About

Friday 9 September 2016

शरद पवार, ऍट्रॉसिटी आणि आत्यंतिक प्रतिक्रियावाद

माकडाच्या हाती कोलीत अशी एक म्हण आहे मराठीत. त्याचा अर्थ ज्या गोष्टीचा वापर करण्याची अक्कल नाही अशी गोष्ट अडाण्याच्या हातात विघातक ठरू शकते.
भारतीय राजकारण व समाजकारणात याच प्रत्यंतर वारंवार येत आहे.

शैक्षणिक आणि सामाजिक परिपक्वता नसताना आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, लोकशाही मिळाली आणि त्या लोकशाहीच्या आज आपण कश्या चिंधड्या केल्या आहेत हे सर्वश्रुत आहे.

तीच गोष्ट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडियाची.
सामाजिक जाणिवा अपरिपक्व असलेल्या आणि भारतीय राजकारण समाजकारणाचे मर्म अजिबात ज्ञात नसलेल्या झुंडी इथे कार्यरत आहेत.
यांचे विशिष्ट अजेंडे ठरलेले असतात.
इथे वावरणाऱ्या कोऱ्या पाट्यांवर विकृत रेघा ओढण्याचे काम करत लोकांचे मत विशिष्ट दिशेला झुकवण्यासाठी हे फक्त संधीच्या शोधात असतात.
आणि सामान्य वकुबाचे लोक यांच्यासोबत वाहवले जातात.

ताजे उदाहरण शरद पवार यांचे अट्रोसिटीबाबतचे वक्तव्य.
शरद पवार हे एक पुरोगामी नेतृत्व आहे. ते आणि त्यांचा पक्ष सर्व जाती समाज घटकांना बरोबर घेऊन चालतात. समाजातील एक मोठा समुदाय जर विशिष्ट गोष्टीची मागणी करत असेल तर त्याची दखल घेऊन त्यावर विचार मंथन व्हावे अस शरद पवारांनी सुचवले तर यात काय चूक आहे ?

पण पवार फोबिया झालेले अनेक जण पवार कधी काय बोलतात यावर टपून बसलेले असतात. पवार काही बोलले की लगेच त्याची सोइस्कर मांडणी करुन या लोकांचे गरळ ओकणे सुरु होते.

शरद पवारांना आज जातीयवादी लेबल लावणाऱ्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा इतिहास विसरु नये. पवार साहेबांच्या त्यावेळच्या निर्णयामुळे त्या भागातला मराठा समाज जो पवारांपासून दुरावला तो आजतागायत रिकव्हर करणे पवार साहेबांना पूर्णतया शक्य झालेले नाही.

एट्रोसिटी कायदा राज्यात कुप्रसिद्ध आहे. दुरुपयोगासाठी बदनाम आहे. कायदा सर्वांना समान हे घटनेचे मुलभुत तत्व असताना विशिष्ट समाजासाठी वेगळे कायदे करुन आपण आपल्या प्रचलित कायदा सुव्यवस्थेचे अपयशच जाहीररित्या कबूल करत आहोत. समानतेचे तत्व पायदळी तुडवत आहोत. अर्थात यावर वेगवेगळी मतमतांतरे असू शकतात. कदाचित काही प्रकरणी हा कायदा आवश्यकही असू शकतो. पण त्यावर कोणी बोलुच नये, त्यविरुद्ध ब्र काढाल तर जातीयवादी ठरवले जाल ही तुघलकी मानसिकता लोकशाहीसाठी घातक आहे.

शरद पवार आणि त्यांचा पक्ष मराठ्यांचा अनुनय करतात अस काही लोकांचे मत आहे. यात प्रामुख्याने तेच लोक आहेत जे बहुजनांच्या खांद्यावर भगवा झेंडा देऊन सत्ता प्राप्त करतात आणि एकदा का सत्ता मिळाली की महत्वाची पदे आणि कोअर कमिट्या अघोषित आरक्षण असावे जणु अश्या पद्धतीने विशिष्ट समाजाला प्रतिनिधित्व देऊन भरतात. दादोजी कोंडदेव कुलकर्णीच्या पुतळ्याची उचलबांगड़ी केल्याने या मंडळींच्या मनात पवार घराणे व त्यांचा पक्ष याबद्दल प्रचंड असंतोष खदखदत असतो. आणि अनेक बहुजन देखील हजारो वर्षांच्या सवयीने त्यांच्या काव्याला बळी पडतात.

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा जर मराठ्यांचा अनुनय करणारा पक्ष असता तर खालील यादीवर नजर टाकावी.. या नेत्यांना मोठमोठी पदे, मानसन्मान, आणि पक्षात महत्वाचे स्थान मिळाले असते का ?

राष्ट्रवादीचे प्रमुख नेतृत्व आणि विरोधी पक्ष नेते  धनंजय मुंडे  वंजारी समाजाचे आहेत. पुरोगामी मुलुखमैदानी तोफ म्हणून सध्या गाजत असलेले जितेंद्र आव्हाड वंजारी आहेत. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे दलित आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आदिवासी (एस टी) आहेत. तर आजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे गवळी आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे तेली आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हे पटेल समाजाचे आहेत. सुधाकरराव नाईक यांचे पुत्र लमाण, बंजारा. माजी उप मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ माळी आहेत. प्रवक्ते नबाब मलिक हे मुस्लिम आहेत.

विचार करा. राष्ट्रवादी हा जातीयवादी किंवा मराठ्यांचा अनुनय करणारा पक्ष असता तर या सर्व लोकांना एवढी मोठमोठी पदे आणि सत्तेत वाटा मिळाला असता काय ?

लक्षात ठेवा. सनातनी आणि प्रतिगामी लोकांना जरब असणारे शरद पवार हे आजघडीचे एकमेव पुरोगामी नेतृत्व आहे. कोणाच्याही कसल्याही अपप्रचाराला बळी पडू नका. अश्या जातीयवादी विखारी मानसिकतेच्या लोकांना जागेवरच चोख प्रत्त्युतर द्या.

©सुहास भुसे




No comments:

Post a Comment