About

Wednesday 10 February 2016

उधळून दे तूफान

प्रेम ही मानवी जीवनातली सर्वात सुंदर आणि सर्वात तरल अनुभूती आहे. ज्याने कधीही कोणावर झोकून देऊन, तुटून प्रेम केले नाही त्याचे जीवनच व्यर्थ आहे. एक अपूर्ण व्यक्तीमत्व असणारी स्त्री आणि एक अपूर्ण व्यक्तीमत्व असणारा पुरुष असे दोन द्वैत प्रेमात पडून अद्वैत बनतात. प्रेम हा एक प्रवास आहे अपूर्णत्वाकडून पुर्णत्वाकडे.

प्रेमात अभिव्यक्तीचे एक वेगळे महत्व आहे. अभिव्यक्ती मग ती पहिल्यांदा प्रपोज करतानाची असू देत की नाते दृढ झाल्यानंतरची असू देत. प्रेम एकदा जुने झाले की जोडप्यांना प्रेम व्यक्त करण्यात फारसा रस उरत नाही. इतर नात्यांत तर ही अभिव्यक्ती खूपच तुरळक. आपल्या आई बाबांवर सर्वच जण प्रेम करतात. मुलांवर करतात. भावाबहिणीवर करतात. सर्व नात्यांवर करतात. पण किती जण किती वेळा हे प्रेम व्यक्त करतात?

प्रेम पोटात असावे ओठात नको असाच सर्वसाधारण कल असतो. पण प्रेमाच्या अभिव्यक्तीने नात्यांचे सौंदर्य वाढते. ती अधिक हेल्दी बनतात. कोणाला तरी आय लव्ह यु म्हणणे आणि कोणाकडून तरी ते ऐकणे ही अनुभूती वर्णनातीतच असते.  या बाबतीत आपण पाश्चात्यांचे अनुकरण करायला काय हरकत आहे? चांगल्या गोष्टींचे अनुकरण का करू नये?

सध्या प्रेमाचा जणू मोसम चालू आहे. कालचा रोज डे ..आज प्रपोज डे ..आणि येऊ घातलेला वॅलेंटाइन डे. प्रेमवीरांसाठी तर जणू संधीवर संधी ... वेगवेगळे तर्क मांडून वाद करत बसणारे वाद करत बसतील. जीवनातील एका सुंदर आनंदाला मुकतील. प्रेम करणारे अभिव्यक्त करतील. आणि जीवन भरभरून उपभोगतील.

सर्वाना वॅलेंटाइन डे च्या आगावू मध्ये शुभेच्छा .. समरसून प्रेम करा ..भरभरून जगा ...आणि मुख्य म्हणजे व्यक्त व्हा .. नाते जुने असो की नवे ..प्रेम मनात ठेऊ नका ..

“उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं...”

©सुहास भुसे.


No comments:

Post a Comment