About

Thursday 31 March 2016

बच्चू कडुंचे काय चुकले ?

अचलपुरचे अपक्ष आमदार बच्चू कडु यांची एक लढवय्या आणि स्वच्छ प्रतिमेचा आमदार अशी ओळख आहे. मंत्रालयातील उपसचिव गावित यांना मारहाण केल्यामुळे बच्चू कडु पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

भारतात लोकशाहीचा वरुन देखावा असला तरी आतून नोकरशहांचेच राज्य आहे हे उघड गुपीत आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेली ही निष्क्रिय कामचुकार धेंडे सरकारच्या अनेक उत्तम योजनांचा कचरा करतात. लोकप्रतिनिधी हे टेंपररी असतात आम्ही पर्मनंट आहोत. आम्हाला कोणी हात लावू शकत नाही अशी शिरजोर मस्ती या मस्तवाल अधिकाऱ्यांच्या अंगात भिनलेली असते. सामान्य जनतेला तर हे मुजोर नोकरशहा फाट्यावर मारतातच पण लोकनिर्वाचित आमदार ख़ासदार, अगदी मंत्र्यानाही कोलतात. अनेक उर्मट अधिकारी आमदारांना अरेतुरे करतात. या बैलाकडून आपले काम करुन घेणे ही या लोकप्रतिनिधींसाठी मोठी कसरतच असते.

जनतेची कामे आपल्या हातून त्वरित व्हावीत, अपंग आणि दीन दलितांना तात्काळ शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा याची आंतरिक तळमळ असणारा बच्चू कडु सारखा लढवय्या आमदार आणि हे मस्तवाल नोकरशहा यांच्यात संघर्ष होणे ही तर अटळ वस्तुस्थिती ठरते. बच्चू कडु यांचा हा संघर्ष नवा नाही. अनेक वर्षांपासून या निष्क्रिय,उद्दाम, कामचुकार शासकीय कर्मचाऱ्याना धडा शिकवण्याच्या नवनव्या युक्त्या योजत आलेले आहेत. शासकीय कार्यालयातील लोकांच्या डोळ्यावरील झापड निघावी यासाठी त्यांनी अनेकदा कार्यालयात जिवंत साप सोडले आहेत. नोकरशहारूपी सापांनी त्या खऱ्याखुऱ्या सापानांही जुमानले नाही हा भाग अलहिदा..

"मला आंदोलने,उपोषणे असे वेळखाऊ रोड शो करायला वेळ नाही. माणसाचे आयुष्य लहान आहे. मला खुप काही करायचे आहे गांजलेल्या पिचलेल्या लोकांसाठी. ज्यांचे जे काम आहे ते त्यांनी करावे जर ते करत नसतील तर त्यांना हरप्रकारे ते करायला लावणे हे माझे काम आहे."
अस अनेकवेळा आपल्या कार्यशैलीचे स्पष्टीकरण बच्चू कडु यांनी दिले आहे.

गावीत यांना आपण मारहाण केली नाही अस बच्चू कडु यांचे म्हणणे आहे. कदाचित हा मस्तवाल नोकरशहांचा संघटित बनावही असू शकतो. कारण एरवी जनतेच्या कामासाठी ढिम्म न हलणाऱ्या या लोकांनी आपली सुटलेली पोटे कमालीच्या वेगाने हलवत मंत्रालयात ठिय्या आंदोलन करत दबाव आणून बच्चू कडु यांना अटक करवली आहे. सामान्य जनतेसाठी एक नया शब्दही कधी खर्ची न घालनाऱ्या मंत्रालय अधिकारी संघटना,   राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, कास्ट्राईब महासंघ वगैरे संघटना अगदी तातडीने युद्धपातळीवर मैदानात उतरल्या आहेत. विशेष म्हणजे गैरवापरासाठी बदनाम झालेले अट्रॅसिटी कलम बच्चू कडू यांना लावण्याची निर्लज्ज मागणी हा गावित नावाचा संभावित करत आहे.

बच्चू कडु म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी या अधिकाऱ्याला मारहाण केली नसेलही कदाचित. पण या लातोंके भूत असणाऱ्या मस्तवाल नोकरशहांची लाथा खाण्याचीच लायकी आहे हे जनता खूब ओळखुन आहे. बच्चू कडु यांना सामान्य जनतेची सहानुभूती, सदिच्छा आणि पाठिंबा मिळणार यात कसलाच संशय नाही.

©सुहास भुसे.


Friday 25 March 2016

तुकारामगाथेचे साहित्यिक पैलू

      संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आध्यात्मिक पैलूबद्दल पुष्कळ चर्चा होते. विद्रोही पैलू ही बऱ्यापैकी समोर आणण्यात यश आले आहे. तुकाराम गाथा आणि त्यातील अभंग यातून तुकाराम आजही समाजातील दंभावर आसुड ओढत असतात. लोकांना व्यवहार ज्ञान देत असतात. भक्तिरसाचे अमृत पाजत असतात. तुकारामांची गाथा ही या सर्व दृष्टीने तर महत्वाची आहेच.. पण ही गाथा  साहित्यिक दृष्टया देखील अनमोल आहे. 

      या गाथेत आध्यात्मिक आणि गृहस्थजीवनाविषयी व्यावहारिक उपदेश करणारे अभंग आहेत तसेच काही छोट्या लघुकथा आहेत. या मराठी भाषेतील पहिल्या लघुकथा असाव्यात. काही विनोदी अभंग तर असे आहेत की आपण हसून हसून लोटपोट व्हावे. मानवी भाव भावना आणि तत्कालीन समाजजीवन यांचे यथार्थ चित्रण त्यांच्या अभंगातून घडते. तुलनात्मक दृष्टया पाहिले तर इतर संतांच्या वांड्मयात इतके वैविध्यपूर्ण जीवनदर्शन येत नाही. ' नवरसी वर्षेन मी ' अशी प्रतिज्ञा करून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली असली तरी 'शृंगाराच्या माथा पाय ' ठेवणारा शांत रस हाच तिचा गाभा आहे.

     तुकारामांचे जीवन आणि चरित्र लक्षात घेतले तर त्यांच्या अभंगातील वैविध्याचा सुगावा लागतो. त्यांच्या अभंगात येणारे हुतुतु, हमामा, वीटी दांडू, चेंडू, पोहणे,सुर पारंबा, आट्यापाट्या अश्या अनेकविध खेळांचे संदर्भ तुकारामांचे बालपण अनुभवदृष्टया संपन्न असल्याचे सूचित करतात. पुढे  गृहस्थाश्रमात तुकाराम महाराज आपली पत्नी, मुले यांच्यावर प्रेम करणारा, त्यांची काळजी वाहणारा आणि प्रपंच करत परमार्थ करणारा कुटुंबप्रमुख आहेत. स्वत: गृहस्थाश्रमापासून पलायन करून लोकांना ' आधी प्रपंच करावा नेटका ' असा सल्ला त्यांनी दिलेला नाही. त्यांच्या शब्दा शब्दाला जीवनातील टोकदार अनुभवांची धार आहे.

     ' वृक्षवल्ली आम्हा सोयरे ' हा अभंग तुकारामांची गाढी जीवननिष्ठा आणि रसिक दृष्टी अधोरेखित करतो. ' ब्रह्म सत्य: जगत् मिथ्य: ' किंवा ' संसार हा भवसागर दुस्तर' असे वास्तव जीवनाकडे पाठ फिरवणारे सदारडु तत्वज्ञान त्यांनी कधीही मांडले नाही. उलट सगळी संत मंडळी मोक्ष, जीवन मृत्युच्या चक्रातुन मुक्ती हेच जीवनाचे अंतिम ध्येय मानत असताना तुकाराम मात्र ' तुका म्हणे गर्भवासी, सूखे घालावे आम्हासी ' अस मागणे मागत हा मनुष्यजन्म पुन्हा पुन्हा मागतात.  याच जीवनावरील प्रेमामुळे त्यांच्या गाथेत फक्त भक्तीरस नाही तर नवरसांचा खराखुरा वास्तवदर्शी वर्षाव आहे.

     'ढाल तलवारे गुंतले हे कर। म्हणे तो झुंजार झुंजु मी कैसा ।।' हा अभंग दर्जेदार विनोदाचे अप्रतिम उदाहरण आहे. दुसऱ्या एका अभंगात एक धनगर एका पुराणिक बुवांचे कीर्तन  ऐकायला जातो. त्याचा बोकड हरवला आहे.

देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी॥
प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥

लोकांना वाटते हा पुराणिक बुवांवरच्या श्रद्धेमुळे रडतो आहे. वास्तविक त्याला पुराणिक बुवाची दाढी पाहुन त्याच्या बोकडाची दाढी आठवत असते.

आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥
बोलों नयें मुखावाटां । म्हणे होतां ब्यांचा तोटा ॥

बोकडाच्या दाढी सोबतच त्याला त्याचे खुर आठवत असतात. हा त्याचा बियाण्याचा बोकड होता. त्याचे गुण आठवून त्याला हमसु हमसु कढ येत आहेत.

दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥
मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥

पुराणिकांनी माया आणि ब्रम्ह अशी दोन बोटे वर केली की धनगराला बोकडाची दोन शिंगे आठवतात, पुराणिक बुवा चार बोटे वर करतात आणि सांगतात वेद चार होते, धनगराला बोकडाचे  चार पाय आठवतात 'होय,होय'.. अशी मान हलवत तो पुन्हा हमसु हमसु रडु लागतो. लोक हे सर्व म्हणजे त्याची श्रद्धा आणि विद्वत्ता समजून चकित होतात.

होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥
तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥

शेवटी मात्र त्याचे बिंग फूटते आणि त्याच्या अंतरीचा भाव बाहेर येतो. लोकांना समजते तो का रडतोय.. अश्या आशयाचा दृष्टांत किस्सा सांगून तुकाराम महाराज शेवटी म्हणतात संसारी माणसाच्या पोटात काही लपत नाही. सगळे भाव बाहेर कळू येतात.

     आता तुकारामांनी आपल्या गाथेत लिहिलेली एक अप्रतिम अभंगरूपी लघुकथा पाहुया. लघुकथा हा तसा आधुनिक वाङ्मय प्रकार आहे. पण संत तुकारामांनी आपल्या गाथेत हा प्रकार साडेतीनशे वर्षांपूर्वी कमालीच्या यशस्वीपणे हाताळला आहे. ही मराठीतील पहिली लघुकथाच नाही नुसती तर इतक्या कमी शब्दात इतका भावभावनांचा कल्लोळ, प्रचंड नाट्य साकार करणे येरा गबाळयाचे काम नाही. त्यासाठी शब्दांवर मजबूत पकड आणि हुकूमत असणारा तुकारामांसारखा शब्दप्रभुच हवा.

सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥

या पहिल्या ओळीत आपल्या आराध्याची आळवणी करतात तुकाराम आपल्या कथेला सुरवात करतात.

व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥

अल्पाक्षरित्व आणि वेगवान कथानक हा या कथेचा महत्वाचा विशेष आहे. हे दोन पक्षी आपल्या कथेचे नायक आणि नायिका आहेत.  तुकारामांनी 'व्याले' हा कमालीचा सूचक शब्द इथे वापरला आहे. या शब्दातुन काय कळत नाही ? त्या पक्षी द्वयांचे प्रेम, त्यांचा शृंगार, त्यांचे सहजीवन, त्यांचा तो इटुकला संसार हे सारे फक्त 'व्याले ' या एकाच शब्दातुन आपल्या डोळ्यापुढे सरकते. आणि हा दुराचारी पारधी आपल्या कथेचा खलनायक आहे. या सुखी चित्रात आता त्याचे आगमन झाले आहे.

वृक्षाचिया माथा सोडिला ससाना । धनुष्यासी बाणा लावियेले ॥

आणि या पारध्याने आता एक भयंकर जाळे विणले आहे. या पक्ष्यांची शिकार होण्यापासून आता देव ही वाचवणे कठीण आहे. पक्षी जर वर उडाले तर त्यांच्यावर झडप घालण्यासाठी त्याने आपला बहिरी ससाना वृक्षाच्या माथ्याकडे सोडला आहे. आणि जर पक्षी ससाण्याच्या भीतीने जागेवरच बसून राहिले तर त्यांच्यावर सोडण्यासाठी त्याचा बाण प्रत्यंचा ताणून तयार आहे. आता या भयंकर दुहेरी पेचातुन या पक्षयांची सुटका कशी होणार ? पाहता पाहता या कथेत एक थरारक नाट्य येऊन उभे ठाकले आहे.

तये काळी तुज पक्षी आठविती । धावे गा श्रीपती मायबापा ॥

कोणीही अश्या भीषण संकटात आपल्या आराध्य देवतेचे स्मरण करेल. सगळे मार्ग कुंठित झालेले पाहुन त्या भ्यालेल्या पक्ष्यांनीही सर्वशक्तिमान परमेश्वराचा, मायबाप श्रीपतीचा धावा केला आहे.

उडोनिया जाता ससाना मारील । बैसता विंधील पारधी तो ॥

आता परमेश्वर जरी सर्वशक्तिमान असला तरी पृथ्वीवर त्याच्या शक्तीला मर्यादा आहेत. या मर्त्य जगात इथले नियम पाळूनच काहीतरी तोडगा निघायला हवा. पण काय तोडगा असणार ? कसलाही चमत्कार न करता श्रीपतीला हे कार्य पार पाडायचे आहे. ससाणा आणि बाण असा हा दुहेरी पेचप्रसंग आहे.  हा कथेतील नाट्याचा सर्वोच्च बिंदु आहे.

ऐकोनिया धावा तया पक्षियांचा । धरिला सर्पाचा वेश वेगी ॥

पण श्रीपती ने या भयंकर पेचप्रसंगातुन एक बेमालूम मार्ग काढला आहे. आधी विचार केल्यास लक्षात येणार नाही पण हा अकल्पनीय शेवट वाचून वाटते की हेच... हेच घडायला हवे होते. याहुन दूसरा मार्ग असुच शकत नाही. पण तरी या ओळीत फक्त आशा पालवली आहे. पेचप्रसंग अजुन कायमच आहे. श्रीपतीने पक्ष्यांचा धावा ऐकून करकराल अश्या मृत्युदुताचा सर्पाचा वेश घेतला आहे. पण पुढे काय ? सर्पाचा वेश घेऊन काय करणार श्रीपती ?

डंखोनि पारधी भुमीसी पाडिला । बाण तो लागला ससान्यासी ॥

आणि कथेत शेवटी येतो हा अल्कपनिय ट्विस्ट, सगळ्या पेचाला जबरदस्त वळण मिळते. एका क्षणात सगळा जमुन आलेला डाव उधळला जातो. आपल्या कथांचा अकल्पनीय आणि धक्कादायक शेवट करण्यासाठी ओ हेंरी प्रसिद्ध आहे. पण त्याच्या शेकडो वर्षे आधीच्या काळातील तुकारामांच्या या लघुकथेचा हा विस्मयजनक आणि धक्कादायक शेवट वाचून ओ हेंरी ने आपली पाची बोटे तोंडात घातली असती थक्क होऊन !

ऐसा तू कृपाळु आपुलिया दासा । होसील कोंवसा संकटींचा ॥
तुका म्हणे तुझी कीर्ति त्रिभुवना । वेदाचिये वाणी वर्णवेना ॥

आणि शेवटच्या ओळित या कथेत पाहुणा कलाकार म्हणून येणाऱ्या पण कथेचा सगळा नूरच पालटून टाकणाऱ्या मॅन ऑफ द मॅच श्रीपतीची तुकाराम स्तुती करतात.

ही लघुकथा साहित्यिक मूल्य, अल्पाक्षरित्व, आशयघनता, नाट्य, थरारकता, रोमांच आदी विविधतेने नटलेली आहे. लघुकथेचा सर्वात जूना आणि सर्वात पहिला त्याच सोबत सर्वात दर्जेदार नमूना आहे.
तुकारामांच्या गाथेत साहित्यिक मुल्याने नटलेले असे अनेक अभंग सापडतील. यावरून लक्षात यावे की तुकाराम हे फक्त एक श्रेष्ठ संतच नव्हते, एक विद्रोही समाज सुधारक नव्हते तर विलक्षण प्रतिभा असणारे श्रेष्ठ दर्जाचे साहित्यिक देखील होते.

©सुहास भुसे.

या लेखाची मी मराठी या वृत्तपत्रातील लिंक - epaper.mimarathilive.com/story.aspx?id=2567&boxid=165837848&ed_date=2016-03-30&ed_code=820009&ed_page=8





Wednesday 23 March 2016

वाद आणि वास्तव

     “प्रजेला काबूत ठेवण्यासाठी फक्त दोनच गोष्टी हव्यात, ब्रेड अँड सर्कसेस (भाकरी आणि करमणूक)” हे सुप्रसिद्ध रोमन तत्वज्ञ जुव्हेलीन याचे उद्गार आहेत. हे हताश उद्गार त्याने कॉलासियम मधले रक्तरंजित खेळ बघून काढले होते. आदर्शवाद आणि जगण्याची उच्च मुल्ये यांनी सत्ता आणि मानवाची सुप्त पाशवी वृत्ती यापुढे पत्करलेली शरणागती म्हणजे हे उद्गार. सध्या भारतात आणि महाराष्ट्रात जे काही सुरु आहे त्यावरून यातील भाकरी चा अर्धा भाग वगळून करमणुकीच्या अर्ध्या भागावर देशात मोदी सरकार आणि राज्यात फडणवीस सरकार यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे असेच दिसते. नक्कीच हे दोघे जुवेलीनचे वाचक असावेत.

     भाजपा सत्तेवर येऊन फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा जणू पेशवाई पुन्हा अवतरली असा जल्लोष अनेकांनी साजरा केला होता. देशात आणि केंद्रात जणू धर्म राज्य आले. साधू, साध्व्या, महंत अश्या धर्माच्या दलालांची किंमत अचानक वाढली. आणि त्यांच्या बेताल जिव्हा अनिर्बंध बडबड करू लागल्या. अनेक वादग्रस्त मुद्दे पुढे आणले जाऊ लागले. पैकी कित्येक मुद्दे तर थेट सरकार प्रायोजित होते. या सर्व मुद्द्यांचा जनतेचे लक्ष विकासाच्या मुद्द्यावरून विचलित करण्यासाठी सफाईदारपणे वापर करून घेण्यात आला.

     आज राज्यात सर्वत्र अभूतपूर्व दुष्काळ आहे. काही मोजक्या भागात नाममात्र सरकारी उपाययोजना हातचे राखून राबवल्या जात आहेत. आणेवाऱ्या बदलून अनेक भाग दुष्काळी योजनांपासून वंचित ठेवण्यात आले आहेत. सर्व शेतमालाचे दर पडले आहेत. शेतातील माल शेतातच अक्षरशः सडत आहे. अनेक भागात पाण्याचे भयंकर दुर्भिक्ष्य आहे. लातूरला महिन्यातून एकदा पाणी येते. तिथे जमावबंदीचे कलम १४४ लागू झाले आहे. लोक पाण्यासाठी एकमेकांचा जीव घेतील अशी भयंकर परिस्थिती आहे. गुरे ढोरे खपाटीला गेलेली पोटे घेऊन शेवटचे आचके देत आहेत. अनेक भागात आज न उद्या चारा छावण्या सुरु होतील या आशेवर शेतकरी आला दिवस ढकलत आहेत. विहिरी बोअर कोरड्या पडल्या आहेत. टँकर चा पत्ता नाही. वीज भारनियमन जैसे थे आहे महागाई गगनाला भिडली आहे. अनेक जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. पेट्रोल डीजेल चे जागतिक दर आणि भारतातील दर यांच्यात प्रचंड तफावत आहे. जगणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. सरकार नावाची व्यवस्था अस्तित्वात तरी आहे का अशीच शंका यावी असे एकंदर वातावरण आहे. शेतकऱ्याच्या आणि शेतीच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. पण यावर कोठे चर्चा होताना दिसत नाही.

     आपण सहज न्यूज चॅनेल वरील चर्चेच्या विषयांवर नजर टाकली किंवा फेसबुक, ट्विटर अश्या सोशल साईटस वर चक्कर टाकली तर काय दिसते? या जीवनाशी निगडीत मुद्द्यांवर कुठेही चर्चा होताना दिसत नाहीत. जणू काही हा दुष्काळ आणि समस्या या वेगळ्या प्लॅनेट वरच्या असाव्यात आणि समांतर प्लॅनेट वर काही वेगळ्याच घडामोडी सुरु असाव्यात. आणि दोहोंचा एकमेकांशी काही सबंध नसावा. सरकारच्या प्रारंभ काळात ब मो पुरंदरेंचा मुद्दा पेटवण्यात आला. गायीला मातेचा दर्जा आणि गोहत्याबंदी चा मुद्दा ऐरणीवर आणला गेला. याकुबची फाशी देखील खूप गाजली. शेषराव मोरे यांच्या पुरोगामी दहशतवादी या वक्तव्याने अनेक दिवस चर्चेला विषय पुरवला. त्यानंतर बाजीराव मस्तानी ने काही दिवस चर्चेला उत आणला. मधूनच सावरकरांना भारतरत्न देण्याची टूम काढली गेली. मधूनच आरक्षण रद्द झाले पाहिजे अश्या आशयाची वक्तव्ये सरसंघचालक करतात. FTII मधील गजेंद्र चौहान च्या नियुक्तीवरून अनेक दिवस रणकंदन माजले. शनी मंदिरात महिलांना प्रवेश आणि Happy to bleed ने गरादोळ माजवला. रोहित वेमुला प्रकरण असेच परस्परविरोधी वक्तव्ये आणि कृती करून पेटवण्यात आले. त्याचे पडसाद विरतात न विरतात तोच JNU मधील कन्हैयाच्या लोकल इश्यु ला नॅशनल इश्यु बनवले गेले. चुकीच्या पद्धतीने प्रकरण हाताळून खोटे विडीओ बनवून धग तेवत ठेवण्यात आली. कायदा आणि यंत्रणा हातात असताना वेगळ्या स्त्रोतांमार्फत वेगळ्या पध्दतीने पद्धतशीरपणे या प्रकरणाला हवा देण्यात आली. देशभक्ती आणि देशद्रोह मुद्द्यावरून सध्या भवंती न भवंती सुरु आहे. आणि आता अगदी ताजे वक्तव्य. श्रीहरी अणे यांचे. विदर्भासोबतच मराठवाडाही स्वतंत्र राज्य झाले पाहिजे.

     सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश झाकण्यासाठी सरकार असे वाद मुद्दाम प्रायोजित करत आहे हे सर्व पूर्वनियोजित पद्धतीने घडवून आणले जात आहे अशी शंका घेण्यास बराच वाव आहे. भावनिक मुद्द्यावर राजकारण करणे ही हिंदुत्ववादी पक्षांची आणि त्यांच्या मातृसंघटनांची खासियत राहिली आहे. तथापि हे सर्व भावनिक मुद्दे बाजूला ठेवून फक्त विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. संविधानाचे निसंदिग्ध पालन केले जाईल अशी ग्वाही देत अच्छे दिनचे स्वप्न दाखवत भाजपा सरकार सत्तारूढ झाले. आणि सत्तेवर येताच हे सर्व हवेत विरून गेले. विकासाला बगल देत आपला जुना नेहमीचा, ठेवणीतला अजेंडाच सरकारने बाहेर काढला आहे.  जनतेच्या करमणुकीची अर्थात सर्कसेसची विविध वादग्रस्त मुद्दे प्रायोजित करून सोय केली जात आहे. आणि याच्या आड आपली कर्तुत्वशून्यता, नाकर्तेपणा आणि अपयश झाकले जाईल अस या लोकांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. जनता सुजाण आहे. ती सत्तेवर आणू शकते तसेच  सत्ता उलथून टाकण्यास ही तिला वेळ लागणार नाही.

© सुहास भुसे


Monday 14 March 2016

शब्दलालित्य आणि सहजता-सुरेश भट

     कवितांचे वेड अतोनात पूर्वीपासून. सहसा गद्यापेक्षा पद्याकडे ओढा जास्त होता. अश्यात सुरेश भटांचा यल्गार हाती पडला. भटांच्या शब्दसामर्थ्याची अशी काही मोहिनी पडली मनावर की भटांशिवाय काही वाचावेसे वाटेना तेव्हा.  झंझावात, रुपगंधा, रंग माझा वेगळा असे काव्यसंग्रह त्या तंद्रीतच एकामागोमाग एक वाचून झाले.  आजही भटांची एखादी न पाहिलेली रचना कुठे दिसली की आपसूक उडी पडते त्यावर माझी. तसे मला अनेक कवी आवडतात. पण भटांना माझ्या मनातील काव्यविश्वात एक खास स्थान आहे. श्रेष्ठ कनिष्ठ ठरवण्याचा प्रयत्न नाही. पण भटांइतके शब्दलालित्य आणि सहजता दुसऱ्या कोणत्याही कवीमध्ये नाही. अर्थात हा निष्कर्ष माझ्यापुरता मर्यादित आहे.

     सुरेश भटांना प्रतिभादेवीने भरभरून दिले आहे. त्यांच्या कवितेत कधी यमके जुळवण्याची किंवा गेयता आणण्याची कसरत दिसत नाही. भट लिहित जातात आणि गेयता सहजगत्या येत जाते. ‘मालवून टाक दीप’ ही गजल या विधानासाठीचे अप्रतिम उदाहरण ठरावी.

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

     अश्या ओळी भट अगदी सहजगत्या लिहून जातात.

कैक द कैफात माझ्या, मी विजांचे घोट प्यालो
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही.

     अशी प्रवाही अर्थगहनता तर भटांच्या कवितेत ठायी ठायी दिसते. भटांचा आणि भटांनी हाताळलेला रसिकांना सर्वाधिक आवडता काव्यप्रकार म्हणजे गजल. भटांच्या गजला नुसत्या काव्यानंदच देत नाहीत तर आपल्याला अंतर्मुख बनवतात. जगण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देऊन जातात.

बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा
मागेच दुखि:तांचा टाहो मरून गेला

     सुरेश भट कम्युनिस्ट चळवळीत कार्यरत होते. त्यांच्या सामाजिक जीवनातील संघर्षाचे प्रतिबिंब त्यांच्या अनेक कवितांत पडले आहे. तसेच वैयक्तिक आयुष्यात देखील त्यांना कौटुंबिक संघर्षाचा सामना करावा लागला. त्यांची इस्टेट बळकावून बसलेल्या त्यांच्या सावत्र भावांसोबत त्यांचा प्रदीर्घ न्यायालयीन लढा सुरु होता. या सर्व घडामोडींच्या तीव्रतेचा परिणाम म्हणून अपरिहार्य कडवाहट त्यांच्या कवितांत जाणवत राहते.

सांगा कुणीतरी या आकाश खाजव्यांना
मातीच मोक्ष देई कंगाल नागव्यांना

     या शब्दांतला दाह थेट जाणवतो.

गांजले ज्यांनी मला ते शेवटी माझेच होते
हा कळीचा दंश होता ! तो फुलांचा वार होता !

     हे भटांनीच लिहावे.

     ह्रदयनाथ-लता-सुरेश भट हे त्रिकुट म्हणजे मराठी गीतांच्या मर्मबंधातली ठेव आहे. या तिघांची अनेक सुरेल गीते अजरामर आहेत. याची सुरवात एखाद्या दंतकथेत शोभावा अश्या प्रसंगातून झाली. रस्त्याने जात असताना ह्र्दयनाथांना एक चोपडी सापडली ज्यात सुरेश भटांच्या रचना होत्या. त्या चोपडीवरून पत्ता शोधत ह्र्दयनाथांनी भटांना शोधले. आणि अनेक भावमधुर रचनाना संगीतबद्ध करण्याचे श्रेयस ह्र्दयनाथांच्या नावे झाले.

     या त्रयीच्या अनेक सुमधूर गीतांपैकी ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ हे गीत निव्वळ अप्रतिम आहे. अनेक वर्षे झाली ते रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. शब्द, संगीत, स्वर, अभिनय सर्व अंगांनी झळाळते आहे.

सख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे,
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे!

      या ओळीतुंन तर भटांची प्रतिभा, हे गाणे, आणि वाचणारे ऐकणारे रसिक एका वेगळ्याच उंचीवर जातात. हे गीत लिहिण्यासाठी भट मुंबईतील एका हॉटेलवर राहिले होते. तिथे त्यांचा मुक्काम 8 दिवस वाढला. पण काही केल्या गाणे काही सुचले नाही.  रूमचे भाडे होते दर दिवशी 500 रु आणि गाण्याचा मिळणारा मोबदला होता 2000 रु. शेवटी हॉटेल सोडण्याचा दिवस आला. त्या बिलाच्या कागदावर पाठच्या बाजुला भटांनी एक सलग 'सुन्या सुन्या मैफिलित' लिहून टाकले. तिथे उपस्थित असणारे बाळ धुरी हा प्रकार पाहुन स्तंभित झाले. त्यांनी लगेच एक 15000 रु चा चेक भटांच्या नावे फाडला. पण मी माझी प्रतिभा विकत नसतो अस उत्तर देऊन त्यांनी तो नाकारला. हा प्रसंग घडतेवेळी तिथे अरुण दाते आणि ह्रदयनाथ उपस्थित होते. हॉटेलचे बिल देखील या दोघांनीच भरले.

     भटांचे जे किस्से ऐकण्यात, वाचण्यात येतात त्यावरून हा प्रतिभाशाली कलावंत काहीसा विक्षिप्त म्हणावा असा स्वत: च्या मस्तीत जगणारा असा होता अस दिसत. नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा अशी प्रतिभा ज्यांच्यावर प्रसन्न असते असे लोक काहीसे कलंदर, आत्ममग्न, मनस्वी  असतातच. भट स्वत:बद्दल म्हणतातच,

रंगुनी सर्व रंगात रंग माझा वेगळा
गुंतूनी सर्व गुंत्यात पाय माझा मोकळा

      आज गजलसम्राट सुरेश भटांची पूण्यतिथी. त्यांना ही भावगर्भ आदरांजली ..
©सुहास भुसे.










Sunday 13 March 2016

मायमराठी आणि इंग्रजी

मराठी मातृभाषा असणाऱ्या मराठी भाषिक लोकांना एकूणच मराठी बद्दल प्रेम व अभिमान कमी आहे हे वास्तव आहे. विशेषतः इंग्रजीला इतके मानाचे स्थान खुद्द इंग्लंड मध्ये नसेल जितके महाराष्ट्रात आहे. मागची पिढी काही अंशी मराठी शाळांमधून शिकली तरी हल्ली आपला पाल्य मराठी शाळेत पाठवणे अप्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले आहे.  सध्या मराठी शाळांना अत्यंत वाईट दिवस आहेत. मराठी शाळांना विध्यार्थी मिळणे दिवसेंदिवस दुरापास्त होत चालले आहे. मराठी शाळांतील अनेक तुकड्या, वर्ग बंद पडून शिक्षक अतिरिक्त ठरत सरप्लस करून घरी बसवले जात आहेत. अनेक शाळा विद्यार्थाअभावी बंद पडत आहेत. मराठी भाषा हा मुद्दा बनवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांची मुले आणि ते स्वत: देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच शिकलेले असतात. मराठी शाळांमध्ये दुय्यम प्रतीचे आणि निकृष्ट दर्जाचे शिक्षण मिळते हा सार्वत्रिक समज रूढ झाला आहे.

शाळांमध्ये जेव्हा जागा भरतीसाठी मुलाखती असतात तेव्हा मराठी विषयाच्या शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील अत्यंत तुच्छतेचा असतो. संस्थापक शिक्षकांना शाळेत नोकरी देऊन त्यांच्यावर जे थोर उपकार करतात त्या उपकाराची परतफेड म्हणून शिक्षकांना डोनेशन द्यावे लागते. जर तुमचा विषय इंग्रजी असेल तर तुमची डोनेशनची रक्कम चालू ' बाजारभावाप्रमाणे ' १२ लाख ते १५ लाख असू शकते. जर तुमचा विषय गणित असेल तर तुमचे डोनेशन १० लाख ते १२ लाख असू शकते. मात्र जर तुमचा विषय मराठी असेल तर तुमच्या डोनेशनची बोली १५ लाखांच्या पुढे सुरु होते. ती २० लाख किंवा अधिकही असू शकते.

तुम्ही जर इंग्रजीत संभाषण करू शकत असाल तर तुम्ही उच्चविद्याविभूषित असणार यात कोणालाही संशय वाटत नाही. इंग्रजी बोलू शकणाऱ्या लोकांमध्ये इंग्रजी न जमणाऱ्या लोकांबद्दल एक कुत्सित भावना आढळते. भाषा आणि शिक्षण याविषयी अनेक गैरसमज आढळतात ते या सर्व सामाजिक वास्तवाच्या मुळाशी आहेत.

पहिला आणि सर्वात मोठा गैरसमज आहे की इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. वस्तुत: जगातील अनेकानेक देश असे आहेत जिथे औषधाला देखील इंग्रजी भाषा आढळत नाही. त्यांचे सर्व शैक्षणिक व्यवहार आणि सामाजिक सोपस्कार सुखनैव सुरु असतात. यामध्ये अनेक विकसनशील आणि विकसित देश समाविष्ट आहेत. सोबत एक नकाशा जोडत आहे त्यावरून जगाच्या किती मोठ्या भागात इंग्रजी नाममात्र आहे व किती भागात तिचे अस्तित्वदेखील नाही हे स्पष्ट होईल. अगदी इंग्लंडच्या शेजारील फ्रांस, इटली इ. युरोपीय  राष्ट्रातसुध्दा  तुम्हाला इंग्रजीत पत्ता विचारला तरी कोणी सांगणे मुश्कील असते.  इंग्रजी ही जागतिक भाषा नसून ती इंग्लंड अमेरिका आणि इंग्लंड अमेरिका धार्जिणी असणाऱ्या भांडवलशाही पुरस्कर्त्या मानसिक गुलाम देशांची भाषा आहे.

दुसरा मोठा गैरसमज म्हणजे अनेक वैज्ञानिक क्लिष्ट संकल्पना मराठीतून शिकवणे किंवा समजावणे कठीण आहे. अनेक वैज्ञानिक पारिभाषिक संकल्पनांना सुयोग्य मराठी पर्यायी शब्द नाहीत. त्यामुळे मराठीतून संपूर्ण शिक्षण शक्य नाही. हे मत असणारे मायमराठीचे पुत्रच मराठीचा सर्वाधिक अपमान करत असतात. चीन आणि जपान या दोन पौर्वात्य देशांची विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील प्रगती थक्क करणारी आहे. आणि या दोन्ही देशात अथ ते इति संपूर्ण शिक्षण मातृभाषेतून दिले जाते. मातृभाषेतून शिक्षण दिल्याने अनेक पायाभूत संकल्पना पक्क्या होण्यास प्रचंड मदत होते हे सर्व भाषातज्ञानी ठासून सांगितलेले वास्तव असताना आपण जाणून बुजून इंग्रजी प्रेमापोटी मातृभाषेला पायदळी तुडवत आहोत. सर्व वैज्ञानिक संकल्पनांना पर्यायी ताकदवान शब्द शोधणे जर जपानी भाषेत शक्य होते, चीनी भाषेत शक्य होते तर ते मराठीत का अशक्य असावे?

“माझा मऱ्हाटाची बोलू कवतुके, परी अमृताही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन " अस म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांचा वारसा मराठी भाषा हरवून बसली आहे का ?

मराठी ही आपली राजभाषा करून सर्व राजकीय व्यवहार मराठी भाषेत चालवण्याचा आदेश देणाऱ्या, मराठीवरील फारशी अरबी उर्दू भाषेचे आक्रमण रोखण्यासाठी व भाषाशुद्धी करण्यासाठी राजव्यवहारकोष हा ग्रंथ सिद्ध करवून घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात मराठी उपरी झाली आहे, इंग्रजी आणि हिंदीच्या आक्रमणापुढे हतबल झाली आहे हेच खरे.

मराठी भाषादिन आणि मराठी भाषा चिरायू होवो !!
©सुहास भुसे



कॉलेज बस

     खूप दिवसांनी बसमध्ये प्रवास केला परवा. अलीकडे बऱ्याच वर्षात बस ने प्रवासाचा योग आला नव्हता. सकाळची वेळ असल्याने बस मध्ये कॉलेजमधल्या मुलामुलींची दाटी होती. त्यांची नुसती दंगा मस्ती सुरु होती. कोड वर्ड मध्ये बोलणे, चेष्टामस्करी, थोड काही झाले की खदखदून हसणे. या वयात हसू ही खूप जास्त येत असावे. काही झाल तरी हसू, काही नाही झाल तरी हसू फुटतेच. त्यांच्या त्या कोलाहलाने बस मधले वातावरण भरून आणि भारून गेले होते. स्वाभाविकच मला आमच्या कॉलेजच्या बस ची आठवण आली. अर्थात ती तशी रुढार्थाने कॉलेजची बस नव्हती. परिवहन महामंडळाची बस. पण तिचे स्वरूप कॉलेजच्या बस सारखेच होते. त्या वातावरणातून अंग काढून घेत मी खिडकीतून बाहेर पाहत आठवणीत हरवून गेलो.

     ही बस आमच्या शेजारच्या गावातली मुक्कामगाडी असल्याने ती सकाळी ६.३० ला सुटत असे. या बसचा सर्वात जवळचा थांबा आमच्या घरापासून ५ किमी अंतरावर असल्याने पहाटे लवकर उठून आटोपून कमीत कमी ६ ला तरी घरून निघावे लागे. मी सायकल वर जात असे तेव्हा. हा सर्वात अलीकडचा थांबा असल्याने बस मध्ये आम्ही मोजकीच ४-८ मुले-मुली असत असू. हळू हळू बस मध्ये गर्दी वाढू लागे. पुढच्या गावात बस जवळ जवळ फुल होई. तिथून एक कच्चा रस्ता सुरु होई माळावरून. त्या सगळ्या माळावरून त्या गावातील लोकांची घरे रस्ता धरून पसरली आहेत. त्या गावातील लोक शेतात माळवे प्राधान्याने करतात. ही सकाळची पहिली गाडी असल्याने माल मार्केट मध्ये वेळेवर पोहोच होई. त्यामुळे या गावापासून आमच्या कॉलेज बस चे स्वरूप बदलून ती तरकारी एक्स्प्रेस बनत असे. या गावात येईपर्यत बस फुल झालेली असल्याने तिथून पुढची मुले मुली मध्ये उभे राहत रांग करत. शेतकरी आपापल्या शेतात बस थांबवून भाजीपाल्याची क्रेट मागच्या शिडीवरून वर चढवत असत.

     कधी कधी कोणीतरी टोमॅटोला पाणी दाखवत असे. रस्त्यावर उभा राहून त्याचा मुलगा हात दाखवून बस थांबवे. ड्रायव्हर ला म्हणे “थांबा जरा आमचा आबा यालाय” आणि मोठ्याने आवाज देई  "येssss आबाsssss पळ लगा, एस टी थांबलीया वाढूळ.”  तो आबा धोतराचा सोगा उचलून धरत रानातून धावत येई. आणि वाहत्या दंडात चिखलाने भरलेले पाय धुवून बस मध्ये चढे. पुढच्याच वळणावर एखादी मावशी घरातूनच हात करे. “आव आव आले थांबवा एस टी” अस ओरडत पळत पळत आपल्या अर्ध्या राहिलेल्या वेणीची शेवटची पेडे गुंतवत येई आणि एस टी. च्या दरवाज्यात उभे राहून रीबिनीचे फुल बांधून पिशवी सावरत बस मध्ये चढे. पुढच्या वळणावर अशीच एखादी मावशी बस मध्ये चढता चढता खाली उतरे. “आग्ग बय्या.. माझी पिशवीच रायली की व कंडक्टर सायेब. आले थांबा लग्गीच. हलवू नका बर्का गाडी.” अशी लाडिक विनंती करून धावत घरी जाई आणि पिशवी घेऊन परत बसमध्ये चढे.

     अश्याच प्रकारे वळणा वळणावर बस थांबत राही. कोणाचे काय राहिलेले असे तर कोणी शेतातून धावत येत असे. बाहेर हा सगळा प्रकार सुरु असे. आणि आत काय ? आतल्या दोन सीटच्या बाकड्यावर तीन किंवा शक्य तर चार जण बसलेले असत. तीन सीटच्या बाकड्यावर चार किंवा शक्य तर पाच-सहा. ड्रायव्हरची केबिन भरलेली असे. मधली उभी एक रांग कंप्लेट होऊन दुसरी रांग तेवढ्याश्या जागेत उभी राही. बस मध्ये अगदी पाय ठेवायला देखील जागा नसे. पण प्रवाश्यांचा लोंढा सुरूच असे. मग कंडक्टर ड्रायव्हरला इशारा करी. ड्रायव्हर खचकन ब्रेक मारी. इकडे सगळी रांग जिकडे कलंडता येईल तिकडे कोसळे. रांग पुन्हा उभी राहून जागा धरेपर्यंत थोडी जागा झालेली असे. अश्या प्रकारे प्रत्येक प्रवाश्याला जागा उपलब्ध करून दिली जाई तिथून पुढे. लहान मोठे, पोरी पोरे असा भेद त्या गर्दीत नाहीसा होऊन ती गर्दी जणू एक अद्वैत बनत असे माणसांचे. शेवटी शेवटी कितीही ब्रेक लावले तरी आत मुंगीही शिरू शकणार नाही अशी अवस्था बस ची होई. तेव्हा तिथून पुढची माणसे एस टी च्या टपावर बसवली जात.

     या सर्व प्रकारात ड्रायव्हर आणि कंडक्टर हे रोज त्याच रूटवरचे मुसाफिर असत. आणि सगळी पोरे पोरी आणि सगळे गाववाले त्यांच्या चांगलेच ओळखीचे असत. त्यामुळे कोणी हात केला आणि बस थांबली नाही अस कधीही होत नसे. कुठे आणि कस बसायचे हे त्या चढणाऱ्याने बघायचे. पण बस थांबणार म्हणजे थांबणारच. आणि हा सर्व दिव्य चमत्कारी प्रकार सुरु असताना देखील कंडक्टरचे पास पंच करणे आणि तिकीट फाडणे सुरुच असे. आता अश्या गर्दीतून जिथे आपला स्वत:चा  हात हलवणे देखील कोणाला शक्य नसे त्यात कंडक्टर मागे पुढे फिरत तिकिटे कशी काढत असेल याची कल्पना करून पाहावी. त्यात उभ्या रांगामध्ये जास्त संख्येने गर्दीत जागा मिळवता न आल्याने उभ्या असलेल्या मुलीच असत. कंडक्टर कडे पोरे आशाळभूत नजरेने पाहत बसत. आमच्या बस मधील ९५ % पोरांचे स्वप्न होते की कॉलेज संपवून आपण बस कंडक्टरच बनायचे.

     तर हा दिव्य प्रवास आटोपत फक्त २२ किमी अंतर तोडून सकाळी ६.३० ला निघालेली बस सुमारे ८.३० च्या आसपास इप्सित स्थळी अवतरत असे. तोवर कॉलेजमधले एक दोन पिरीयड बोंबललेले असत. सगळी पोरे पोरी धूम सुटत आपापल्या कॉलेजकडे. आणि वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक गर्दी वाहून आलेली ती बस मोकळा श्वास घेई क्षणभर. पुन्हा दुपारी साडेबाराला काही कॉलेजेस सुटत तर काही १ ला तर काही १.३० ला. पुन्हा हळू हळू बस स्थानकावर युवा महोत्सव सदृश्य वातावरण तयार होण्यास सुरवात होई. बऱ्याचदा म्हणजे महिन्यातून कमीत कमी २० वेळा काहीना काही कारणाने आमची परतीची गाडी रद्द झालेली असे. मग मुलांचे म्होरके आपापली टोळकी घेऊन नियंत्रक कार्यालयावर धावा बोलत. गोंधळ होई. विनंत्या आर्जवे होत. आंदोलने होत. काहीतरी मांडवली होऊन आमच्यासाठी एखादी गाडी अडजस्ट केली जाई.  या कारणामुळे या बस येणाऱ्या आम्हा विविध गावच्या विवीध कॉलेजमधल्या मुलामुलीत खूप एकजूट निर्माण झाली  होती.

     आमचा कॉलेज जीवनातला बहुतांश वेळ कॉलेजमध्ये कमी आणि या बस मध्ये आणि बस स्थानकावरच जास्त जात असे. अनेक प्रेमप्रकरणे या बस मध्ये घडली. हळूच कोणाच्या सॅक मध्ये प्रेमपत्रे सरकवली जात. प्रेमप्रकरणे घडली, फुलली, सफल झाली. विफल झाली. अनेकदा भांडणे झाली. वाद झाले. गोष्टी पोलीस स्टेशन पर्यतही गेल्या. प्रत्येक दिवसाच्या प्रवासाच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. आमच्या सर्वांच्या भावविश्वात कॉलेजला कमी आणि या बसलाच जास्त महत्व होते. अशी दिव्य बस अश्या दिव्य प्रकारे अशी भव्य गर्दी घेऊन रोज न कुठे धावत असेल न कधी धावेल पुढे. आमची कॉलेज बस ती तीच एकमेवाद्वितीय !!!
©सुहास भुसे.