About

Sunday 15 November 2015

सत्याचे प्रयोग

आज पुन्हा एकदा महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग वाचायला घेतले आहे. तस अगदी पहिल्यांदा वाचून खुप दिवस झाले. अधुन मधून नेहमी वाचत असतोच ...आणि एका वाचनात समजणेही कठीण आहे. दरवेळी वाचत जाऊ तस नव काही गवसत राहत.
     तस या पुस्तकात अंलकारीक भाषा, प्रसंग खुलवुन सांगणे आदी कोणतीही साहित्यिक मूल्ये नसूनही पुस्तक खिळवुन ठेवते. एकमेव कारण म्हणजे शब्दा शब्दा मागील प्रामाणिकपणा जो थेट ह्र्दयाला जाऊन भिडतो...माझ आयुष्य म्हणजे उघड पुस्तक अस म्हणायला ठीक आहे फक्त ...पण इतक्या प्रामाणिकपणे ते सार्वजनिकरित्या खुले करण्यासाठी परकोटिचे धैर्य पाहिजे.
     गांधीजी मित्रांच्या संगतीने तीनवेळा वेश्यागमन करण्यासाठी गेले ...तिथे काय झाले ते सांगणे 'दोन्ही परिस्थितीत' कठिण आहे. असे अनेक कठीण प्रसंग बिनदिक्कत आणि कमालीच्या प्रामाणिकपणे गांधीजी पानापानातुन उलगडत राहतात. अगदी पहिल्याच पानावर ते आपल्या वडिलांचे वर्णन पुढीलप्रकारे करतात..
  "वडील कुटूंबप्रेमी, सत्यप्रिय, धीट, उदार पण रागीट असे होते. काहीअंशी विषयासक्तही असावेत. त्यांचा शेवटचा विवाह चाळिसाव्या वर्षानंतर झाला होता."
     मला विशेष आवडतो तो गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील आंदोलनाचा भाग ..सुपिक मशागत केलेल्या जमिनीत कोणीही पिक काढेल ...पण खडकाळ ..पडिक ..नापिक जमीन कसुन त्यात पिक काढायला हाडाचा शेतकरीच हवा. ज्या लोकांना आपल्यावर अन्याय होतोय याची जाणीव नव्हती ..दोघे चौघे एकत्र येवून काही सार्वजनिक काम करायचे असते याची जाणीव नव्हती त्यांना एकजुट आणि जागृत करुन मोठी चळवळ उभी करणे किती कठिण काम असेल ?
     नवीन पिढीचा गांधींवर टीका करणे हा आपण हिंदुत्ववादी, क्रांतिकारी वगैरे असल्याचे भासवण्याचा इंडिकेटर बनला आहे. पैकी क्वचितच कोणी गांधीजींएवढा सर्व धर्मांचा अभ्यास केला असेल. ही गांधीविरोधी मते एका अपरिपक्व वयात विशिष्ट प्रचारकी साहित्यामुळे बनतात. आणि जस जस आपण गांधी वाचत जातो आणि परिपक्व होत जातो (कदाचित दोन्ही एकच ) तस तस गांधीद्वेषी लोकांचा ढोंगीपणा, खोटेपणा समजत जातो.
     कदाचित बहुसंख्य लोकांच्या जीवनात हे संक्रमण येत असावे. मी ही एकेकाळी या विचारांच्या प्रभावाखाली होतो. आणि सांगायला खेद वाटतो की गांधीजींना शिव्या घालायचो अगदी.
     जो सत्याचे प्रयोग अथवा इतर गांधी वाचेल आणि जो स्वत:शी प्रामाणिक आहे तो गांधीवादी झाल्याशिवाय राहणार नाही. किमान तो गांधीविरोधी तरी खचितच राहणार नाही हे मात्र निर्विवाद सत्य आहे.
©सुहास भुसे


No comments:

Post a Comment