About

Thursday 19 November 2015

रहे ना रहे हम : प्रियदर्शिनी इंदिरा

     आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वात वादळी व्यक्तिमत्व म्हणजे इंदिरा गांधी. अनेक भल्या बुऱ्या गोष्टींसाठी त्यांची कारकीर्द नेहमी वादळी म्हणून चर्चेत राहिली. भारतात सद्यस्थिती मध्ये अनेक प्रश्न समस्या आहेत. प्रत्येक राज्यकर्त्यापुढे त्या असतातच. देशहिताच्या निर्णयाआड येणारे अनेक दबावगट असतात. हा सर्व दबाव झुगारून देऊन प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचे दर्शन घडवत योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा राज्यकर्ता त्याचे आणि त्याच्या देशाचे नाव इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवतो. नेमक्या याच प्रकारच्या नेतृत्वाची इंदिरा गांधीनंतर भारतात सदैव उणीव भासली आहे. अनेक समस्यांवर बोलताना इंदिराजींचे विरोधक देखील खाजगीत का होईना म्हणतात कि आज इंदिराजी हव्या होत्या. यातच इंदिराजींच्या महत्तेची, एकमेवाद्वितीयतेची बीजे आहेत.

     इंदिराजींनी अनेक कठोर आणि कणखर निर्णय त्यांच्या कारकिर्दीत घेतले ज्यांची गोड फळे आज आपण चाखतो आहोत. यातला सर्वात मोठा प्रसंग बांगलादेशमुक्ती संग्राम अर्थात पाकिस्तानच्या विभाजनाचा. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने कुरापत काढत भारतावर हल्ला केला. पाकच्या हवाईदलाने आपल्या ११ हवाई तळांवर व रडार केंद्रांवर हल्ले चढवले. मग भारताने युद्ध घोषित करत १३ दिवसात मोठ मोठ्या वल्गना करणाऱ्या पाकिस्तानला बिनशर्त शरणागती पत्करण्यास भाग पाडून पाकचे विभाजन करत बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले. यावेळी प्रचंड आंतरराष्ट्रीय दबावाला झुगारून देत मोठ्या मुत्सद्देगिरीने इंदिराजींनी राजकीय आघाडीवरही बाजी मारली. अमेरिकेने इंदिराजीवर दबाव आणण्यासाठी सातवे आरमार बंगालच्या उपसागरात तैनात केले होते. पण त्यांना अखेर हात चोळत माघारी जावे लागले. एक सर के बदले हम दस सर लाएंगे वाल्यांसाठी हा प्रसंग दीपस्तंभ ठरू शकेल.

     अणुस्फोट परीक्षणाचा असाच महत्वाचा निर्णय. “आणि बुद्ध हसला” या सांकेतिक शब्दांनी प्रसिद्ध असलेला हे अणुस्फोट परीक्षण इंदिराजींच्या काळात करण्यात आले. बँकाच्या राष्ट्रीयीकरणाचा असाच एक कणखर निर्णय इंदिरांनी घेतला. ४० वर्षापूर्वी सर्व बँका या व्यापारी बँका होत्या. आजच्या प्रमाणे सामान्य माणसाला तेव्हा बँकेत प्रवेश नव्हता. बँकेत खाते उघडता येत नसे, पैसे ठेवता येत नसत अगर कर्ज मागता येत नसे. भांडवलशाही व्यवस्थेत गरीबाला केंद्रस्थानी आणत इंदिराजींनी १९६९ साली १४ व्यापारी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले. आज भारतीय राजकारणावर बड्या उद्योगपती व पैसेवाल्या धेंडांची असलेली मजबूत पकड पाहता हा निर्णय घेताना इंदिराजींना किती प्रचंड दबावाचा सामना करावा लागला असेल याची कल्पना येते.

     हरितक्रांतीच्या जननी देखील इंदिराजीच. तत्पूर्वी परदेशातून धान्याची आयात झाल्यावरच रेशनवर गरिबांना धान्य मिळत असे. पण पाणी, संकरित बियाणे, रासायनिक खते आणि हमी भावाने धान्य खरेदी या चतुसूत्री हरितक्रांतीची इंदिराजींनी घोषणा केली जणू जादूची कांडी फिरली. पंजाब हरियाना मध्ये गव्हाची विक्रमी उत्पादने निघाली. भारतातील धान्याची कोठारे ओसंडून वाहू लागली आणि सन १९७४ नंतर भारताने अन्नधान्याची आयात पूर्णपणे बंद केली ते आजतागायत. आज धान्य निर्यात करणाऱ्या २० प्रमुख देशातला भारत एक देश आहे.

     आणि एक कठोर निर्णय जो त्यांच्या प्राणाचे बलिदान घेऊन गेला. तो म्हणजे भिंद्रानवाले या खलीस्तानवादी अतिरेक्याला सुवर्णमंदिरात कंठस्नान घालण्यासाठी केलेले ऑपरेशन ब्लू स्टार. विमान अपहरण प्रसंगी अतिरेक्यांपुढे गुढघे टेकत, त्यांच्या मागण्या मान्य करत आपल्या राज्यकर्त्यांनी घातकी अतिरेक्यांना कसे सोडले ते जगाने पाहिले. अश्या पार्श्वभूमीवर इंदिराजींच्या निर्णयाचे वेगळेपण ध्यानात यावे. पाकिस्तानच्या मदतीने स्वतंत्र खलिस्तान या राष्ट्राची घोषणा करत मोठ्या शस्त्रसाठ्यासह भिंद्रानवाले सुवर्णमंदिरात लपून बसला होता. सुवर्णमंदिरातच या राष्ट्राचा ध्वज फडकवून उदघोषणा करण्याचा त्याचा बेत समजताच इंदिराजींनी लष्करी कारवाईचा निर्णय घेतला जो त्यांच्या प्राणावर बेतला. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी या कारवाईचा बदला म्हणून इंदिराजींच्या शीख अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडला आणि या तेजस्वी पर्वाची अखेर झाली.

     आज १९ नोव्हेंबर. या भारतमातेच्या कणखर, थोर सुपुत्रीची जयंती. या तेजस्वी विद्द्युल्लतेला विन्रम अभिवादन _/\_ .

©सुहास भुसे.


No comments:

Post a Comment