About

Saturday 5 September 2015

एक होती लोकशाही

     भारतीय लोकशाहीने पाहता पाहता पासष्टी गाठली आहे. पण जितकी जुनी होते आहे तितकी ती परिपक्व होते आहे का ? की उत्तरोत्तर तिची अपरिपक्वताच वाढत चालली आहे ? खरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. देशात धार्मिक उन्माद वाढत चालला आहे. जातीपाती वगैरे समस्या जैसे थे आहेत. नव्हे उलट जातीय अस्मिता आधी कधी नव्हत्या इतकी मान वर काढत चालल्या आहेत. राजकारण म्हणजे तर सामान्य लोकांसाठी फक्त टीकेचा आणि कलंकित विषय बनला आहे. सर्व समाजाने ज्यांच्याकडे आशेने पाहावे अशी आदराची स्थाने कमी होत चालली आहेत. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी अश्या विचारवंतांचे राजरोस खून पाडले जात आहेत. ही वाटचाल फारशी आशादायक नाही.

     धर्म, जात यात आपल्या जाणीवा संकुचित करून टाकण्याच्या काळात लोकशाही मूल्यांबाबत प्रबोधन ही गरजेची बाब होऊन बसली आहे. शालेय अभ्यासक्रमातला २० गुणांचा नागरिकशास्त्र विषय १०० गुणांचा करण्याची हीच वेळ आहे. संपूर्ण जगाने सार्वभौम लोकशाहीची कल्पना ज्या ग्रीस कडून उचलली त्या ग्रीसचे हजारो वर्षापूर्वीचे समृद्ध लोकशाहीचे तत्वज्ञान आजही आपल्याला ललामभूत ठरावे. “ मी अथीनियन नव्हे, मी ग्रीक नव्हे, मी जगाचा नागरिक आहे.” हे महान ग्रीक तत्वज्ञ सोक्रेटीसचे उद्गार आहेत.
सॉक्रेटीस

     एक मजेशीर पण उद्बोधक किस्सा.

     अथेन्स मधला लोकशाहीचा प्रारंभ काळ. कारभार चालवण्यासाठी दरवर्षी चिठ्ठ्या टाकून लकी ड्रो पद्धतीने ५०० लोकांचे एक मंडळ निवडण्यात येई. एका सभासदाला दोनदा काम करण्याची संधी मिळे. या पद्धतीने प्रत्येक नागरिक कधी ना कधी या प्रक्रियेचा घटक बनतच असे. हे ५०० लोक दर दहा दिवसांनी एक सभा घेऊन त्यात विविध समस्यांवर चर्चा करून निर्णय घेत असत. या लोकांना जर या ५०० जनात कोणी अयोग्य वाटत असेल किंवा जनहितविरोधी कारवाया करत असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी एक पद्धती होती. त्यानुसार अश्या अयोग्य सभासदांसाठी नकारात्मक मतदान घेतले जाई. खापराच्या तुकड्यावर नाव कोरून मत दिले जाई त्याला ऑस्राकॉन म्हणत. यात ज्या सभासदाला सर्वात जास्त मते मिळत त्याला दहा वर्षे अथेन्स सोडून जावे लागत असे.

     अरिस्टेडेस ( aristedes bc 530 to bc 468 ) नावाचा एक सांसद तेव्हा न्यायी, न्यायी म्हणून खूप गाजला होता. पण या कीर्तीचा त्याला थोडा गर्व झाला. तो त्याच्या वर्तनातून जाणवू लागला. तेव्हा सभासदांनी त्याची ही ‘ग’ ची बाधा उतरवायची ठरवली. या सभेसाठी जात असताना अरिस्टेडेस एका शेजारून चाललेल्या सभासदाशी बोलत होता. तो सभासद अरिस्टेडेसला ओळखत नसल्याने अरिस्टेडेसच्या तोंडावरच त्याने त्याची निंदा सुरु केली. व शेवटी म्हणाला या अरिस्टेडेसचा माज आज मी उतरवणार. त्याच्या विरोधी मतदान करणार. अस म्हणून त्याने स्वत:ला लिहिता वाचता येत नसल्याने मतदान करण्यासाठी नाव लिहून द्यायला खापराचा तुकडा अरिस्टेडेस पुढे धरला. क्षणभर हसून न्यायी अरिस्टेडेस ने आपल्या कीर्तीला जागत त्या तुकड्यावर त्याला आपले नाव लिहून दिले व त्यादिवशी झालेल्या मतदानात अरिस्टेडेस बहिष्कृत झाला. आणि तो फक्त एका मताने ! जे त्याने स्वत: च्या हाताने लिहून दिले होते.

     ही खरी समृद्ध लोकशाही आणि परिपक्व नेते व जनता ! ज्यांनी आपल्याला निवडून दिले आहे त्यांनी आपल्याला विचारलेला जाब केलेली टीका ज्या राजकारण्यांना सहन होत नाही त्यांनी खूप काही घेण्यासारखे आहे ना अरिस्टेडेस कडून. भारतीय लोकशाही देखील ही उंची लवकरच गाठो ही अंती शुभेच्छा !

     ©सुहास भुसे  

अरिस्टेडेस

No comments:

Post a Comment