About

Saturday 10 September 2016

गुंठे पाटील नव्हे भूमीपुत्र

शेतकरी जमिनीवर आई सारखी माया करतो. आज ज्यांच्याकडे जमीनी आहेत त्यांच्या वाडवडिलांनी अनंत हालअपेष्टा सोसल्या पण जमीन विकली नाही. दुष्काळात नाही पिकले तर मोठ्या शेतकऱ्यांच्यात सालं घातली, कोंडयाचा मांडा करुन पोरेबाळे जगवली. पण जमिनीला हात घातला नाही. पिको न पिको अनासक्त कर्मयोगाच्या भावनेने आमचे पूर्वज निष्ठेने या काळ्या आईची सेवा करत राहिले, मुठ पसा पेरत तिची ओटी भरत राहिले.

या गरीबीत देखील शेतकऱ्याचे मन मात्र कधी कोते झाले नाही. त्याच्या बांधाला लोकांनी शेळ्या गुरे चारावीत, पिकाच्या कडेच्या दोन काकऱ्या त्यांच्यासाठीच ठेवलेल्या असत. शेतात जो येईल त्याने दोन्ही हातांनी भरभरुन माळवे, भाज्या न्याव्यात. ज्यांना जमीनी नव्हत्या अश्या बलुत्यांनाही कधी काही विकत आणावे लागले नाही. शेतकऱ्यांच्या खळ्यावरुन माल घरी जायच्या आधी बलुत्यांना वाटप होई. मग पोत्यांची लड गाडीत रचली जाई. आमचे पूर्वज जी मिळेल त्यातली अर्धीकोर गावगाड्याबरोबर वाटून घेऊन गाडा हाकत राहिले.

अहो जो हाडाचा शेतकरी असतो तो पाखरं राखताना ढेकुळ शेजाऱ्याच्या रानात जाईल म्हणून त्यांना कधी ढेकुळ फेकून हाणत नाही. दार धरताना पायाला लागलेला चिखल धुतल्या, पुसल्याशिवाय बांधाबाहेर पाय ठेवत नाही. काय होणार त्या ईवल्याश्या मातीने असे .... पण त्याची आपली वेडी माया असते...

आजही हा शेतकरी राजा असाच भावुक आहे. काळ्या आईवर त्याची अशीच अपार श्रद्धा आहे. शहरीकरणाच्या रेट्यात शहराजवळच्या मुठभर लोकांनी आपल्या जमीनी विकल्या असतील ... पण म्हणून आमच्या पूर्वजांनी ज्यांच्या पिढ्या जगवल्या त्यांची चार दोन बुकं शिकलेली, अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली पोरे ' गुंठे पाटील ' ' गूंठा मंत्री ' म्हणून समस्त मराठा शेतकरी वर्गाचा उपहास करत आहेत.

त्यांची चीड येत नाही तर कीव येते .. विकृतीत परिवर्तित झालेल्या त्यांच्या तथाकथित, फुसक्या विद्रोहाची दया येते.. ज्यांच्या पिढ्यान पिढ्यांना कधी काळ्या आईची हिरवी माया मिळालीच नाही तर तिचे मोल त्यांना कसे समजणार ??

©सुहास भुसे


No comments:

Post a Comment