About

Monday 20 February 2017

लोकशाहीचा सडलेला चौथा स्तंभ

'भले तरी देऊ गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठी देऊ माथा ।।
जगदगुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग गाथेचे संकलन करणाऱ्या विष्णुशास्त्रीना अश्लील वाटला. त्यांनी 'गांडीची ' हा शब्द बदलून 'कासेची' या शब्दाची योजना केली. आणि पुढे तो शब्द रूढ़ झाला.
तुकारामांच्या गाथेत आज अनेकांना अश्लील वाटू शकतील असे अनेक शब्द आहेत. रांडा हा शब्द तर कित्येक अभंगात येतो.
ग्रामीण भागात बोलीभाषेत अश्या अनेक अश्लील वाटणाऱ्या शब्दांची, म्हणीची, वाकप्रचारांची सहज येताजाता योजना केली जाते.
त्यात कोणालाही काहीही अश्लील वाटत नाही.
'........ मग काय मुतु काय ? '
हा वाकप्रचार तर अगदी सहज बोलता बोलता कोणीही वापरते.
गाडीत पेट्रोल नाही तर काय मुतु काय ?
विहीरित पाणी नाही पिकाला काय मुतु काय ?
ज्याची ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे अश्या कोणालाही हा शब्द खटकणार नाही. अगदी थोडक्यात सांगायचे तर अभिजन म्हणवल्या जाणाऱ्या वर्गाची आणि ग्रामीण बहुजन वर्गाची अश्लीलतेची परिभाषा वेगळी आहे. तुंपभातात आणि भाकरी-मिर्चीच्या खर्ड्यात जेवढा फरक आहे तेवढाच अभिजन व बहुजन भाषांमध्ये आहे.

राष्ट्रवादी हा ग्रामीण भागात पाळेमुळे असणारा पक्ष आहे. राष्ट्रवादीचे नेते हे शहरी भागात मोठे झालेले, ए सी ऑफिसच्या काचेच्या खिडकीतुन समाज बघणारे नेते नाहीत. सतत ग्रामीण भागात फिरणे आणि नेहमी ग्रामीण लोकांत वावर याचा परिणाम म्हणून बहुतांश राष्ट्रवादी नेत्यांची भाषा आणि तिचा बाज ग्रामीण ढंगाचा आहे.

अजितदादा ' धरणातच पाणी नाही तर काय मुतु काय ' हा वाकप्रचार अगदी सहजपणे बोलून गेले होते. त्यात त्यांचा कोणताही गैरहेतु नव्हता हे ग्रामीण भाषेची साधी तोंडओळख असणारा कोणीही सांगू शकेल. पण त्यावेळी मिडियाने केलेला गहजब आठवा. रात्रंदिवस पाच पाच मिनिटाला या विधानाच्या बाइट्स दाखवल्या जात होत्या. अजितदादा पवार या तरुण, तडफदार नेत्याला सुपारी घेऊन मेन स्ट्रीम मधून बाजूला सारण्याचे काम मिडियाने किंवा मीडियामधील अभिजनांनी हेतुपुरस्पर केले. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीची सत्ता जाण्याच्या काही कारणांपैकी या विधानाला ठरवून दिलेली प्रचंड प्रसिद्धी हे एक महत्वाचे कारण होते.

2014 साली राज्यातली आणि केंद्रातली सत्ता भाजपाच्या ताब्यात आली. तेव्हापासून भाजपाच्या शीर्षगामी नेत्यांसहित दुसऱ्या तिसऱ्या फळीच्या अनेक नेत्यांनी कमालीची आक्षेपार्ह विधाने केली आहेत. शेतकरी नामर्द आहेत, लफड़ेबाज आहेत, मोबाईल बील भरायला पैसे असतात वीज बिल भरायला नसतात, शेतकरी फॅशन म्हणून आत्महत्या करतात, आदिवासी मुले कुपोषणाने मरतात तर मरु द्या अशी एकापेक्षा एक असंवेदनशील आणि संतापजनक विधाने भाजपा नेते जवळ जवळ दररोज आणि चढाओढीने करत असतात.
असंवेदनशील विधानांचा कळस मागच्या चार दिवसात दोन भाजपा नेत्यांनी केला आहे.
‘आत्महत्या करणारे शेतकरी म्हणजे सवलती लाटणारे व्यापारी’
– रामेश्वर शर्मा, भाजपा आमदार
'सैनिक बॉर्डरवर असताना त्याची बायको बाळंत होते, तो वर्षभर घरी आलेला नसतो. त्याला तार येते पोरगा झाला आणि तो तिकडे पेढे वाटतो'
-प्रशांत परिचारक, भाजपा आमदार

या एकूण एक सर्व विधानाना केवळ सोशल मीडियातुन वाचा फुटल्याने जगाच्या लाजे काजे एखादा दूसरा दिवस न्यूज चॅनेल्सनी पाच दहा मिनिटे वेळ दिलेला आहे. ही विसंगती अगदी प्रकर्षाने नजरेत भरते. अजितदादा बोलले तो केवळ एक वाकप्रचार होता. धरुन चालू की तो अश्लील किंवा आक्षेपार्ह शेरा होता. केवळ शाब्दिक निवडीतील चुकीवर इतका कांगावा आणि ज्यांचा शब्द न शब्द निर्लज्ज माजोरडेपणाने आणि असंवेदनशील हरामखोरीने बरबटला आहे त्यांच्या विधानाना इतकी कमी प्रसिद्धी आणि टीका ?

शेवटी लोकशाहीचा हा चौथा स्तंभ पैसा आणि सत्तेच्या वाळवीने पूर्णपणे पोखरला आहे आणि काही ठराविक शक्तिंसाठी तो न्यूजमेकिंगचे काम करत असतो असाच या सर्वांचा निष्कर्ष काढावा लागेल. जनतेने यापुढे मिडियाचा उपयोग एखाद्या पक्ष, नेता किंवा विचारसरणी बद्दल आपली मते बनवण्यासाठी करू नये हेच उत्तम !!!
©सुहास भुसे.


No comments:

Post a Comment