About

Sunday 20 September 2015

सनातनचा बिमोड आवश्यक

सनातन संस्थेवर नुसती बंदी घाला अशी मागणी पुढे येतेय. अर्थात तिलाही अनुल्लेखाने मारले जात आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या आणि तिचे धागेदोरे हा विषय अत्यंत गंभीर तर आहेच पण अजून एका महत्वाच्या गोष्टीकडे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे. त्यावर फारसे कोणी लिहिलेले माझ्या वाचनात तरी आले नाही. सनातन संस्थेचे सातत्यपूर्ण प्रक्षोभक लिखाण, ते समाजात पसरवत असलेल्या अंधश्रद्धा, अनेक कोवळ्या तरुणांना नादी लावून त्यांची उध्वस्त केलेली भविष्ये आणि या सर्वातून समाजाचे केलेले सर्व प्रकारचे शोषण.

     दाभोळकरांच्या खुनाआधी केलेले प्रक्षोभक लेखन त्यांच्या मृत्युनंतर लिहिलेले दांभिक कुत्सित अग्रलेख हे सर्व लपून छपून केले जात नाहीये तर उघडपणे प्रिंट मिडिया, इलेक्ट्रोनिक मिडिया यांच्या माध्यमातून उघड उघड पणे केले जात आहे. आणि तरी देखील पुरोगामी समाज व सरकार यावर गप्प आहेत. “जे आपल्या विचारांना विरोध करतात त्यांना नष्ट केले पाहिजे” असल्या तालिबानी भाषेत वृत्तपत्रीय लेखन करून तरुणांची माथी भडकावली जातात. समाजात प्रबोधन करणाऱ्या विचारवंताना टार्गेट करून सातत्याने त्यांच्याविरुद्ध गरळ ओकून एक वातावरण निर्मिती केली जाते. नुकताच पानसरेंच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केलेला समीर गायकवाड वयाच्या १५ व्या वर्षापासून सनातनचा साधक आहे. अश्या कोवळ्या, संस्कारक्षम वयात अश्या दहशतवादी विचारांचा मारा करून तरुणांचा ब्रेन वाश केल्यावर ते तरूण खून बॉंबस्फोट किंवा तत्सम हिंसक कारवाया करण्यास प्रवृत्त झाले तर यात दोष कोणाचा? याला आठवले आणि सनातन संस्था जितकी जबाबदार आहे तितकीच हे सर्व उघडपणे सुरु असताना डोळ्यावर कातडे ओढून मूकपणे पाहणारी शासनव्यवस्था ही याला तितकीच जबाबदार आहे. आज तर सनातन संस्थेने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना कठोर साधनेची शिक्षा दिली जाईल असे जाहीर करून सर्व शासन व कायदा सुव्यवस्थेला उघड आव्हान दिले आहे.

     यांचे आश्रम, त्यात घरदार, कामधंदा सोडून पडून असलेले साधक, आश्रमात सेवेसाठी सोडलेल्या साधिका हा काय प्रकार आहे ? विज्ञान तंत्रज्ञान युगात जग कोठे चालले आहे आणि हे धर्माच्या नावाखाली लोकांना कोठे घेऊन जात आहेत? साधकांची तपासली जाणारी अध्यात्मिक पातळी तीही टक्क्यात. टक्केवारी वाढली की दर्जा वाढला. विशिष्ट अध्यात्मिक पातळी गाठली की संतपद. स्थूल रूप काय, सूक्ष्म रूप काय अरे काय चालले आहे काय हे? हा पप्पू आठवले चक्क स्वत: ला विष्णूचा अवतार घोषित करून लोकांचे शोषण करत आहे. हे सर्व जितके हास्यास्पद आहे तितकेच चीड आणणारे आहे.

     नुसती सनातन संस्थेवर बंदी घालून हा प्रश्न सुटणार नाही. नवीन नाव घेऊन नवीन संस्था काढून हे लोक पुन्हा कार्यरत होणार. यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. बंदी तर आणलीच पाहिजे शिवाय यांच्या सर्व तथाकथित आश्रमांना टाळे ठोकून सर्व साहित्य जप्त करून आजवर केलेले सर्व लेखन तपासून त्याची संगती लावून आजवर कोणकोणते गुन्हे यांनी केले आहेत याचा वेध घ्यायला हवा. सनातन संस्थेच्या सर्व पदाधिकारी व प्रवक्त्यांसाठी एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन करून यांची घरे देखील तपासून यांना आत घ्यायला हवे. जादू टोणा विरोधी कायद्याच्या तरतुदी खाली समाजात अंधश्रद्धा पसरवल्याच्या आरोपाखाली सर्वप्रथम पप्पू आठवले ला उचलला पाहिजे. पप्पू आठवले हा खरच विष्णू चा अवतार आहे का याची त्याला चौदावे रत्न दाखवून, थर्ड डिग्री लावून तपासणी व्हायला हवी. सनातन संस्थेची संपूर्ण पाळेमुळे खणून काढून या विषवल्लीचा पूर्ण बिमोड केल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत.

     राज्याचे गृहमंत्रीपद भूषवणारे आपले कर्तुत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर  कठोर भूमिका घेतात की सनातन ला पाठीशी घालतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

©सुहास भुसे




No comments:

Post a Comment