About

Friday 9 September 2016

भुत रिलोडेड

गावाकडची भूते आणि सिनेमातली भूते यात फार फरक असतो.

आमच्या गावात एक पैलवान मनुक्ष होता. मी लहान असताना पाहिले तेव्हा त्याची पांढरी दीड वित दाढ़ी .. आणि एकेकाळी ताठ असलेले आणि आता खंगलेले शरीर.. पण आता खंडहर असलेली ही इमारत एकेकाळी बुलंद होती हे जाणवायच. पावणे सात फुटाच्या आसपास उंची आता वाकल्याने जरा कमी वाटे. आमच्या वाड्याच्या आसपासच घर होते.

लोक सांगत की तो दातांनी ज्वारीच पोत उचलायचा. पोत्यांनी भरलेली बैलगाडी हातांनी ओढायचा. दाढीने पाण्याची मोठी घागर उचलायचा. भयंकर ताकदवान मनुक्ष.
याच्या भुताशी असलेल्या जवळीकीच्या गोष्टी ऐकून आम्ही याला जाम टरकुन असायचो. गल्लीत आला की पोरे सोरे सुंबाल्या व्हायची.

तो दर अमावस्येला भूताशी कुस्ती खेळायला जायचा.
ते भुत याला गोळसायच, हा त्या भुताला गोळसायचा. भुत याला उचलून आदळायच. हा भुताला परूस करुन वरुन फेकून द्यायचा. तूफान धूमश्चक्री व्हायची.
तर अस दर अमावस्येला कुस्ती खेळून खेळून याची आणि त्या भुताची झाली दोस्ती.
मग एके दिवशी ते भुत या पैलवानाला वेताळाच्या जत्रेला घेऊन गेले.

अमावस्येला कुठेतरी लांब माळावर ही वेताळाची जत्रा भरते. तिला झाड़ून सगळी भूते उपस्थित असतात. भूते मशाली नाचवतात. वेताळाची पालखी इकडून तिकडे फिरवतात.
तर यांची जत्रा बित्रा झाली सगळी.
मग भूते जेवायला बसली. हे सगळी अंगत पंगत. भूतांच्या पंगतीचा एकमेव नियम असा की वाढताना नको म्हणायचे नाही आणि ताटात शिल्लक काही ठेवायच नाही. नियम मोडला की खैर नसे.

आपला पैलवान भूतांच्या मांडीला मांडी लावून बसला आणि पंगत सुरु झाली. जेवण काय तर हिरव्यागद्द भाकरी, पातळढंग आमटी. भूते फूल स्पीड मध्ये तुटून पडली जेवणावर. वाढनारांची धांदल उडाली. पैलवान पण भूतांच्या बरोबरी ताट रिकामे करू लागला. कसा तर त्याने एक 'युगत' केली होती. डोक्यावरचा फेटा सोडून त्याची झोळी केली आणि ती खांद्याला अडकवली. येतील त्या भाकरी तो त्यात टाकायचा. आणि ताटाला त्याने एक छोट भोक पाडल. येईल ती आमटी खाली ओघळून जायची.

होतास्ता ती रंगलेली पंगत संपली एकदाची. भूतांच्या बरोबरीने एवढा अवाढव्य खाना घेतला म्हणून त्याच्या दोस्त भुताने पैलवानाच्या पाठीत शाब्बासकीदखल एक जोराचा धपाटा घातला. आणि त्याला जेव्हा हव तेव्हा वेताळाच्या जत्रेला यायची परवानगी देऊन टाकली.
..
या गोष्टी अतार्किक असत. त्यात फार कल्पना चमत्कृती नसे. त्यामुळेच कदाचित त्या दंतकथा आहेत अस  जाणवत नसे. ते सगळ खरच वाटे. ते कथानायक गावातले असत. अजुन जिवंत असत.   त्या वयात गावातील एखाद्या पारावर एखाद्या म्हाताऱ्या गुइंदा आबाने किंवा आण्णु गुरवाने आपल्या खास खुमासदार शैलीत रंगवुन सांगितल्या की खुप रंगतदार वाटायच्या. लोक गुंगुन जायची. टीव्ही किंवा मोबाईल नसणाऱ्या काळातील ते जिवंत आणि रसरशीत मनोरंजन होते.
©सुहास भुसे


No comments:

Post a Comment