काही गोष्टी, काही माणसं, काही घटना प्रचंड मानसिक त्रास देऊ शकतात. अशा गोष्टी मागं टाकता यायला हव्यात. अशी माणसं डोक्यातुन काढून टाकता यायला हवीत. अशांसाठी एक क्लोजड सब्जेक्टसची फाईल बनवता यायला हवी. एकदा विषय बाजुला टाकला म्हणजे टाकलाच..
आमचे पणजोबा योग्य वयात आपल्या चार कर्त्या मुलांकडे प्रपंच सोपवुन निरिच्छ झाले. वानप्रस्थाश्रम स्वीकारला. सकाळी उठावं प्रातर्विधी उरकेपर्यंत सुनांनी गरम पाण्याचं घंगाळ तयार ठेवायचं. अंघोळ उरकुन कपडे करून तयार होईपर्यंत भाकरी, वरण व थोडासा भात.. सुनांनी ताट तयार करून ठेवावं. अन्नाप्रति निरिच्छता. उर्वरित आयुष्यात या साध्या आहाराव्यतिरिक्त कोणताही आहार घेतला नाही. कोणाशीही अपवाद वगळता एका शब्दाने संभाषण नाही. सगळे दैनंदिन शेड्यूल न बोलताच सुरू राहिलं.
निरिच्छता अशा टोकाची आणि एकदा स्वीकारलेली स्थितप्रज्ञता एवढी ठाम होती.. की एकदा एका प्रसंगात तिचा कस लागला. यथावकाश चार भावंडांमध्ये मतभेद सुरू झाले. ते टोकाला जात वाटण्यापर्यंत वेळ आली.
जुन्या काळात वाटण्यांचे मोठे प्रकरण असायचे. काही जमिनी कोरडवाहू, काही बागायत..काही हलक्या, काही भारी.. काही मळे गावालगत असतं. काही गावापासून लांब. कोणी काय घ्यायचं हे ठरवणं मोठं वादग्रस्त व्हायचं.
तर वाटण्यांच्या बैठकीत वाद सुरू झाला. पैपाहुण्यांच्या उपस्थितीत चारी भाऊ हमरीतुमरीवर आले. वाद विकोपाला जाऊ लागले. भाऊ भाऊ एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले. हाणामारी पेटली.
पोटची कर्तीसवरती मुलं डोळ्यासमोर एकमेकांचे गळे पकडत होती.. आणि पणजोबा लोडाला टेकुन एखादं सिनेमातले दृश्य असावं जणु असं एक ही शब्द न बोलता सगळं काही पाहत होते. संपुर्ण प्रसंगात एक ही शब्द त्यांनी तोंडातून काढला न चेहऱ्यावर काही भाव उमटले.
टोकाची निरिच्छता .. एकदा प्रपंचाचा विषय सोडला म्हणजे सोडलाच.
👌
ReplyDelete