About

Thursday 27 October 2016

भारतीय लोकशाहीची परिपक्वता

भारतीय लोकशाही आणि एकूणच समाजाच्या अपरिपक्वतेचे दर्शन सर्व प्रकारच्या माध्यमांतुन सुरु असलेल्या नॉन इश्शुज् वरील चर्चातुन घडते.
मागच्या महिन्यात कोणता विषय ऐरणीवर होता तर सर्जिकल स्ट्राइक, त्यानंतर तुझी जात माझी जात , मागचा पूर्ण आठवडा पेंग्विनने व्यापुन टाकला, काल आज काय तर सायरस मिस्त्री ...

प्रत्येक आला दिवस नवीन फोल विषय घेऊन येतो.
आणि मग सोशल मीडिया, वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल्सवर त्यावर मतामतांचा गलबला सुरु होतो.

रोजच्या दैनंदिन जीवनात आपण अनेक समस्यांना सामोरे जात असतो. ग्रामीण भागात पावलापावलावर नवीन समस्या आहेत. शेतीच तर रोज गावे तेवढे कमी अस रडगाणे आहे. रस्ते,वीज, पाणी यांचे कायमचे बारा वाजलेले आहेत. आधुनिक इंफ्रास्टक्चर चा दूरदूरवर गंध देखील नाही. कोणतीही सरकारी किंवा बिगर सरकारी व्यवस्था आपले काम प्रामाणिकपणे करत नाही.

शहरी भागातही सगळ ऑलवेल आहे अस नाही. जे काही थोडे फार बरे आहे ते फक्त ग्रामीण भागाच्या तुलनेत. खड्डामय रस्ते आहेत, गुंडगिरी आहे, भयंकर महागाई आहे, वाहतूक समस्या आहेत, प्रदूषण आहे, बेकारी आहे.
पण रोज हे सगळे फेस करत असूनही कोणी यावर बोलायला तयार नाही.

दिवसाला तीन शेतकरी मरतात इथे आणि कुठला फालतू पेंग्विन मेला त्यावर आपले गप्पांचे फड रंगतात.  कोण फवाद, कोण सलमान ? कोण तो सायरस मिस्त्री ? त्याला टाटांनी काढला किंवा बाटांनी घेतला, कोणाला फरक पडतो इथे ?
पण लोकांना गॉसिप्स आवडतात, मसालेदार विषय आवडतात.  आपले माध्यम कर्मी आणि राजकारणी देखील लोकांची हीच नस ओळखून लोकांना नॉन इश्शुज् मध्ये गुंगवून ठेवतात. खऱ्या समस्यांवर चर्चाच होऊ दिली जात नाही. लोकांच्या भावनांना हात घालून त्यांच्या पोटावर लाथ मारली जाते.

सर्व सार्वजनिक व्यासपीठांवरचे चर्चांचे विषय जोवर बदलत नाहीत आणि खरा महत्वाचा कोणता विषय आहे याबद्दलचा प्राधान्यक्रम जोवर समाजाच्या ध्यानी येत नाही तोवर भारतीय लोकशाही परिपक्वतेपासून शेकडो योजने दुरच राहील.
©सुहास भुसे


Wednesday 19 October 2016

प्रेस्टीज आणि ख्रिस्तोफर नोलन

काल सहज एका साइटवर प्रेस्टीज सापडला. खुप दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये असताना पाहिलेला. टीवीवरही सहसा लागत नाही. माझ्या तर जवळ जवळ विस्मृतित गेलेला. पण काल परत एकदा पाहिला.
मला ख्रिस्तोफर नोलन भयंकर आवडतो .  
कोणताही मूवी फक्त त्याच्या नावावर पहावा.
नोलनचे सिनेमे एक्शनपट, थरारपट वगैरे काहीही नसतात. ते फक्त नोलनपट असतात.
एखादा दिग्दर्शक चित्रपटावर आपला इतका अमिट ठसा उमटवण्यात फार अपवादाने यशस्वी होतो.
कुठलाही विषय नोलन अश्या उंचीवर नेऊन ठेवतो की आपण चकित होतो.
बॅटमॅन सारख्या फैंटसी एक्शनपटाला नोलनने जी एथिकल , फिलोसोफीकल आणि सोशलॉजीकल डूब दिली आहे त्याला खरेच तोड़ नाही.
कुठलीही कन्सेप्ट नोलन याच पद्धतीने हाताळतो. आणि साध्या सरळ लौकिक कहानीला अलौकिक बनवून सोडतो .

प्रेस्टीज ही दोन जादूगारांमधील व्यावसायिक स्पर्धेची कहाणी आहे. ह्यू जॅकमॅन आणि  क्रीस्टीअन बेल या दोन तुल्यबळ अभिनेत्यांची जुगलबंदी पाहणेबलच आहे. एकमेकांवर कुरघोडी करत, एकमेकांची सीक्रेट्स चोरत या दोघांची कारकीर्द सुरु असते. दरम्यान एका अपघातादरम्यान ह्यू जॅकमॅनची पत्नी क्रीस्टीअन बेलच्या चुकीमुळे मरते आणि या वैराला वेगळीच धार येते.

जादूगर जादू तीन भागात सादर  करतो, द प्ले, तो एखादी वस्तु दाखवतो. टर्न, मग ती वस्तु गायब करतो. आणि प्रेस्टीज, ती वस्तु अनपेक्षित ठिकाणी प्रकट करतो. या तिन्ही भागांचे अचंबित करणारे सादरीकरण करणारी एक ट्रांसपोर्टेड मॅन नावाची ट्रिक क्रीस्टीअन बेल शोधतो आणि ह्यू ती ट्रिक चोरण्याच्या मागे लागतो. दरम्यान फ्लॅशबॅक तंत्राचा वापर करत नोलन प्रेक्षकांना असे जोरदार धक्के देत राहतो की सुरवातीला खुर्चीला खिळलेला प्रेक्षक सिनेमा संपला तरी त्यातून बाहेर येत नाही.

अजुनही बघितला नसेल किंवा बरेच दिवसांपूर्वी पाहिला असेल तर परत एकदा, पुन्हा पुन्हा बघावा असा नोलनपट म्हणजे प्रेस्टीज ... हाच नव्हे तर बॅटमॅन ट्रिलजीसहित इंस्पेशन, इंटरसेलर असे नोलनपट शोधून शोधून पाहावेत, संग्रही ठेवावेत, पुन्हा पुन्हा पाहत पुनः प्रत्ययाचा आनंद घेत राहावा.
©सुहास भुसे


मोर्च्यांवर टीका का होतेय?

मागील साठेक वर्षांत अनेक जातींचे-धर्मांचे मोर्चे महाराष्ट्राने पाहिले ..
अनेक मोर्च्यांतुन बहकलेल्या मॉब मेंटालिटीमधून प्रक्षोभक भाषा वापरली गेली. बऱ्याचदा जाळपोळ तोडफोडी घडल्या. मोर्चे हिंसक बनले.
पण अस होऊनही मोर्च्यात सहभागी जातीव्यतिरिक्त इतर जातींनी त्या मोर्च्यांवर कधी सर्वंकष जात्यंध टिका केल्याचे उदाहरण नाही.

मराठा क्रांती मोर्च्यांच्या बाबतीत बरोबर याच्या उलट घडत आहे. मोर्च्यात सहभागी जातीसमाज अत्यंत शांततेत महाविराट मोर्चे आयोजित करत संपूर्ण जगात शिस्तीचे नवे मानदंड स्थापित करत आहे.
तर मराठेतर जातीतील सर्वस्तरीय विजारवंत या मोर्च्यांवर जात्यंध टिका करत सामाजिक वातावरण कलुषित करण्यात धन्यता मानत आहेत.

वृत्तपत्रातुन मराठेतर पत्रकार टिका करत आहेत, न्यूज चॅनेलवर वक्ते, प्रवक्ते खुसपटे काढत आहेत. समाजाशी केव्हाच फारकत झालेले लेखक आपली नसणारी प्रज्ञा पाजळत स्वजातीप्रेमाचे विकृत दर्शन घडवत आहेत. फेसबुकी विजारवंत तर बुडाला आग लागल्याप्रमाणे पोस्टवर पोस्ट करत आपल्या वांझोटया जात्यंध विरोधाचे किळसवाणे प्रदर्शन करत आहेत.

हे सर्व कमी की काय म्हणून प्रत्यक्ष सत्ताधारी आणि कॅबिनेट मंत्रीदेखील अवास्तव, मुजोर, जात्यंध विधाने करून या असंतोषाला खतपाणी घालत आहेत. सामाजिक न्यायमंत्र्यासारखा जबाबदार पदावरील व्यक्ती आजकाल कोणीही उठते आणि आरक्षण मागते अशी गरळ ओकत आहे.

सामजिक वातावरण धूमसत आहे, सलोखा धोक्यात येत आहे म्हणून अरण्यरुदन करत टाहो फोडणाऱ्या निजाती विजारवंतांनी आपली लेखनी या सर्व मराठाद्वेषी जात्यंध घटकांवर चालवायला हवी. तरच त्यांची सामाजिक सलोख्याची चिंता दांभिक नाही अस सिद्ध होईल आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल. सामाजिक सलोखा ही सर्व सामाजिक घटकांची जबाबदारी आहे. तो सर्वांना मिळूनच राखता येईल.
©सुहास भुसे