेज बघत असत.
बापुंचा अराजकीय वारस म्हणून अण्णाना हजार गोष्टी लोकांनी माफ करून टाकल्या. कॉंग्रेसचे सरकार पाडण्यात, सरकारविरोधी जनमत तयार करण्यात अण्णाचा फार मोठा हात होता.

सरकार बदलले. लोकपाल गंगेला मिळाले. घोटाळे नव्या दमाने सुरु आहेत. पण अण्णानी जे तोंडाला कुलुप लावले आहे ते उघडायचे नावच नाही. जणु यूपीए चे सरकार पाडणे हेच त्यांचे अवतारकार्य होते. अण्णा अजुनही क्वचित तोंडाचे कुलुप किलकिले करतात ते पवारांवर आरोप करण्यासाठीच. पण लोकांनी आता या ढोंगी नकली गांधीला पुरते ओळखले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांची त्यांचे पित्तेही दखल घेत नाहीत. मिडिया आणि जनता तर दुरच. अण्णा हे प्रतिगांधी नसून सरकारराज मध्ये दिलीप प्रभावळकरांनी साकारलेले महापाताळयंत्री रावसाहब आहेत हे लोकांच्या लक्षात आले आहे.
एका गालावर मारली तर दूसरा गाल पुढे करा म्हणणाऱ्या त्या थोर महात्म्याची शिकवण या  क्रोध, मोह ,मद ,मत्सर आदि षड्रिपुनी पोखरलेल्या ढोंगी माणसाने ज्या क्षणी ' फक्त एकच ? ' हे निर्लज्ज उद्गार काढले तेव्हाच धुळीला मिळवली आहे.
©सुहास भुसे