About

Wednesday 22 February 2017

शरद पवार : संसदीय कारकिर्दीची पन्नास वर्षे

आज पवार साहेब संसदीय कारकिर्दीची 50 वर्षे पूर्ण करत आहेत. पवारांबद्दल अनेक प्रकारचे मतप्रवाह आढळतात. पण या मुद्द्यावर जवळ जवळ सर्वांचे एकमत आहे.

' पवार साहेब प्रचंड क्षमता असणारा नेता आहे. पण त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार पद मिळाले नाही. अर्थात पंतप्रधान पद !!'

का मिळाले नाही यासाठी विरोधकांचीे बेभरवशीपणा, घातपाती राजकारण वगैरे कारणे असतात. तर समर्थकांची कॉंग्रेस श्रेष्ठीची सततची इनसिक्युरिटीची भावना आणि त्यासाठी महत्वाकांक्षी नेत्यांचे पंख छाटणे वगैरे कारणे असतात. पण पवार साहेब या पदासाठी त्यांच्या कारकिर्दीच्या काळातले सर्वात लायक उमेदवार होते यावर विरोधक समर्थकांचे एकमत असते.

या सगळ्या कारणांपेक्षा मला पवारांना महाराष्ट्रातुन एकमुखी पाठिंबा न मिळणे हे याचे महत्वाचे कारण वाटते.  मोदींना गुजरात मधून एकमुखी पाठिंबा मिळाला कारण गुजरात आणि इतर राज्ये आणि महाराष्ट्र यात एक बेसिक फरक आहे.

महाराष्ट्र हा जसा फुले शाहू आंबेडकरी परंपरेसाठी ओळखला जातो तसा तो पूर्वीपासून सनातनवादाचाही अड्डा राहिलेला आहे. मराठी लोक कधीच एका झेंड्याखाली एक झालेले नाहीत. पेशावाई ते थेट टिळकांच्या काळापासून इथल्या सनातनी कारवाया आज तागायत अथकपणे सुरु आहेत. याची काही उदाहरणे बघायची झाली तर महाराष्ट्रातील बहुसंख्य ब्राह्मण वर्ग कधीही बीजेपी सोडून मतदान करत नाही. इतर राज्यात असे नाही. दाक्षिणात्य राज्यात तर भाजपा औषधालाही नाही. उत्तर प्रदेश मध्ये ब्राह्मण आणि दलित मोट बांधून बहन मायावती सत्तेत आल्या होत्या. बिहार, बंगाल, पंजाब कुठेही बीजेपीला ब्राह्मणांचे एकगठ्ठा मतदान नाही.

आजचे सनातनवादाचे सर्वोच्च केंद्र असलेल्या संघाची सुरवात इथेच झाली. हेगड़ेवार इथलेच, गोळवलकर इथलेच.
बहुजन वर्ग संसदेत जाऊन काय नांगर हाकणार का असे प्रामाणिक मत असणारे टिळक इथलेच.
जोतिबा, सावित्री माई वर शेण फेकणारे इथलेच.
दाभोळकर, पानसरे यांच्या हत्या याच राज्यात झाल्या.

या सनातनी वर्गाला महाराष्ट्रात कधीही पुरते पाय रोवु न देता 50 वर्षातली बहुतेक वर्षे त्यांना सर्वंकष सत्ता हस्तगत करण्यापासून दूर ठेवले हे पवार साहेबांचे सर्वात मोठे काम आहे असे मी मानतो. हेच कारण आहे की पवार साहेब हे धर्मांध आणि सनातनी शक्तींच्या कायम निशाण्यावर राहिले आहेत. 'बदनाम करा, बाजूला सारा' या सनातन्यांच्या मोड्स ऑपरेंडीचे सर्वाधिक शिकार बनले आहेत.

वाईट फक्त इतकेच वाटते की सनातन्यांच्या या हेतुपुरस्पर केल्या जाणाऱ्या अपप्रचाराला बहुजन वर्गही बळी पडला, पडतोय आणि पवार साहेबांच्या कर्तुत्वाला एका जातीच्या सिमित परिघात बंदिस्त करू पाहतोय !!
येणाऱ्या काळात सनातनी विरोधक आणि पुरोगाम्यांना उपरती होऊन ते एकमुखाने साहेबांच्या मागे एकवटोत या सदिच्छांसह पवार साहेबांच्या 50 वर्षांच्या दैदीप्यमान कारकिर्दीला सलाम आणि साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
©सुहास भुसे


No comments:

Post a Comment