About

Saturday, 20 October 2012

चार्वाक दर्शन २ : प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी तत्वज्ञ -चार्वाक



चार्वाक हे कोणी एक व्यक्ती होते कि ती एक उपाधी होती कि जडवादी परंपरेतील सर्वच अनुयायांना चार्वाक म्हणत असत याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. पण हे चार्वाक दर्शन हिंदू परंपरेत सर्वात जास्त महत्वाचे गणले गेले आहे आणि इतर कोणत्याही तत्वज्ञानाची झाली नाही इतकी चार्वाक तत्वज्ञानाची चर्चा हिंदू धर्मशास्त्रात झाली आहे. चार्वाकांचे तत्वज्ञान हे देव आणि धर्म यांच्या नावावर लोकांचे शोषण करणा-यांसाठी इतके धोकादायक होते कि नंतरच्या काळातील जवळ जवळ सर्व विचारधारांना चार्वाक मताचे खंडण करणे महत्वाचे वाटले आहे. उपनिषदे ,बादरायणाची ब्रह्मसूत्रे आदी अनेक ग्रंथात चार्वाक मताचे खंडन केले गेले आहे. साधारणत: इ.स. ६ व्या शतकापर्यंत चार्वाक मतावर खंडण-मंडनाची ही परंपरा सभ्य आणि सुसंस्कृत चाकोरीतून गेलेली दिसते. त्याचे खंडन करण्याचा प्रयत्न करणारांनी देखील चार्वाक विचारांचा सन्मानच केलेला दिसतो.

महाभारतातील वनपर्वात द्रौपदी एक जुनी आठवण सांगताना म्हणते कि माझ्या पित्याने मला चार्वाक दर्शनाचे शिक्षण देण्यासाठी ह्या तत्वज्ञानातील अधिकारी व्यक्तीची नियुक्ती केली होती. आता राजा द्रुपदासारखा एक तात्कालिक मान्यवर राजा आपल्या कन्येला शिक्षण देण्यासाठी चार्वाक संप्रदायाच्या गुरुची निवड करतो म्हणजे त्या काळात चार्वाक परंपरा निश्चितच प्रतिष्ठित आणि लोकमान्य राहिलेली असणार. पाणिनीने चार्वाक दर्शनाला अन्विक्षकी शास्त्रात स्थान दिले आहे. कृषी ,उत्पादन ,ऐहिक जीवन ,अर्थ अशी जीवनस्पर्शी शास्त्रे अन्विक्षकी शास्त्रात येतात. यावरूनही आपल्याला चार्वाक दर्शनाचे तात्कालिक महत्व लक्षात येते. आद्य शंकराचार्यांनीदेखील चार्वाक दर्शनाचा सन्मानच केला आहे. शंकराचार्य म्हणतात की चार्वाकमत हे  सर्वसामान्य जनतेचे मत आहे.  शंकराचार्यांचा समकालीन असलेला जैन विचारवंत हरिभद्र म्हणतो, इंद्रियांच्या प्रत्ययाला येणारे जगत् व पदार्थसमूह म्हणजे लोक. हा लोक ज्या तत्वज्ञानाचा आधार आहे ते म्हणजे लोकायत. कौटिल्याने त्याला आपल्या तर्कशास्त्रात स्थान दिले आहे.  या सर्व संदर्भांवरून असे लक्षात येते साधारण यापूर्वीच्या सर्व विचारवंतांना चार्वाकांचे विचार मान्य होते. मात्र इ.स ६ व्या शतकानंतर मात्र या विचारांची टवाळी सुरु होऊन हे विचार दाबण्याचा प्रयत्न झाला. 



Dropadi by Raja Ravivrma


चार्वाकांचे तत्वज्ञान


चार्वाक प्रत्यक्ष हेच प्रमाण मानतात. जी गोष्ट दिसत नाही वा जिचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही अशी कोणतीही गोष्ट मान्य करण्यास त्यांचा कडवा विरोध आहे. तात्कालिक धर्म परंपरा ही मोक्ष ,मुक्ती ,स्वर्ग अश्या कल्पनांच्या मागे धावत होती. उपवास ,व्रतवैकल्ये ,जपजाप आणि कडक कर्मकांड ... आणि एकूणच शरीराला कष्टवणारी धर्मसाधना म्हणजेच धर्माचरण असा लोकांचा समज करून देण्यात आला होता. अशी कडकडीत साधना करणे वा इंद्रियनिग्रह म्हणजे स्वर्गात आपली जागा राखून ठेवण्याचा राजमार्ग. चार्वाकांना मृत्यनंतरच्या तथाकथित सुखांसाठी जीवनाकडे पाठ फिरवणारी ही फोल विचारसरणी अमान्य होती. त्यांनी आत्म्याचे अस्तित्व अमान्य केले. स्वर्ग-नरक असल्या कल्पनांना केराची टोपली दाखवली. मृत्यू म्हणजेच मुक्ती हे तत्वज्ञान त्यांनी मांडले.

चैतन्य हा आत्म्याचा गुण आहे. तथापि आत्मा नावाची कोणती गोष्ट अस्तित्वात असल्याचे प्रमाणासहित सिद्ध करता येत नाही . त्यामुळे अंतत: हा शरीराच गुण होतो. शरीर संपले कि चैतन्य संपले. सारे काही संपले. याची सिद्धता त्यांनी तीन प्रकारे मांडली.

१)     तर्क
२)    अनुभव
३)    आयुर्वेद शास्त्र


तर्क – चार्वाक मानतात कि शरीर जोवर असते तोवरच त्यात चैतन्य खेळत असते. जेव्हा शरीर नष्ट होते तेव्हा हे चैतन्य कोठे दिसत नाही वा त्याचे मृत्यूपश्चातचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. या अनुषंगाने पाहीले असता शरीर हाच आत्म्याचा एकमेव आधार आहे अर्थात आत्मा म्हणजेच शरीर.


अनुभव- मी स्थूल आहे, मी दुर्बल आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी निष्क्रीय आहे, मी ताकदवान आहे, असे अनुभव आपल्याला पावला-पावलाला येत असतात. स्थूलता-दुर्बलता इत्यादी शरीराचे धर्म आहेत आणि ‘मी’ देखील शरीराचाच धर्म आहे. पर्यायाने आत्मा म्हणजेच शरीर.


आयुर्वेद शास्त्र- ज्या प्रकारे गुळ आणि मोहरी यांच्या मिश्रणात कालांतराने विशिष्ट परीस्थितीमुळे मादक गुणधर्म तयार होतात, ज्याप्रमाणे दही, पिवळी माती आणि शेण यांच्या मिश्रणात कालांतराने विंचू उत्पन्न होतात, ज्याप्रमाणे कात, चुना, सुपारी, पान यांचे सुयोग्य मिश्रण मुखात लालीमा उत्पन्न करते त्याचप्रमाणे चार महाभूतांचे विशिष्ट मिश्रण विशिष्ट परिस्थितीमध्ये चैतन्याच्या निर्मितीस कारणीभूत होते. चार्वाक हे फक्त पृथ्वी, तेज, जल, वायू ही चार महाभूते मानतात. आकाश हे महाभूत आहे हे त्यांना मान्य नाही. इथे निर्दिष्ट करण्याची बाब म्हणजे चार्ल्स डार्विन ने सजीवांच्या उत्पत्तीचे हेच कारण आपल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतांत मांडले आहे. विशिष्ट पोषक परिस्थितीत सजीवांची उत्पत्ती झाली हा त्याचा सिद्धांत चार्वकांनी फक्त काही हजार वर्षापूर्वी या भारतभूमीत मांडला होता. इथेच त्यांचे श्रेष्ठत्व आणि वैज्ञानिक दृष्टीकोन अधोरेखित होतो.
    
हे अंतर्गत घटकांचे प्रमाण बिघडले कि शरीरात निर्माण झालेले हे चैतन्य नाश पावते, देह-आकार नष्ट होतात हाच मृत्यू. आत्मा हा शरीराहून वेगळा आहे, तो या देहात येतो जातो असे मानणे वेडगळपणाचे आहे असे चार्वाकांचे स्पष्ट मत आहे.


आकारामुळे निराकाराचा भास होतो. वस्तुत: निराकार असे काही नाही. फक्त आकारच आहे. उदा अचानक उमटलेल्या ध्वनिमुळे आधी शांतता होती असा भास होतो. शांतता असे काही नसते.

चारी पुरुषार्थात मोक्ष हा पुरुषार्थ सर्व श्रेष्ठ मानला जातो. चार्वाकांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ मान्य नाहीत. ते फक्त अर्थ आणि काम हे दोनच पुरुषार्थ मानतात. धर्म आणि मोक्ष यांना चार्वकांनी बाद ठरवले आहे. पण धर्माला नाकारताना ते पारलौकिकाचे फळ देणारे साधन आहे म्हणून तो नाकारला आहे . चार्वाकी विचारसरणीला पारलौकिकाचे वावडे आहे.



यज्ञ म्हणजे वेळ आणि द्रव्य यांचा अपव्यय, एक व्यर्थ कर्मकांड असे चार्वाक मानतात. चातुर्वण्य व्यवस्थेला देखील चार्वकांनी कडवा विरोध केला. कथित ऐतिहासिक रित्या येणारी वंशशुद्धी आणि तिच्यामुळे येणारा अहंकार यावर चार्वकांनी कठोर टीका केली. वंश शुद्धी ही वस्तुस्थिती नसून एक आभास आहे. समाजातले आपले उच्च स्थान टिकवण्यासाठी केलेला अपप्रचार आहे असे चार्वाक मानतात.







चार्वाकांविषयी केल्या गेलेल्या अपप्रचारामुळे चार्वाक हे अयोग्य आणि अनीती पसरवणारे तत्वज्ञान सांगतात अशी अनेकांची समजूत झालेली दिसते. तथापि चार्वाक कोणतीही अयोग्य गोष्ट सुचवत नाहीत. उलट चोरी, मद्यप्राशन, पशुहत्या, हिंसा इत्यादी गोष्टींचा त्यांनी धिक्कार केला आहे.  धर्माच्या नावाखाली लोकांचे शोषण करणारे पुरोहित हे चार्वाकांचे खरे टीकाविषय आहेत. लोकांचे रक्त पिवून जगणा-या असल्या लोकांचा त्यांना प्रचंड तिटकारा आहे. माणसाने लबाडी करू नये, कोणाचे शोषण करू नये, आयत्या पिठावर रेघोट्या ओढू नयेत. कष्ट करावे, शेती करावी, प्रामाणिक पणे श्रम करून अर्थार्जन करावे आणि काव्य संगीत कला नृत्य यांचा आस्वाद घेत सुखनैव जीवन कंठावे असा रोकडा सल्ला ते सामान्यांना देतात. दंडनिती, राजकीय स्थैर्य यातून लोक नियंत्रण करीत शासकांनी स्वार्थ बुद्धी त्यजून लोकांचे आणि एकूणच समाजाचे हित साधावे असे ते सुचवतात.

       कृषीगोरक्ष वाणिज्यदंडनित्या दिभी: बुधै :
एतेरैव सदोपायैतुर्भोगाननुभवेदृवि


(क्रमश:)

-सुहास भुसे

Tuesday, 16 October 2012

चार्वाक दर्शन : कर्मकांड आणि धार्मिक शोषणावर करडा प्रहार

साधारणत: इसवी सनाच्या सहाव्या शतकापर्यंत भारतीय धर्म परंपरा अतिशय उदार राहिलेली आहे. अनेक धार्मिक विचारधारा अतिशय प्राचीन काळापासून इथे उदयास आल्या, विकसित झाल्या . काही काही कालखंडात तर एकाच वेळी भिन्न भिन्न परंपरा आणि धर्म इथे एकाच वेळी नांदत असलेले दिसून येतात. या वैचारिक परंपरा एकमेकांच्या विचारांचे खंडणमंडन करीत असलेल्या दिसतात. यातील बहुधा सर्व वैचारिक आणि धार्मिक परंपरांचे अनेक ग्रंथ आणि वाङमय उपलब्ध आहे. वेदांहून वेगळा विचार करणारी अनेक दर्शन शास्त्रे आहेत. त्यांची विचारधारा स्पष्ट करणारे देखील अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. सामान्यत: आपली धार्मिक परंपरा उदार राहिलेली आहे. एका धर्माने दुस-या धर्माचे किंवा एका विचारपरंपरेने दुस-या विचारपरंपरेचे ग्रंथ वाङमय जाळून नष्ट केल्याचा रानटी प्रकार आपल्याकडे किमान इ स ६ व्या शतकापर्यंत तरी दिसून येत नाही.


याला अपवाद एकमात्र विचारधारेचा, लोकायत दर्शन किंवा चार्वाक दर्शन.

चार्वाक दर्शन जे लोकायत दर्शन म्हणूनही ओळखले जाते त्याचा एकही ग्रंथ आज उपलब्ध नाही. अभ्यासूंना चार्वाक दर्शन शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उपनिषदादी ग्रंथात त्याच्यावर केलेल्या टीकेवर विसंबून त्याचा अभ्यास करावा लागतो. चार्वाक दर्शनाचा एकही ग्रंथ उपलब्ध नसण्याचे गौडबंगाल काय असावे बुवा? सर्वसमावेशक अश्या उदार भारतीय धार्मिक परंपरेला चार्वाक दर्शनाचे ग्रंथ नष्ट करण्याची काय गरज भासली असावी? हे कोणाचे कारस्थान असावे ? या प्रश्नांच्या संभाव्य उत्तरांचा आणि चार्वाक दर्शनाच्या विचारधारेचा वेध घेऊ या नव्या लेखमालेतून.



             



चार्वाक मुनी हे सामान्यत: नास्तिक आणि भोगवादी विचारधारेचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांची ही ओळख विकृत आहे आणि वैदिक धर्ममार्तंड महाब्राह्मणांनी  हेतुपुरस्पर निर्माण केलेली आहे. त्यांचे तत्वज्ञान त्याहून कितीतरी व्यापक आणि बहुधा वेदांहूनही प्राचीन आणि पुरातन आहे. तसे पाहू जाता इतर सर्व दर्शनशास्त्रांमध्ये जन्म-बंधन-मोक्ष यांचे महत्व तर आहे पण ईश्वर किंवा देव या संकल्पनेचे निर्णायक महत्व नाही. जसे आपणास मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्मात दिसते. सांख्य दर्शन तर देवाचे अस्तित्वच अमान्य करते तथापि त्यांना नास्तिक म्हटले गेलेले नाही. सांख्य ,न्याय ,वैशेषिक ,मीमांसा ,वेदांत ,शीख ,नाथपंथी ,या आणि भारतीय परंपरेतील एकूण एक विचारधारा या आस्तिक सदरात मोडतात. मग स्वत:ला भारतीय परंपरेचे उत्तराधिकारी म्हणवून घेणा-यांनी चार्वाक दर्शन शास्त्राला नास्तिक का म्हटले असावे? याचे एक प्रमुख कारण म्हणजे चार्वाकांनी केलेली वेदांची निंदा. इतर कोणत्याही विचारधारेने वेदांची निंदा केलेली नाही.

नास्तिको वेदनिन्दक:’ 

अर्थात जो वेदांची निंदा करतो तो नास्तिक. आणि चार्वकांनी तर वेदांना धूर्त आणि लबाड लोकांचे षडयंत्र म्हटले, राक्षसांची व्यर्थ बडबड देखील म्हटले. अब्राह्मण अब्राह्मण !! हे तर मोठेच महापाप झाले कि राव मग ! यामुळेच चार्वाकांना नास्तिक ठरवले गेले. वस्तुत: भारतीय तत्वज्ञानाचा कोणताच ग्रंथ निर्भेळ राहिला आहे यावर माझा विश्वास नाही. वेद म्हणजे ज्ञानाचा धबधबता प्रवाह. निसर्गातील विविध चमत्कारांना देवतास्वरूप मानून त्यांच्यावर रचलेल्या पवित्र ,उत्फुल्ल ऋचांचे संकलन आहे. वेद म्हणजे त्याकाळच्या वैदिक समाजाचा आरसा आहेत. तथापि वेदांचे निर्भेळ आणि शुद्ध स्वरूप कालौघात तसेच टिकून राहिले असेल याची अजिबात शाश्वती नाही. अनेक स्वार्थी आणि लबाड लोकांनी देव आणि धर्म यांच्या नावावर लोकांचे शोषण करण्यासाठी त्यात भेसळ केली आहे. आणि चार्वाक तर समाजातील धर्माच्या नावावर आपली पोळी भाजून घेणा-यांचे कट्टर दुश्मन. त्यांच्या तोंडी हे श्लोक धर्माच्या ठेकेदारांनी घुसडले असण्याची दाट शक्यता आहे. हे धर्म मार्तंड स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि समाजातील आपले उच्च स्थान अबाधित राहावे यासाठी नीच पातळीवर जाऊन इतिहास-पुराणांची मोडतोड कशी करत असत याचे अनेक दाखले आणि पुरावे आता हाती लागत आहेत. चार्वाकांच्या एका श्लोकाचे उदाहरण धर्माच्या दलालांच्या हरामखोरीचे उदाहरण म्हणून पुढे देत आहे.


चार्वाकांचा हा श्लोक अतिशय सुप्रसिद्ध आहे. किंवा कुप्रसिद्ध आहे म्हटले तरी चालेल. याच श्लोकाचा आधार घेऊन त्यांना भोगवादी ठरवण्यात आले. खर तर इतके तर्कशुद्ध आणि जीवनाचे यथार्थ नीतीमान तत्वज्ञान रचणारा विद्वान असे बेजबाबदार विधान करेल हेच मुळात शंकास्पद आणि हास्यास्पद आहे. पण कुटील ब्राह्मणांनी त्या श्लोकाची मोडतोड करून चार्वाकांना कसे बदनाम केले आहे पहा.

तो श्लोक ज्या रुपात प्रसिद्ध आहे तो असा-

यावज्जीवेत्  सुखंजीवेत् ऋणंकृत्वा घृतंपिवेत्।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुत:।

याचा अर्थ असा कि जोवर जीवन आहे तोवर सुखात जगा. खा ,प्या ,ऐश करा. ऋण काढून तूप प्या. ऋण परत फेडण्याची चिंता करू नका. मानवी शरीर नश्वर आहे. एकदा मेल्यानंतर पुन्हा इथे येणे कोठले?

याच श्लोकाच्या आधारे चार्वाकांचे जडवादी तत्वज्ञान भोगवादी आणि चंगळवादी ठरवण्यात आले. चार्वकांनी वस्तुत: नीतीमान समाजव्यवस्था कशी असावी याविषयी आपल्या तत्वज्ञानात खूप उहापोह केला आहे. असले समाजात अनीती पसरवणारे विधान असला महान तार्किक विचारवंत करू शकेल का? नवव्या शतकात होऊन गेलेल्या जयंत भट्ट या चार्वाक परंपरेतील महान चार्वाकाच्या ग्रंथात हा मूळ श्लोक पुढील प्रमाणे येतो.


यावत् जीवेत् सुखम् जीवेत्, नास्ति मृत्युः अगोचरः,
भस्मिभूतस्य देहस्य पुनरागमनम् कृतः 


यातील ‘नास्ति मृत्यू: अगोचर’ हा चरण गाळून तिथे ‘ऋणकुत्वा घृतपिवेत’ या ओळी घुसडून हा श्लोक आणि त्यामागचा विचार विकृत स्वरुपात लोकांपुढे आणण्यात आला. आणि याचा परिणाम म्हणजे आता चार्वाक म्हटल कि त्यांचा हा भेसळयुक्त श्लोक लोकांना लगेच आठवतो. अशी किती पौराणिक गोष्टींची मोडतोड करून हिंदू धर्माचे किती अपरिमित नुकसान हिंदू धर्माला स्वत:ची जहागीर समजणा-यांनी केले असेल याची आपणास उपरोक्त उदाहरणावरून कल्पना येऊ शकेल.


     हे वैदिक लोक चार्वाकांना इतके का घाबरत होते? अस काय तत्वज्ञान होत चार्वाकांच? 

     चार्वाक हे प्रत्यक्षाला प्रमाण मानणारे विचारवंत होते. प्रत्याक्षावरून काढले जाणारे अनुमान देखील त्यांनी प्रमाण मानले होते. त्यांनी महत्वाची मानलेली ही दोन प्रमाणे तर आजच्या प्रगत विज्ञानाची दोन महत्वाची प्रमाणे आहेत. प्रत्यक्ष आणि प्रमाण या दृष्टीने चार्वाक हे पहिले वैज्ञानिक विचारांचे तत्वज्ञ ठरतात. (तथापि नेहमी महापुरुषांची कुत्सित चेष्टा करण्याची पुरातन सवय असणा-यांनी चार्वाक समोर असेल तर त्याची बायको सधवा आणि तो डोळ्याआड झाला कि विधवा ,अशी बोचरी टीका त्याच्यावर केली.)


चार्वाकांची विचारसरणी संक्षेपात पुढील प्रमाणे –

१)     जे प्रत्यक्ष आहे तेच प्रमाण.
२)   आत्मा आणि देह वेगळे नाहीत अर्थात देह संपला कि आत्मा संपला. देहातील चैतन्य म्हणजेच आत्मा. ( A body with soul is consciousness)
३)   मृत्यू म्हणजेच मोक्ष. ( Death is a salvation )
४)   न स्वर्ग आहे, न नरक आहे ,न अंतिम मोक्ष ,न शरीपासून वेगळा आत्मा, न चार आश्रमी व्यवस्थेचे कोणते कर्म फळ मिळते.

त्यांच्या विज्ञाननिष्ठ विचारसरणी विषयी अधिक विस्तृत पणे जाणून घेऊया पुढील लेखात.

                             -सुहास भुसे
                             (रोखठोक साठी)