About

Thursday 31 March 2016

बच्चू कडुंचे काय चुकले ?

अचलपुरचे अपक्ष आमदार बच्चू कडु यांची एक लढवय्या आणि स्वच्छ प्रतिमेचा आमदार अशी ओळख आहे. मंत्रालयातील उपसचिव गावित यांना मारहाण केल्यामुळे बच्चू कडु पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

भारतात लोकशाहीचा वरुन देखावा असला तरी आतून नोकरशहांचेच राज्य आहे हे उघड गुपीत आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेली ही निष्क्रिय कामचुकार धेंडे सरकारच्या अनेक उत्तम योजनांचा कचरा करतात. लोकप्रतिनिधी हे टेंपररी असतात आम्ही पर्मनंट आहोत. आम्हाला कोणी हात लावू शकत नाही अशी शिरजोर मस्ती या मस्तवाल अधिकाऱ्यांच्या अंगात भिनलेली असते. सामान्य जनतेला तर हे मुजोर नोकरशहा फाट्यावर मारतातच पण लोकनिर्वाचित आमदार ख़ासदार, अगदी मंत्र्यानाही कोलतात. अनेक उर्मट अधिकारी आमदारांना अरेतुरे करतात. या बैलाकडून आपले काम करुन घेणे ही या लोकप्रतिनिधींसाठी मोठी कसरतच असते.

जनतेची कामे आपल्या हातून त्वरित व्हावीत, अपंग आणि दीन दलितांना तात्काळ शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा याची आंतरिक तळमळ असणारा बच्चू कडु सारखा लढवय्या आमदार आणि हे मस्तवाल नोकरशहा यांच्यात संघर्ष होणे ही तर अटळ वस्तुस्थिती ठरते. बच्चू कडु यांचा हा संघर्ष नवा नाही. अनेक वर्षांपासून या निष्क्रिय,उद्दाम, कामचुकार शासकीय कर्मचाऱ्याना धडा शिकवण्याच्या नवनव्या युक्त्या योजत आलेले आहेत. शासकीय कार्यालयातील लोकांच्या डोळ्यावरील झापड निघावी यासाठी त्यांनी अनेकदा कार्यालयात जिवंत साप सोडले आहेत. नोकरशहारूपी सापांनी त्या खऱ्याखुऱ्या सापानांही जुमानले नाही हा भाग अलहिदा..

"मला आंदोलने,उपोषणे असे वेळखाऊ रोड शो करायला वेळ नाही. माणसाचे आयुष्य लहान आहे. मला खुप काही करायचे आहे गांजलेल्या पिचलेल्या लोकांसाठी. ज्यांचे जे काम आहे ते त्यांनी करावे जर ते करत नसतील तर त्यांना हरप्रकारे ते करायला लावणे हे माझे काम आहे."
अस अनेकवेळा आपल्या कार्यशैलीचे स्पष्टीकरण बच्चू कडु यांनी दिले आहे.

गावीत यांना आपण मारहाण केली नाही अस बच्चू कडु यांचे म्हणणे आहे. कदाचित हा मस्तवाल नोकरशहांचा संघटित बनावही असू शकतो. कारण एरवी जनतेच्या कामासाठी ढिम्म न हलणाऱ्या या लोकांनी आपली सुटलेली पोटे कमालीच्या वेगाने हलवत मंत्रालयात ठिय्या आंदोलन करत दबाव आणून बच्चू कडु यांना अटक करवली आहे. सामान्य जनतेसाठी एक नया शब्दही कधी खर्ची न घालनाऱ्या मंत्रालय अधिकारी संघटना,   राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, कास्ट्राईब महासंघ वगैरे संघटना अगदी तातडीने युद्धपातळीवर मैदानात उतरल्या आहेत. विशेष म्हणजे गैरवापरासाठी बदनाम झालेले अट्रॅसिटी कलम बच्चू कडू यांना लावण्याची निर्लज्ज मागणी हा गावित नावाचा संभावित करत आहे.

बच्चू कडु म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी या अधिकाऱ्याला मारहाण केली नसेलही कदाचित. पण या लातोंके भूत असणाऱ्या मस्तवाल नोकरशहांची लाथा खाण्याचीच लायकी आहे हे जनता खूब ओळखुन आहे. बच्चू कडु यांना सामान्य जनतेची सहानुभूती, सदिच्छा आणि पाठिंबा मिळणार यात कसलाच संशय नाही.

©सुहास भुसे.


No comments:

Post a Comment