About

Thursday 6 April 2023

गोष्ट छोटी डोंगराएवढी

 बागेच्या फौंडेशन साठी दगडांची गाडी आली होती. गड्यानी अर्धी गाडी खाली केली व थोडा विसावा केला. जवळच ऊसाचा एक ट्रेलर सोडून ट्रॅक्टर दुसरा ट्रेलर आणायला गेला होता. दोघा तिघांनी ऊस काढून खायला सुरवात केली. अर्धेअधिक खाल्ले तोवर मुकादम म्हणाला चला उठुया.


एकाने उरलेला ऊस ट्रेलर मध्ये मोळीत खोवुन ठेवला व दुसऱ्यांनाही सांगितलं. बाबांनो शेतकऱ्याच्या चार कांड्यांची नासाडी करू नका. आधीच बिचाऱ्यांना काही राहत नाही. दुसऱ्या गड्यानी त्याला दुजोरा देत आपापल्या उरलेल्या कांड्या मोळीत नीट बसवुन दिल्या.


अगदी छोटीशी गोष्ट. पण त्या मागची भावना मनाला स्पर्श करून गेली. ज्याची शेतीशी असलेली नाळ तुटलेली नाहीय त्या प्रत्येकाची या कठीण काळात शेतकऱ्यांप्रति सद्भावनाच आहे.


हां .. आता परवडत नसेल तर करू नका शेती म्हणणारेही आहेत. पण कशी सोडावी शेती?


परवडेल किंवा न परवडेल. शेतकरी कर्जबाजारी होईल. पण शेती सोडणार नाही. भांडवलशाहीच्या युगात इतर व्यवसायांसारखा शेती हा ही एक व्यवसायच समजला जातो.  


पण शेती हा आमचा व्यवसाय नाही तर ती आमची संस्कृती आहे. आमची जीवनपद्धती आहे. आमचा धर्म आहे. आमचे सगळे कुलाचार, रीतीभाती, सण समारंभ शेतीच्या चक्रावरच उभे आहेत. आमच्या हजारो पिढ्या, वाडवडील जगले तसेच आम्हीही जगत राहू.. विकता न आलेली पिके मोत्यासारखी फुलवत राहु.


शेती सोडणं म्हणजे जगणंच सोडणं !!!!

No comments:

Post a Comment