About

Thursday 12 November 2015

बळीचे राज्य येवो

शेतकऱ्याचा बलवान, शीलवान आणि लोककल्याणकारी राजा बळी आणि भिक्षुक बटू वामन यांची मिथककथा ही मिथककथा नसून मिथ्या, संदर्भहीन, अतार्किक व प्रक्षेपित कथा असली तरी आधुनिक काळात मात्र ती चपलख लागू होते.

     शेतकऱ्याला बळीराजा म्हणून संबोधले जाते तेव्हा त्या प्राचीन, महान राजाच्या तेजस्वी परंपरेशी त्याचे नाते जोडले जाते. ‘बळीराजा’ ही त्याची आदर, सन्मान आणि अभिमानाची बिरुदावली आहे. पण आज मात्र या बळीराजाची आधुनिक वामन अवहेलना करत आहेत. त्याची कुचेष्टा, अपमान करण्याचा वामनांचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे.

     शेती आणि शेतकऱ्याकडे पाहण्याचा हा बदललेला दृष्टीकोन सर्वाधिक चिंतेची बाब आहे. शेतीसाठी इतर उद्योगांप्रमाणे सुविधा भांडवल व संरक्षण न पुरवणे, दूरगामी उपाययोजनांची बोंब,  मार्केटिंग मध्ये होणारी त्याची लुट या गोष्टींमुळे संपन्न आणि समृद्ध बळीराजा नागवला जात आहे. याची चिंता तर करायला हवीच पण जे वामन त्याच्या टाळूवरचे लोणी लुटून ओरबाडून खातात तेच त्याला भिकारी समजत आहेत. या आधुनिक वामनांचे प्रबोधन करण्याचे काम ज्याला शेतीतले किमान ज्ञान आहे किंवा ज्याच्या किमान मागच्या पिढीने शेती केली आहे अश्या प्रत्येकाने आवर्जून आणि प्राधान्याने हाती घ्यायला हवे.

-बळीराजाला एक सत्ताधारी आधुनिक वामन भिकारी, फुकटे म्हणतो.
-एक वामन त्याचा आक्रोश म्हणजे बळीराजाची बोगस बोंब आहे म्हणतो.
-एक वामन बळीराजा लफडेबाज रंडीबाज असतो म्हणतो.
-एक वामन बळीराजा भेकड, नपुंसक असतो म्हणून आत्महत्या करतो म्हणतो.
-एक वामन बळीराजा कर्जबाजारीपणामुळे नव्हे तर प्रेमप्रकरनांमुळे आत्महत्या करतो म्हणतो.

     रोज बरोज अशी विधाने ओकून या वामनांच्या झुंडीने बळीराजाच्या जगण्याचा तर जगण्याचा पण त्याच्या मरण्याचा देखील विनोद बनवून ठेवला आहे. या वामनांचे प्रबोधन व्हायला हवे. शेती काय चीज आहे हे त्यांना AC मधून बाहेर खेचून रानात उन्हांतान्हात नांगर चालवायला लावून समजून द्यायला हवे. किती अपार कष्टांच्या मोबदल्यात ही काळी आई बळीराजाच्या पदरात मोत्याचे दान टाकते आणि ते मोती हे वामन कसे फुकापासरी लुबाडतात याची जाणीव करून द्यायला हवी. या देशात श्रमप्रतिष्ठेची बूज राखली गेली नाही तर हे आधुनिक वामन या बळीराजाला खरोखर पाताळात गाडल्याशिवाय राहणार नाहीत.

     आजच्या बळीप्रतिपदेच्या दिवशी या विश्वनियंत्याच्या चरणी हजारो वर्षापासून मागितले जाणारे मागणे मागण्याची इतकी गरज आहे जितकी या आधी कधीही नव्हती.

“इडा पीडा टळो...बळीचे राज्य येवो.”

©सुहास भुसे.


No comments:

Post a Comment